जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 29 July 2026

कर्जमुक्ती योजनेत ई-केवायसीला वेग; 61.58% प्रमाणीकरण पूर्ण

 

कर्जमुक्ती योजनेत ई-केवायसीला वेग; 61.58% प्रमाणीकरण पूर्ण

गोंदिया, दि. 29  : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यात ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेला वेग मिळत असून आतापर्यंत 61.58 टक्के प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. 29 जुलैपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, एकूण 20,915 कर्जखाते अपलोड करण्यात आली असून त्यापैकी 18,830 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 11,597 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून उर्वरित 7,233 प्रकरणे प्रलंबित आहेत.

प्रशासनाकडून ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने जनजागृती व पाठपुरावा सुरू आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यास कर्जमुक्तीचा लाभ लवकर मिळू शकणार आहे.

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, प्रलंबित असलेले ई-केवायसी त्वरित पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा.

00000

गोंदिया शहरात नझुल भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणासाठी विशेष शिबिर १ ऑगस्टला अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

गोंदिया शहरात नझुल भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणासाठी विशेष शिबिर

 १ ऑगस्टला अर्ज सादर करण्याचे आवाहन

                                   

गोंदिया, दि.२९ : मौजा गोंदिया येथील नझुल शीट क्रमांक १ ते ३२ मधील सर्व भाडेपट्टाधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोंदिया शहरात एकूण २,४९५ मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या असून, त्यापैकी शिल्लक राहिलेल्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण तसेच वर्ग–१ (फ्री होल्ड) करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक जमीन २४९९/प्र.क्र./१२५/ज-८ दिनांक २३ डिसेंबर २०१५ तसेच शासन निर्णय क्रमांक नझुल २०१६/प्र.क्र./१८६(अ) ज-८ दिनांक २ मार्च २०१९ नुसार सन २०१० ते २०४० या कालावधीसाठी भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण व फ्री होल्ड प्रक्रिया खासदार राजेंद्र जैन आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे.

याअंतर्गत, उर्वरित भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण व वर्ग–१ (फ्री होल्ड) करण्यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून जलाराम लॉन, फुलचुर, गोंदिया येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व भाडेपट्टाधारकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा नझुल अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :

१) अर्ज

२) आखीव पत्रिका

३) प्रमाणित नकाशा

४) सन १९५२-५३ चा प्रमाणित खसरा

५) जुन्या पट्ट्याची प्रत (उपलब्ध नसल्यास ₹१०० चा हलफनामा)

६) खरेदी खत

७) वाणिज्य वापर असल्यास स्थानिक नियोजन प्राधिकरणाची मान्यता (नमुना ७५, गुमास्ता, बांधकाम नकाशा इ.)

८) चालू वर्षाची नगर परिषद कर पावती

९) भाडेपट्टाधारक मृत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र व वारसांसाठी ₹१०० स्टॅम्पवरील प्रतिज्ञापत्र

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शिल्लक भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण आणि फ्री होल्ड प्रक्रियेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अर्ज सादर करावेत, जेणेकरून प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊ शकेल.

00000

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत शेतकऱ्यांना सुवर्णसंधी प्रक्रिया युनिट व गोदामासाठी ६०% अनुदान

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत शेतकऱ्यांना सुवर्णसंधी

प्रक्रिया युनिट व गोदामासाठी ६०% अनुदान

गोंदिया, दि. २९ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा–२ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPC) व महिला बचत गटांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कृषी मूल्यसाखळी बळकट करणे, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि शेतमाल साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने प्रक्रिया युनिट व गोदाम उभारणीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र संस्थांना प्रकल्प खर्चाच्या तब्बल ६० टक्के अनुदान मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी गटांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. स्थानिक स्तरावरच शेतमाल प्रक्रिया करून त्याला अधिक मूल्य मिळवून देणे, काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे तसेच बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण करणे, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या प्रकल्पात कृषी प्रक्रिया युनिट उभारणी, गोदाम बांधकाम, मूल्यवर्धन व पॅकेजिंग सुविधा, वैज्ञानिक साठवण व्यवस्था आणि बाजारपेठेशी थेट जोडणी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांची आर्थिक क्षमता वाढण्यास मदत होणार असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.

जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (DPIU), गोंदिया यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयं सहायता गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM, MAVIM), गावसंघ, प्रभाग संघ, लोक संचालित साधन केंद्र, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट तसेच पेसा क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायतींना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक संस्थांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (आत्मा), कारंजा, गोंदिया येथे त्वरित संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन, तांत्रिक माहिती व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा, असेही कळविण्यात आले आहे.

शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार व निर्धारित कालमर्यादेत प्रस्ताव सादर केल्यास या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), आत्मा, गोंदिया यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात किटकजन्य आजारांचा आढावा

 

दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात किटकजन्य आजारांचा आढावा

·        जन आरोग्य समितीच्या बैठकीत फॉगिंग, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावे या सह विविध प्रतिबंधात्मक उपायांवर मंथन करण्यात आले.

गोंदिया दि. 29 :  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सद्य स्थितीतील हिवताप जन्य परिस्थिती व वाढत्या किटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी दि. 28 जुलै 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे 'जन आरोग्य समिती'च्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत परिसरातील आरोग्य स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दि. 28 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील 'जन आरोग्य समिती'च्या विशेष बैठकीत अध्यक्ष जन आरोग्य समिती तथा जि.प.सदस्या गीताताई लिल्हारे, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम,पंचायत समिती सदस्या,सुनीताताई राऊत,पिपरियाचे सरपंच गुणारामजी मेहर,जमकुडोचे सरपंच नूतनताई सोनावणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस गिरी यांचे उपस्थितीत संपन्न झाली.

बैठकीदरम्यान जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील किटकजन्य आजारांच्या सद्यस्थिती आढावा घेतला.डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांत तात्काळ फॉगिंग (धूर फवारणी), डी-लारवा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.तसेच, आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करून स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांना केले.

जन आरोग्य समिती सभे दरम्यान लोकप्रतिनीधी व समाजसेवक त्यात मधूजी ओकटे, ओमप्रकाश लिल्हारे, गोविंदजी मरसकोल्हे, देवराजजी मरसकोल्हे, सुरेलाल मडावी,वैद्यकीय अधिकारी डॉ.शितालप्रसाद म्हैसकर यांचेसह दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे आवाहन

"पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वेगाने होते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात साचलेले पाणी वाहते करणे, आठवड्यातून एकदा 'कोरडा दिवस' पाळावा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फवारणी व तपासणी कामात सहकार्य करावे."

00000


‘राजस्व-समाधान’ शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

Uploading: 97327 of 97327 bytes uploaded.

Uploading: 176182 of 176182 bytes uploaded.

Uploading: 251728 of 251728 bytes uploaded.

‘राजस्व-समाधान’ शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोंदिया दि. 29 : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज ‘राजस्व-समाधान’ (शिकायत निवारण) शिविर विजयलक्ष्मी हॉल, आमगाव येथे नुकतेच  संपन्न झाले.

या शिबीराला जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून एकूण 2470 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमगावचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, पंचायत समिती आमगावच्या सभापती योगिताबाई पुंडे, सालेकसा सभापती विनताई कटरे, देवरी सभापती अनिलकुमार भिसेन जिल्हाधिकारी मंदार पत्की, यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात तहसीलदार मोनिका कांबळे यांनी शिबीराची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी आमगाव, देवरी व सालेकसा येथील महसूल यंत्रणा, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

शिविरात महिलांना ‘शेतकरी’ दर्जा देणारी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच गावठाण वस्तीतील नागरिकांना मालकी हक्काच्या सनदा देण्यात आल्या. मुख्यमंत्री बलिराजा शेत/फार्म ऍक्सेस रोड योजनेला मंजुरी देण्यात आली असून शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली.

याशिवाय ‘प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अॅक्ट’ अंतर्गत स्थानिक क्षेत्रांची घोषणा, ‘जीवंत सातबारा’ अभियान, विस्थापितांच्या जमिनींना फ्री-होल्ड करण्यासाठी ‘स्पेशल अमनेस्टी स्कीम-2025’ ला मुदतवाढ, राजमाता जिजाऊ महिला सशक्तीकरण योजना, आवास योजनेतील विशेष प्रावधान, कुंभार समाजासाठी सवलती तसेच कृषी जमिनीच्या कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी यांसारख्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.

कार्यक्रमात आमदार संजय पुराम यांनी नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारींचे तातडीने व प्रभावी निवारण करण्याच्या सूचना दिल्या.

शिविरात केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मोठी मदत झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

 

00000


आमदार विनोदजी अग्रवाल यांचे पुढाकाराने 200 क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वितरण

 





आमदार विनोदजी अग्रवाल यांचे पुढाकाराने

200 क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वितरण

गोंदिया, दि. 29 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीनिमित्त राज्यात दि.22ते 28 जुलै दरम्यान या कालावधीत राज्यभर विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याबाबत शासना मार्फत मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या आहेत.त्यानुसार आरोग्य संस्थेतील कार्यक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत,जनआरोग्य समीती सभा अंतर्गत विविध समाजोपोयोगी उपक्रम त्यात आरोग्य तपासणी,रक्तदान शिबीरे,वृक्षारोपण करण्यात येत आहे.त्याचबरोबर प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र बनून फूड बास्केटचे वितरण करण्यात येत आहे. दि.27 व 28 जुलै रोजी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील आमदार विनोदजी अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन गोंदिया तालुक्यातील 200 क्षयरुग्णाना फूड बास्केट वितरण करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत गोंदिया तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र  येथील कार्यक्षेत्रातील 200 क्षयरुग्णाना फूड बास्केटचे वितरण करण्यात आले.त्याच बरोबर समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी समोर येऊन निक्षय मित्र बनून गोरगरीब क्षयरोगी रुग्णांना मदतीचा हात देण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी गोंदियावासियांना केले आले.

क्षयरोगाच्या रुग्णांसाठी पौष्टिक 'फूड बास्केट' अतिशय महत्त्वाची असते. टीबीच्या औषधांमुळे रुग्णांची भूक मंदावते आणि शरीरातील ऊर्जा कमी होते.सकस आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, औषधांचे दुष्परिणाम कमी होतात, वजन स्थिर राहते आणि रुग्ण लवकर बरा होत असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.

क्षयरोग रुग्णांच्या उपचारात आणि पुनर्प्राप्तीमध्ये 'फूड बास्केट' (पोषक आहाराचे किट) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.चांगला व सकस आहार आजाराशी लढण्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो,औषधांचे दुष्परिणाम कमी करतो आणि रुग्णाचे वजन व ऊर्जा पूर्ववत करून त्याला लवकरात लवकर बरे होण्यास मदत करत असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव यांनी याप्रसंगी माहीती दिली आहे.

टीबी रुग्णांसाठी 'फूड बास्केट'चे महत्त्व आणि फायदे:

·        रोगप्रतिकारशक्ती वाढवणे: टीबीच्या जंतूंशी लढण्यासाठी शरीराला उच्च दर्जाचे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. फूड बास्केटमधील कडधान्ये, शेंगदाणे, अंडी व दूध यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती बळकट होते.

·        औषधांचे दुष्परिणाम कमी करणे: टीबीची औषधे खूप कडक असतात, ज्यामुळे मळमळणे, भूक मंदावणे व थकवा येणे अशा समस्या उद्भवू शकतात. पौष्टिक आहारामुळे रुग्णाचा अशक्तपणा दूर होतो.

·        वजन वाढवणे: टीबीमुळे रुग्णाचे वजन वेगाने कमी होते. आहारातील योग्य पोषण तत्वांमुळे वजन नियंत्रित राहून रुग्ण लवकर बरा होतो.

·        उपचारात सातत्य: अनेक गरीब रुग्ण आर्थिक दुर्बलतेमुळे औषधांचा खर्च करू शकत नाहीत किंवा उपाशीपोटी औषध घेऊ शकत नाहीत.फूड बास्केटमुळे रुग्णांना खात्रीशीर अन्न मिळते, ज्यामुळे ते उपचारांमध्ये खंड न पाडता पूर्ण कोर्स करतात.

·        कुटुंबाला आर्थिक आधार: आजारपणामुळे रुग्ण काम करू शकत नसल्याने कुटुंबावर आर्थिक संकट येते. फूड बास्केटमुळे कुटुंबाची अन्नाची गरज पूर्ण होऊन मोठा मानसिक व आर्थिक भार कमी होतो.

00000


गोंदिया जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षणाला वेग गणना पत्रक वाटप 98.85 टक्के, डिजिटायझेशन 80.28 टक्के

 

गोंदिया जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षणाला वेग

 गणना पत्रक वाटप 98.85 टक्के, डिजिटायझेशन 80.28 टक्के

गोंदिया, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 17 जुलै 2026 रोजी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून, त्याअंतर्गत जिल्ह्यात मतदान केंद्र स्तरावरील अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून मतदारांना गणना पत्रक (Enumeration Form) वाटपाचे काम वेगाने सुरु आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय कामाची 29 जुलै 2026 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंतची प्रगती अत्यंत समाधानकारक असून, एकूण 11,23,805 मतदारांपैकी 11,10,917 मतदारांना गणना पत्रकांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. याचे प्रमाण 98.85 टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे, 9,02,163 गणना पत्रके डिजिटाईज करण्यात आली असून डिजिटायझेशनचे प्रमाण 80.28 टक्के इतके आहे.

मतदारसंघनिहाय प्रगती पाहता, अर्जुनी मोरगाव (63) मतदारसंघात 2,59,149 मतदारांपैकी 2,58,383 मतदारांना गणना पत्रके वितरित करण्यात आली असून हे प्रमाण 99.7 टक्के आहे. त्यापैकी 2,19,315 पत्रके डिजिटाईज झाली असून डिजिटायझेशन 84.63 टक्के आहे.

तिरोरा (64) मतदारसंघात 2,67,869 मतदारांपैकी 2,67,418 मतदारांना गणना पत्रके देण्यात आली असून वाटपाचे प्रमाण 99.83 टक्के आहे. गोंदिया (65) मतदारसंघात 3,25,976 मतदारांपैकी 3,14,401 मतदारांना गणना पत्रके वितरित करण्यात आली असून हे प्रमाण 96.45 टक्के आहे. त्यापैकी 2,39,852 पत्रके डिजिटाईज झाली असून डिजिटायझेशन 73.58 टक्के आहे.

अमगाव (66) मतदारसंघात 2,70,811 मतदारांपैकी 2,70,715 मतदारांना गणना पत्रके वाटप करण्यात आली असून हे प्रमाण 99.96 टक्के इतके आहे. त्यापैकी 2,30,711 पत्रके डिजिटाईज झाली असून डिजिटायझेशन 85.19 टक्के आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी व संबंधित यंत्रणा या मोहिमेत सक्रियपणे कार्यरत असून उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही या प्रक्रियेत सहकार्य करून गणना पत्रक अचूक भरून देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000