जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 13 August 2026

पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होणार मुख्य कार्यक्रमाचे ध्वजारोहण

 

 

         गोंदिया, दि.13 : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा (गोंदिया) येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे.

        याप्रसंगी उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

         येथील नविन प्रशासकीय इमारतीत उविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण होणार आहे.

        सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था आदींनी त्यांचे ध्वजारोहणाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000000

पालकमंत्री इंद्रनील नाईक दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


           गोंदिया, दि.13 : उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे दिनांक 14 ऑगस्ट रोजी सोईनुसार शासकीय विश्रामगृह रविभवन, नागपूर येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे आगमन व राखीव.

          15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथून मोटारीने पोलीस मुख्यालय मैदान, कारंजाकडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे आगमन. सकाळी 9.05 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा (गोंदिया) येथे भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. सोईनुसार गोंदिया येथून मोटारीने पुसद जि.यवतमाळकडे प्रयाण करतील.

0000000

बालकांच्या संरक्षणासाठी समन्वय आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

 





पोलीस अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत बालस्नेही दृष्टिकोनावर भर; अधिकाऱ्यांचा सहभाग

           गोंदिया, दि.13 : बालकांच्या संरक्षणासंदर्भातील कोणत्याही गुन्ह्यात तडजोड केली जाणार नाही.  बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबी सक्षमपणे हाताळण्याबरोबरच त्यांचे सुरक्षित पुनर्वसन आणि समाजात पुनर्एकात्मीकरण करण्यासाठी बालस्नेही वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे  सदस्यांनी केले.

         महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बाल कल्याण पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ तसेच बाल न्याय अधिनियम २०१५ या विषयांवरील सचेतन कार्यशाळेचे आयोजन पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृह, कारंजा येथे करण्यात आले. या कार्यशाळेत बालकांच्या सुरक्षेसाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.

         यावेळी आयोगाच्या सदस्या गीतांजली बुटी यांनी बालकांशी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलता आणि समन्वयाने कार्य करण्याची गरज व्यक्त केली. बालके हे देशाचे भविष्य असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित बालपण सुनिश्चित करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने बालस्नेही दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

         प्रविण भुजाडे यांनी रस्त्यावर राहणाऱ्या तसेच भिक्षावृत्तीत अडकलेल्या बालकांबाबत सामाजिक दायित्व स्वीकारून पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले. बाल भिक्षेकरी प्रणाली संपुष्टात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

         कार्यशाळेपूर्वी आयोगाचे सदस्य प्रविण भुजाडे व गीतांजली बुटी यांनी गोंदिया येथील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह (बालगृह) आणि आसरा शिशुगृहाला भेट देऊन तेथील सुविधा व व्यवस्थेची पाहणी केली. बालकांसाठी उपलब्ध सुविधा समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

         कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

         कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर यांनी POCSO कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात ॲड. परम आनंद यांनी बाल न्याय कायद्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांबाबत माहिती दिली, तर वसीम शेख यांनी विधी संघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसन प्रक्रियेवर मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले. सूत्रसंचालन बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी केले, तर आभार रविंद्र टेंभूर्णे यांनी मानले. कार्यशाळेस परिविक्षा अधिकारी रेश्मा मोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रीती कुळमेथे यांच्यासह सुमारे १३५ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

                                                        00000000

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्यासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन

 






ग्रामीण विकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्यासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन

गोंदिया, दि. १३ : ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढविणे, शाश्वत आजीविका निर्माण करणे आणि ग्रामविकासाला चालना देणे या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे "विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, २०२५ (VBG RAM G)" या विषयावर जिल्हास्तरीय एकदिवसीय पंच संमेलन उत्साहात संपन्न झाले.

संमेलनाला उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) श्री. दर्शन निकाळजे, गट विकास अधिकारी (मनरेगा) श्री. ज्ञा. शा. लोहबरे, जिल्हा एमआयएस समन्वयक श्री. किशोर मादळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) कु. सुरेखा ब्राम्हणकर, श्री. जितेंद्र पारधी, बीआरएलएफ समन्वयक श्री. नितेश बोपचे, तांत्रिक सहाय्यक श्री. राकेश बघेले व श्री. प्रविण खरवडे यांच्यासह सर्व पंचायत समित्या व तहसील कार्यालयांतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच सदस्य तसेच व्ही बी जी रामजी (VBG RAM G) अभियानाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संमेलनात विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, २०२५ मधील विविध तरतुदी, उद्दिष्टे आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला रोजगाराची हमी उपलब्ध करून देणे, शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि ग्रामविकासाला गती देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतींचे सरपंच व पंच सदस्य यांच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. मजुरांची नोंदणी, कामांचे नियोजन, ग्रामसभेच्या माध्यमातून विकासकामांना प्राधान्य देणे तसेच योजनांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

संमेलनादरम्यान मनरेगा व व्ही बी जी रामजी (VBG RAM G) अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वयातून काम करून ग्रामीण विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) श्री. दर्शन निकाळजे यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच सदस्य व संबंधित कर्मचाऱ्यांना  व्हिलेज ग्रामपंचायत प्लॅन (Village Gram Panchayat Plan) आराखडा तयार करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतींच्या सहभागातून रोजगारनिर्मिती, शाश्वत विकास आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

संमेलनामुळे नव्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतींची क्षमता वृद्धिंगत करणे आणि ग्रामीण भागातील रोजगार व आजीविका हमी अधिक बळकट करण्यासाठी सकारात्मक दिशा मिळाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

00000

‘व्होकल टू लोकल’च्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार द्या





 


‘व्होकल टू लोकल’च्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार द्या

-        अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे

गुंतवणूक परिषदेत एकूण ४२ सामंजस्य करार; ७२१ कोटींची गुंतवणूक

 

गोंदिया, दि. १३ : "व्होकल टू लोकल" या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६" च्या कार्यक्रमात केले.

गोंदिया जिल्ह्याची ओळख केवळ तांदूळ उत्पादनापुरती मर्यादित न ठेवता कृषी आधारित उद्योग, पर्यटन, बांबू उद्योग तसेच इतर पूरक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील असून उद्योजकांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातून तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांसह इतर उद्योगांच्या निर्यातीसाठीही प्रयत्न वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या जिल्हा गुंतवणूक परिषदेत एकूण ४२ सामंजस्य करार; ७२१ कोटींची गुंतवणूक झाली.

गोंदिया जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि जिल्ह्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने आज  जिल्हा नियोजन भवन, गोंदिया येथे "जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६" चे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेची अध्यक्षता अपर जिल्हाधिकारी श्री. अभिजीत घोरपडे, यांनी केली.  याप्रसंगी मुख्य  सह आयुक्त (उद्योग व सेवा) एस. एस. मुद्दमवार, अतिरिक्त कामगार आयुक्त तथा नोडल अधिकारी "मैत्री" श्री. रविराज इलावे, सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) श्री. विक्की पु. खिराळे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती अंजु निमसरकर, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (महावितरण), स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक अधिकारी श्री. अतुल कुमार, नाबार्डचे श्री. अविनाश लाड, जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष श्री. हुकूमचंद अग्रवाल, नमो उद्योजक, विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार तसेच शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

४२ सामंजस्य करार; ७२१ कोटींची गुंतवणूक

या जिल्हा गुंतवणूक परिषदेत एकूण ४२ उद्योग घटकांसोबत ४२ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. या करारांद्वारे ७२१ कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक जिल्ह्यात होणार असून त्यातून १,८७५ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या गुंतवणुकीमुळे गोंदिया जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच कुशल मनुष्यबळासाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

परिषदेचे प्रास्ताविक सह आयुक्त (उद्योग व सेवा) श्री. एस. एस. मुद्दमवार यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध औद्योगिक योजनांची, उद्योग आयुक्तालयाच्या उपक्रमांची तसेच उद्योगांना उपलब्ध असलेल्या सवलती व सुविधांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त कामगार आयुक्त तथा नोडल अधिकारी "मैत्री" श्री. रविराज इलावे यांनी मैत्री पोर्टल २.० तसेच Ease of Doing Business (EoDB) विषयी मार्गदर्शन केले. एकाच छताखाली १२८ परवाने व सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या पोर्टलची माहिती त्यांनी उद्योजकांना दिली. तसेच "गोंदिया जिल्ह्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी" या विषयावर लघु उद्योग भारती, गोंदियाचे सचिव श्री. कुशल चोपडा यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत विविध चर्चासत्रे घेण्यात आली तसेच उद्योजकांच्या प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) श्री. विक्की पु. खिराळे यांनी मानले.

00000


गोंदियात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जे. एम. हायस्कूलमधून भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

 



स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानाला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने गोंदिया शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीचे उद्घाटन आणि मार्ग: मेरा युवा भारत (MY Bharat) गोंदिया आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीचे उद्घाटन जे. एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जी. के. पारधी आणि MY Bharat चे उपसंचालक श्री. सौरभ निषाद यांच्या हस्ते झाले. रॅलीची सुरुवात जे. एम. हायस्कूल मुख्य शाखेतून होऊन ती अवंतीबाई चौक मार्गे शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग: या रॅलीत गुजराती हायस्कूलचे एनसीसी कॅडेट्स, शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. “हर घर तिरंगा”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.

निष्कर्ष: देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आणि युवकांमध्ये देशभक्ती जागृत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. एनसीसी अधिकारी सी/ओ श्री. बी. टी. गजभिये आणि एफ/ओ श्री. आर. लिल्हारे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही रॅली अत्यंत यशस्वी झाली.

Wednesday, 12 August 2026

क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी हँडबॉल चाचणी 17 ऑगस्टपासून तर खेळनिहाय कौशल्य चाचणी 18 ऑगस्पासून

 


       गोंदिया, दि.12 :  वर्ष २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी हँडबॉल खेळाची राज्यस्तर सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर कोराडी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

         राज्यस्तर सरळ प्रवेश प्रक्रिया १७ व १८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चाचणीला सुरुवात होईल. तसेच खेळनिहाय कौशल्य चाचणी १८ व १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चाचणी सुरू होईल.

         या प्रक्रियेसाठी खेळाडू १९ वर्षांखालील वयोगटातील असणे आवश्यक आहे. राज्यस्तर सरळ प्रवेशासाठी राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभाग प्रमाणपत्र आवश्यक असून, खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी किमान राज्यस्तर सहभाग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

         चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी प्राविण्य किंवा सहभाग प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, वयाचा पुरावा यासह सर्व आवश्यक कागदपत्रे मूळ स्वरूपात आणावीत. तसेच स्वतःचे स्पोर्ट्स किट सोबत आणणे आवश्यक आहे. निवास व भोजनाची व्यवस्था खेळाडूंना स्वतःच्या स्तरावर करावी लागणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनीमध्ये हँडबॉल तसेच खेळ निहाय कौशल्य चाचणीसाठी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीकांत यादव यांनी केले आहे.

                                                               00000000