जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Tuesday, 30 June 2026
मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात;नागरिकांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
विकसित भारत जी राम जी अभियानांतर्गत सावरी ग्रामपंचायतीची वृक्ष लागवड कामाची शुभारंभाकरीता निवड
गोंदिया,
दि.30 : भारत सरकारद्वारे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)
व्हीबी जी राम जी अधिनियम 2025 मंजूर केले असून, सदर अधिनियम सद्यस्थितीत
अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम
(MGNREGA) एैवजी अस्तीत्वात येत असून दि.1 जुलै 2026 पासून राज्यात सर्वत्र
अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दि.2 जुलै रोजी जिल्हास्तरीय
जनसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्ह्यात भारत सरकारद्वारे
विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) व्हीबी जी राम जी अधिनियम 2025
मंजूर केले असून गोंदिया तालुक्यात ग्रामपंचायत सावरी या ग्रामपंचायतीची निवड
करण्यात आली असून वृक्ष लागवड या कामाचे दि.2 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी मंदार
पत्की यांच्या हस्ते सावरी येथे वृक्षारोपण होणार आहे. असे उपजिल्हाधिकारी (रोहयो)
भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविले आहे.
0000000
नागरिकांच्या सर्वंकष विकासासाठी अचुक आकडेवारी महत्वाची - उपायुक्त सुनिल धोंगडे
राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा
गोंदिया, दि.30 :
योग्य नियोजन, प्रभावी निर्णय आणि नागरिकांच्या सर्वंकष विकासासाठी अचुक आकडेवारी
महत्वाची असते, असे प्रतिपादन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त सुनिल धोंगडे
यांनी केले.
येथील जिल्हा सांख्यिकी कार्यालयात सोमवारी
20 वा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी
डॉ.रुपेश राऊत, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, एनएमडी
महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.अलका पाटील उपस्थित होत्या.
उपायुक्त श्री. धोंगडे म्हणाले, भारतीय
सांख्यिकी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि सांख्यिकीचे जनक प्रा. प्रशांत चंद्र
महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 जून रोजी ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’
साजरा केला जातो. राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये
सांख्यिकी विज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करणे तसेच देशाच्या विकासासाठी अचूक माहिती,
आकडेवारी आणि डेटा यांचे महत्व अधोरेखित करणे हा आहे. देशाच्या विकासासाठी अचुक
डेटा, वैज्ञानिक विश्लेषण आणि प्रभावी नियोजन आवश्यक आहे. राष्ट्राच्या उभारणीत
सांख्यिकीय आकडेवारीचे खुप महत्व आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राध्यापिका डॉ.पाटील म्हणाल्या,
देशातील 140 कोटी जनतेला मोजणे म्हणजे सोपे काम नाही. अचुक माहिती गोळा करुन ती
शासनाकडे पाठविली जाते, असे उदाहरण देऊन त्यांनी समजावून सांगितले. प्रा. प्रशांत
चंद्र महालनोबिस यांनी भारतातील आधुनिक सांख्यिकी व्यवस्थेच्या विकासात मोलाचे
योगदान दिले. त्यांच्या संशोधनामुळे आणि कार्यामुळे देशात डेटा संकलन, विश्लेषण
आणि नियोजन प्रक्रियेला वैज्ञानिक आधार मिळाला. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या
धोरणांची आखणी करताना सांख्यिकीचा प्रभावी वापर करण्याची दिशा त्यांनी दाखवून
दिली. शासन, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये घेतले जाणारे अनेक
महत्वाचे निर्णय विश्वासार्ह आकडेवारीवर आधारित असतात, असे त्या म्हणाल्या.
डॉ. राऊत म्हणाले, आकडेवारी ही केवळ
संख्या नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. योग्य आकडेवारीमुळे नियोजन, धोरणनिर्मिती
आणि प्रगतीचा मार्ग सुकर होतो. सांख्यिकी हे संशोधन, अर्थव्यवस्था, शासन आणि
समाजासाठी एक प्रभावी साधन आहे. अचुक माहिती, अचुक विश्लेषण आणि अचुक निर्णय हेच
प्रगतीचे मार्ग आहे. सांख्यिकी दिन हा अचुक माहिती आणि आकडेवारीच्या आधारे अधिक
सक्षम आणि प्रगत भारत घडविण्याचा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले.
श्रीमती निमसरकर म्हणाल्या, दैनंदिन
जीवनात सांख्यिकी आकडेवारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या डिजिटल युगात डेटा हा
विकासाचा महत्वाचा पाया मानला जातो. लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, कृषी, आरोग्य आणि
पायाभूत सुविधा यासारख्या विविध क्षेत्रातील माहितीचे विश्लेषण करुन शासन आणि
धोरणकर्ते अधिक प्रभावी निर्णय घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रा.
प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन
करण्यात आले.
कार्यक्रमास सहायक संशोधन अधिकारी
तुलसीदास झंझाड व कमलाकर गावनेर, सांख्यिकी सहायक उत्तम साकोरे, राहूल राऊत,
कृपाली राऊत, देवेंद्र डोरलीकर, गौतम शहारे, तसेच विपुल फरतडे, प्रशांत प्रेमलवार,
मुकेश सोरले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवेंद्र डोरलीकर यांनी केले,
तर उपस्थितांचे आभार कमलाकर गावनेर यांनी मानले.
00000000
Monday, 29 June 2026
गोंदिया जिल्ह्यात ३० जूनला ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा होणार
मंदार पत्की यांनी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सुवर्णसंधी ; जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ उचलावा : जिल्हा कृषी अधीक्षक यांचे आवाहन
महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार
गोंदिया जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेला गती : जिल्हास्तरीय समितीची स्थापना
Sunday, 28 June 2026
गोंदिया: बाई गंगाबाई रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे दिमाखात उद्घाटन
कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
Saturday, 27 June 2026
२८ जून रोजी प्रत्येक बालकाला पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजून पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला बळ द्या!
२८ जून रोजी प्रत्येक बालकाला पोलिओचे ‘दोन थेंब’
पाजून पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला बळ द्या!
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी जिल्हा परिषद
अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर व उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे यांचे पालकांना कळकळीचे
आवाहन
गोंदिया, दि. 27 जून : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या
यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २५ जून
रोजी जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री.
लायकरामजी भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २८ जून रोजी होणाऱ्या
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
तथा आरोग्य सभापती मा. श्री. सुरेशजी हर्षे यांनीही मोहिमेच्या प्रभावी
नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीत मार्गदर्शन करताना
अध्यक्ष श्री. लायकरामजी भेंडारकर म्हणाले की, भारताने पोलिओमुक्त देशाचा मान
मिळवला असला तरी जगातील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचा धोका कायम आहे. त्यामुळे
हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे
वयोगटातील प्रत्येक बालकाला २८ जून रोजी पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत.
पोलिओमुक्त भारत कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही राष्ट्रीय जबाबदारी समजून
सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष तथा आरोग्य
सभापती श्री. सुरेशजी हर्षे यांनी आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत
सांगितले की, जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाडा तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागातील
बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पोलिओ बूथ, मोबाईल पथके आणि ट्रान्झिट पथकांची
प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये,
यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, तसेच लोकप्रतिनिधी,
ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी
या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत उपस्थित सर्व
मान्यवरांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, "२८ जून रोजी आपल्या घरातीलच
नव्हे तर शेजारील आणि नातेवाईकांच्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना
जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत. आपल्या मुलांचे
निरोगी भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही अत्यंत आवश्यक आणि जबाबदारीची बाब
आहे."
बैठकीस जिल्हा परिषदेच्या
सदस्यांमध्ये श्रीमती रचनाताई गहाणे, श्रीमती छायाताई नागपुरे, श्रीमती गीताताई
लिल्हारे, श्रीमती वैशालीताई पंधरे, श्रीमती सुधाताई रहांगडाले, श्री. प्रवीणजी
पटले, डॉ. भूमेश्वर पटले आणि श्री. रूपेशजी कुथे उपस्थित होते.
तसेच आरोग्य विभागाच्या
वतीने सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा हिवताप
अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. विजय आखाडे,
साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, श्री. मिलिंद नंदागवळी, श्री. प्रशांत खरात
तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी (THO) उपस्थित होते.
बैठकीत मोहिमेच्या यशस्वी
अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन, बूथ व्यवस्था, मोबाईल पथके, जनजागृती उपक्रम तसेच
दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपाययोजनांवर सविस्तर चर्चा
करण्यात आली. जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
00000
Friday, 26 June 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शाहू महाराजांनी अभूतपूर्व क्रांती घडविली - अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे
सामाजिक
न्याय विभागातर्फे सामाजिक न्याय दिन साजरा
गोंदिया, दि.26 : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अभूतपूर्व क्रांती घडवून समाजातील वंचित
घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी
अभिजित घोरपडे यांनी केले. त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची
जयंती सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण कार्यालय गोंदियाच्या वतीने सामाजिक
न्याय दिन म्हणून सामाजिक न्याय भवनात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून
सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त अनिल देशमुख, शुध्दोधन सहारे, सविता बेदरकर,
समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर, समाज कल्याण अधिकारी किर्तीकुमार कटरे व
समाजभुषण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. घोरपडे म्हणाले, राजर्षी छत्रपती
शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. शाहू
महाराज हे कृतीशील राजे होते. त्यांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी आणि समतेसाठी
अनेक कार्ये केली. त्यांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी खुप तळमळ होती, म्हणून
त्यांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. अनेक
गावांमध्ये त्यांनी शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत
त्या पालकांना प्रति महिना 1 रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली. समाजातील
दुर्लक्षित मागासवर्गीय दुर्बल घटकांच्याप्रती त्यांचा दृष्टीकोन विशेष सहानुभूती
व सुधारणावादी होता. त्यांचा आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा या दृष्टीकोनातून
त्यांचा जन्म दिवस 26 जून हा दरवर्षी ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात
येतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी समाजभुषण प्राप्त शुध्दोधन
सहारे, डॉ.सविता बेदरकर व सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त अनिल देशमुख यांनीही
आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी इयत्ता 10 वीत गोंदिया
जिल्ह्यातून प्रथम आलेली विद्यार्थीनी खुशी सुहास सुखदेवे व 10 वीत विभागीय
मंडळाच्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यप्राप्त अक्षरा शैलेंद्र कोल्हे, तसेच
इयत्ता 12 वीत देवरी तालुक्यातून प्रथम आलेला विद्यार्थी क्रिश मधुलाव चव्हाण व
तिरोडा तालुक्यातून प्रथम आलेली विद्यार्थीनी याशिका राजेश गुणेरीया, त्याचप्रमाणे
इयत्ता 10 वीत शासकीय निवासी शाळेतून प्राविण्यप्राप्त विद्यार्थी अक्षरा गोपीलाल
मेश्राम, तन्मय खेमराज साऊस्कार, आर्या प्रदिप वैद्य, संचित मोरेश्वर शहारे,
मोनिका रामकिशन देवांगण, रुतुजा अजय मेश्राम, कोमल लालचंद उके, दक्ष देवेंद्र
मेश्राम, हेमंत गोवर्धन लाडे, सिमरन रामेश्वर नंदगाये यांचा मान्यवरांच्या हस्ते
स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
तसेच राजेश दुलिचंद सेवतकर, प्रेमलाल
अंकुश बर्वे, लक्ष्मण बाबुलाल सेवतकर, देवराम तिलकचंद तांडेकर, मिलिंद कोविंदा
बिंझाडे, कल्पना माणिक बरियेकर, अभिमन मोतीराम बिंझाडे, धर्मेद्र ओमकार जगणे, नरेश
सुभाष बरैये, नरेंद्र कुंभारिया तांडेकर, सुजित विक्रम खरोले, विनोद भोजराज जगणे,
जितेंद्र रामु छिपे, तेजराम दुलीचंद भोंडेकर, संजय सुखदेव चवरे, मंगेश शिवराम
चौबे, अमित उमराव निकुरे, कपुरचंद शिवलाल कुलभजे, सुरेंद्र लकचंद कुलभजे, विरेंद्र
प्रेमलाल मोहबे, राजेश भरतलाल कनोजे, भिकु मेहतर गायकवाड या गटई कामगारांना मान्यवरांच्या
हस्ते पत्र्याचे स्टॉल वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण
सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले. सुत्रसंचालन प्रमोद गणवीर यांनी केले, तर
उपस्थितांचे आभार हेमंत घाटघुमर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी,
विद्यार्थीनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे व राजेश मुधोळकर, लक्ष्मण खेडकर, प्रकाश
मेश्राम अमित रंगारी, दिपक मेश्राम, पुष्पलता धांडे, आशिष जांभुळकर, पंकज काळे,
निशांत वाघमारे, मानिकराव इरले, गिरीधर गोबाडे, योगेश हजारे, निवेदिता बघेले,
विद्या मेश्राम, निवास सहारे व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0000000
Thursday, 25 June 2026
Wednesday, 24 June 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त २६ जून रोजी सामाजिक न्यायदिन कार्यक्रम
Tuesday, 23 June 2026
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्टार स्वयंरोजगार संस्थेद्वारे (RSETI) · गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार व्यक्तींसाठी" मोबाईल रीपेरिंग, पशू पालन-गाय, शेळी, कुक्कुट, सी. सी. टीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशन, मेहंदी आर्ट, पुरुष सलून उदयमी, महिला शिवणकला: टेलर, आणि ब्युटि पार्लर" या व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्टार स्वयंरोजगार
संस्थेद्वारे (RSETI)
·
गोंदिया
जिल्ह्यातील बेरोजगार व्यक्तींसाठी" मोबाईल रीपेरिंग, पशू पालन-गाय, शेळी,
कुक्कुट, सी. सी. टीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशन, मेहंदी आर्ट, पुरुष सलून उदयमी, महिला
शिवणकला: टेलर, आणि ब्युटि पार्लर" या व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण
गोंदिया,23 : भारत सरकार
ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतीना स्वायरोजगार
करण्यासाठी ज्ञान व कौशल्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने देशाच्या प्रत्येक जिल्हा
मुख्यालयाच्या ठिकाणी अग्रणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामीण स्वयरोजगार
प्रशिक्षण संस्था (RSETI) ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
गोंदिया जिल्ह्यामध्ये बँक
ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा बँकच्या वतीने ८/०. वाहने पॅलेस, हरिणखेडे पेट्रोल पंप
जवळ तिरोडा रोड, कुडवा, गोंदिया येथे २०११ पासून कार्यरत असून संस्थेने संस्थेने
आजपर्यंत 10391 युवक-युवतीना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी मिळालेल्या
प्रशिक्षणाच्या आधारे 7875 युवक-युवतीना रोजगार प्राप्त झालेला आहे. संस्थेच्या
माध्यमातून देण्यात येणारे प्रशिक्षण ही पूर्णपणे मोफत असून संस्थेमध्येच मोफत
निवास व भोजन, चहा, व नाश्ता ची सोय उपलब्ध करून दिली जाते. प्रशिक्षणादारम्यान
मोफत गणवेश, स्टेशनरी व प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले जात असून
प्रशिक्षणामध्ये संबंधीत व्यवसायाचे 75% प्रात्यक्षिक व 25% थेअरी प्रशिक्षण दिले
जाते. त्यासोबतच 21 व्या शतकाचे व्यावसायिक कौशल्य उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास
(एडप), संवाद कौशल्य, मार्केटिंग कौशल्य, डिजिटल कौशल्य, संगणक कौशल्य व पर्यावरण
कौशल्य अश्या प्रकारचे कौशल्य प्रशिक्षणार्थी मध्ये विकसीत करून त्यांना व्यवसाय
करन्यासाठी तय्यार केले जाते. जून महिन्यामध्ये पुढील प्रमाणे प्रशिक्षण आयोजित
करण्याचे निश्चित केले असून सर्वच प्रशिक्षणार्थींची संख्या 35 इतकी आहे.
1 सामान्य उद्योजकता (पशू
पालन-गाय, शेळी, कुक्कुट), प्रशिक्षणाचा कालावधी०६ दिवस, १८ ते २३ जूनपर्यंत, 2
मोबाइल रीपेरिंग सी. सी. टीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशन प्रशिक्षणाचा कालावधी३०
दिवस, २५ जून ते 25 जुलैपर्यंत, 3
सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन प्रशिक्षणाचा कालावधी, 13 दिवस, 4 ते 17 जुलैपर्यंत. 4 सामान्य
उद्योजकता (मेहंदी आर्ट) प्रशिक्षणाचा कालावधी०६ दिवस, 1 ते 5 जुलैपर्यंत. 5 पुरुष
सलून उद्यमी प्रशिक्षणाचा कालावधी 30 दिवस, 16 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत महिला
शिवणकला टेलर या प्रशिक्षणाचा कालावधी 31 दिवस असणार आहे, 25 जुलै ते 25
ऑगस्टपर्यंत. 6 ब्युटी पार्लर, 35 दिवस कालावधी असून या अभ्यासक्रमाची सुरुवात एक
ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.
वरील प्रशिक्षण हे ग्रामीण
भागातील 18 ते 45 वयोगतील बेरोजगार युवक व युवतीसाठी निशुल्क असून
प्रशिक्षणार्थीसाठी संस्थेमध्ये मोफत राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध असणार आहे.
त्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इच्छुक लोकांनी जास्तीत जास्त संख्येने
व लवकरात लवकर संस्थेत येऊन आपले नाव नोंद करावेत.
ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांनी ह्या संधीचा फायदा
घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. (ग्रामीण भागातील
बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येइल). इच्छुक उमेदवारानी आपले आवेदन पत्र निदेशक,
स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान गोंदिया, वाहने पॅलेस हरिणखेडे पेट्रोल पंप
च्या जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी संपर्क:-8788625680/8698140105/9834895077/8830249205
00000
सांगली येथे दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण
सांगली येथे दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक
प्रशिक्षण
गोंदिया, 23: महाराष्ट्र
शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली
अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग
प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी
पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना
महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई ची शासन मान्यता
आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे.
सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा
असल्याने त्वरीत संपर्क साधा.
प्रवेशासाठी नियम अटी व सवलती
१. अभ्यासक्रमाचे नांव
अ) सर्टिफिकेट इन कॉम्युटर
ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स)
ब) मोटार अँड आर्मेचर
वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स)
शैक्षणिक पात्रता
किमान इ. ८ वी पास
किमान इ. ९ वी पास
२. वयोमर्यादा : 16 ते 40
वर्ष
३. प्रशिक्षण कालावधी : 1
वर्ष
४. फक्त दिव्यांग मुलांनाच
प्रवेश दिला जातो.
५. सोई व सवलती
> प्रशिक्षण कालावधीत
राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय
> अद्यावत व परीपूर्ण
संगणक कार्यशाळा
> भरपूर प्रॅक्टीकल्स व
व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण
> नेटवकींग व इंटरनेटची
सुविधा
> अनुभवी व तज्ञ निदेशक
> उज्वल यशाची परंपरा
> समाज कल्याण
विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना
६. अर्ज केंव्हा, कसे व कोठे करावेत
( प्रवेश अर्ज व
माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी
रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड: 416 410 नंबर
0233-2222908 मोबाईल 9922577561,9325555981 या पत्यावर पोस्टा व्दारे किंवा समक्ष
मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे
भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा
सोडल्याचा दाखला, SSC मार्कशिट व प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम
अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड, Domicile प्रमाणपत्र व
उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे
पाठवावेत, प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समिती व्दारे मुलाखती घेऊन प्रवेश
देण्यात येईल.
तरी माफक जागा असल्याने
गरजू दिव्यांगाना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत संपर्क साधा, ग्रामीण व
शहरी भागातील लोकांना आवाहन करणेत येते की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणांस ज्ञात
असलेल्या गरजू दिव्यांगाना या शासकीय योजनेची माहिती करुन द्यावी असे आवाहन शासकीय
प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.
00000
प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे, विवरणपत्र दखल न केल्यास दहा हजारांचा दंड
प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल
करावे,
विवरणपत्र
दखल न केल्यास दहा हजारांचा दंड
मुंबई, दि. 23:- प्रेस आणि
नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक
वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) प्रेस सेवा पोर्टल
(PSP) वर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ चे विवरणपत्र सादर न
करणाऱ्या प्रकाशकांना ३० जून २०२६ पर्यतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर
कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी
दिल्ली यांनी सूचनांद्वारे कळविले आहे.
प्रेस आणि नियतकालिक
नोंदणी अधिनियम, २०२३ मधील कलम १४(१) (व) व १४(३) नुसार, वार्षिक विवरणपत्र
निर्धारित मुदतीत न भरल्यास संबंधित प्रकाशकावर दंड आकारण्याची तरतूद आहे. पहिल्या
चुकोसाठी किमान दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक
चुकीसाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल. मात्र, एकूण दंडाची कमाल
मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली असल्याचे प्रेस रजिस्टार जनरल, नवी
दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ चे
वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांनी ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाइन
दाखल करावे. या मुदतीनंतर विवरणपत्र सादर न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार दहा
हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असेही प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी
सूचनांमध्ये नमूद केले आहे.
00000
स्वाधार योजनेतंर्गत दि. ०७ जुलै २०२६ पुर्वी त्रुटींची पुर्तता करणेबाबत अंतिम संधी
स्वाधार योजनेतंर्गत दि. ०७ जुलै २०२६ पुर्वी
त्रुटींची पुर्तता करणेबाबत अंतिम संधी
स्वाधार योजनेतंर्गत
विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी लागणारी
आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बैंक खात्यामध्ये वितरीत केली जाते.
त्याकरीता विद्यार्थ्यांना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर
करणे आवश्यक असते. शैक्षणिक सत्र २०२४-२५ व २०२५-२६ मधील बऱ्याच विद्यार्थ्यांचे
अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या त्रुटीपुर्तते अभावी विद्यार्थ्यांच्या आयाडीवर परत
(Send Back) करण्यात आले आहेत. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील सद्यास्थितीत गोंदिया
तालुक्यातील ४१, गोरेगाव ०९, अर्जुनी मोरगाव ०३, सडक अर्जुनी ०४ व सालेकसा ०१ एकुण
५८ विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयामार्फत त्रुटीपुर्तते करीता विद्यार्थ्यांच्या
आयडीवर परत पाठविण्यात आले आहे.
स्वाधार योजनेतंर्गत सन
२०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना समाज
कल्याण कार्यालयाद्वारे सुचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन
अर्जाची स्थिती Send Back दिसत आहे, त्या विद्यार्थ्यांना त्रुटींची पुर्तता
करणेकरीता दिनांक ०७ जुलै २०२६ अंतिम मुद्दत देण्यात आली आहे. करीता
विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पुर्तता (आवश्यक कागदपत्र
अपलोड) करुन अर्ज दिनांक ०७ जुलै पुर्वी कार्यालयाचे आयडीवर सादर करावे, नमुद
दिनांकापर्यत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही व विद्यार्थी
स्वाधार योजनेपासून वंचित राहिल्यास याची संपुर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची राहिल,
याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज
त्रुटीपुर्तते करीता Send Back करण्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी
कागदपत्रांच्या माहितीसाठी कार्यालयाच्या ०७१८२-२३४११७ या दुरध्वणी क्रमांकावर,
acswogondia@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपर्क
साधावा, दिनांक ०७ जुलै २०२६ पुर्वी आपल्या ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पुर्तता
करुन अर्ज कार्यालयाचे आयडीवर सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयामार्फत
करण्यात येत आहे.
00000
इंडो जर्मन टूल रूम आणि अमृत चा विशेष उपक्रम खुल्या वर्गातील तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण व्यवसायासाठी विशेष सहाय्य
इंडो जर्मन टूल रूम आणि अमृत चा विशेष उपक्रम
खुल्या वर्गातील तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण
व्यवसायासाठी विशेष सहाय्य
गोंदिया, 23:
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींसाठी रोजगार व
स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'अमृत' म्हणजेच महाराष्ट्र
संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त
संस्था आणि इंडो-जर्मन टूल रूम (भारत सरकारची संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने
विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना
अत्याधुनिक तांत्रिक कौशल्ये दिली जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर
नामांकित कंपन्यांद्वारे नोकरी, तसेच व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व
सहकार्यही मिळणार आहे.
इंडो जर्मन टूल
रूम, संभाजीनगर ही भारत सरकारची संस्था असून त्याच्या महाराष्ट्रामध्ये इतरत्र चार
शाखा आहेत. मुख्य शाखा संभाजीनगर येथे असून त्या ठिकाणी प्रशिक्षण सोबत राहण्याची
सोय देखील उपलब्ध आहे. संभाजीनगर येथील शाखेमध्ये अतिशय दर्जेदार व उत्कृष्ट
दर्जाचे मशिनरी आणि इतर उपकरणे उपलब्ध असून अत्यंत अचूकतेने काम करण्यासाठी
अत्याधुनिक आणि उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण दिल्या जाते. या उत्कृष्ट दर्जाच्या
प्रशिक्षणाचा लाभ अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना मिळण्यासाठी
"अमृत" ने इंडो जर्मन टूल रूम यांच्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे. व
सुमारे 45 विविध कोर्सेस साठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
अमृतच्या या
उपक्रमांतर्गत पात्र युवक-युवतींना निःशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर
प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) अमृत, पुणे मार्फत केला
जाईल. निवासी प्रशिक्षणाची सोय फक्त आय.जी.टी.आर. छत्रपती संभाजीनगर येथेच उपलब्ध
असून संस्थेच्या पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूज उपकेंद्रात अनिवासी
प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची
आखणी करण्यात आली असून, रोजगारक्षम कौशल्यांवर यात भर दिला जाणार आहे. या
उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील युवक-युवतींना आधुनिक
काळातील कौशल्ये (Modern Skills) शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
कौशल्यांअभावी कोणीही रोजगारापासून वंचित राहू नये आणि युवकांची रोजगारक्षमता
(Employability) वाढावी, यासाठीच ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची निर्मिती करण्यात
आली आहे.
पात्रता व अटी-
या प्रशिक्षणासाठी
पात्रता अट म्हणजे उमेदवार खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील
अमृतच्या लक्षित गटातील असावा. त्याची आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधित
अभ्यासक्रमासाठी निश्चित केल्याप्रमाणे असेल. वयोमर्यादा व इतर अटी IGTR
संस्थेच्या नियमानुसार लागू राहतील. आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक
राहील.
अर्ज कुठे करायचा?
खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकातील वयोगट १८ ते ४० मधील इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी अमृत
संस्थेच्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा व अर्जात
नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करावी. यासंदर्भात इतर आवश्यक माहितीसाठी
अमृत संस्थेच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
निवड प्रक्रिया-
प्राप्त झालेल्या
अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करण्यात येईल. निवडक उमेदवारांना
पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पात्र उमेदवारांची यादी
संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यानंतर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची
यादी आय.जी.टी.आर. व अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत?
या अंतर्गत अनेक
महत्त्वपूर्ण अत्याधुनिक अभ्यासक्रम आहेतः सीएनसी मशीन ऑपरेटर, मशिनिंग तंत्रज्ञान,
उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक देखभाल कौशल्ये, संगणक आधारित तांत्रिक
प्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे इतर कौशल्याधारित अभ्यासक्रम.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र
प्रशिक्षण
यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र (Certificate)
दिले जाते. हे प्रमाणपत्र शासकीय पार्श्वभूमी असलेल्या 'अमृत' संस्थेचे असल्याने
खाजगी आणि निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करताना याला प्राधान्य मिळू
शकते. तसेच, स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी किंवा कर्ज मंजुरीसाठी हे कौशल्य
प्रमाणपत्र अत्यंत उपयुक्त ठरु शकते.
स्वयंरोजगारासाठी संधी :
स्वतःचा उद्योग
सुरु करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अमृत संस्थेची वैयक्तिक व्याज परतावा योजना ही
योजना उपलब्ध असणार आहे. याचा लाभ घेऊन हा उमेदवार स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय देखील
सुरू करू शकेल. यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन। GTR संस्थेकडून उपलब्ध होऊ शकेल.
खुल्या वर्गातील अमृत च्या लक्षित गटातील
उमेदवारांसाठी योजना
ही योजना विशेषतः
खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) अमृतच्या लक्षीत
गटातील युवक-युवतींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आर्थिक अडचणीमुळे
प्रशिक्षण घेऊ न
शकलेल्या तरुणांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या उमेदवारांनी सदर सुवर्णसंधीचा
अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्यावा असे आवाहन "अमृत" तर्फ
करण्यात आले आहे.
प्रशिक्षणानंतर नोकरी, व्यवसायासाठी साहाय्य-
प्रशिक्षण
यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये
रोजगाराच्या संधी IGTR मार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्वयंरोजगार किंवा उद्योग
सुरु करु इच्छिणाऱ्या तरुणांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल आणि विविध
शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी
खालील लिंकवर क्लिक करावे. त्याचप्रमाणे अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क
साधावा. https://mahaamrut.org.in/coordinators-contact
00000
ॲट्रासिटीची प्रकरणे संबंधित विभागाने प्राथमिकतेने हाताळावे : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले
गोंदिया,
दि.23 : मागासवर्गीय समाजावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना सामाजिक
न्याय मिळवून देण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा तयार करण्यात आलेला आहे. ॲट्रॉसिटीच्या
गुन्ह्यातील दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याकरीता येणाऱ्या अडचणी संबंधित विभागाने
प्राथमिकतेने हाताळावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा आयोजित
करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. सभेला समाजकल्याण सहायक आयुक्त किशोर
भोयर, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पुरुषोत्तम अहेरकर, जिल्हा माहिती अधिकारी
अंजु कांबळे-निमसरकर, विधी अधिकारी मिलिंद चवरे व नागरी हक्क संरक्षण पथकाचे
प्रतिनिधी उत्तम दहिवले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. गोंदावले म्हणाले, ॲट्रॉसिटी अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस तपासावर
असलेल्या गुन्ह्यांना न्यायालयातून मंजुरी मिळवण्यासाठी जिल्हा शासकीय अभियोक्ता
यांचेशी समन्वय साधून प्रयत्न करावे. पोलीस स्टेशन डुग्गीपार येथील पीडीत महिलेचे
जात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करावी. पोलीस
स्टेशन आमगाव येथील मृतकाचे जातीचे प्रमाणपत्र तयार करुन देण्याबाबत उपविभागीय
अधिकारी देवरी यांना पत्राद्वारे कळवावे. तसेच आमगाव येथील मृतकाचे नाव नमुद करुन
सुधारित पोस्ट मार्टम रिपोर्ट तयार करण्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना
लेखी कळवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
त्यानंतर
समिती सदस्य सचिव किशोर भोयर यांनी माहे मे २०२६ अखेर पोलीस विभागाकडून प्राप्त
एकूण गुन्ह्यांची स्थिती, पोलीस तपासावरील गुन्ह्यांची स्थिती, पोलीस फायनल
गुन्ह्यांची स्थिती, न्यायालयात प्रलंबित गुन्ह्यांची स्थिती व अर्थसहाय्याकरिता
प्रलंबित गुन्ह्यांची स्थिती सभेसमोर सादर केली. सन २०२६-२७ आर्थिक वर्षामध्ये
माहे मे २०२६ अखेर खून-२. खुनाचा प्रयत्न-०, बलात्कार-०, विनयभंग-२, मारहाण/गंभीर
दुखापत-१, जाळपोळ-०, शिवीगाळ-२ व इतर-२, असे एकूण ९ गुन्हे घडलेले आहेत. त्यापैकी
६ अनुसूचित जाती व ३ अनुसूचित जमातीचे गुन्हे आहेत. या गुन्ह्यांपैकी ९ गुन्हे
पोलीस तपासावर आहेत. सन २०२५-२६ मध्ये घडलेल्या एकूण ५६ गुन्ह्यांपैकी ५१ गुन्हे
न्यायालयात प्रलंबित असून ४ गुन्हे पोलीस फायनल करण्यात आले आहेत, तर १ गुन्हा
पोलीस तपासावर आहे. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
0000000