गोंदिया,
दि.22 : जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी,
असे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
शासनाच्या निर्णयानुसार ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्ह्यातील हजारो
पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, लाभ मिळण्यासाठी काही आवश्यक अटी व
प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सदर
योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सहकारी बँकेचे 20,915 शेतकरी यासाठी पात्र आहेत.
सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार
प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच सर्व
शेतकऱ्यांनी ‘अॅग्रीस्टॅक’ (Agristack) अंतर्गत नोंदणी व प्रमाणीकरण करून घ्यावे.
ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते एकमेकांशी लिंक नाहीत, त्यांनी तात्काळ
संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे.
यासोबतच,
वरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सहकारी संस्था, आपले
सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा. योजनेच्या
अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास तालुकास्तरीय तक्रार निवारण
समितीकडे दाद मागण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शासनाने
निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यासच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ
मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी विलंब न करता
आवश्यक बाबी पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment