जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 14 August 2026

खांबी ते बोंडगाव रस्त्यावर असलेला पूल जड वाहतुकीसाठी बंद : पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु

 

गोंदिया, दि.14 : सन 2026 पावसाळा पूर्वीचे नियतकालीन निरीक्षण दरम्यान बोंडगाव बाराभाटी रस्त्यावर असलेल्या लहान पुलाच्या स्लॅबचे खालील स्टील पूर्णत: दिसत असल्याने व ते गंजलेल्या अवस्थेत असल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2, गोंदिया व तहसिलदार अर्जुनी मोरगाव यांनी कळविले आहे.

सदर पुलावरुन जड वाहने गेल्यास पूल क्षतीग्रस्त होवून अपघात व जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी मोटार अधिनियम 1988 चे कलम 115 चे तरतुदीनुसार त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत बाराभाटी-पिंपळगाव-खांबी-निमगाव-बोंडगाव या पर्यायी मार्गे वळविणे. बोंडगाव-निमगाव-खांबी-पिंपळगाव-बाराभाटी या पर्यायी मार्गे वळविणेकरीता खालील अटी व शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक तिथे हाईटवार लावण्याची व्यवस्था करावी. वाहतुक वळविण्याची व पर्यायी वाहतुक मार्ग उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतुक शाखा यांची राहील. वाहतुक मार्गावर आवश्यक तेथे गतिरोधक संबंधित विभागाने लावावे. वाहतुक वळविल्याबाबत दिशा निर्देशन करणारे फलक व स्वयंसेवकाची व्यवस्था संबंधित विभागाने करावी. जड-अवजड वाहतुक वळविल्याबाबत दिशा निर्देशन करणारे फलकाची व्यवस्था संबंधित विभागाने करावी. सदर वाहतुक मार्गावर कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत कोणताही प्रश्न उदभवणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घेण्यात यावी. सदर रस्ता बंद केल्यावर नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घेण्यात यावी. अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील. अटी व शर्तीचे पालन न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.

0000000

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू

 


        गोंदिया, दि.14 : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे.

           शासनाच्या http://hmasnew.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवर १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा. ऑनलाइन अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित शासकीय वसतिगृहात सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

         अधिक माहितीसाठी इमाव, विमाप्र व विजाभज मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, गोंदिया येथील गृहपाल अश्विनी दिघोरे (मो. ९७६५०८४०९०), मंगलेश गिरी (मो. ८७८८२३५७६७) तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गोंदिया यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालकांनी केले आहे.

                                                                   0000000

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन संवाद

 


       गोंदिया, दि.14 : गावपातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभरातील विविध आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद साधणार आहेत.

          १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या जनसंवादातून गावागावातील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना आणि अपेक्षा थेट आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचणार असून, त्याचवेळी राज्यातील विविध नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे.

          निरोगी महाराष्ट्रासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भागीदारी अधिक मजबूत करणे’ या दिशेने होणारा हा जनसंवाद आरोग्य क्षेत्रातील लोकसहभागाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

          सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती (VHNSC), जन आरोग्य समिती (JAS), रुग्ण कल्याण समिती (RKS) आणि एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती या समित्या शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. या समित्यांमध्ये ग्रामपंचायत प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, युवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध घटकांचा सहभाग असतो.

          आरोग्य सेवांची गुणवत्ता, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेतील सहभाग आणि स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक अडचणी याबाबत या जनसंवादातून थेट चर्चा होणार आहे. निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मार्गदर्शन करणार आहेत.

गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत व्यापक सहभाग

        या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावर व्यापक पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर JAS आणि VHNSC समितीतील अशासकीय सदस्यांना एकत्रित उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच संबंधित मान्यवरांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          गावपातळीवर VHNSC सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित उपस्थित राहून ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

         निवडक सदस्यांसोबत थेट द्विमार्गी संवादासाठी स्वतंत्र ECHO लिंक उपलब्ध करून देण्यात येणार असून, इतर समिती सदस्यांसाठी YouTube व ब्रॉडकास्ट लिंकद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध राहणार आहे.

१२४ आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटन

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध भागांत नव्याने उभारण्यात आलेल्या तसेच कार्यान्वित झालेल्या आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे. उपलब्ध नियोजनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, BPHU, PHU, UHWC यांसह विविध आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे.

             यामध्ये ग्रामीण भागासोबतच महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचाही समावेश असून, नागरिकांना त्यांच्या घराजवळ गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यामुळे अधिक बळ मिळणार आहे.

लोकसहभागातून सक्षम होणार आरोग्य व्यवस्था

           आरोग्य व्यवस्था ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी न राहता त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने आरोग्य समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा समिती सदस्यांशी होणारा हा थेट संवाद आरोग्य व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

           गावातील आरोग्यविषयक प्रश्न थेट शासनापर्यंत पोहोचविणे, स्थानिक पातळीवरील चांगले उपक्रम जाणून घेणे, आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतील अडचणी समजून घेणे आणि नागरिकांच्या सहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना गती देणे, हा या जनसंवादाचा प्रमुख उद्देश आहे.

०००००००

निवृत्तीवेतन धारकांसाठी गोंदियात समाधान शिबीर संपन्न

 


           गोंदिया, दि.14 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासंबंधित येणाऱ्या समस्यांचे निराकारण करण्याकरिता तसेच राज्य शासनाच्या नवीन उपक्रमाबाबत व शासनाचे अद्यावत निर्णय गोंदिया जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृतीवेतनधारकांना माहिती देण्याकरिता जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया तर्फे दि.11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

          या कार्यक्रमास कोषागार कार्यालय गोंदिया तर्फे अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा), कोषागार कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखेचे सर्व कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) समीर देशमुख यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी समाधान शिबिराच्या आयोजनाचे  उद्दिष्ट, सेवानिवृत्ती प्रकरणी जिल्हा कोषागार कार्यालयाची भूमिका तसेच त्यांचे कर्तव्य याबाबत माहिती दिली.

         या समाधान शिबिरात लाईफ सर्टिफिकेट (LIFE CERTIFICATE), डिजिटल सर्टिफिकेट (DIGITAL LIFE CERTIFICATE), बँकेच परस्पर बदल, मृत प्रमाणपत्र सादर करणे, निवृत्तीवेतन वाहिनी, महाउपलब्धी ॲप, निवृत्तीवेतन सुधारित करणे व एनपीएस/डीसीएजी (NPS/DCAG) च्या प्रलंबित प्रकरणांबाबत विस्तृतपणे माहिती देण्यात आली.

       यावेळी खाजगी अनुदानित शाळा अधिकारी/कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री पारधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रविण ठोंबरे, कनिष्ठ लेखापाल (निवृत्तीवेतन शाखा) जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.

                                                            0000000

नवीन सेवार्थ प्रणालीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सर्व कोषागार कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु

 


         गोंदिया, दि.14 : वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून वित्त विभागाचे दि.1 जुलै 2026 चे शासन निर्णयानुसार नवीन सेवार्थ प्रणाली लागु केली आहे. या नवीन सेवार्थ प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जुन्या सेवार्थ प्रणालीमधील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती आणि सेवा तपशील नवीन पोर्टलवर स्थलांतरित (Data Migration) करण्याची प्रक्रिया सध्या कोषागार कार्यालय स्तरावर युद्ध पातळीवर सुरु असून विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कोणतेही नवीन कामकाज किंवा बील निर्मिती दि.20 ऑगस्ट 2026 नंतर करता येणार नाही.

          गोंदिया जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी यांनी याची गांभिर्यानी नोंद घ्यावी व Data Migration ची प्रक्रिया आणि नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये माहे जुलै 2026 चे वेतन देयक तयार करणे (Pilot Bill Generate) इत्यादी कामकाज दि.20 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावे. याबाबत कोणालाही मुदतवाढ मिळणार नाही असे संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी निर्देश दिले आहे.

          तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नवीन सेवार्थ प्रणाली मध्ये Data Migration व Pilot देयक तयार करण्याबाबत विहीत कालावधीत कामकाज पूर्ण करण्याबाबत कोषागारास सहकार्य करावे. सदर कामकाज विहित कालावधीत पूर्ण करण्याकरिता सर्व कोषागार/उपकोषागार कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील, असे जिल्हा कोषागार अधिकारी तौसीफ हसीन यांनी कळविले आहे.

                                                                        00000000

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविणे बंधनकारक

 


           गोंदिया, दि.14 : शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2026-27 मधील शेतकरी नाव नोंदणी बाबत शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदर शासन निर्णयात ऑनलाईन नाव नोंदणीकरीता कृषि विभागाकडून लागु करण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅक (AgriStak) या संकेतस्थळावर नोंदणी करुन फार्मर (Farmer) आयडी बनविणे बंधनकारक केलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या ॲग्रीस्टॅक (AgriStak) या संकेतस्थळावर आपले आधार क्रमांक, मोबाईल नंबर व पीक पेरा नोंद असलेले 7/12 उतारे घेऊन नोंदणी करावी व फार्मर आयडी (Farmer ID) तयार करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी यांनी केले आहे.

                                                 0000000

जलसंधारण सप्ताह 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान : तालुका स्तरावर राबविण्यात येणार विविध उपक्रम

 


           गोंदिया, दि.14 : स्व. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले असून पाणी अडवा, पाणी जिरवा  या विचारातून पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण तसेच लघु जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामांमुळे त्यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची संकल्पना असून मंत्री, मृद व जलसंधारण विभाग यांच्या निर्देशानुसार 21 ऑगस्ट 2026 हा स्व. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यानिमित्ताने दि.15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्याचे शासनाचे धोरण आहे.

           गोंदिया जिल्ह्यात सुध्दा जलसंधारण सप्ताह 15 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तालुका स्तरावर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार दि.15 ऑगस्ट रोजी जलसंधारणाची शपथ घेणे. दिनांक 16 ते 20 ऑगस्ट 2026 पर्यंत जलसंधारण विषयक निबंध, चित्रकला, घोषवाक्य व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. विद्यार्थ्यांसाठी जलसंधारण व पाणी बचतीबाबत व्याख्याने/मार्गदर्शन सत्रे आयोजित करणे. स्थानिक जलस्त्रोत, तलाव, बंधारे इत्यादींच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे. विद्यार्थ्यांना जलदूत/जलसंधारण दूत म्हणून सहभागी करुन घेऊन जलसंधारणाचा संदेश कुटुंब व समाजापर्यंत पोहोचविणे. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित जनजागृती करणे. पावसाचे पाणी साठवणूक, भूजल पुनर्भरण व पाणी बचतीच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना देणे. दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सर्व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर (Maha Walkathon-Walk for Water) उपक्रम राबविण्यात येणार आहे.

                                              0000000