जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 29 June 2026

गोंदिया जिल्ह्यात ३० जूनला ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा होणार


गोंदिया,29 : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने येत्या ३० जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि १०० टक्के पटसंख्या पूर्ण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून, गावपातळीवर जनजागृती करून पालकांना मुलांना शाळेत दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः वंचित व शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश देण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी शाळांमध्ये विविध स्वागत उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नवीन विद्यार्थ्यांचे टिळा लावून, फुगे देऊन व पुष्पगुच्छांनी स्वागत केले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पालक मेळावे आणि शाळा स्वच्छता मोहिमाही राबविण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन (शालेय पोषण आहार) व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. शाळांमध्ये सुरक्षित व आनंददायी वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना नियमित उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
यासोबतच आरटीई (Right to Education) अंतर्गत प्रवेश, गुणवत्ता वाढ, डिजिटल साधनांचा वापर आणि शैक्षणिक उपक्रम याबाबतही पालक व ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती (SMC), शिक्षक व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
0000

मंदार पत्की यांनी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला



गोंदिया, 29 : भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2019 तुकडीचे अधिकारी मंदार पत्की यांनी गोंदिया जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आज पदभार स्वीकारला आहे. 

यापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ZP) म्हणून त्यांनी फेब्रुवारी २०२४ ते जून २०२६ या कालावधीत प्रभावी नेतृत्व केले. श्री. पत्की नंदुरबार जिल्ह्यात तळोदा येथे प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी (SDM) म्हणून कार्य करताना आदिवासी भागातील विकासकामांना गती दिली. 

बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले मंदार पत्की यांनी २०१९ च्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अखिल भारतीय क्रमांक २२ वा मिळविला होता. त्यांनी पुण्यातील वीआयटी महाविद्यालयातून यांत्रिकी (मेकॅनिकल ) अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

गोंदिया जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हे आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी नमूद केले.

00000

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सुवर्णसंधी ; जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ उचलावा : जिल्हा कृषी अधीक्षक यांचे आवाहन

.

योजनेतून मिळवा लाखो रुपयांचे अनुदान
गोंदिया, दि. 29: ग्रामीण आणि शहरी भागातील युवक, शेतकरी व उद्योजकांसाठी उद्योग उभारणीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी यंदा 291 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कृषि विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी केले आहे.  

ही योजना बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी https://pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे.

*आकर्षक अनुदान व सुविधा*
या योजनेअंतर्गत वैयक्तिक तसेच गट स्वरूपातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येते. उद्योग सुरू करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्क्यांपर्यंत, कमाल 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. कर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.
याशिवाय, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था व स्वयंसहाय्यता गटांना सामाईक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 3 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. तसेच मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी 50 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

*कोणते उद्योग करता येतील?*

फळे, भाजीपाला, कडधान्ये, तेलबिया, अन्नधान्य तसेच गूळ प्रक्रिया यांसारख्या उद्योगांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.

*अर्ज प्रक्रिया सुलभ*
अर्जदारांना संपूर्ण प्रक्रियेत मदत करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जिल्हा संसाधन व्यक्ती नेमण्यात आलेली आहे. अर्ज भरण्यापासून ते कर्ज मंजुरीपर्यंत मार्गदर्शन निशुल्क दिले जाते.
पात्रता व कागदपत्रे
या योजनेसाठी शेतकरी, युवक, महिला बचत गट, उद्योजक, संस्था तसेच अ‍ॅग्रो कंपन्या अर्ज करू शकतात. शेती नसलेल्या व्यक्तींनाही संधी उपलब्ध आहे.

अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, शिक्षण प्रमाणपत्र (किमान 8 वी उत्तीर्ण), उद्यम आधार, FSSAI परवाना, यंत्रसामग्रीचे कोटेशन, वीज बिल आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
रोजगारनिर्मितीला चालना

PMFME योजना ही रोजगारनिर्मिती व आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. स्थानिक पातळीवर उद्योग उभारून उत्पन्न वाढविण्याची ही उत्तम संधी असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. निलेश कानवडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा..
00000

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

*कर्जमुक्ती विशेष लेख – 29 जून 2026*




महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात काही निर्णय हे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नोंदले जात नाहीत, तर ते शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरतात. राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही अशाच प्रकारची योजना आहे. ही योजना केवळ कर्जमाफी देणारी योजना नसून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य, नव्याने पतपुरवठा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने नेणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिली जात आहे.

2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत शेतीचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रातील शेती आजही मोठ्या प्रमाणावर निसर्गावर अवलंबून आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, हवामानातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्चातील वाढ या अनेक कारणांमुळे शेतकरी वारंवार आर्थिक संकटात सापडतो. अशा परिस्थितीत कर्ज हा शेतीचा अविभाज्य भाग बनतो. परंतु जेव्हा हे कर्ज परतफेडीच्या क्षमतेपलीकडे जाते, तेव्हा त्याचे रूप आर्थिक विवंचनेत बदलते. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने यापूर्वीही विविध कर्जमुक्ती योजना राबवल्या होत्या. मात्र या वेळी शासनाने केवळ कर्जमुक्तीचा विचार न करता भविष्यात शेतकरी पुन्हा त्याच परिस्थितीत अडकणार नाही यासाठी व्यापक दृष्टीकोन स्वीकारला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेला देण्यात आले आहे, यालाही विशेष महत्त्व आहे. लोककल्याणकारी शासन, जलसंधारण, सिंचन व्यवस्था, ग्रामीण विकास आणि रयतेच्या हिताचा सातत्याने विचार करणाऱ्या अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या योजनेला त्यांचे नाव देऊन शासनाने इतिहासातील लोकाभिमुख परंपरेला अभिवादन केले आहे.
या योजनेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिची रचना. यापूर्वी अनेकदा असे होत असे की दोन लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नसे. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज दोन लाख दहा हजार रुपये असले तरी तो संपूर्णपणे अपात्र ठरत असे. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत होते. यावेळी शासनाने ही त्रुटी दूर केली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती शासनाकडून मिळणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्याचा आणि शेती उभी करण्याचा मार्ग खुला होणार आहे.
 

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. अनेकदा चर्चेत केवळ थकीत कर्जदार येतात; मात्र वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक शिस्त राखणाऱ्या आणि प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे एकवेळ समझोता योजना अर्थात वन टाइम सेटलमेंट (ओटीएस). अनेक शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याने ते संपूर्ण कर्जमुक्तीच्या चौकटीत बसत नव्हते. आता अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तातडीचा आर्थिक भार कमी होऊन त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे.

मात्र या योजनेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिच्यामागील शासनाची व्यापक भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ही बाब स्पष्टपणे मांडली आहे की, वारंवार कर्जमाफी देणे हे अंतिम समाधान नाही. शेतकरी पुन्हा कर्जाच्या चक्रात का अडकतो, त्याचे उत्पन्न स्थिर का राहत नाही आणि शेती आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कशी होईल, याचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या शिफारशींमधून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन सक्षमीकरणाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शाश्वत शेतीचा. प्रत्येक शेतापर्यंत सिंचन सुविधा पोहोचणे, पाण्याचे सक्षम व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेती उत्पादन खर्च कमी करणे, योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि वेळेवर पतपुरवठा करणे या गोष्टींवर शासनाचा भर आहे. कर्जमुक्ती हा त्यातील एक भाग आहे; परंतु भविष्यात कर्जमाफीची गरजच भासू नये अशी परिस्थिती निर्माण करणे हा त्यामागचा मोठा उद्देश आहे.

राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून जवळपास ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना मानली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.

योजनेची अंमलबजावणीही पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण, बँकांमधील माहितीची पडताळणी आणि तंत्रज्ञानाधारित प्रक्रिया यामुळे लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, जिल्हा बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांमधील कर्जदारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून साधारणता लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या तपशीलाचे संकलन बँकामार्फत केले जाणार आहे.

आज महाराष्ट्रातील शेतकरी केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा करत नाही, तर स्थैर्य, विश्वास आणि विकासाची संधी शोधत आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना शेतकऱ्याच्या तातडीच्या आर्थिक अडचणी दूर करेलच; पण त्याचबरोबर सिंचन, पतपुरवठा, तांत्रिक सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून भविष्यातील सक्षम कृषी व्यवस्थेची पायाभरणी करण्याचाही प्रयत्न करेल.

म्हणूनच या निर्णयाकडे केवळ कर्जमाफी म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा निर्णय शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाचे पुनरुज्जीवन, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आणि शेतीच्या शाश्वत विकासासाठी उचललेले एक धाडसी पाऊल म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याची क्षमता या योजनेत आहे आणि म्हणूनच ही योजना महाकर्जमुक्तीच्या पलीकडे जाऊन शेतकरी सक्षमीकरणाची नवी दिशा ठरू शकते.

- *प्रवीण टाके,* 
उपसंचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय,
कोल्हापूर. 
9702858777

गोंदिया जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेला गती : जिल्हास्तरीय समितीची स्थापना


गोंदिया, दि. 29: शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळावा यासाठी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमुळे योजनेच्या अंमलबजावणीला अधिक वेग आणि शिस्त मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सदर समितीमध्ये जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तसेच व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अर्चना माळवे या सदस्य सचिव म्हणून समितीचे कामकाज पाहणार आहेत.

*योजनेच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष*

ही समिती कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर समन्वय साधणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करणे, अपात्र घटकांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे तसेच आधारशी जोडणी न झालेल्या कर्जखात्यांची माहिती प्रसिद्ध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.

*शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम*
शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण सुलभ करण्यासाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, योजनेबाबत व्यापक जनजागृती करून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

*तक्रार निवारण आणि पारदर्शकता*

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे, बँका व संबंधित विभागांमध्ये समन्वय राखणे आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी असणार आहे.

*शेतकऱ्यांसाठी दिलासा*

या समितीच्या स्थापनेमुळे कर्जमुक्ती प्रक्रियेला गती मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत समिती कार्यरत राहणार आहे.

000000

Sunday, 28 June 2026

गोंदिया: बाई गंगाबाई रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे दिमाखात उद्घाटन


​उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुरेशजी हर्षे यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस
​गोंदिया, 28: देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आज २८ जून २०२६ (रविवार) रोजी राज्यभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून गोंदिया येथील बाई गंगाबाई (BGW) महिला रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जाहीर उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले.
​या विशेष मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती श्री. सुरेशजी हर्षे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आले. "image.png" मध्ये पाहिल्याप्रमाणे, उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या देखरेखीखाली एका चिमुरड्याला पोलिओचा डोस देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
​वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती
​या उद्घाटन प्रसंगी आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
​डॉ. अमरीश मोहबे (नोडल ऑफिसर)
​डॉ. पुरुषोत्तम पटले (जिल्हा शल्य चिकित्सक)
​डॉ. अभिजीत गोल्हार (जिल्हा आरोग्य अधिकारी)
​डॉ. निकीता पोयम (वैद्यकीय अधीक्षक, BGW रुग्णालय)
​डॉ. तृप्ती कटरे (जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक)
​डॉ. रोशन राऊत (माता बाल संगोपन अधिकारी)
​डॉ. निरंजन अग्रवाल (साथरोग अधिकारी)
​श्री. विजय आखाडे (जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी)
​'दोन थेंब प्रत्येक वेळी' - जनजागृतीवर भर
​उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बोलताना मान्यवरांनी पोलिओ लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या बालकाच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या ५ वर्षांपर्यंतच्या बालकाला पोलिओचा डोस प्रत्येक वेळी देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
​"image.png" मधील बॅनरवर नमूद केल्याप्रमाणे, या मोहिमेच्या अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी नागरिकांनी आपल्या भागातील आशा सेविका, ए.एन.एम. (ANM) आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने चोख नियोजन केले आहे.

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित



राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली  असून या योजनेचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी  सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना  देण्यात  आल्या आहेत.

योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येत आहे. बँकांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले  आहेत. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हा स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक स्वरूपात संकलित करून पोर्टलवर अपलोड करण्यासह प्रत्येक टप्प्यावर समन्वयाची जबाबदारी बँकांवर निश्चित करण्यात आली आहे.

यासाठी प्रत्येक बँकेने मुख्यालय स्तरावर दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापैकी एक अधिकारी योजना अंमलबजावणी समन्वयक, तर दुसरा माहिती तंत्रज्ञान समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय समिती (DLC) यांच्याशी समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र जिल्हा नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्जखात्यांचे दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. आधार क्रमांक उपलब्ध असलेली कर्जखाती आणि आधार क्रमांक उपलब्ध नसलेली कर्जखाती. ज्या खात्यांमध्ये आधार क्रमांक उपलब्ध नाही, अशा खात्यांची स्वतंत्र यादी तयार करून ती बँक शाखा, विकास संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मोहीम राबवून शेतकऱ्यांचा आधार क्रमांक प्रमाणीकरण करण्याचे  आवाहन केले जात आहे.  यासाठी बँकांनी विशेष आधार-जोडणी मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाने दिलेल्या नमुन्यानुसार तयार करून पोर्टलवर तातडीने अपलोड करावी लागणार आहे. दि३० सप्टेंबर २०२५ रोजी थकित असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली वैयक्तिक व संयुक्त पीककर्ज खाती यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

संयुक्त कर्जखात्यांसाठी सर्व कर्जदारांचे आधार क्रमांक, आधार-जोडलेली बचत खाती तसेच प्रत्येकाचा कर्जातील हिस्सा नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मयत कर्जदारांच्या प्रकरणांमध्ये वारसांची नोंद करून त्यानुसार लाभ वितरित करण्यात येणार आहे.

कर्जखात्यांची माहिती अपलोड करताना पोर्टलवरील निकषांचे पालन करणे आवश्यक राहील. त्रुटी आढळल्यास माहिती दुरुस्त करून पुन्हा अपलोड करावी लागणार आहे. आधार क्रमांक असलेल्या खात्यांची माहिती प्रथम अपलोड केली जाईल, तर नंतर आधार जोडणी झालेल्या खात्यांची माहिती पुढील टप्प्यांत स्वीकारली जाणार आहे.

माहितीची संगणकीय पडताळणी झाल्यानंतर गावनिहाय लाभार्थी यादी पोर्टलवर उपलब्ध होईल. ही यादी बँक शाखा व विकास संस्थांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा संबंधित बँक शाखेत उपस्थित राहण्याबाबत  संदेश  पाठविण्यात येईल.

शेतकऱ्यांना यादीतील माहितीबाबत हरकत असल्यास ती थेट जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे पाठविली जाईल. समितीच्या निर्णयानुसार संबंधित बँकांनी आवश्यक दुरुस्त्या करून माहिती अद्ययावत करणे बंधनकारक राहील.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर व्यापारी बँकांच्या लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ४८ तासांच्या आत संबंधित नोंदी अद्ययावत करून पोर्टलवर माहिती नोंदविणे आवश्यक राहील. कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेमुळे पात्र शेतकऱ्यांची अचूक ओळख, माहितीची पारदर्शक पडताळणी, तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था आणि कर्जमाफीचा लाभ वेळेत पोहोचविणे शक्य होणार आहे या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाची माफी करण्यात येणार आहे. थकित, पुनर्गठित तसेच फेरपुनर्गठित कर्जांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दोन लाख रुपयांपेक्षा किंचित अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर शासन दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा करणार आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र करण्यात आले आहे.

एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) प्रकरणांबाबतही शासनाने दिलासादायक निर्णय घेतला असून व्यापारी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांमधील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अॅग्रीस्टॅकमध्ये नाव नसल्यामुळे कोणताही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही प्रथम नोंदणी करून त्यानंतर लाभ दिला जाणार आहे . आवश्यकतेनुसार विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांचा डेटा विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना यादीत स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात येणार असून ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच ऑनलाइन पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्यात येणार . आधार प्रमाणीकरण आणि मोबाईल क्रमांक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून थेट संबंधित शेतकरी बांधवांच्या कर्जखात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. लवकरच थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्यास मदत होईल,

या योजनेचा उद्देश केवळ कर्जमुक्ती देणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आहे.

–काशीबाई थोरात –धायगुडे (वरिष्ठ सहायक संचालक)