जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 20 August 2026

दोन चिमुकल्यांना मिळाला हक्काच्या कुटुंबाचा आधार : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गोंदिया जिल्ह्यात पहिला दत्तक निर्णय; दोन बालकांची दत्तक प्रक्रिया पूर्ण

 



गोंदिया, दि. 20 : आई-वडिलांचे प्रेम, कुटुंबाचा आधार आणि मायेची ऊब ही प्रत्येक बालकाच्या निरोगी व आनंदी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे काही बालकांना या सुखापासून वंचित राहावे लागते. अशा बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळवून देण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत आसरा शिशुगृहातील दोन बालकांची दत्तकविधान प्रक्रिया पूर्ण करून त्यांना हक्काचे कुटुंब मिळवून देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या आदेशाने गोंदिया जिल्ह्यातील हा पहिला दत्तक निर्णय पार पडला. न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रक्रिया हस्तांतरीत- गोंदिया जिल्ह्यात दत्तकविधानाची प्रक्रिया न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित झाल्यानंतर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी पहिला दत्तक आदेश निर्गमित केला. त्यानंतर दोन्ही बालकांना त्यांच्या पात्र दत्तक पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. महिला व बाल विकास मंत्रालयाने दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करत गोंदिया जिल्हा प्रशासनाने दत्तक प्रक्रियेला गती दिली. दत्तक ग्रहण नियमावली 2022 तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे या दोन चिमुकल्यांच्या आयुष्यात आता केवळ घरच नाही, तर प्रेम, माया, सुरक्षितता आणि कुटुंबाचा आधारही मिळाला आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून प्रक्रिया पूर्ण- ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, संरक्षण अधिकारी असंस्थात्मक मुकेश पटले, आचल फुलेकर, विशेष दत्तक संस्थेच्या अधीक्षिका तसेच डॉ. सचिन उईके आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) व राज्य दत्तक संसाधन प्राधिकरण यांच्या समन्वयातून ऑनलाइन पद्धतीने पारदर्शक व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. यापूर्वी बालक दत्तक देण्याबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयाकडून घेतला जात होता. दत्तक प्रक्रियेला अधिक गती मिळावी आणि बालकांचे पुनर्वसन जलदगतीने व्हावे, यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या माध्यमातून दत्तकविधानाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दत्तक प्रक्रिया म्हणजे बालकांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाचा मार्ग- दत्तक प्रक्रियेकडे केवळ प्रशासकीय प्रक्रिया म्हणून न पाहता अनाथ, निराधार, परित्यक्त व समर्पित बालकांच्या पुनर्वसनाचा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून पाहणे गरजेचे आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. चाैकट... जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले चिमुकल्यांना कुशीत... दत्तक आदेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दोन्ही बालकांना आपल्या कुशीत घेतले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून उपस्थितांचे वातावरण भावूक झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी बालकांची तसेच दत्तक पालकांची माहिती जाणून घेतली. बालकांना पालकांच्या स्वाधीन करताना त्यांनी दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी शासनाच्या अधिकृत दत्तक प्रक्रियेत नोंदणी करून नियमानुसार दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले. 0000000

गोंदियाच्या जलवैभवाचा समृद्ध वारसा...

 




 

            महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला वसलेला, झाडीपट्टी म्हणून ओळखला जाणारा गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या सीमेला लागून असल्यामुळे येथील नागरिकांच्या बोलीभाषेत हिंदीचा प्रभाव दिसून येतो. मात्र, या जिल्ह्याची खरी ओळख येथील डोंगर-दऱ्या, वनाच्छादित प्रदेश आणि नैसर्गिक तलावांमुळे अधिक उठून दिसते. आदिवासीबहुल जिल्हा असल्याने प्राचीन काळापासून येथे निसर्ग व पर्यावरणाचे केवळ संवर्धनच नव्हे, तर पूजन करण्याची परंपरा आणि संस्कृती जपली गेली आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या मालगुजारी तलावांमुळे गोंदिया जिल्ह्याला ‘तलावांचा जिल्हा’ अशीही ओळख प्राप्त झाली आहे.

            ‘मालगुजारी’ हा शब्द इंग्रजांच्या काळात प्रचलित झाला. महसूल (मालगुजारी) वसूल करण्याचा अधिकार ज्या व्यक्तींना देण्यात आला होता, त्यांना मालगुजर असे संबोधले जात असे. मालगुजर शेतकऱ्यांकडून महसूल वसूल करून त्यातील निश्चित रक्कम सरकारकडे जमा करीत असत. तलावांची देखभाल, दुरुस्ती, गाळ काढणे तसेच पाण्याचे वाटप याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्या काळात या तलावांना मालगुजारी तलाव असे नाव प्राप्त झाले. सध्या या तलावांचे व्यवस्थापन शासनाकडे आहे.

            आज गोंदिया जिल्ह्यात 1,659 मालगुजारी तलाव आहेत. या तलावांचा इतिहास सुमारे 300 ते 350 वर्षांपूर्वीचा आहे. गोंड राजा हिरशहा यांनी दूरदृष्टी ठेवून त्या काळातील पर्जन्यमान आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन एक महत्त्वपूर्ण फर्मान काढले होते. त्यानुसार, जो कोणी जंगल साफ करून शेती करेल त्याला ती जमीन बहाल करण्यात येईल आणि जो कोणी तलाव बांधेल त्याला त्या तलावाखालील जमीन बक्षीस म्हणून दिली जाईल. या धोरणामुळे तत्कालीन प्रजेने लोकसहभागातून जलव्यवस्थापनाची प्रभावी आणि शाश्वत पद्धत विकसित केली.

तलाव उभारताना पाण्याचा साठा योग्य प्रकारे होईल, यासाठी नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून जागेची निवड करण्यात आली. तलावांच्या खालच्या भागात विहिरी बांधण्यात आल्या. गावाच्या चारही दिशांना तलावांची साखळी निर्माण करण्यात आली. तलावातील अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे गावाच्या खालच्या बाजूने वाहून जाईल, अशी रचना करण्यात आली. त्यामुळे पुराचा धोका गावाला पोहोचत नाही. एका तलावातील अतिरिक्त पाणी दुसऱ्या तलावात आणि त्यानंतर तिसऱ्या तलावात जाईल, अशी साखळी निर्माण करून पाण्याचा अपव्यय टाळण्यात आला. त्या काळात विकसित केलेले हे जलव्यवस्थापनाचे तंत्र आजही आश्चर्यचकित करणारे आहे. याच परंपरेचा परिणाम म्हणून, अल निनोसारख्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही या भागात धान पिकासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा उपलब्ध राहतो.

पाण्याची साठवण करण्याची ही पारंपरिक पद्धत आजही अत्यंत उपयुक्त ठरत असून आधुनिक जलसंधारण योजनांमुळे तिला अधिक बळ मिळाले आहे. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागांतर्गत 248 तलाव, 26 पाझर तलाव आणि 229 गाव तलाव आहेत. मालगुजारी तलावांसह जिल्ह्यात एकूण 2,152 तलाव जलसंपदेचा महत्त्वाचा स्रोत आहेत. या तलावांमुळे 868.78 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होत असून त्याद्वारे 1,01,007 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली आहे.

वर्ष 2023 पासून जलयुक्त शिवार अभियान (टप्पा-2) जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 2,047 कामे पूर्ण झाली आहेत. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (टप्पा-2) अंतर्गत आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यांतील पाच क्लस्टरमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची 894 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 879 कामे पूर्ण, तर उर्वरित 15 कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.

‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. सन 2024-25 मध्ये जिल्ह्यातील 225 तलावांतील गाळ काढण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी 103 तलावांतून 4,32,950 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे 4.3295 दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. ही बाब जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी निश्चितच लाभदायक ठरली आहे. भविष्यात कोणत्याही जलसंकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा सक्षम होत आहे.

जलसंधारण सप्ताह आणि जनसहभागाचे आवाहन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील जलसंधारण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून त्यांनी पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि लघु जलसंधारणाच्या अनेक योजनांना चालना दिली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून 21 ऑगस्ट हा दिवस राज्य शासनाने ‘जलसंधारण दिन’ म्हणून घोषित केला आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हा कालावधी ‘जलसंधारण सप्ताह’ म्हणून साजरा केला जात असून जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या सप्ताहानिमित्त मृद व जलसंवर्धन रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 वर्षांवरील युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाविषयी जनजागृती करणाऱ्या रील्स तयार करूनhttps://register.mahaevent.co.in/#/register या संकेतस्थळावर अपलोड कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

21 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन जयस्तंभ चौक ते फुलचूर तलाव या मार्गावर करण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्याला लाभलेल्या जलसमृद्धीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जलसंवर्धनाचा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी सर्व नागरिकांनी या वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हावे.

 

चला, आपल्या पूर्वजांनी जपलेली जलसंवर्धनाची परंपरा पुढे नेऊया आणि जलसमृद्ध गोंदिया – समृद्ध भविष्य या संकल्पनेला साकार करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करूया.

 

-मंदार पत्की,

जिल्हाधिकारी, गोंदिया

00000000


Wednesday, 19 August 2026

रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन 21 ऑगष्टला गोंदियात

 


        गोंदिया, दि.19 : मानवी जीवनामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. रानभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जीवनसत्वे व खनिजे आणि औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. सकस आहारामध्ये विविध रानभाज्यांचा/फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. सद्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रानातील भाजी तसेच शेतशिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्याचे आहारातील महत्व व औषधी गुणधर्माबाबत व आरोग्य विषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने शुक्रवार दि.21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे करण्यात आले आहे.

          सदर रानभाजी महोत्सवात सर्व नागरिक, शेतकरी बांधव, अधिकारी/कर्मचारी, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्याथीनी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी गोंदिया नेहा आढाव यांनी केले आहे.

                                                            0000000


पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या रांगोळी व पोस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : जलसंधारण सप्ताहानिमित्त कार्यक्रम

 



            गोंदिया, दि.19 : लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग, आमगाव कार्यालयाच्या वतीने 15 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत साजरा होत असलेल्या जलसंधारण सप्ताहानिमित्त सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन, पाणी बचत व पर्यावरण संरक्षण या विषयांवर आकर्षक कलाकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

          कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, पंचायत समिती सदस्य शालिंदर कापगते तसेच अल्लाउद्दीन राजानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एन.के. गजभिये, डी. पी. डोंगरवार, एन.आर. गिरेपुंजे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

          लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग, आमगावच्या वतीने उपअभियंता शुभदा असटूल, शाखा अभियंता प्रिती नागपुरे, कनिष्ठ अभियंता अनिल आदमने, टेकराम बिसेन व रोहित नागलवाडे यांनी कार्यक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व समजावून सांगितले.

         या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा उद्देश सफल झाला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत "पाणी वाचवा, भविष्य वाचवा" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

0000000

जागतिक डास दिवस : डासांची उत्पत्ती रोखा, आजारांना दूर ठेवा

 


दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक डास दिवस साजरा केला जातो. डासांमुळे पसरणाऱ्या विविध आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.

पावसाळ्यात घराभोवती, कुंड्यांमध्ये, टायरमध्ये, फुलदाणीत, फ्रीजच्या ट्रेमध्ये किंवा इतर वस्तूंमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे आणि साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

🦟 डासांपासून होणारे प्रमुख आजार

  • ॲनोफेलीस – मलेरिया
  • एडिस इजिप्ती – डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका
  • क्युलेक्स – हत्तीरोग व जपानी मेंदूज्वर

🛡️ डासांपासून बचावासाठी

✔️ घराभोवती पाणी साचू देऊ नका.
✔️ फ्रीजचा ट्रे, फुलदाणी व कुंड्या ३-४ दिवसांनी स्वच्छ करा.
✔️ टायर, डबे, टाक्या व कंटेनरमध्ये पाणी साचू देऊ नका.
✔️ मच्छरदाणीचा वापर करा.
✔️ पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
✔️ आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक साधनांचा वापर करा.
✔️ परिसरातील साचलेले पाणी लोकसहभागातून दूर करा.

डासांची उत्पत्ती रोखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला, आपला परिसर डासमुक्त आणि आरोग्यदायी बनवूया!

उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

 

 

       गोंदिया, दि.19 : राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ.उदय सामंत हे शुक्रवार दि.21 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8 वाजता नागपूर येथून मोटारीने नवेगावबांध ता.अर्जुनी मोरगाव कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता नवेगावबांध येथे पुस्तकांचे गाव नवेगावबांध उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11 वाजता नवेगावबांध येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण.

         दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात गोंदिया जिल्हा उद्योग विभाग (CMEGP) व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात गोंदिया जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत संवाद. दुपारी 2 वाजता पोवार बोर्डींग लक्ष्मीनगर गोंदिया येथे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात मराठी भाषा विभाग आढावा बैठक तसेच साहित्यिकांसमवेत संवाद. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पत्रकार परिषद. तदनंतर सायंकाळी 6 वाजता गोंदिया येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

0000000


Tuesday, 18 August 2026

जलसंधारण ही काळाची गरज; लोकसहभागातून जलक्रांती घडवा : लायकराम भेंडारकर

 






         गोंदिया दि.18 : जलसंधारण ही केवळ शासकीय योजना नसून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेतल्यास जलसमृद्ध गावांचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

         अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इंजोरी येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण जनजागृती कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे उपसभापती संदीप कापगते, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         श्री. भेंडारकर यांनी पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्यासाठी जलसंधारण, वृक्षारोपण आणि लोकसहभागाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ घेऊन गावपातळीवर जलसंधारणाची कामे गतीने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

         कार्यक्रमात जलसंधारणाचे महत्त्व विषद करण्यात आले तसेच उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली.

                                                            0000000