जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Sunday, 28 June 2026
गोंदिया: बाई गंगाबाई रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे दिमाखात उद्घाटन
कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
Saturday, 27 June 2026
२८ जून रोजी प्रत्येक बालकाला पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजून पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला बळ द्या!
२८ जून रोजी प्रत्येक बालकाला पोलिओचे ‘दोन थेंब’
पाजून पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला बळ द्या!
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी जिल्हा परिषद
अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर व उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे यांचे पालकांना कळकळीचे
आवाहन
गोंदिया, दि. 27 जून : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या
यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २५ जून
रोजी जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री.
लायकरामजी भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २८ जून रोजी होणाऱ्या
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
तथा आरोग्य सभापती मा. श्री. सुरेशजी हर्षे यांनीही मोहिमेच्या प्रभावी
नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीत मार्गदर्शन करताना
अध्यक्ष श्री. लायकरामजी भेंडारकर म्हणाले की, भारताने पोलिओमुक्त देशाचा मान
मिळवला असला तरी जगातील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचा धोका कायम आहे. त्यामुळे
हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे
वयोगटातील प्रत्येक बालकाला २८ जून रोजी पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत.
पोलिओमुक्त भारत कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही राष्ट्रीय जबाबदारी समजून
सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष तथा आरोग्य
सभापती श्री. सुरेशजी हर्षे यांनी आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत
सांगितले की, जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाडा तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागातील
बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पोलिओ बूथ, मोबाईल पथके आणि ट्रान्झिट पथकांची
प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये,
यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, तसेच लोकप्रतिनिधी,
ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी
या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत उपस्थित सर्व
मान्यवरांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, "२८ जून रोजी आपल्या घरातीलच
नव्हे तर शेजारील आणि नातेवाईकांच्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना
जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत. आपल्या मुलांचे
निरोगी भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही अत्यंत आवश्यक आणि जबाबदारीची बाब
आहे."
बैठकीस जिल्हा परिषदेच्या
सदस्यांमध्ये श्रीमती रचनाताई गहाणे, श्रीमती छायाताई नागपुरे, श्रीमती गीताताई
लिल्हारे, श्रीमती वैशालीताई पंधरे, श्रीमती सुधाताई रहांगडाले, श्री. प्रवीणजी
पटले, डॉ. भूमेश्वर पटले आणि श्री. रूपेशजी कुथे उपस्थित होते.
तसेच आरोग्य विभागाच्या
वतीने सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा हिवताप
अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. विजय आखाडे,
साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, श्री. मिलिंद नंदागवळी, श्री. प्रशांत खरात
तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी (THO) उपस्थित होते.
बैठकीत मोहिमेच्या यशस्वी
अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन, बूथ व्यवस्था, मोबाईल पथके, जनजागृती उपक्रम तसेच
दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपाययोजनांवर सविस्तर चर्चा
करण्यात आली. जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
00000
Friday, 26 June 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शाहू महाराजांनी अभूतपूर्व क्रांती घडविली - अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे
सामाजिक
न्याय विभागातर्फे सामाजिक न्याय दिन साजरा
गोंदिया, दि.26 : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अभूतपूर्व क्रांती घडवून समाजातील वंचित
घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी
अभिजित घोरपडे यांनी केले. त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची
जयंती सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण कार्यालय गोंदियाच्या वतीने सामाजिक
न्याय दिन म्हणून सामाजिक न्याय भवनात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून
सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त अनिल देशमुख, शुध्दोधन सहारे, सविता बेदरकर,
समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर, समाज कल्याण अधिकारी किर्तीकुमार कटरे व
समाजभुषण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. घोरपडे म्हणाले, राजर्षी छत्रपती
शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. शाहू
महाराज हे कृतीशील राजे होते. त्यांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी आणि समतेसाठी
अनेक कार्ये केली. त्यांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी खुप तळमळ होती, म्हणून
त्यांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. अनेक
गावांमध्ये त्यांनी शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत
त्या पालकांना प्रति महिना 1 रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली. समाजातील
दुर्लक्षित मागासवर्गीय दुर्बल घटकांच्याप्रती त्यांचा दृष्टीकोन विशेष सहानुभूती
व सुधारणावादी होता. त्यांचा आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा या दृष्टीकोनातून
त्यांचा जन्म दिवस 26 जून हा दरवर्षी ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात
येतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी समाजभुषण प्राप्त शुध्दोधन
सहारे, डॉ.सविता बेदरकर व सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त अनिल देशमुख यांनीही
आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी इयत्ता 10 वीत गोंदिया
जिल्ह्यातून प्रथम आलेली विद्यार्थीनी खुशी सुहास सुखदेवे व 10 वीत विभागीय
मंडळाच्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यप्राप्त अक्षरा शैलेंद्र कोल्हे, तसेच
इयत्ता 12 वीत देवरी तालुक्यातून प्रथम आलेला विद्यार्थी क्रिश मधुलाव चव्हाण व
तिरोडा तालुक्यातून प्रथम आलेली विद्यार्थीनी याशिका राजेश गुणेरीया, त्याचप्रमाणे
इयत्ता 10 वीत शासकीय निवासी शाळेतून प्राविण्यप्राप्त विद्यार्थी अक्षरा गोपीलाल
मेश्राम, तन्मय खेमराज साऊस्कार, आर्या प्रदिप वैद्य, संचित मोरेश्वर शहारे,
मोनिका रामकिशन देवांगण, रुतुजा अजय मेश्राम, कोमल लालचंद उके, दक्ष देवेंद्र
मेश्राम, हेमंत गोवर्धन लाडे, सिमरन रामेश्वर नंदगाये यांचा मान्यवरांच्या हस्ते
स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
तसेच राजेश दुलिचंद सेवतकर, प्रेमलाल
अंकुश बर्वे, लक्ष्मण बाबुलाल सेवतकर, देवराम तिलकचंद तांडेकर, मिलिंद कोविंदा
बिंझाडे, कल्पना माणिक बरियेकर, अभिमन मोतीराम बिंझाडे, धर्मेद्र ओमकार जगणे, नरेश
सुभाष बरैये, नरेंद्र कुंभारिया तांडेकर, सुजित विक्रम खरोले, विनोद भोजराज जगणे,
जितेंद्र रामु छिपे, तेजराम दुलीचंद भोंडेकर, संजय सुखदेव चवरे, मंगेश शिवराम
चौबे, अमित उमराव निकुरे, कपुरचंद शिवलाल कुलभजे, सुरेंद्र लकचंद कुलभजे, विरेंद्र
प्रेमलाल मोहबे, राजेश भरतलाल कनोजे, भिकु मेहतर गायकवाड या गटई कामगारांना मान्यवरांच्या
हस्ते पत्र्याचे स्टॉल वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण
सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले. सुत्रसंचालन प्रमोद गणवीर यांनी केले, तर
उपस्थितांचे आभार हेमंत घाटघुमर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी,
विद्यार्थीनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे व राजेश मुधोळकर, लक्ष्मण खेडकर, प्रकाश
मेश्राम अमित रंगारी, दिपक मेश्राम, पुष्पलता धांडे, आशिष जांभुळकर, पंकज काळे,
निशांत वाघमारे, मानिकराव इरले, गिरीधर गोबाडे, योगेश हजारे, निवेदिता बघेले,
विद्या मेश्राम, निवास सहारे व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0000000