जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 18 August 2026

21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन’मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

 




        गोंदिया, दि.18 : महाराष्ट्र शासनाने स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त दि.15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 हा जलसंधारण सप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. यामध्ये 21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ (Maha Walkathon-Walk for Water) ही संकल्पना आयोजित केलेली आहे.

         गोंदिया जिल्हा हा जलसंधारणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. या सप्ताहामध्ये दि.21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन उपक्रम संपूर्ण जिल्हाभर आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

        या उपक्रमात सर्व युवकांसाठी ‘पाणी आणि जलसंधारण’ यावरील रील स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यासाठी सर्व युवकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गोंदिया येथील जयस्तंभ चौक ते फुलचूर तलाव पर्यंत महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे.

        दरम्यान, महा वॉकेथॉनची नोंदणी दि.21 ऑगस्ट रोजी सकाळी 5.30 ते 6.30 पर्यंत होणार आहे. सकाळील 6.45 वाजता जलसंधारणाची शपथ घेण्यात येईल. जयस्तंभ चौक, गोंदिया येथून सकाळी 7.00 वाजता मान्यवरांमार्फत हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सकाळी 8.00 वाजता शिवधाम (फुलचूर तलाव) येथे महा वॉकेथॉन समाप्त होणार आहे. सकाळी 8.30 वाजता जलपूजन व दीप पूजन होईल. त्यानंतर पुरस्कार वितरण व कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.

         महा वॉकेथॉन हे दि.21 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. यामध्ये शासनाच्या तसेच विविध स्तरावरील नागरिकांचा सहभाग असणार आहे, जेणेकरुन गोंदिया जिल्ह्यात जलसंपदेचे आणि मृदसंपदेचे जतन करण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी मदत होणार आहे.

        या वॉकेथॉनमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे. वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी https://register.mahaevent.co.in/#/register या संकेतस्थळाला भेट द्यावी व आपली नोंदणी करुन ई-प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.

        चला… आपल्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया! माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवूया.

        तरी गोंदिया जिल्ह्यातील सर्व युवकांनी या महा वॉकेथॉनमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून शासनाच्या या जलसंधारण सप्ताहाला यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

                                                     0000000


Monday, 17 August 2026

जलसंधारण ही लोकचळवळ बनली तरच जलसमृद्ध गावांचे स्वप्न साकार होईल

 





गोंदिया | 17 ऑगस्ट

जलसंधारण सप्ताहानिमित्त सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कनेरी येथे जलपूजन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

यावेळी आमदार बडोले यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करताना, जलसंधारण ही केवळ शासकीय योजना न राहता लोकचळवळ बनली पाहिजे, असे सांगितले. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जलसंधारणासोबतच मृदसंधारण आणि वृक्षारोपण या बाबींचा समन्वय साधल्यास गावांचा शाश्वत विकास साधता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पाऊलदौना येथील अमृत सरोवर परिसरात वृक्षारोपण करून जलसंधारण व मृदसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली.

15 ते 21 ऑगस्टदरम्यान आयोजित जलसंधारण सप्ताहात जिल्ह्यातील विविध तहसील व पंचायत समिती कार्यालयांमध्ये जलसंधारणाची शपथ घेण्यात आली असून, शाळा व महाविद्यालयांमध्ये रांगोळी, पोस्टर आणि रील स्पर्धांसह विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चला, जलसंवर्धनाच्या चळवळीत सहभागी होऊया!

जिल्हा न्यायालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रितेश वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

 

         गोंदिया, दि.17 : भारतीय स्वातंत्र्याच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त 15 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे सकाळी 7.30 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रितेश वाघमारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

         सदर कार्यक्रमात न्यायाधिश ए.एस. प्रतिनिधी जिल्हा न्यायाधीश-1 गोंदिया, एम.टी.आसीम जिल्हा न्यायाधीश-2 गोंदिया, ए.सी. खुराना जिल्हा न्यायाधीश-4 गोंदिया, एन.के. वाळके सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, एम.के. सोरते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया, श्रीमती वाय.के. राऊत मुख्य न्यायदंडाधिकारी गोदिया, ए.व्ही. ढोरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया, श्रीमती एस.व्ही. चरडे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया, श्रीमती ए.एम. कासीम सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गोंदिया, श्रीमती एस.के. बिराजदार 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गोंदिया, व्ही.एच. शेंडे 4 थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गोंदिया व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सचिन बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

         तसेच अॅड. निना दुबे सचिव जिल्हा वकील संघ गोंदिया, पी.झेड. शेख कोषाध्यक्ष जिल्हा वकील संघ गोंदिया व जिल्हा वकील संघाचे इतर पदाधिकारी आणि जिल्हा सरकारी वकील महेश चांदवानी, सरकारी वकील वसंत चुटे व इतर तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ओ.जी.मेठी, श्री. बडे, व्ही.एल. जानी, राजकुमार बोंबार्डे, अॅड. शबाना अंसारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता ए.आर. कुकडे, एम.पी. पटले, ए.एम. भालेराव, एन.पी. गोखले, एस.एस. बागडे, एस.व्ही. गावंडे, डी.सी. कनोजिया यांनी सहकार्य केले.

0000000

जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल : पालकमंत्री इंद्रनील नाईक

 





       गोंदिया, दि.17 : जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने आयोजित टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात दिले.

         श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने राईस मिलर्स असोसिएशन सभागृह, गोंदिया येथे शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी श्री. नाईक बोलत होते. हे या कार्यक्रमाचे दहावे वर्ष आहे. या कार्यक्रम समारंभास राज्यसभेचे खासदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष सचिन शेंडे, जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जि.प. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती दीपाताई चंद्रिकापुरे मंचावर उपस्थित होते.

          श्री. नाईक पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून यात पत्रकारांची भूमिका ही महत्त्वाची आहे. सामान्य माणसांच्या अडचणी समजून त्याची वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतात. राज्य शासनाकडून विविध योजनांचा लाभ पत्रकारांना देण्यात येत असून जिल्ह्यातील पत्रकारांसाठीचे पत्रकार भवन बांधण्या संदर्भातील प्रस्तावास जिल्ह्यातील खासदार प्रफुल पटेल आणि राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने पूर्ण करता येऊ शकते, यासाठी लागणारी मदत राज्य शासनाच्या वतीने करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

          खासदार राजेंद्र जैन म्हणाले, गोंदिया जिल्ह्याला जागरूक पत्रकारितेचा वारसा लाभलेला असून सर्व इथले पत्रकार नीपक्षपातीपणे जबाबदारी पार पाडतात. हा कार्यक्रम सर्वसमावेशक असा कार्यक्रम पत्रकार संघाने आयोजित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही श्री. जैन यांनी यावेळी केले.

         या कार्यक्रमात पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नवभारत वर्तमानपत्राचे वरिष्ठ पत्रकार राधेश्याम नागपुरे यांना जीवन गौरव टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार, उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, स्व. मनोहरभाई पटेल स्मृतीनिमित्त संपादकीय पुरस्कार, स्व. स्वातंत्र्य सेनानी हिरालाल जैन स्मृतीनिमित्त उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार, स्व. संतोष अग्रवाल स्मृतीनिमित्त शोध वार्ता पुरस्कार, स्व. रामकिशोर कटकवार स्मृतीनिमित्त वृत्तवाहिनी पुरस्कार, माजी आमदार खोमेशभाऊ रहांगडाले यांच्याकडून कृषिरत्न पुरस्कार, कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी यांच्याकडून सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, गणेश स्टोर्स परिवार गोंदिया यांच्याकडून वैद्यकीय सेवा पुरस्कार, स्व. गोविंदभाऊ शेंडे स्मृतीनिमित्त पर्यावरण संवर्धन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

         कार्यक्रमाचे आयोजन सर्वश्री पत्रकार हाजी अल्ताफ शेख, संजय राऊत, हरीश मोटघरे, रवी सपाटे, महेंद्र बिसेन, महेंद्र माने, सुरेश येळे, नवीन अग्रवाल, दिलीप पारधी, मोहन पवार, बाबाभाई शेख, अमित गुप्ता, नवीन दहिकर, सुनील कावळे, साहिल भावडकर यांच्या सहयोगाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलदीप लांजेवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संजय राऊत यांनी मानले.

  00000000


Saturday, 15 August 2026

चिचगड येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; 14 वर्षांपासून प्रलंबित सामूहिक वनहक्क फेरफार प्रकरणे निकाली

 




गोंदिया, दि. 15 ऑगस्ट : अपर तहसील कार्यालय, चिचगड येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.

14 वर्षांपासून प्रलंबित वनहक्क प्रकरणांना मिळाला न्याय

या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सामूहिक वनहक्क फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

संबंधित ग्रामपंचायतींना सामूहिक वनहक्काचे पट्टे यापूर्वीच प्राप्त झाले होते. मात्र फेरफार प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सातबारा उतारे उपलब्ध झाले नव्हते. तहसील कार्यालयाच्या विशेष प्रयत्नांतून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि संबंधित ग्रामपंचायतींना सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.

यामुळे वनहक्कधारक ग्रामपंचायतींच्या हक्कांची महसुली नोंद अधिकृतरीत्या पूर्ण झाली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

श्रीराम विद्यालय, चिचगड येथील सुमारे 700 विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 150 विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले. देशभक्तीपर घोषणा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध राष्ट्रप्रेमपर उपक्रमांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कार्यक्रमादरम्यान महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक मूल्यांचे जतन आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी सक्रिय सहकार्य करण्याचा संकल्प केला.

प्रशासनाने संविधानातील मूल्ये प्रत्यक्षात उतरवावीत - जिल्हाधिकारी मंदार पत्की : जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते ध्वजारोण

 








 

      गोंदिया, दि.15 : प्रशासनाने संविधानातील मूल्ये प्रत्यक्षात उतरवावीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करतेवेळी केले.  

         प्रारंभी वंदे मातरम् या एैतिहासिक गाण्याने ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.

           यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी श्री. पत्की म्हणाले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे गुण जशी लिहिली गेलेली आहेत, हे गुण प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी आपल्या प्रशासकीय यंत्रणेवर आहे. प्रशासनात काम करतांना आपल्याकडून कोणत्याही कामामध्ये कोणाशी मनभेद, मतभेद किंवा आकांक्षा ठेवून कोणाकडून काम होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

         कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, सर्वश्री उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, विजय अवधाने, दर्शन निकाळजे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.रुपेशकुमार राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रविंद्र मारबते, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते

नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण

          भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

          वंदे मातरम् गीतानंतर पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीताने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देवून भेटी घेतल्या. यावेळी तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, जिल्हा उपनिबंधक योगेशकुमार बाकरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे, उपसंपादक कैलाश गजभिये यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000

गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनवूया : पालकमंत्री इंद्रनील नाईक

 







गोंदिया, दि. 15 ऑगस्ट 2026 : गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी झेनीत दोन्तुला, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व विद्यार्थी उपस्थित होते.

विकासासाठी ₹438.25 कोटींची तरतूद

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत ₹438 कोटी 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील सुमारे 30 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 12,679 शेतकऱ्यांच्या खात्यात ₹75.74 कोटी जमा करण्यात आले आहेत.

खरीप हंगामात भात लागवडीसाठी 74,613 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच धान खरेदी केंद्रांमार्फत 1.98 लाख शेतकऱ्यांकडून 75.57 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून ₹1,569.12 कोटींचे चुकारे वितरित करण्यात आले आहेत.

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

क्षयरोग निर्मूलनात गोंदिया जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.37 लाख आयुष्मान कार्ड आणि 9.90 लाख आभा कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

पर्यटन व जैवविविधतेला चालना

हाजराफॉलच्या विकासावर विशेष भर देण्यात येत असून, जूनअखेरपर्यंत 8,500 हून अधिक पर्यटकांनी हाजराफॉलला भेट दिली. सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाल्याने गोंदियाच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

रोजगार निर्मितीला प्राधान्य

व्ही.बी. जी-राम-जी अभियानांतर्गत ग्रामीण भागात 17.88 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती झाली आहे. पात्र कुटुंबांना 125 दिवसांपर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जलसंधारण सप्ताहाचा संदेश

15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

🌱 “चला माती वाचवू... पाणी जपू... जलसमृद्ध महाराष्ट्र घडवू!”

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या भावनेतून गोंदिया जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्याचा संकल्प करण्यात आला.