जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 8 September 2026

बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यवेक्षिकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 



गोंदिया, दि.8 : अंगणवाडीतील बालकांना गुणवत्तापूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे ज्ञान व कौशल्य अद्ययावत होणे गरजेचे आहे. बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे सेविकांना निश्चितच अधिक सक्षम होता येईल, असा विश्वास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार SARTHAQ-2 मधील टास्क क्र. 19 अंतर्गत 12 वी व त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आला असून, सत्र 2026-27 मध्ये राज्यातील सर्व पात्र अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी जिल्हास्तरीय एक दिवशीय उदबोधन प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजकुमार हिवारे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, गोंदिया CDPO प्रियंका किरणापुरे, सालेकसा CDPO श्रीमती बावणकर, विषय सहायक संदीप सोमवंशी व सुनील हरिनखेडे यांची उपस्थिती होती.
*12 मॉड्यूल्सवर सखोल मार्गदर्शन :*
प्रशिक्षणामध्ये बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील 12 मॉड्यूल्सवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच ब्लेंडेड मोड प्रशिक्षण म्हणजे काय, Unilearn अॅपवर बीट स्तरावर प्रशिक्षण कसे घ्यावे, स्वाध्याय व प्रात्यक्षिके कशी पूर्ण करून घ्यावीत, मूल्यांकन प्रक्रिया कशी राबवावी आणि अंतिम परीक्षा कशा पद्धतीने होणार याबाबत पर्यवेक्षिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी पर्यवेक्षिका उषा आगाशे, अश्विनी कदम, विशेष शिक्षक सतीश गजभिये व साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी सुलभक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधनव्यक्ती अनिता ठेंगडी व उर्मिला वैद्य यांनी विशेष सहकार्य केले.
00000000

Monday, 7 September 2026

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद


• सहा विभागांना याच महिन्यात भेटी
• विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद
गोंदिया, दि.8 : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.
या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.
टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक :
पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६
स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर
ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६
स्थळ : अमरावती
ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in
छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६
स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर
ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in
कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६
स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.
भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
00000000

स्वाधार योजनेंतर्गत अर्जातील त्रुटींची पुर्तता 10 सप्टेंबरपुर्वी करण्याचे आवाहन


गोंदिया, दि.7 : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी लागणारी आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत केली जाते. त्याकरीता विद्यार्थ्यांना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असते. शैक्षणिक सत्र 2025-26 मधील बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या त्रुटीपुर्तते अभावी विद्यार्थ्यांच्या आयडीवर परत (Send Back) करण्यात आले आहेत. शैक्षणिक सत्र 2025-26 मधील सद्यस्थितीत तालुकानिहाय गोंदिया तालुक्यातील 22, गोरेगाव 11, अर्जुनी मोरगाव 07, सडक अर्जुनी 04 व सालेकसा 01 असे एकुण 45 विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयामार्फत त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थ्यांच्या आयडीवर परत पाठविण्यात आले आहे.
स्वाधार योजनेंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयाद्वारे सुचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाची स्थिती Send Back दिसत आहे, त्या विद्यार्थ्यांना त्रुटीची पुर्तता करण्याकरीता दि.10 सप्टेंबर 2026 अंतिम मुदत देण्यात आली आहे, करीता विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पुर्तता (आवश्यक कागदपत्र अपलोड) करून अर्ज दि.10 सप्टेंबर पुर्वी कार्यालयाचे आयडीवर सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. नमुद दिनांकापर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही व विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची राहिल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता Send Back करण्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या माहितीसाठी कार्यालयाच्या 07182-234117 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.
00000000

भाडे तत्वावर वाहनाची आवश्यकता : अर्ज आमंत्रित


गोंदिया, दि.7 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया कार्यालयासाठी रोजगार मेळाव्याच्या प्रचार व प्रसाराकरीता, कार्यालयीन कामकाजाच्या आवश्यकतेनुसार कॉल बेसीसवर, ज्या दिवशी आवश्यकता पडेल त्यानुसार प्रती किलोमीटर दराप्रमाणे वाहन भाडे तत्वावर घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
वाहन भाडे तत्वावर घेण्याबाबतच्या अटी व शर्तीच्या माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.210, आमगाव रोड, गोंदिया येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा दुरध्वनी क्रमांक 07182-299150 अथवा gondiyarojgar@gmail.com यावर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे.
00000000

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत बँकर्स कर्ज मेळाव्याचे आयोजन


गोंदिया, दि.7 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत कर्जप्रक्रिया प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील 860 लाभार्थींसाठी विशेष कर्ज मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हा अग्रणी प्रबंधक, बँक ऑफ इंडिया गोंदिया व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत दि.8 सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृह आमगाव, 9 सप्टेंबरला पंचायत समिती सभागृह तिरोडा, 10 सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृह गोंदिया व 16 सप्टेंबर 2026 रोजी पंचायत समिती सभागृह गोरेगाव येथे बँकर्स कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून कर्ज प्रकरणाची पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तरी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत आयोजित या बँकर्स कर्ज मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी. देवीपुत्र यांनी केले आहे.
00000000

एस.आय.आर.(SIR)वर विशेष लेख... जागरुक नागरिकांनो मतदार यादीत आपले नाव तपासा!

 




           भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण 11 लाख 23 हजार 805 मतदारांचा समावेश आहे. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय तसेच इतर तपशील तपासून घ्यावा. नाव नसल्यास किंवा नोंदीमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित नागरिकांनी दि.30 सप्टेंबर 2026 पर्यंत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी केलेले आहे.

          भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित अथवा अपात्र मतदारांची नावे वगळणे तसेच मतदारांच्या नावातील, पत्त्यातील आणि अन्य तपशीलांतील त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
         भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अनुषंगाने मतदारांनी मागील वर्ष 2002 च्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणामधील मतदार यादीत स्वतःचे तसेच संबंधित नातेवाईकांचे नाव व तपशील तपासावेत. यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार सेवा संकेतस्थळ https://voters.eci.gov.in यावर तपशील तपासता येणार आहे. मतदारांना घोषणापत्रामध्ये आवश्यक तपशील भरता येईल. याबाबत सहाय्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधावा.
          गणना प्रपत्रामध्ये नमूद केलेला मागील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणातील मतदार यादीतील तपशील उपलब्ध नसल्यास अथवा उपलब्ध तपशील आयोगाच्या डेटाबेसशी जुळत नसल्यास, संबंधित मतदारास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस निर्गमित करण्यात येईल. नोटीस प्राप्त झाल्यानंतर मतदारांनी आपल्या जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच आवश्यकतेनुसार पालकांचा तपशील सिद्ध करण्यासाठी विहित कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
         कोणती कागदपत्रे ग्राह्य?
* केंद्र शासन, राज्य शासन किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील (PSU) नियमित कर्मचारी अथवा
निवृत्तीवेतनधारकांना निर्गमित ओळखपत्र किंवा निवृत्तीवेतन प्रदान आदेश.
* शासन, स्थानिक प्राधिकरण, बँका, टपाल विभाग, एलआयसी (LIC) किंवा सार्वजनिक क्षेत्रातील
उपक्रमामार्फत भारतात निर्गमित केलेले 1 जुलै 1987 पूर्वीचे ओळखपत्र, प्रमाणपत्र किंवा अन्य दस्तऐवज.
* सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले जन्म प्रमाणपत्र.
* पारपत्र (पासपोर्ट).
* मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठाने निर्गमित केलेले मॅट्रिक्युलेशन अथवा शैक्षणिक प्रमाणपत्र.
* सक्षम राज्य प्राधिकरणाने निर्गमित केलेले कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र.
* वनहक्क प्रमाणपत्र.
* सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले इतर मागासवर्गीय (OBC), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा अन्य जात प्रमाणपत्र.
* राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC), ज्या ठिकाणी लागू असेल तेथे.
* शासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही सांविधानिक किंवा प्रशासकीय नियमानुसार जतन केलेली कौटुंबिक नोंदवही.
* शासनामार्फत निर्गमित जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र.
* आधारबाबत भारत निवडणूक आयोगाच्या 9 सप्टेंबर 2025 (परिशिष्ट-11) अन्वये निर्गमित निर्देश लागू राहतील.
         वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे स्वतः, वडील आणि आई यांच्यासाठी स्वतंत्र स्व-प्रमाणित स्वरूपात, ज्या प्रकरणात आवश्यक आहेत त्या अनुषंगाने सादर करावीत.
         जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे
         1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्म झालेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी नमुद यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे.
         1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान भारतात जन्म झालेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे यादीतील कोणतेही एक कागदपत्र तसेच वडील किंवा आई यांची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे.
         2 डिसेंबर 2004 नंतर भारतात जन्म झालेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे कागदपत्र, तसेच वडील आणि आई यांची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
         पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास, मतदाराच्या जन्माच्या वेळी संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत सादर करणे आवश्यक राहील.
         भारताबाहेर जन्म झाल्यास
भारताबाहेर जन्म झालेल्या व्यक्तींनी विदेशस्थित भारतीय दूतावास किंवा मिशनने जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत सादर करावी. नोंदणीकरण किंवा नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले असल्यास नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक राहील.
          मतदारांनी नोंदींची पडताळणी करावी
मतदार यादीतील नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच संबंधित नातेवाईकांच्या नोंदींमध्ये अचूकता असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मतदारांनी संकेतस्थळावर उपलब्ध असलेली मागील मतदार यादीतील माहिती तपासून घ्यावी. माहितीमध्ये तफावत आढळल्यास किंवा संबंधित नोंद उपलब्ध नसल्यास घाबरून न जाता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झाल्यास त्यामध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत.
          पात्र नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढाकार घ्यावा
लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव नोंदलेले असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः प्रथमच मतदान करणारे युवक, स्थलांतरित नागरिक तसेच मतदार यादीतील तपशीलामध्ये बदल झालेले नागरिक यांनी मतदार यादीची विशेष पडताळणी करावी.
          30 सप्टेंबर 2026 ही दावे व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता प्रारुप मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

- जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया
00000000

Friday, 4 September 2026

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

 






मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा योगदानाचे स्मरण; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार

गोंदिया, दि.4 : भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया व एकविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 ऑगस्टदरम्यान विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम 29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उत्साहात पार पडला. जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर हॉकीचे जादूगार व महान क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय हॉकीला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून देण्यात मेजर ध्यानचंद यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या क्रीडा कारकिर्दीची व ऑलिम्पिकमधील उल्लेखनीय कामगिरीची माहिती उपस्थित खेळाडूंना यावेळी देण्यात आली.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी पूजा श्रीवास, क्रीडा अधिकारी राहुल देशमुख, विविध एकविध क्रीडा संघटनांचे प्रशिक्षक व पदाधिकारी तसेच विविध खेळांचे प्रशिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षकांनी खेळाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासह व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व विशद केले. तसेच खेळाडूंनी योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित सराव याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास खेलो इंडिया, मिशन लक्ष्यवेध तसेच नेटबॉलचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार, क्रीडा प्रतिज्ञा, पारंपरिक खेळ, सायकल रॅली आदी विविध उपक्रम घेण्यात आले.
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविणाऱ्या युकांत उके, दक्ष ठाकरे, खुशी हलमारे, रोहित शरणागत आणि एविना चौरागडे या खेळाडूंना शिष्यवृत्तीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुराज गायकवाड यांनी केले, तर अंकुश गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000