जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 22 June 2026

गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

 




मुंबई/गोंदिया, दि.22 : गोंदिया जिल्ह्यात नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन  करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि आधुनिक कृषी सुविधा उपलब्ध करून देण्याबराबरच गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.

गोंदिया जिल्ह्यातील नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाला मंजुरी देण्याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग आणि कृषी आयुक्त सुरज मांढरे बैठकीला उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले की, कृषी विभागाच्या जमीन वापराचे धोरण ठरवावे लागेल. गोंदिया येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्तरावर प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच कारंजा येथील तालुका बियाणे गुणन केंद्राच्या परिसरात विविध पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करून पुढील काळात कृषी उद्यान उभारण्याची योजना आहे. कारंजा येथील कृषी विभागाच्या जागेवर विविध कार्यालये, प्रयोगशाळा व शेतकरी प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक इमारतींच्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला आहे. जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या तीन प्रमुख प्रक्षेत्रांभोवती संरक्षणात्मक कुंपण उभारण्याचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालकांकडे सादर करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री भरणे म्हणाले की, कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आतापर्यंत २ हजार ७४७ लाभार्थ्यांना २६.५७ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या सुमारे १३.६९ कोटी रुपयांच्या अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामकाजासाठी आवश्यक वाहनांची उपलब्धता; तसेच सिमकार्ड, मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप वितरणासंदर्भातील प्रलंबित बाबींचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. लॅपटॉप वितरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. कारंजा येथे मंजूर माती परिक्षण प्रयोगशाळा सुरू असली तरी आवश्यक मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अडचणी येत आहेत. कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधानुसार कर्मचारी मंजुरीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात येईल.

खतांच्या विक्रीतील अनियमितता रोखण्यासाठी २० मे २०२६ रोजीच्या परिपत्रकांतील निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. आतापर्यंत ६० कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली असून ५ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द, २२ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एका कृषी केंद्राविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, युरिया खताच्या जास्त दराने विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे, असेही ते म्हणाले.

राज्यातील युरिया खत विक्रीच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर २२ जून २०२६ अखेर १२,२२४ खत विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १,१९२ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ५५ विक्रेत्यांचे परवाने रद्द व ८३३ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत; तसेच २१ ठिकाणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही मंत्री भरणे यांनी दिली.

                                                 0000000  

गोंदियात पेंशन समाधानचे आयोजन 24 जूनला

 


गोंदिया, दि.22 : जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांचे वतीने बुधवार दि.24 जून 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत कार्यशाळा तथा पेंशन समाधानचे आयोजन जिल्हा नियोजन व विकास समितीचे सभागृह (DPDC Hall), जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आहरण व संवितरण अधिकारी (DDOs) यांचेसाठी E- GPF प्रणाली तसेच E- REVISION PENSION CASES (सुधारित प्राधिकारपत्र) हे विषय घेण्यात येतील. तसेच पेंशन अदालतीत निवृत्तीवेतन धारकांसाठी पेंशनर समाधान तसेच निवृत्तीवेनधारक यांच्या समस्यांचे निराकरण कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांचेकडून करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांनी बुधवारी गोंदिया येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मोहम्मद तौसिफ हसीन तसेच अप्पर कोषागार अधिकरी (निवृत्तीवेतन) गोंदिया यांनी केले आहे.

                                                                        0000000  

पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

 


जिल्हाधिकारी यांनी केली पूरप्रवण भागांची पाहणी

गोंदिया, दि.22 : जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरु झाला असून जिल्ह्यातील पुरप्रवण भागात जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी रविवारी भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून जिल्हा प्रशासन पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सहायक अभियंता बाघ इटियाडोह प्रियम शुभम, कनिष्ठ अभियंता रामेश्वर कुंडलवाडे, संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी गोंदिया तालुक्यातील कोरणी घाट, रजेगाव, बिरसोला, कासा, काटी, पुजारीटोला या गावांना भेट देवून स्थानिक लोकांशी संवाद साधला तसेच मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने यावर्षी करण्यात आलेले पूर परिस्थितीचे नियोजन व भौगोलिक परिस्थिती पाहणी केली.

यावर्षी भारतीय हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. तरीही जिल्हाधिकारी यांनी पूरप्रवण गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली व पूर येण्याची कारणे तसेच पूर परिस्थिती दरम्यान शोध व बचाव करण्याकरीता प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून जाणून घेतली.

वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान तसेच वेळेवर शासनाकडून तात्काळ मदत देण्याकरीता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादीबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली. तसेच जिल्हाधिकारी यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी  संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी यांचे नागरिकांनी आवाहन

आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. प्रशासन व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. आज रोजी जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही. परंतु धरण, जलाशय या ठिकाणी पाण्यात उतरू नये. तसेच सेल्फीचे मोह टाळावे व पाण्यात बोटिंग करताना लाइफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

पाण्याचा वापर जपून करा...

यावर्षी कमी पावसाचा अंदाज असल्यामुळे येत्या काळात शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावे तसेच हवामान खात्याकडून प्राप्त सूचनांच्या आधारे शेतीची कामे करावे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्षारोपण जास्तीत जास्त प्रमाणात करावे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या पाणीटंचाई व वाढत्या तापमानाला तोंड देणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000000  


भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विजयी

 


मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात संपन्न ;

457 पैकी 456 वैध मतांची मोजणी

भंडारा/गोंदिया, दि.22 : महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा सभागृहात सकाळी 8 वाजता  सुरू झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक नितीन पाटील, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडली. मतमोजणीनंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी विजय संपादन केला.

महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा सभागृह येथे सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर चव्हाण, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विकास व्यवहारे, उपजिल्हाधिकारी जे.पी. लोंढे, नायब तहसीलदार (निवडणूक) रोशनी दिघोरे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणीअंती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी 302 मते प्राप्त करून विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मते मिळाली, तर सचिन कुंभलकर यांना एकही मत प्राप्त झाले नाही.

एकूण 457 मतांपैकी 1 मत अवैध ठरले असून 456 मते वैध ठरली. मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवडणूक निरीक्षक नितीन पाटील तसेच जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सावन कुमार उपस्थित होते.

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील चार मतदान केंद्रांमधून एकूण 457 मतपत्रिका प्राप्त झाल्या. यामध्ये भंडारा केंद्रातून 166, साकोली केंद्रातून 61, गोंदिया केंद्रातून 154 आणि सडक-अर्जुनी केंद्रातून 76 मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी 1 मत अवैध ठरल्यामुळे 456 मतांची मोजणी करण्यात आली.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

0000000






“रक्तदान-जीवनदान” : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त गोंदियात रक्तदान शिबीर आयोजकांचा गौरव

 




गोंदिया, दि.22 : दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधुन बाई गंगाबाई रक्तकेंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे MET हॉलमध्ये जिल्ह्यातील रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून के.टी.एस. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, बाई गंगाबाई रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. नितिका पोयाम तसेच विकृतीशास्त्र विभागप्रमुख व रक्तकेंद्र प्रभारी डॉ. अरविंद राठोड उपस्थित होते.

जिल्हाभरातील सुमारे 150 रक्तदान शिबीर आयोजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. घोरपडे यांनी रक्तपेढीच्या दैनंदिन कार्यात रक्तदान शिबीर आयोजकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. तसेच मागील वर्षी दिलेल्या आश्वासनानुसार कंपोनंट सेपरेशन युनिट सुरू करण्यात आले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी रक्त कोणत्याही कारखान्यात तयार करता येत नसल्यामुळे रक्तदान हे अत्यंत महान व जीवनदायी कार्य असल्याचे सांगत सर्वांना रक्तदानासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमास विविध विभागातील वरिष्ठ प्राध्यापक, विकृतीशास्त्र विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विजय बिसेन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित मुन, अमित ठवरे, युवराज जांभुळकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता पंढरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. पुजा बांबोर्डे यांनी मानले.

00000000

Saturday, 20 June 2026

निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

 




विविध आरोग्यपूर्ण योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

गोंदिया, दि.21 : योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.

आज इंदिरा गांधी स्टेडियम येथे 12 वा आंतराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष सचिन शेंडे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, नगरपरिषदचे मुख्याधिकारी संदिप बोरकर, धावपटू मुन्नालाल यादव यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गोंदावले म्हणाले, गोंदिया जिल्ह्याला सुंदर, स्वच्छ व हिरवेगार करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असून नशामुक्ती, योगसाधना व अशाप्रकारचे इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. योगाचे नियमित आचरण करुन सर्वांनी निरोगी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारावी असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Ageing) अशी असून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी योगाचे महत्व अधोरेखित करण्यात येत आहे. नियमित योगाभ्यासामुळे तणाव नियंत्रण, रोगप्रतिकारक शक्ती वाढ, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि जीवनशैलीजन्य आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. आधुनिक धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.नागेश गौतम यांनी शिथिलीकरणामध्ये ग्रीवा चालन, कटी चालन, स्कंद संचलन, घुटना संचलन तसेच योगासनामध्ये ताडासन, वृक्षासन, अर्ध चक्रासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, शशांकासन, वक्रासन, उत्तान मंडुकासन, मक्रासन, भुजंगासन, शलभासन, सेतु बंदासन, उत्तान पादासन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन, शवासन त्याचप्रमाणे प्राणायाममध्ये कपाल भाती, शितली, अनुलोम विलोम, भ्रामरी, ध्यान (प्रणव) आदी योग प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करवून घेतले.

या कार्यक्रमामध्ये नगर योग उत्सव समिती गोंदिया, अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिविंग, प्रजापिता ब्रम्हाकुमारी, ईश्वरीय विश्वविद्यालय, दिव्य योग फाउंडेशन, पतंजली योग समिती, रामकृष्ण सत्संग मंडळ, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टीट्युट, योग मित्र मंडळ व बलवान योग आदी योग शाखांचा यामध्ये समावेश होता.

याप्रसंगी गोंदिया जिल्ह्याला नशामुक्त करण्याचा दृढ निश्चय करण्यासाठी  नशामुक्त भारत प्रतिज्ञा सामुहिकरित्या घेण्यात आली. यावेळी नशामुक्त भारतासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. नागेश गौतम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रशांत कटरे यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

                              00000000

Friday, 19 June 2026

अमृततर्फे युपीएससी मुख्य परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी अर्थसहाय्य : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे

 

गोंदिया, दि.19 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) उमेदवारांना 'संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पुर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य (सन 2026-27) योजना राबविण्यात येत आहे.

सन 2026-27 मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबंधितांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज सादर करण्यापूर्वी सूचनांचे पालन करावे.

सदर योजनेविषयी भविष्यातील सर्व माहिती/सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी काही शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.

सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी 50 हजार रुपये व मुलाखतीच्या पुर्वतयारीसाठी 25 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

सदर योजनेसाठी ऑनलाईन/संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 17 जुलै 2026 आहे. अधिक माहितीसाठी 9112228776 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक ‘अमृत’ गोंदिया कार्तिक तिवारी यांनी कळविले आहे.

00000000