जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 10 September 2026

मतदार यादी निरीक्षक वियजलक्ष्मी बिदरी 17 सप्टेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


       गोंदिया, दि.10 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारुप मतदार यादीवरील दावे व हरकतींच्या कालावधीत मतदार यादीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने त्या गुरुवार दि.17 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

         दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीवरील आक्षेप व हरकतींच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक गोंदिया जिल्ह्यात तीन भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या पहिली भेट दि.17 सप्टेंबरला देणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी 1.00 वाजता लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदार यादी पुनरीक्षणाचे काम पारदर्शक आणि अचूक व्हावे या दृष्टीने या बैठकीत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करुन आढावा घेतला जाणार आहे.

    जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी व अनुपस्थित/मयत/स्थलांतरीत/दुबार मतदारांची यादी जिल्ह्याच्या https://gondia.gov.in/en/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

          मतदारांना त्यांच्या कोणत्याही अडचणी/तक्रारी करीता मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे मतदार मदत केंद्र क्रमांक 63-अर्जुनी मोरगाव- 07196-220147, 64-तिरोडा- 07198-299020, 65-गोंदिया- 07182-236703 व 66-आमगाव- 07199-295296 आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदार मदत केंद्र क्रमांक 07182-236148 यावर 24 बाय 7 संपर्क करता येईल. असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी कळविले आहे.

                                                             00000000

         

राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन 12 सप्टेंबरला

 


       गोंदिया, दि.10 : सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.

जिल्हा न्यायालयासह गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच अन्य न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये लोक अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. लोकअदालतीत तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणांसह मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, महसुली प्रकरणे, वैवाहिक बाद, बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित वसुलीची प्रकरणे तसेच अन्य प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढता येणार आहेत. वाद मिटविण्यासाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकत्यांचे मंडळ पक्षकारांना मदत करणार आहे.

प्रलंबित तसेच दाखलपूर्व तडजोडीस पात्र प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश आर.जी. वाघमारे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एम.आर. बोरकर यांनी केले आहे.

0000000 

          


Wednesday, 9 September 2026

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची जिल्ह्यातील विविध शाळांना भेट : विद्यार्थ्यांशी साधला संवाद; शैक्षणिक सुविधांचा घेतला आढावा






गोंदिया, दि.9 : शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान विविध शाळांना भेट देऊन शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती तसेच शाळांमधील उपलब्ध भौतिक व शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य तसेच गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय सहायक व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
दौऱ्यादरम्यान शिक्षण आयुक्त श्री. सिंह यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डव्वा, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सडक-अर्जुनी तसेच अंगणवाडी व बालवाटिका सडक-अर्जुनी येथे भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाबाबतच्या अपेक्षा, भविष्यातील स्वप्ने व करिअरविषयक आकांक्षा जाणून घेतल्या. त्यांनी वर्गभेटीदरम्यान अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहभाग तसेच विज्ञान व गणित विषयाच्या अध्ययनाची माहिती घेतली.
तसेच पीएम पोषण आहार योजना, पीएम श्री शाळा अनुदान, शाळांमधील भौतिक सुविधा, अध्ययन व अध्यापन साहित्य, परसबाग, परिसर स्वच्छता, व्यवसाय शिक्षण, कार्यशिक्षण, वाचनालय व संगणक कक्ष आदींची पाहणी करून संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.
अंगणवाडी व बालवाटिकेतील शैक्षणिक वातावरण आणि बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला. शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना येणाऱ्या अडचणी, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न तसेच शाळाबाह्य कामांबाबतची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, आनंददायी व विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी उपलब्ध सुविधा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने या भेटीदरम्यान त्यांनी विविध बाबींचा आढावा घेतला.
0000000

शिक्षण हे समाजाचे केंद्रबिंदू असले पाहिजे : शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा शिक्षण आयुक्तांनी घेतला आढावा

  



                                                                                


गोंदिया, दि.9 : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणामुळेच देशाची प्रगती शक्य आहे. त्यामुळे शिक्षण हे समाजाचे केंद्रबिंदू असले पाहिजे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आवश्यक सुविधा आणि कौशल्याधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, जिल्हा नोडल अधिकारी प्रकाश मुकूंद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शिक्षण आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास त्यांचे जीवन उज्ज्वल होण्यास वेळ लागणार नाही. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे शाळांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शाळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा विकास समितीच्या (DPDC) माध्यमातून निधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्यावर भर द्यावा.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक उणिवा ओळखून त्यावर योग्य उपाययोजना करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. शिक्षकांनी आपली भूमिका आणि जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.

शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अधिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे. येत्या काळात विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारेल व याचे चांगले परिणाम दिसून येतील याची खातरजमा करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

संयुक्त राष्ट्र्र संस्थेच्या वतीने सतत विकासाचे धोरण निश्चित करण्यात आले असून याअंतर्गत शिक्षणही आहे. जगातील सर्वच बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासह केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या वतीने आणि राज्य शासनातर्फे आकांक्षीत जिल्हे तसेच तालुके निर्धारित केलेले आहेत. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी हे निश्चित केलेले आहेत. येथे असलेल्या शाळांमध्ये विशेष लक्षपूर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अनिवार्य आहे. असे श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

श्री. सिंह पुढे म्हणाले, अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, प्राथमिक शाळेनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. यासाठी स्थानिक शिक्षकांनी पालकांना विश्वासात घेऊन अशा विद्यार्थ्यांना योग्य त्या शाळेत दाखल करणे गरजेचे आहे.

साधन व्यक्तींना अधिक सक्षम करण्यावर भर

शिक्षण विभागातील साधन व्यक्तींच्या क्षमतेचे वेळोवेळी मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या चाचण्या घेण्यात याव्यात. साधन व्यक्तींनी अधिक सक्षम असणे आवश्यक असून त्यांनी दर महिन्याला शाळांना भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या विकासासाठी योगदान द्यावे. पीएम पोषण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांच्या एका आईने आहाराची चव घेण्याची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

शिक्षण, आरोग्य व पोषणाला प्राधान्य

शिक्षण, आरोग्य आणि पोषण या क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळून शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल, असे श्री. सिंह यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता व क्षमता अंगणवाडी किंवा इयत्ता पहिलीपासूनच ओळखून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. मुलगी शाळेत का येत नाही, याबाबतची माहिती यू-डायस प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होते. या माहितीचा उपयोग करून विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातच शिक्षण घ्यावे

जिल्ह्यातील विद्यार्थी बारावीपर्यंत शिक्षणासाठी अन्य जिल्ह्यात जाऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात यावा. प्रत्येक शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, शाळा व परिसराची स्वच्छता, क्रीडांगण, कुंपण भिंत, विद्युत सुविधा, आवश्यक फर्निचर तसेच ई-सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृत्रिम बुध्दीमत्ता(AI), व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकासाला प्राधान्य

बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यात यावा. व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज असून सध्याचे युग स्पर्धेचे असल्याने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देणे आवश्यक आहे. गाव आणि शाळा यांच्यातील संबंध अधिक दृढ करून शिक्षण प्रक्रियेत समाजाचा सहभाग वाढवावा, असेही शिक्षण आयुक्तांनी सांगितले.

‘शिक्षण केवळ पुस्तकातच नाही, तर व्यवहारात सुध्दा आहे’

शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून दैनंदिन व्यवहारातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित, व्यवहाराभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याची गरज आहे.

माझी शाळा सशक्तीकरण ही केवळ शिक्षण विभागाची नव्हे, तर समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाजाने एकत्रितपणे काम करावे, असे सांगत शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी ‘चला शाळेत जाऊया’ अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारणासाठी आवश्यक त्या सूचना केल्या व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येईल असे सांगितले.

यानंतर शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. शाळेत उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करुन जिथे शिक्षकांची कमतरता असेल अशा ठिकाणी शाळा व्य्वस्थापन समितीने पुढाकार घेऊन स्थानिक शिक्षित नागरिकांना स्वयंस्फुर्तीने तात्पुरते शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करावे. शाळेतील खोली रिकामी असेल तर त्यामध्ये अभ्यासिकेचे रुपांतर करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

                                                     00000000

 

Tuesday, 8 September 2026

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी नागपूर विभागातून सूचना आणि अभिप्राय मागविले : उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबरला नागपुरात



नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात असणार विशेष कक्ष

विद्यार्थी, परीक्षार्थी, पालकांसह सर्व संबंधित घटकांना अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

गोंदिया, दि.८ : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि अन्य संबंधित घटकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे कामकाजाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. त्यापूर्वी नागपूर विभागातील संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.
सूचना व अभिप्राय निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडे सादर करता येतील. प्रत्यक्ष सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांची स्वीय शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे स्वीकारण्यात येतील. तसेच nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवरही लेखी अभिप्राय पाठविता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी विहित मुदतीत ई-मेलद्वारे आपले अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यमान परीक्षा प्रणाली व विविध विभाग, प्राधिकरणे तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा, परीक्षा अधिक सुरक्षित, निष्पक्ष, पारदर्शक व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल प्रक्रियेपर्यंतची सुरक्षा, प्रश्नपत्रिकेचे मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी आणि मूल्यांकन याबाबत सूचना अपेक्षित आहेत.
तसेच बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करणे याबाबतही अभिप्राय मागविण्यात आले आहेत. इतर राज्ये अथवा देशांतील यशस्वी व आधुनिक परीक्षा पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान पायाभूत व सुरक्षा मानके, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग आणि परीक्षा संस्थांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण प्रणाली याबाबतही सूचना देता येणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या सूचना व शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील सर्व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सूचना व अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
०००००

अन्न व औषध प्रशासनाकडून एका नामांकित रेस्टॉरंटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित

 

गोंदिया, दि.8 : गोंदिया शहरातील शास्त्री प्रभाग स्थित एका अन्न आस्थापनेगध्ये जनआरोग्यास अत्यंत घातक ठरणारी अस्वच्छता आणि गंभीर त्रुटी आढळून आल्याने, अन्न व औषध प्रशासनाने सदर रेस्टॉरंटचा अत्र परवाना तात्काळ प्रभावाने (Forthwith Suspension) निलंबित केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी चै. ज. नानोटे यांनी दि.7 सप्टेंबर 2026 रोजी केलेल्या ऑनलाईन तपासणीदरम्यान या आस्थापनेत खालीलप्रमाणे गंभीर गैरसोयी व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले.
दूषित व कुजलेला कच्चा माल : स्वयंपाकघरात टोमॅटो कुजलेले, बटाटे उंदरांनी कुरतडलेले व अळ्यांनी दूषित स्थितीत आढळले.
मुदतबाह्य व विना-लेबल उत्पादने : सनफ्लॉवर वनस्पती/तेल, ब्रेड, स्वीट कॉर्न हे मुदतबाह्य (Expired) तसेच मगज बीज व चाट मसाल्याची पाकिटे विना-लेबल आढळली.
कचरा व किटकांचा धोका : कचऱ्याचे डबे उघडे व थेट गॅस शेजारी ठेवलेले आढळले, ज्यामुळे किटक व उंदरांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली.
परस्परांत दूषितीकरण (Cross-Contamination) : शाकाहारी व मांसाहारी अन्नासाठी वापरली जाणारी भांडी वेगळी नव्हती; तसेच कच्चे मांस पिण्याच्या पाण्याच्या नळाखाली अयोग्य रितीने धुतले जात होते.
अस्वच्छता व पायाभूत सुविधांचा अभाव : व्हेंटिलेशन व चिमणीची स्वच्छता न केल्याने प्रचंड ग्रीस/काजळी साचली होती, तसेच ड्रेनेज अयोग्य असल्याने सांडपाणी साचत असल्याचे दिसून आले.
या सर्व त्रुटींमुळे ग्राहकांना तीव्र अन्नविषबाधा, गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याचा थेट धोका निर्माण झाला होता.
व्यापक जनहित व जनआरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) अमृता शिर्के यांनी सदर अन्न आस्थापनेचा परवाना दि.8 सप्टेंबर 2026 पासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहे.
निलंबन कालावधीत सदर आस्थापनेत कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाकडून जिल्ह्यातील अन्न आस्थापनांची तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहील. तपासणीदरम्यान स्वच्छतेबाबत किंवा अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्यास संबंधित आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित/रद्द करण्यात येईल आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. असे पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) अमृता शिर्के यांनी कळविले आहे.
00000000

तिरोडा तालुक्यातील सरपंच पदाची सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुधारित आरक्षण सोडत आज

 


         गोंदिया, दि.8 : जिल्हाधिकारी, गोंदिया यांचे दि.7 सप्टेंबर 2026 च्या अधिसुचनेनुसार तिरोडा तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधीकरीता 93 ग्रामपंचायती पैकी 49 ग्रामपंचायतीची सरपंच पदाकरीता सुधारित सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करावयाचे असून त्याकरीता बुधवार दि.9 सप्टेंबर 2026 रोजी पंचायत समिती सभागृह, तिरोडा येथे सकाळी 11 वाजता आरक्षणाची सोडत होणार आहे. तरी तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांनी आरक्षण सोडतीकरीता उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिदार तिरोडा यांनी केले आहे.

                                                                  0000000