जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 22 July 2026

जिल्ह्यात 6 ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश लागू

 

        

      गोंदिया, दि.22 : सद्यस्थितीत दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावरील विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन संघटनेकडून दि.23 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र बंद तसेच जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो आत्मदहन व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 23 जुलै पासून ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.                        

                                                                     0000000

कावराबांध येथे जनआरोग्य समितीमार्फत क्षयरुग्णांना फुड बास्केटचे वितरण

 




गोंदिया, दि.22 : जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत दर महिन्याला जनआरोग्य समितीची सभा आयोजित केली जाते. जन आरोग्य समिती (JAS) ही एक अत्यंत महत्त्वाची स्थानिक समुदाय आरोग्य समिती आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य सेवांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे, पारदर्शकता आणणे आणि आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट असते.

सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे दि.21 जुलै रोजी जनआरोग्य समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत उपस्थित जि.प.सदस्य व मान्यवरांचे हस्ते क्षयरुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख यांनी दिली. यावेळी कार्यक्षेत्रातील आठ क्षयरोगी रुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आले.

क्षयरोगाच्या रुग्णांसाठी पौष्टिक 'फूड बास्केट' अतिशय महत्त्वाची असते. टीबीच्या औषधांमुळे रुग्णांची भूक मंदावते आणि शरीरातील ऊर्जा कमी होते. सकस आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, औषधांचे दुष्परिणाम कमी होतात, वजन स्थिर राहते आणि रुग्ण लवकर बरा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख यांनी दिली.

यावेळी जनआरोग्य समिती सभेदरम्यान जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे व छाया नागपुरे, पंचायत समिती सदस्य प्रतिला गणवीर, सभापती यादनलाल बनोठे, सरपंच कुंजलाल नवगोडे, अरुण मच्छिरके, पुरुषोत्तम बनोठे, सामाजिक कार्यकर्ते गणवीर, नागपुरे, वच्छला बावनथडे व स्मिता कटरे यांचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते क्षयरुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आले. यावेळी सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम, वैदकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख व डॉ.रोहिणी पवार यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

क्षयरोग रुग्णांच्या उपचारात आणि पुनर्प्राप्तीमध्ये 'फूड बास्केट' (पोषक आहाराचे किट) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. चांगला व सकस आहार आजाराशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, औषधांचे दुष्परिणाम कमी करतो आणि रुग्णाचे वजन व ऊर्जा पूर्ववत करून त्याला लवकरात लवकर बरे होण्यास मदत करत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम यांनी यावेळी दिली.

                                                             00000000

दरेकसा अंतर्गत हिवताप अति संवेदनशिल गावात जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या भेटी

 




             गोंदिया, दि.22 : जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी आज सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत हिवतापाकरीता अति संवेदनशिल असलेले अतिदुर्गम मुरकुटडोह, दंडारी, दलदलकुही, टेकाटोला, नवाटोला व पिपरिया येथे भेटी देवुन कार्यक्षेत्रात किटकजन्य कार्यक्रमाची होत असलेल्या कामाची पाहणी केली.

            प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील हिवताप दुषित रुग्णाची विचारपुस करुन दिल्या जात असलेल्या औषधोपचाराची माहिती जाणुन किटकजन्य कार्यक्रमाची पाहणी केली. गावात आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत ताप रुग्ण व कंटेनर शोध मोहिमेची माहिती जाणुन घेतली. गावात प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला.

           किटकजन्य आजाराबाबत सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस गिरी यांचेसह आरोग्य संस्थेत चांगली सेवा देत असल्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांचे राबविण्यात येत असलेल्या कार्याचे समाधान व्यक्त करुन दररोज होत असलेल्या कामाचे पर्यवेक्षण चांगल्याप्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. भेटी दरम्यान त्यांचेसोबत डॉ.पारस गिरी, आरोग्य पर्यवेक्षक किशोर भालेराव, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ठाकरे उपस्थित होते. 

            डॉ.विनोद चव्हाण यांनी भेटी दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र दरेकसा येथील प्रयोगशाळेत किटकजन्य कार्यक्रमाचे आवश्यक रजिष्टर व रेकॉर्डची पडताळणी केली. तसेच आंतररुग्ण वार्ड, औषधीसाठा केंद्र इत्यादीची पाहणी केली. कार्यक्षेत्रातील गावे हे अतिदुर्गम व जंगलव्याप्त असल्याने हिवतापाबाबतची साथ उदभवु नये म्हणुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, कीटकजन्य, जलजन्य आजार तसेच साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करणे, कार्यक्षेत्रातील 100 टक्के अंडवृद्धी शस्त्रक्रीया होण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय येथे भरती करणे, आश्रमशाळा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आर.डी.के. किट द्वारे रक्त तपासणी करणे, स्थलांतरी लोकांची यादी अद्यावत करुन पत्ता सिजन कामावरुन गावी परतलेल्या लोकांचे हिवतापाबाबत तपासणी करणे, आरोग्य संस्थेत हिवताप बाबतचे रक्त नमुने बॅकलॉग ठेवु नये, हिवतापाबाबत गप्पी मासे व लारवा यांचे शाळेत प्रात्यक्षिक जनजागृती कार्यक्रम घेणे इत्यादी विविध बाबी सोबतच लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

                                                            0000000

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 


            गोंदिया, दि.22 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार-2026 प्रदान करण्यात येणार असून, त्यासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, संघटना तसेच संबंधित घटकांकडून ऑनलाइन अर्ज व नामांकन मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 31 जुलै 2026 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण किर्तीकुमार कटरे यांनी केले आहे.

            राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू झाली असून, विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या अर्ज व नामांकनांचा विचार करून वर्ष 2026 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. अर्ज राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in यावर केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, प्रत्यक्ष अथवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

            अर्जदारांनी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यानुसार सर्व माहिती अचूकपणे भरावी. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण कार्याचा वर्णनात्मक तपशील नमूद करून त्यासंबंधीची आवश्यक सहाय्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत.

            राष्ट्रीय पुरस्कारांसाठी सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन आणि श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका या उप-श्रेणींमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका या उप-श्रेणीसाठी अर्ज करताना युडीआयडी कार्ड अथवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.

            राष्ट्रीय पुरस्कारांसाठीची पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शक तत्त्वांची सविस्तर माहिती www.depwd.gov.in आणि www.awards.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असून, इच्छुकांनी त्याचा संदर्भ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. असे सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी कळविले आहे.

                                                         00000000

तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना

 


           गोंदिया, दि.22 : तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती :- सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांनी तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठीची केंद्रीय क्षेत्र योजना अंतर्गत Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise (SMILE) या छात्र योजनेंतर्गत या उपयोजनेचा समावेश करण्यात आला असून, ही योजना केंद्र शासनाच्या http://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवरून राबविण्यात येत आहे.

        योजनचे निकष, अटी व लाभाचे स्वरूप :- शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये इयत्ता 9 वी ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीयांना योजनेचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थी भारताचा नागरिक असावा व त्यांच्याकडे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या तृतीयपंथी व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्यांची संख्या मर्यादित असल्याने, लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील गुणांच्या आधारे करण्यात येईल. तथापि विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासन पुरस्कृत इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यास सदर शिष्यवृत्ती देय राहणार नाही. मॅट्रिकपूर्व (pre-Matric) व मॅट्रिकोत्तर (Post Matric) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.13,500/- इतकी शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न (Aadhaar Linked) बँक खाते असावे.

            बीज भांडवल योजना :- राज्यातील तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देवून त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी बीज भांडवल योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्ष वास्तव्य असलेल्या अप्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तीना 21 प्रकारच्या लघु व्यवसायांसाठी तसेच त्याव्यतिरिक्त 12 प्रकारच्या व्यवसायांसाठी प्रशिक्षित असल्यास किंवा अप्रशिक्षित तृत्तीयपंथीय व्यक्तींना व्यवसायांचे प्रशिक्षण देवून आवश्यक साधने संथ (Tool Kit) साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेचे निकष, अटी व लाभाचे स्वरूप :- अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या किमान 10 वर्ष रहिवासी असावा व त्यांच्याकडे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या तृतीयपंथी व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थी हा 18 ते 50 वयोगटातील व्यवसाय करण्यास सक्षम असावा. सदर योजनेंतर्गत लघु कर्ज योजना (रु. 25,000/- पर्यंत), मध्यम कर्ज योजना (रु. 50,000/- पर्यंत) व दीर्घ कर्ज योजना (रु. 2,00,000/- पर्यंत) यापैकी कोणतेही एक कर्ज अनुज्ञेय राहील. सदर योजनेंतर्गत लाभार्थी हिस्सा 5 टक्के असून, 45 टक्के शासन अनुदान व 50 टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थ्याने व्यवसायासाठीचा परवाना, व्यवसायासाठी लागणारी सामुग्री, यंत्र सामुग्री इत्यादी कोटेशन, बिले, योजनेचा 7/12 किंवा जागा भाड्याची असल्यास भाडेकरारनामा, व्यवसाय करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यादी सादर करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याने शासनाने विहीत केलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे सहायक आयुक्त, समाजकल्याण, संबंधित जिल्हा यांचेकडे सादर करावे. सदर योजनेंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या लाभार्थ्यास व्याजावर 3 टक्के रिबेट (सुट) देण्यात येईल. इच्छुक लाभार्थ्यांनी योजनांच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, संबंधित जिल्हा यांचेकडे संपर्क साधावा. असे समाजकल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.

                                                 0000000

Tuesday, 21 July 2026

विशेष वृत्त... शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

 


गोंदिया, दि.22 : जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.          

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, लाभ मिळण्यासाठी काही आवश्यक अटी व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सदर योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सहकारी बँकेचे 20,915 शेतकरी यासाठी पात्र आहेत. सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ (Agristack) अंतर्गत नोंदणी व प्रमाणीकरण करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते एकमेकांशी लिंक नाहीत, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे.

यासोबतच, वरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यासच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी विलंब न करता आवश्यक बाबी पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

0000000

इंडिया स्किल्स आणि वर्ल्ड स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

 


         गोंदिया, दि.21 : भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित इंडिया स्किल्स (India Skills) आणि वर्ल्ड स्किल्स (World Skills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कौशल्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याची संधी साधावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त वाय.एस. शेंडे यांनी केले आहे.

         देशातील विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट प्रतिभा शोधून त्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. जिल्हा स्तरावरून निवड झालेल्या स्पर्धकांना राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळणार असून, राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट स्पर्धकांना World Skills Competition मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.  

0000000