जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 20 July 2026

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर : प्रारूप मतदार यादी 17 ऑगस्टला, अंतिम यादी 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 


            गोंदिया, दि.20 : अलिकडच्या कालावधीमध्ये कोकण, मुंबई व काही भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गणना कार्यक्रमामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमामध्ये काही मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. सदर विनंती मान्य करुन भारत निवडणूक आयोगाने 15 जुलै 2026 च्या पत्रान्वये राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

           सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

त्यानंतर 17 ऑगस्ट 2026 (सोमवार) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत नोटीस देणे आणि दावे व हरकती निकालात काढण्याची प्रक्रिया पार पडेल. यानंतर 19 ऑक्टोबर 2026 (सोमवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पात्र नागरिकांनी निर्धारित कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र भरून देऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी केले आहे.

00000000

विशेष वृत्त... आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने भात उत्पादन वाढीस गती; विविध पद्धतींचा प्रचार व नियोजन

 


गोंदिया, दि.20 : भात पिकामधील उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित पद्धतीचा अवलंब आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी विविध उपाययोजना आणि लागवड पद्धतींचे नियोजन करण्यात आले असून, त्यातून उत्पादनवाढीस मोठी मदत होणार आहे.

भात पिकासाठी बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया मोहिम राबविणे, बियाणे स्वउत्पादनाबाबत जनजागृती करणे, तसेच संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर वाढविणे यावर विशेष भर दिला जात आहे. गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करणे, श्री पद्धत, पट्टा पद्धती तसेच यंत्राद्वारे पेरणी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठीही मोहिमा राबविल्या जात आहेत.

याशिवाय, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अझोला व हिरवळीच्या खतांचा वापर, तसेच माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जात आहे. युरिया ब्रिकेट्सचा वापर वाढवून खर्चात बचत व उत्पादनात वाढ साध्य करण्याचा प्रयत्न आहे.

भात लागवडीसाठी विविध पद्धतींचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत. श्री पद्धतीमुळे बियाणे, पाणी व वेळेची बचत होऊन उत्पादन वाढते. पट्टा पद्धतीमुळे रोग व कीड नियंत्रण सुलभ होते. यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास मजुरी खर्चात ६० टक्क्यांपर्यंत बचत होते. डीएसआर (DSR) व एसआरटी (SRT) पद्धतींमुळे पाण्याची बचत आणि उत्पादनात वाढ होते. तसेच यंत्राद्वारे पेरणीमुळे योग्य अंतर राखले जाऊन तण नियंत्रण सुलभ होते.

या सर्व पद्धतींच्या अंमलबजावणीसाठी सुमारे ६४ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्री पद्धतीसाठी सुमारे २४ हजार हेक्टर, पट्टा पद्धतीसाठी २८ हजार हेक्टर, यांत्रिक लागवडीसाठी २९ हजार हेक्टर, डीएसआर (DSR) साठी ६ हजार हेक्टर, एसआरटी (SRT) साठी १ हजार हेक्टर आणि यंत्राद्वारे पेरणीसाठी ८०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

तसेच, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात, हरभरा व मका पिकांसाठी अनुक्रमे ४३०, ५००, ३५० व ० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, एकूण १७,५२७ लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

एकूणच, आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित पद्धती आणि प्रभावी नियोजन यांच्या माध्यमातून भात उत्पादन वाढविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

0000000

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत रोईंग व कुस्ती खेळांच्या विभागीय निवड चाचणीचे आयोजन

 


          गोंदिया, दि.20 : मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत रोईंग व कुस्ती खेळांच्या विभागीय निवड चाचणीचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत पुणे विभागामार्फत रोईंग व कुस्ती या खेळांसाठी विभागीय स्तरावरील निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील पात्र व इच्छुक खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.

        रोईंग निवड चाचणी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता क्रीडा संकुल, एमआईटी एडीटी विद्यापीठ, लोणी काळभोर, पुणे येथे होणार आहे. तर कुस्ती निवड चाचणी 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, माळेगाव (बारामती रोड), पुणे येथे होणार आहे.

        निवड चाचणीसाठी उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनी जन्मतारीख प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील सात वर्षातील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच संबंधित खेळासाठी आवश्यक साहित्य सोबत आणावे.

        गोंदिया जिल्ह्यातील सर्व पात्र खेळाडूंनी मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत आयोजित या निवड चाचणीमध्ये सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

0000000

शासकीय वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता : प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


          गोंदिया, दि.20 : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येत असलेल्या आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह गोंदिया क्र.2 व आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह चिचगड ता.देवरी या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निवासाकरिता वसतिगृह इमारतीची भाडेतत्वावर आश्यकता आहे. यामध्ये विविध सोयी-सुविधा उपलब्धतेच्या अटी व शर्तीनुसार प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, चिचगड रोड, जि.गोंदिया या पत्यावर भाडेतत्वावर वसतिगृहाकरीता इमारत उपलब्ध असल्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव परिपूर्ण दस्तावेजासह कार्यालयीन वेळेत सादर करावे.

        अटी व शर्ती : प्रस्ताव आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक १५.०२.२००५ च्या शासन निर्णयातील नमुद मार्गदर्शक सुचनेप्रमाणे असावा. गोंदिया येथे आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह गोंदिया क्र.2 करीता खाजगी इमारत ही 250 विद्यार्थी क्षमता तथा आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह चिचगड करीता 75 विद्यार्थी क्षमता समाविष्ट होईल इतकी मोठी व सुरक्षित इमारत व जागा असलेली इमारत असावी. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी तसेच वापरावयाचे पाणी मुबलक व पुरेसे असावे. विद्युत व्यवस्था, शौचालय व स्नानगृह इत्यादीची सोयी-सुविधा असावी. भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या इमारतीचे भाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे राहील. इमारतीचे सर्व दस्तावेज नियमानुसार सादर करणे आश्यक राहील (उदा. इमारत मालकी टॅक्स पावती, नकाशा इत्यादी).

         अधिक माहितीकरीता कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक (07199) 251444 यावर संपर्क करावे. असे प्रकल्प अधिकारी देवरी नितीन ईसोकर यांनी कळविले आहे.

                                                                 0000000

वेठबिगार कामगार कामावर ठेवल्याचे आढळल्यास तक्रार करावी

 

 

गोंदिया, दि.20 : वेठबिगारांना वेठबिगारीतून मुक्त करुन त्यांचे पुर्नवसन करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने वेठबिगार पध्दत (निर्मुलन) अधिनियम-१९७६ लागू केलेला आहे. वेठबिगार कामगार म्हणजे 'आपले इच्छेविरुद्ध वेठबिगारी करणारा पुरुष/स्त्री अथवा बालकामगार अथवा वेठीस धरलेला व बिगारी कामे करणारा. सहसा, अशा व्यक्तीने स्वतः अथवा त्याचे जवळचे नातेवाईकाने (आई, वडिल, भाऊ इत्यादी), उधार अथवा अग्रीम म्हणून रक्कम अथवा वस्तू घेतलेली असते. ती रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, त्याला अथवा त्याचे संपूर्ण कुटुंबाला, त्या रकमेची परतफेड म्हणून, आवश्यक पूर्तता होईपर्यंत श्रम मजूरी अथवा सांगितलेली कामे करावी लागत असून वेठबिगारास आपले इच्छेविरुद्ध काम करावे लागते.'

हा कायदा मोडणाऱ्या मालकाला/व्यक्तीला 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच वेठबिगार कामगार पद्धती (निर्मूलन) अधिनियम १९७६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या सुधारीत मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure -SOP) प्रकाशित केलेली असून त्याची अंमलबजावणी करण्याकरीता महसूल व कामगार विभागाव्दारे प्रचार प्रसार करण्यात येत आहे.

गोंदिया जिल्हयात वरीलप्रमाणे वेठबिगार कामगार कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्हयातील कामगारांनी/नागरिकांनी/समाज सेवी संस्थेने जिल्हाधिकारी गोंदिया, स्थानिक पोलिस स्टेशन, जिल्हयातील उपविभागिय अधिकारी तसेच सहायक कामगार आयुक्त गोंदिया यांचेकडे प्रत्यक्षात, पोष्टाव्दारे किंवा aclgnd@gmail.com या ई-मेलवर तक्रार करण्यात यावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त, गोंदिया यांनी केले आहे.

                                                           00000000

गोंदिया जिल्ह्यात SIR-2026 मोहिमेला वेग; 59.80% फॉर्म डिजिटायझेशन पूर्ण

 


गोंदिया, दि.20 : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) मोहिमेत गोंदिया जिल्ह्यात लक्षणीय प्रगती झाली असून शनिवारपर्यंत एकूण 59.80 टक्के एन्यूमरेशन फॉर्म (EFs) चे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये (अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया आणि आमगाव) एकूण 11 लाख 23 हजार 805 मतदारांचा समावेश असून, सर्व 1285 BLO मार्फत 100 टक्के फॉर्म डाउनलोड व प्रिंटिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

यापैकी 97.34 टक्के फॉर्मचे वितरण करण्यात आले असून 6 लाख 72 हजार 79 फॉर्म डिजिटायझेशन झाले आहेत, तर सुमारे 4 लाख 22 हजार फॉर्म अद्याप डिजिटायझेशनसाठी शिल्लक आहेत.

तालुकानिहाय पाहता, आमगाव (ST) मतदारसंघात सर्वाधिक 68.02 टक्के डिजिटायझेशन झाले असून अर्जुनी मोरगाव (65.86%) आणि तिरोडा (59.86%) हे त्यानंतर आहेत. गोंदिया मतदारसंघात मात्र 48.11 टक्के डिजिटायझेशन झाले आहे.

दरम्यान, एकूण 5.52 टक्के फॉर्म अजूनही न मिळालेल्या (Uncollectable) स्वरूपात असून 2.64 टक्के प्रकरणांमध्ये विविध विसंगती (Anomalies) आढळून आल्या आहेत.

SIR-2026 मोहिमेअंतर्गत उर्वरित फॉर्म लवकरात लवकर जमा करून त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

0000000

Friday, 17 July 2026

विशेष लेख... SIR 2026 म्हणजे काय? सर्वसामान्यांसाठी सोप्या भाषेत माहिती

 


          देशातील लोकशाही मजबूत राहण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने निवडणूक आयोगामार्फत Special Intensive Revision (SIR) 2026 ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे, नवीन मतदारांची नोंद करणे आणि मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे हे काम केले जाते.

SIR 2026 म्हणजे काय?

        SIR ही एक विशेष मोहीम आहे, ज्यामध्ये संपूर्ण मतदार यादीची सखोल तपासणी केली जाते. यामध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन माहिती पडताळणी केली जाते. त्यामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनते.

या मोहिमेचा उद्देश काय आहे?

       मतदार यादीतील त्रुटी दूर करणे. पात्र नागरिकांची नोंद सुनिश्चित करणे. चुकीची किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकणे. लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढवणे.

सामान्य नागरिकांनी काय करावे?

         आपल्या नावाची मतदार यादीत नोंद आहे का ते तपासावे. चुकीची माहिती असल्यास ती दुरुस्त करून घ्यावी. नवीन मतदार असल्यास अर्ज करून नाव नोंदवावे. BLO (Booth Level Officer) किंवा संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

       साधारणपणे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि वयाचा पुरावा अशी कागदपत्रे आवश्यक असतात. मात्र, अचूक माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवावी.

ही मोहीम का महत्त्वाची आहे?

       योग्य मतदार यादी ही स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणुकीचा पाया असते. जर यादीत चुकीची नावे असतील किंवा पात्र नागरिकांची नोंद नसेल, तर लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.

अफवांपासून सावध राहा

         कधी कधी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जाते. अधिकृत माहिती फक्त निवडणूक आयोग किंवा प्रशासनाकडूनच घ्यावी. कोणत्याही अनोळखी क्रमांकावर संपर्क करण्यापूर्वी खात्री करावी.

निष्कर्ष

          SIR 2026 ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. योग्य माहिती देऊन आणि प्रशासनाला सहकार्य करून आपण मजबूत लोकशाही घडवू शकतो.

आपला एक मत — देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा

 

-        -- जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

                                                                         00000000