जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 13 July 2026

100 टक्के डिजीटायजेशन करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या चार BLO यांचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते गौरव

 



       गोंदिया, दि.13 :  भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 14 मे, 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision) कार्यक्रम (दिनांक 20/06/2026 ते 07/10/2026) घोषित केलेला आहे.

          विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत दिनांक 29 जुन 2026 पासून गणनापत्रक वाटप व डिजीटायझेशनचे काम सुरु झालेले आहे, गोंदिया जिल्यात एकुण 11,23,805 एवढया मोठ्या प्रमाणावर मतदार संख्या सर्व मतदारांना गणना पत्रक देऊन त्यांच्या माहितीचे डिजीटायझेशन दिलेल्या मुदतीत करणे बंधनकारक आहे.

           दिनांक 10/07/2026, 11/07/2026, 12/07/2026 रोजी जिल्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका/नगर पंचायत कार्यालय येथे विशेष कॅम्प घेण्यात आले. आज दिनांक 13/07/2026 रोजी जिल्हयामध्ये एकुण 3,51,829 मतदारांचे डिजीटायजेशन करण्यात आले, ही टक्केवारी 31.31% इतकी आहे. गोंदिया जिल्हयातील EF 100 टक्के डिजीटायजेशन झालेले आहे अशा पहिल्या चार BLO यांचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते सत्कार करुन गौरविण्यात आले. सत्कारीमुर्ती खालील प्रमाणे.

1) श्री श्रीकांत तागडे, शिक्षक, BLO भाग क्रमांक 265 कोटजांभोरा तहसिल देवरी LAC 66 आमगांव

2) श्री राहुल काकडे, ग्राम महसुल अधिकारी, देवरी BLO भाग क्रमांक 292 धवलखेडी तहसिल देवरी LAC 66 आमगांव

3) श्री पंकजकुमार असाटी जिल्हा परीषद प्राथमीक शिक्षक BLO भाग क्रमांक 208 भजेपार तहसिल तिरोडा LAC 64 तिरोडा

4) श्री कैलास जी पाटील ग्राम पंचायत अधिकारी BLO भाग क्रमांक 124 गुमाधावडा तहसिल तिरोडा LAC 64 तिरोडा

         अध्यापही काही BLO यांचे डिजीटायजेशनचे प्रमाण खुप कमी आहे. अशा BLO यांच्या कामात प्रगती दिसुन न आल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. SIR संबधीत काही अडचणी आल्यास नागरीकांसाठी जिल्हास्तरावर हेल्पलाईन 24 X 7, 07182-236148 / 1950 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

        करीता मतदारांनी आपला सर्व तपशील अचुक भरुन BLO यांचेकडे तात्काळ दयावा असे आवाहन  जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

        SIR प्रक्रीयेत राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनीधी यांचा सहभाग देखील महत्तवपुर्ण आहे जिल्हयातील मान्यता प्राप्त राजकीय पक्ष यांचे जिल्हाध्यक्ष यांची बैठक दिनांक 16/07/2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. या बैठकीत SIR च्या कामातील प्रगती बाबतची माहीती राजकीय पक्ष यांना देण्यात येणार असून नागरीक व राजकीय पक्ष यांचे विविध शंकाचे निरसन केले जाणार आहे.

*SIR स्थिती अहवाल (दि.13 जुलै 2026, सायं. 4.00 पर्यंत)*

*थोडक्यात माहिती :*

          गोंदिया जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत कामाला वेग आला असून सर्व 1285 BLO  प्रशिक्षित आहेत. जिल्ह्यात एकूण सुमारे 11.23 लाख मतदार असून त्यानुसार फॉर्म (EFs) वितरणाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे.

         एकूण 96.03% फॉर्म वितरित झाले आहेत. त्यापैकी 32.38% फॉर्म डिजिटाईज झाले आहेत. सुमारे 32.36% फॉर्म BLO कडून पडताळले गेले आहेत. Self Mapping 15.94% तर Progeny Mapping 16.12% नोंदवले गेले आहे.

         अनियमितता (Anomalies) 2.66% इतकी आढळली आहे. तालुकानिहाय पाहता, आमगाव व अर्जुनी मोरगाव येथे कामाचा वेग चांगला असून इतर भागांतही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

         एकूणच, गोंदिया जिल्ह्यात SIR मोहिमेचे काम समाधानकारक गतीने सुरू असून पुढील टप्प्यात डिजिटायझेशन आणि पडताळणीवर भर दिला जात आहे.

                                                                00000000

सोशल मीडियावर एसआयआरबाबत बनावट संदेश निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण : ‘मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये’

 


        गोंदिया, दि.13 : सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सअॅपवर @ecisveep आणि @ceo_maharashtra यांच्या नावाने बनावट संदेश आणि मोबाईल क्रमांक व्हायरल होत असल्याची बाब समोर आली आहे. ‘SIR-2026’ प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचा दावा करत, दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क न केल्यास मतदार ओळखपत्र हटवले जाईल, असा संदेश पसरवला जात आहे.

         मात्र, हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि निराधार असल्याचे निवडणूक यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारचे कोणतेही संदेश अधिकृत नसून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

         निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, मतदार यादीसंबंधित कोणतीही माहिती, पडताळणी किंवा कार्यवाही ही केवळ अधिकृत माध्यमांतूनच केली जाते. अनोळखी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याची आवश्यकता नसून, अशा संदेशांना प्रतिसाद देणे टाळावे.

         नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास थेट अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांपासून सावध राहून केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000000

 

यशोगाथा... प्रगतशील शेतकरी श्री. दादा रामजी फुंडे

 





        गोंदिया, दि.13 : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खारी सुकळी येथील शेतकरी श्री. दादा रामजी फुंडे यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत वर्ष 2023 मध्ये  उद्यानपंडित पुरस्कार सन 2023 घोषित झाला असून नुकताच विद्यमान राज्यपाल यांच्या हस्ते उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       सुरुवात साधी, ध्येय मोठे : परंपरागत शेतीतून सुरुवात करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, बदलत्या काळानुसार त्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा निर्धार केला आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात केली.

       विविध पिकांची यशस्वी लागवड : श्री. फुंडे यांनी आंबा, पेरू, चिकू, सीताफळ यांसह विविध भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पन्नाचे स्रोत वाढवले. त्यांनी स्वतःची रोपवाटिका सुरू करून भाजीपाल्याची दर्जेदार रोपे तयार करून विक्रीही सुरू केली.

       सेंद्रिय शेतीचा अवलंब : रासायनिक खतांपासून दूर जात त्यांनी सेंद्रिय खत, जीवामृत, दशपर्ण अर्क यांचा वापर सुरू केला. गांडूळ खत व कंपोस्ट खताची स्वतः निर्मिती करून उत्पादन खर्च कमी केला आणि मातीची सुपीकता वाढवली.

       पाणी व्यवस्थापनात स्मार्ट पद्धती : ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत केली. प्लास्टिक मल्चिंगद्वारे बाष्पीभवन कमी करत उत्पादनात लक्षणीय वाढ साधली.

       पर्यावरणपूरक किटक नियंत्रण : रासायनिक कीटकनाशकांऐवजी फेरोमोन सापळे, चिकट सापळे आणि जैविक उपायांचा वापर करून त्यांनी सुरक्षित व निरोगी शेतीचा आदर्श निर्माण केला.

          आधुनिक शेतीकडे वाटचाल : राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेडनेट हाऊस उभारून कोबी, मिरची, चवळी यांसारखी पिके घेतली. तसेच APEDA अंतर्गत नोंदणी करून निर्यातक्षम शेतीकडेही त्यांनी पाऊल टाकले.

        समूह शेती व मार्गदर्शन : ‘योगश्री एफपीओ’ आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सामूहिक शेतीला चालना दिली. विविध प्रशिक्षण, प्रदर्शन आणि सोशल मीडियाद्वारे ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.

          प्रेरणादायी निष्कर्ष : श्री. दादा रामजी फुंडे यांची ही यशोगाथा दाखवून देते की, नवीन तंत्रज्ञान, सेंद्रिय पद्धती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर शेतीत मोठे यश मिळवता येते. त्यांच्या कार्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी प्रेरित होत असून, आधुनिक शेतीचा मार्ग अधिक बळकट होत आहे.

00000000

शिरपूर बांध येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कामाचा आढावा : गुणवत्तापूर्ण व जलद काम करण्याचे उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय अवधाने यांचे निर्देश

 



        गोंदिया, दि.13 : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत शिरपूर बांध (ता. देवरी) येथे शनिवारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी बीएलओ सहाय्यकांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या तसेच काम जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय अवधाने यांनी निर्देश दिले.

          या पाहणीदरम्यान अपर तहसीलदार चिचगड नवनाथ कातकडे तसेच तहसीलदार देवरी धनंजय देशमुख उपस्थित होते. श्री. अवधाने यांनी बीएलओ सहाय्यकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कामातील अडचणी जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले.

         विशेष म्हणजे, दूर ग्रामीण भागातील बीएलओ सहाय्यक सुद्धा SIR कामात उत्साहाने सहभागी झालेले दिसून आले. हे सहाय्यक स्थानिक गावातील असल्याने गावातील मतदारांशी त्यांचा सहज संपर्क होत असून काम प्रभावीपणे पार पडत आहे. त्यामुळे मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला गती मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

                                                                              0000000

यशोगाथा... सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका : उमेद योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना

 





         गोंदिया, दि.13: आमगाव तालुक्यातील केलसर येथे समृद्ध CLF गट मार्फत सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना व शेतकऱ्यांना रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. सूक्ष्म प्रकल्प सन 2024-25 अंतर्गत सुमारे 45 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाने अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

          या प्रकल्पाची दररोज 2 टन उत्पादनाची क्षमता असून, एकूण 180 सदस्य या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. रोपवाटिकेसाठी 4.5 एकर तर भाजीपाल्यासाठी तब्बल 45 एकर क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनावर भर देण्यात आल्याने बाजारात या उत्पादनांना चांगली मागणी मिळत आहे.

         या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती झाली असून, सुमारे 500 कुटुंबांना या उपक्रमातून उपजीविकेचा आधार मिळाला आहे. महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून चालणाऱ्या या प्रकल्पामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळाली आहे.

         सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आरोग्यदायी अन्ननिर्मिती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीचा मार्ग या प्रकल्पातून पुढे येत आहे. भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

                                                                   0000000

विशेष वृत्त... वर्ष २०२६-२७ साठी विविध योजनांमध्ये २६,२७४ लाभार्थी होणार समावेश : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासह कृषी व सिंचन योजनांना प्राधान्य

 

 

         गोंदिया, दि.13 : वर्ष २०२६-२७ या वर्षासाठी विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभार्थी निवडीचे व्यापक नियोजन करण्यात आले असून, मागील वर्षाच्या तुलनेत अनेक योजनांमध्ये लाभार्थी संख्येत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी २६,२७४ लाभार्थ्यांना मिळणार लाभ. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना अधिक प्रमाणात योजनांचा लाभ मिळणार आहे.

          राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यंदा भात, कडधान्य, भरडधान्य तसेच पोषक तृणधान्य या घटकांमध्ये लाभार्थी संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

भातासाठी ७४८७ वरून ८०००, कडधान्यांसाठी ५४५० वरून ६०००, तर भात पड क्षेत्र कडधान्यांसाठी ३४४४ वरून ४००० लाभार्थी नियोजित करण्यात आले आहेत. पोषक तृणधान्यांतही वाढ करून १०० वरून ५०० लाभार्थी करण्यात आले आहेत. भरड धान्यामध्ये मागील वर्षी ११४६ वरून यावर्षी नियोजित लाभार्थी २००० करण्यात आलेले आहेत. कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी १७३ लाभार्थ्यांवरून १८० लाभार्थी यावर्षी आहेत.

          याशिवाय कृषी यांत्रिकीकरण योजनांमध्येही वाढ दिसून येते. केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानात ३६२ वरून ५०० तर राज्य पुरस्कृत योजनेत १६७६ वरून २००० लाभार्थ्यांचे नियोजन आहे. सिंचन क्षेत्रातही PMKSY (ड्रिप सिंचन योजना) अंतर्गत लाभार्थी ५६ वरून १०० पर्यंत वाढविण्यात आले आहेत.

          मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी १६ वरून ५० लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गतही लाभार्थी संख्या वाढवून अनुक्रमे ४३ वरून २६४ आणि ५६ वरून २०० करण्यात आली आहे.

          फळबाग लागवड योजनांमध्येही विशेष भर देण्यात आला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत १६ वरून १३४० तर  रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेत १११५ वरून १३४० लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.

          एकूणच, सन २०२५-२६ मध्ये २१,१५८ लाभार्थ्यांच्या तुलनेत सन २०२६-२७ मध्ये २६,२७४ लाभार्थ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कृषी क्षेत्रात विकासाला चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

0000000

यशोगाथा... प्रिती टेंभरे या ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित’; आधुनिक शेतीतून घडवला आदर्श

 




         गोंदिया, दि.13 : गोंदिया जिल्ह्यातील चुटिया येथील प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती प्रिती ऋषी टेंभरे यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार वर्ष 2023’ प्रदान करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पूरक व्यवसायांची जोड आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना विद्यमान राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

         श्रीमती टेंभरे यांनी आपल्या शेतात सौर ऊर्जा युनिट, सौर पंप आणि बायोगॅस युनिटची स्थापना करून ऊर्जा बचत साधली आहे. मजुरी खर्च कमी करण्यासाठी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, मल्चिंग व गवत कापणी यंत्रांचा प्रभावी वापर केला. तसेच 60 ते 80 गाईंचे संगोपन करत पंचगव्य आधारित उत्पादने तयार करून दुग्धव्यवसायालाही चालना दिली आहे.

        ‘योगी’ ब्रँडच्या माध्यमातून त्यांनी दुग्धजन्य पदार्थांची थेट विक्री सुरू केली असून स्थानिक बाजारपेठेबरोबरच शहरी भागातही विक्रीचे जाळे उभे केले आहे. कोरोना काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून देत देशी गाईंच्या शेणापासून राखी तयार करण्याचा उपक्रमही त्यांनी राबवला, ज्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे.

         याशिवाय ‘लक्ष्मी’ कृषी पर्यटन केंद्र उभारून कृषी पर्यटन व्यवसायाला चालना दिली आहे. ‘लक्ष्मी शेतकरी उत्पादक संघ’ व ‘लीलावती अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी’च्या माध्यमातून शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. गेल्या 12 वर्षांपासून सेंद्रिय शेती व गोपालन विषयावर शेतकरी मेळावे आणि प्रत्यक्ष शेतावर प्रशिक्षण देण्याचे कामही त्या सातत्याने करत आहेत.

         शेतीतील पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन आणि शेततळ्यांचा वापर करून पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन त्यांनी केले आहे. फेरोमोन सापळे व पक्षी थांबे यांसारख्या उपाययोजनांमुळे पर्यावरणपूरक शेतीला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

         श्रीमती प्रिती टेंभरे यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी त्या प्रेरणादायी ठरत असून महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

00000000