जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 21 August 2026

गोंदिया जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील पायाभुत सुविधांसाठी 15 कोटी मंजूर - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

 





         गोंदिया, दि.21 : गोंदिया जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील पायाभुत सुविधांसाठी 15 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

         तत्पूर्वी जिल्ह्यातील उद्योजक आणि उद्योग विभागाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत गोंदिया जिल्ह्यातून दरवर्षी 2 हजार कोटीचा तांदूळ निर्यात होतो. त्यामुळे या भागात राईस मिल उद्योगांची संख्या अधिक आहे. त्याअनुषंगाने येथील एमआयडीसीमधील राईस मिल उद्योग व इतर उद्योगांना चालना देवून औद्योगिक विकासाला गती देणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा घेण्यात आला, तसेच जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिथ चंद्रा दोंतुला, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त विक्की खिराळे, एमआयडीचे प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, खादी व ग्रामोद्योग अधिकारी इंद्रजित देवीपुत्र यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

          श्री. सामंत म्हणाले, येथील औद्योगिक पदाधिकाऱ्यांच्या ट्रान्सपोर्टबाबत अडचणी लक्षात घेता, गोंदिया एमआयडीसीमध्ये कंटेनर पार्क तयार करण्यात येणार. 2 हजार कोटीचा तांदूळ जिल्ह्यातून उत्पादित होते, त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चांगला प्रकल्प निर्माण करण्यात येईल. राज्य शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बॅंकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त बेरोजगारांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी पी. एम. विश्वकर्मा व मधाचे गाव या योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यात अविकसित असलेले भूखंड तातडीने ताब्यात घेऊन गरजू लहान उद्योजकांना वाटप करण्याच्या अनुषंगाने तत्परतेने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याविषयी त्यांनी आवश्यक सूचना एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या.

          यावेळी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी गोंदिया जिल्ह्यातून जवळपास 2 हजार कोटी तांदळाची निर्यात होत असल्याबाबत अवगत केले. तसेच जिल्ह्यातील तांदूळ निर्यातकांचा वाहतूक खर्च कमी होण्याच्या उद्देशाने गोंदिया शहरालगत कंटेनर डेपो विकसित करण्याची मागणी केली. या विषयावर त्यांनी कॉनकॉर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. कॉनकॉर कंपनी याबाबत सकारात्मक असून जिल्हा प्रशासनाने सदर डेपोकरिता जागा उपलब्ध करुन द्यावी,असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच गोंदिया तालुक्यात मौजा डोंगरगाव येथे अंदाजे 40 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित एमएसएमई पार्कच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेतला.

         गोंदिया जिल्ह्यात राईस मिलिंग ही मुख्य औद्योगिक प्रक्रिया असून राईस मिल उद्योजकांना व विशेषत: तांदूळ निर्यातकांना निर्यातवाढीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. बैठकीत उद्योजकांना होणाऱ्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत सखोल चर्चा त्यांनी औद्योगिक संघटनांशी केली व या समस्या तत्परतेने सोडविण्याबाबत आवश्यक निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

         यावेळी उपस्थित औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व अडचणींवर सखोल व सकारात्मक चर्चा केल्याबद्दल मंत्रीमहोदयांचे आभार मानले.

                                                                   0000000


 






*तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा कार्यक्रम रानभाज्या या निसर्गाचे वरदान*

-        मुनेशजी रहांगडाले सभापती पंचायत समिती गोंदिया

 

गोंदिया,दि.21: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २१/०८/२०२६ रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता नविन प्रशासकिय इमारत, जयस्तंभ चौक गोंदिया येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती दिपाताई चंद्रिकापुरे कृषि व पशुसवर्धन सभापती जिल्हा परिषद गोंदिया, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. मुनेशजी रहांगडाले सभापती पंचायत समिती गोंदिया, मा. श्रीमती शैलेजा सोनवाने पंचायत समिती सदस्य नंगपूरा मुरी, मा.श्रीमती जितेश्वरी रहांगडाले पंचायत समिती सदस्य काटी, मा.श्री. अजित आडसुळे प्रकल्प संचालक आत्मा गोंदिया, मा.श्री. निलेश कानवडे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गोंदिया, मा.श्री. रूपेश मेश्राम प्रकल्प उपसंचालक आत्मा गोंदिया, मा.श्री. महेंद्र ठोकळे उपविभागीय कृषि अधिकारी गोंदिया, श्री. तिवारी नायब तहसिलदार गोंदिया, कु. नेहा आढाव तालुका कृषि अधिकारी गोंदिया आणि पाककला परिक्षक म्हणून प्राध्यापक श्रीमती तेजेश्वरी टेंभरे एस.एस. गर्ल्स हायस्कुल गोंदिया उपस्थित होते.

तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धाचे उद्घाटन मा. श्री. मुनेशजी रहांगडाले सभापती पंचायत समिती गोंदिया यांचे हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात मा. श्री. मुनेशजी रहांगडाले यांनी सांगितले कि, रानभाज्या या निसर्गाचे वरदान असून त्या त्यांच्यातील औषधीय गुणधर्मामुळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशिर आहेत. त्या फक्त पावसाळयामध्येच नैसर्गिकरीत्या मिळत असून त्याचा उपयोग आपल्या आहारात करावा. तसेच रानभाजी महोत्सव हा महोत्सवापुरताच न ठेवता दैनंदिन जिवनात लोकांना कसे उपलब्ध करता येईल याची सुचना कृषि विभागाला केली. मा. श्री. अजित आडसुळे प्रकल्प संचालक आत्मा यांनी सांगितले कि, नविन पिढीला रानभाज्यांचे महत्व कळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आपले पुर्वज रानभाज्यांचा समावेश आहारात करित होते त्यामुळे ते निरोगी व सुदृढ राहत होते. शरिराची रोग प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी रानभाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे, जेणेकरून आपले आरोग्य उत्तम राहील. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. निलेश कानवडे यांनी विविध रानभाज्याबद्दल माहिती दिली. तसेच रानभाज्यावर प्रक्रिया करून त्यांचा वर्षभर वापर कसा करता येईल याकरिता प्रक्रिया उद्योगाबद्दल कृषि विभागाकडून संपर्क करून विविध योजनेची माहिती घेवनू अर्ज सादर करावा व कृषि विभागाच्या योजनांचा फायदा घ्यावा असे आव्हान केले. प्राध्यापक श्रीमती तेजेश्वरी टेंभरे यांनी शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने, खनिजे व सुक्ष्म गुणद्रव्ये व रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यासाठी रोजच्या आहारात रानभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच रानभाज्यांचे महत्व सांगितले. कु. नेहा आढाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राध्यापक श्रीमती तेजेश्वरी टेंभरे, कु. मृदुला कोळी तंत्र अधिकारी आणि कु. भावना शेंद्रे लिपीक यांनी पाककलेच्या स्टॉलचे परिक्षण केले.

तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा मध्ये तालुक्यातील नैसर्गिकरित्या उत्पादित झालेल्या रानभाज्यांचे व रानभाज्यांपासून बनविलेल्या पाककृतींचे स्टॉल लावण्यात आले होते. महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांनी व उमेदच्या बचत गटांनी सुध्दा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. यावेळी जवळपास ६५ स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल मध्ये काटवल, सुरण, तरोटा, खापरखुटी, आंबाडी, सेवगा, मटारू, घोळभाजी, कोचईचे पाने, मशरूम, केना, पातुर भाजी इत्यादी रानभाज्यांचा समावेश होता. महिला शेतकरी तसेच गटांमार्फत रानभाज्यांची व रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्य पदार्थाची विक्री करण्यात आली. यावेळी एकुण ३५४३० रुपयांची उलाढाल झाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. टी.एस. तूरकर उपकृषि अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. सुनिल खडसे, कृषि अधिकारी श्री. मुनेश्वर ठाकुर, मंडळ कृषि अधिकारी श्री. रेशिम रामटेके, श्री. सुमित नंदनवार, उपकृषि अधिकारी श्री. जे.टी.मेंढे, श्री. किशोर रायसिडाम तसेच गोंदिया तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, कृषि सेवक तसेच सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हयातील उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गटातील महिला, शेतकरी व गोंदिया शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

00000


 




*विदर्भातील पहिल्या पुस्तकांचे गाव नवेगाव बांध येथे थाटात लोकार्पण झाडीबोली साहित्य संमेलनासाठी २५ लाखांचे अनुदान*

- मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

गोंदिया, दि.21 : मराठी भाषेचा विकास, तिचा अभिजात दर्जा अधिक बळकट करणे आणि जागतिक स्तरावर मराठीला प्रमुख भाषा म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी गावपातळीवर वाचन संस्कृती रुजविणे आवश्यक आहे. त्यासाठीच ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना राबविण्यात आली असून, विदर्भातील पहिले पुस्तकांचे गाव नवेगाव बांध येथे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच झाडीबोली साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

यावेळी श्री. सामंत म्हणाले की, गोंदिया जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. येथील वाचन संस्कृती अधिक मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नवेगाव बांधची ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून निवड केली आहे. आज पहिल्या दालनाचे उद्घाटन करताना विशेष आनंद होत आहे. झाडीबोली साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दरवर्षी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा करत त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी तिची समृद्ध ग्रंथसंपदा, संतपरंपरा आणि ऐतिहासिक वारसा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यामुळे मराठी अधिक समृद्ध झाली आहे. मराठीचा पहिला राज्यव्यवहार कोश छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

मराठीसोबतच विविध बोलीभाषांचाही विकास झाला पाहिजे आणि ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना त्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरील ‘चांदा ते बांदा’ या संकल्पनेनुसार प्रत्येक भागात पुस्तकांचे गाव आणि कवितेचे गाव उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीत शिक्षण घेऊनही जागतिक स्तरावर यश संपादन करता येते, याचा उल्लेख करत त्यांनी मातृभाषेच्या सामर्थ्यावर भर दिला. महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी भाषा शिकल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल, असेही ते म्हणाले. राज्य शासनाने आतापर्यंत १ लाख ६७ हजार हिंदी भाषिकांना मराठी शिकवल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मातृभाषेत शिक्षण घेऊन आपल्या मातीत राहून समाजसेवा करावी आणि जागतिक स्तरावरही नाव कमवावे, असा मोलाचा संदेश ही त्यांनी यावेळी दिला.

भंडारा दौऱ्यात गणेशपूर हे ‘पुस्तकांचे गाव’ आणि लाखनी हे ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच, झाडीपट्टीतील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी आपणही त्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शरद मेश्राम यांनी केले, तर सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक डॉ. लक्ष्मीकांत कापगते यांनी केले.

00000


Thursday, 20 August 2026

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अंतर्गत वडेगाव येथे दोन दिवसीय CPHC प्रशिक्षण उत्साहात संपन्न

 






            गोंदिया, दि.20 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' उपक्रमांतर्गत वडेगाव येथे दोन दिवसीय 'सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा' (CPHC - Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.

         या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांना दैनंदिन आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे पुरवण्यासाठी विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रात्यक्षिके, व्याख्याने व केस स्टडीच्या माध्यमातून सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

पहिला दिवस : प्राथमिक काळजी, माता-बाल संगोपन व आपत्कालीन सेवा कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी नोंदणी व उद्घाटनानंतर विविध सत्रांमध्ये आरोग्य सेवांच्या पायाभूत घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 * आयुष्मान आरोग्य मंदिर: डॉ. जी. एस. खोब्रागडे (Observer) यांनी संवादात्मक सत्राद्वारे आयुष्मान आरोग्य मंदिराची रचना आणि उद्दिष्ट्ये यावर प्रकाश टाकला.

 * माता व बाल आरोग्य: श्रीमती कुंदा कुंभरे यांनी गरोदरपणातील, प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. नवजात शिशु व अर्भकाच्या आरोग्य सेवांवर डॉ. सचिन उके यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले.

 * आणीबाणी व बाल आरोग्य: डॉ. राजेश वेलमकर यांनी 'इमर्जन्सी केअर व सीपीआर (CPR)' यावर प्रात्यक्षिक (डेमो चार्ट) सादर केले, तर श्रीमती रंजना रोकडे यांनी बालक व किशोर वयातील आरोग्य सेवांवर केस स्टडी घेतली.

 * आजार नियंत्रण व कुटुंब नियोजन: श्रीमती कुंदा कुंभरे यांनी कुटुंब नियोजन साधनांवर रोल प्ले केला. विजय मेश्राम यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व किरकोळ/संसर्गजन्य आजारांच्या व्यवस्थापनावर व्याख्यान दिले. डॉ. राजेश वेलमकर यांनी असंसर्गजन्य आजारांची छाननी व प्रतिबंधावर गटचर्चा घेतली.

दुसरा दिवस : क्षेत्र भेट, प्रात्यक्षिके व मानसोपचार

दुसऱ्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कौशल्यांवर व क्षेत्र अभ्यासावर भर देण्यात आला.

 * क्षेत्र भेट (Field Visit): सत्राच्या सुरुवातीला सुरजलाल दोनोडे यांनी कार्यक्षेत्र भेटीदरम्यान CBAC फॉर्म भरणे व HR मदर भेट याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले.

 * विशेष आरोग्य काळजी : डॉ. जी.एस. खोब्रागडे यांनी डोळे व कान समस्यांची प्राथमिक काळजी यावर प्रॅक्टिकल डेमो दिला. डॉ. राजेश त्रिपाठी यांनी तोंडाच्या आरोग्याची मूलभूत काळजी यावर डेमॉन्स्ट्रेशन दिले, तर डॉ. राजेश बेलमकर यांनी वृद्धापकाळातील काळजी व वेदनाशामक उपचारांवर केस चर्चा घेतली.

 * इमर्जन्सी व मानसोपचार: श्रीमती रंजना रोकडे यांनी तत्काळ वैद्यकीय सेवेसाठी BLS (Basic Life Support) डेमो दिला. दीपक आंगुलवार यांनी मानसिक आरोग्य, समुपदेशन व योग प्रात्यक्षिके करून घेतली.

 * प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग व आयुष उपचार पद्धतीचा अवलंब यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट सर्व सहभागी कर्मचाऱ्यांचे अभिप्राय आणि समारोपाने झाला. या प्रशिक्षणामुळे वडेगाव व परिसरातील नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.             

                                                                      000000000


अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर; 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


गोंदिया, दि.20 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना शेतीसह पुरक व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना सन २०२६-२७ साठी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पात्र बचत गटांकडून ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
दिनांक ६ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयनुसार राबविण्यात येणाऱ्या या योजनेत १५ अश्वशक्तीचे युवराज २१५ मिनी ट्रॅक्टर, १.५ टन क्षमतेचा नॉन-टिपिंग ट्रेलर आणि ०.८ मीटर रोटावेटर यासाठी कमाल ३.५० लाख रुपये खर्च ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापैकी ९० टक्के म्हणजे ३.१५ लाख रुपये शासकीय अनुदान, तर उर्वरित १० टक्के म्हणजे ३५ हजार रुपये बचत गटाचा हिस्सा राहणार आहे.
योजनेसाठी आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा किंवा कृषी विभागाकडे नोंदणीकृत आणि नियमित आर्थिक व्यवहार करणारे स्वयं सहाय्यता बचत गट पात्र असतील. गटातील सदस्यांनी यापूर्वी पॉवर टिलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे बंधनकारक आहे.
लाभार्थी बचत गटांना आवश्यक असल्यास ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी करण्याची मुभा राहील. मात्र शासनाकडून कमाल ३.१५ लाख रुपयांपर्यंतच अनुदान मिळणार असून अतिरिक्त खर्च संबंधित बचत गटाला स्वतः करावा लागेल.
योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर मान्यताप्राप्त उत्पादकाकडून ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी करावी लागतील. खरेदीची पावती सादर केल्यानंतर आणि आवश्यक अटींची पूर्तता झाल्यावर टप्प्याटप्प्याने अनुदान लाभार्थी बचत गटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. ट्रॅक्टरचा विमा, कायमस्वरूपी नोंदणी (Permanent Passing) आणि ट्रेलरची नोंदणी लाभार्थी गटाने स्वतःच्या खर्चाने करणे आवश्यक राहील.
शासनाने स्पष्ट केले आहे की, अनुदानातून मिळालेला ट्रॅक्टर विकणे किंवा गहाण ठेवणे हा बेकायदेशीर प्रकार मानला जाईल. अशा प्रकरणात संबंधित बचत गटावर फौजदारी कारवाई करून शासनाने दिलेले संपूर्ण अनुदान वसूल करण्यात येईल. तसेच संबंधित गटाला किमान पाच वर्षे शासनाच्या इतर योजनांसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
यापूर्वी अर्ज करूनही लाभ न मिळालेल्या बचत गटांनी नव्याने सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल.
इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयं सहाय्यता बचत गटांनी जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार किंवा इतर ओळखपत्र, रेशन कार्ड अथवा वीज बिलासह आवश्यक कागदपत्रे जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे दि.४ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.
00000000

‘पहा, जाणा, बदल दिसल्यास उपचार करा’ हा कानमंत्र; स्तन कर्करोगावर मात करण्यासाठी जनजागृतीची गरज

 






        गोंदिया, दि.20 : "पहा, जाणा, बदल दिसल्यास त्वरित उपचार करा" हा स्तन कर्करोगावर मात करण्याचा प्रभावी कानमंत्र देत 18 ऑगस्ट 'स्तन कर्करोग संशोधन दिवस' निमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील सुमारे 100 प्रभावशाली महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमातून स्तन कर्करोगाबाबत जागरूकता, नियमित तपासणी, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेवर उपचार केल्यास हा आजार पुर्णपणे बरा होऊ शकतो, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

            बी.जे. हॉस्पिटल, गोंदिया यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी व ऑन्को सर्जन डॉ. विकास जैन, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लता जैन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला शाखेच्या अध्यक्षा डॉ. शेफाली जैन, डॉ. अवि जैन, डॉ. जुली जैन, डॉ. निलेश जैन, डॉ. विवेक जैन तसेच बी. जे. हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय चमूच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.    

             प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिलांनीही हातातील दीप प्रज्वलित करून स्तन कर्करोग जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

            प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र जैन यांनी स्तन कर्करोगाबाबत जनजागृती ही काळाची गरज असल्याचे सांगून या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी नियमित तपासणी करून कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

            यावेळी डॉ. विकास जैन यांनी 18 ऑगस्ट हा दिवस 'स्तन कर्करोग संशोधन दिवस' म्हणून पाळला जात असल्याची माहिती दिली. भारतातील प्रत्येक आठ महिलांपैकी एका महिलेला आयुष्यात कधीतरी स्तन कर्करोगाचा धोका असू शकतो, असे सांगून त्यांनी या आजाराबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. सध्या अत्याधुनिक संशोधनामुळे अनुवंशिक पद्धतीने स्तन कर्करोग होण्याच्या शक्यतेची तपासणी करणाऱ्या चाचण्याही उपलब्ध झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. वेळेत निदान व योग्य उपचार झाल्यास स्तन कर्करोगावर पुर्णपणे मात करता येते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. शेफाली जैन यांनी स्तन कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे, नियमित स्व-स्तन तपासणीचे महत्त्व आणि महिलांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्तनात गाठ जाणवणे, त्वचेत बदल होणे, स्तनाग्रातून असामान्य स्त्राव होणे अथवा इतर कोणतेही संशयास्पद बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे त्यांनी आवाहन केले.

डॉ. अवि जैन यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या मॅमोग्राफी तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले. मॅमोग्राफीद्वारे स्तन कर्करोग अगदी सुरुवातीच्या अवस्थेत ओळखता येतो. त्यामुळे उपचार वेळेत सुरू होऊन रुग्ण पुर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक वाढते, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर यांनी आपल्या मनोगतात स्तन कर्करोगावर यशस्वी मात केलेल्या महिलांची उदाहरणे देत त्यांच्या जिद्दीचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. स्तन हा स्त्रीच्या मातृत्वाचे, सौंदर्याचे आणि आरोग्याचे प्रतीक असून त्याचे आरोग्य जपणे ही प्रत्येक महिलेची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक महिलेने स्वतः जागरूक राहून आपल्या कुटुंबातील व परिसरातील महिलांमध्येही जनजागृती करण्याचे आवाहन केले.

यावेळी स्तन कर्करोगावर यशस्वी मात केलेल्या प्रीती शामका यांनी स्वतःचा प्रेरणादायी अनुभव कथन केला. आरोग्याची व आहाराची योग्य काळजी घेत असूनही त्यांना स्तन कर्करोगाचे निदान झाले. मात्र वेळेत उपचार, सकारात्मक विचार आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळामुळे त्या या आजारातून पूर्णपणे बाहेर पडल्या. त्यांच्या अनुभवामुळे उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी स्तन कर्करोगासंदर्भात विविध प्रश्न विचारले. तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत शंकानिरसन केले. अनेक महिलांनी स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या कर्करोगाशी संबंधित अनुभव मोकळेपणाने मांडल्याने कार्यक्रम अधिक संवादात्मक आणि परिणामकारक ठरला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचा, स्तन कर्करोगाबाबत समाजात जनजागृती करण्याचा आणि "पहा, जाणा, बदल दिसल्यास उपचार करा" हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. लता जैन यांनी केले.

                                             0000000


2023-24 ते 2026-27 या कालावधीत सिंचन प्रकल्पांमधून लक्षणीय वाढ

 





     गोंदिया, दि.20 : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील चार वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार 2023-24 ते 2026-27 या कालावधीत निधीचा प्रभावी वापर करून सिंचन क्षमता निर्माण व पुनर्स्थापित करण्यावर भर देण्यात आला.

         2023-24 या वर्षात ₹1,219.49 लाख निधी प्राप्त झाला असून ₹762.28 लाख खर्च करण्यात आला. या वर्षात 84 कामे पूर्ण झाली. त्यातून 1716 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण झाली, तर 686 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यात आली. एकूण 2,402 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली.

2024-25 मध्ये ₹967.45 लाख निधी प्राप्त झाला असून ₹852.42 लाख खर्च करण्यात आला. या वर्षात 1,831 कामे पूर्ण झाली. त्यातून 2,464 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण झाली व 1,003.20 हेक्टर क्षमता पुनर्स्थापित करण्यात आली. एकूण 3,467.20 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली.

2025-26 मध्ये ₹1,555.22 लाख निधी प्राप्त होऊन ₹990.36 लाख खर्च करण्यात आला. या वर्षात 5,136 कामे पूर्ण झाली. त्यातून 5,962 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण झाली, तर 2,384.80 हेक्टर क्षमता पुनर्स्थापित करण्यात आली. त्यामुळे एकूण 8,346.80 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली.

2026-27 मध्ये आतापर्यंत ₹2,657.23 लाख निधी प्राप्त झाला असून ₹1,888.31 लाख खर्च करण्यात आला आहे. या कालावधीत 238 कामे पूर्ण झाली. त्यातून 5,236 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण झाली व 2,094.40 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यात आली. एकूण 7,330.40 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली. तसेच 217 कामे प्रगतीपथावर आहेत.

एकूणच, चार वर्षांच्या कालावधीत सिंचन प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून हजारो हेक्टर क्षेत्रासाठी सिंचन क्षमता निर्माण व पुनर्स्थापित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा वाढण्यास मदत झाली असून कृषी उत्पादन वाढीस चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

                                                  0000000