जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 5 August 2026

कर्जमुक्ती योजनेत ई-केवायसीला वेग; 80% प्रमाणीकरण पूर्ण

 


गोंदिया, दि.5  : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यात ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेला वेग मिळत असून आतापर्यंत 80 टक्के प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. दिनांक 5 ऑगस्टपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, एकूण 20,915 कर्जखाते अपलोड करण्यात आली असून त्यापैकी 18,830 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 14,965 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित 3,865 प्रकरणांवर वेगाने कार्यवाही सुरू असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ज्या पात्र शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधारशी रजिस्टर्ड नाहीत त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकांना माहिती देवून सदर प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. तसेच जे शेतकरी बाहेरगावी गेलेले आहेत त्यांनी आपली  ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरुन कर्जमुक्तीचा लाभ वेळेवर उपलब्ध होण्यास मदत होईल. ज्या पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे लवकरच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

                                                  00000000

गोरेगाव तालुक्यात लोकशाही दिनाचे आयोजन 10 ऑगस्टला

 


         गोंदिया, दि.5 : गोरेगाव तालुक्यात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला 10 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता लोकशाही दिनाचा कार्यक्रम तहसिलदार गोरेगाव यांचे अध्यक्षतेखाली, तहसिल कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनानिमित्ताने तहसिलदार यांचेकडून जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी एैकून घेण्यात येतील आणि शासनाच्या विविध विभागाचे तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी यांना त्या संबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील. तरी गोरेगाव तालुक्यातील जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी असल्यास प्रपत्र-1 (अ) मध्ये विहीत केलेल्या अर्जामध्ये लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे आवाहन गोरेगाव तहसिलदार प्रज्ञा भोकरे यांनी केले आहे.

00000000

अवयवदान-जीवनदानाचा संकल्प अभियान : 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम सुरू

 




गोंदिया, दि.5 : महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी दि.3 ते 15 ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यात दि.3 ते 15 ऑगस्ट पर्यंत 'अवयवदान पंधरवाडा' संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाण्याचे मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

सोमवार 3 ऑगस्ट रोजी के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे  व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांचे हस्ते 'अवयवदान पंधरवाडा' अभियानाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

दि.3 ऑगस्ट रोजी अवयवदान प्रभातफेरी व शपथ घेण्याच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरी दरम्यान अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी विजय आखाडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल, शल्य चिकित्सक डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे, डॉ.राजेश बेलमकर, डॉ.अनिल आटे, डॉ.मिना वट्टी, डॉ.ज्योती राठोड, डॉ.कांचन भोयर, डॉ.सोनम जाधव, नेत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चंद्रकिशोर पारधी, नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले/नागपुरे, नेत्र सहाय्यक रिता अरोरा, योगशिक्षिका मनीषा पशीने, स्वाती पाटील, सपना खंडाईत, संध्या शंभरकर यांनी शहरात प्रभातफेरीने विविध पोष्टरच्या माध्यमातुन अवयवदानाची जनजागृती केली. यावेळी के.टी.एस. प्रांगणात अवयवदानाचा संकल्प घेवुन प्रतिज्ञा घेण्यात आली.

अवयवदानाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यासंदर्भातील गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करणे तसेच अधिकाधिक नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने समाजहिताच्या या कार्यात सहभागी होऊन अवयवदानाचा संकल्प करावा,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

यावर्षी 'अवयवदान जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प' या संकल्पनेवर आधारित विविध जनजागृती उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत.

अवयवदानासाठी कार्यरत संस्थांच्या समन्वयातून नागरिकांना अवयवदानाची प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच सामाजिक संस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक व धार्मिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती रॅली, शपथविधी, व्याख्याने, चर्चासत्रे, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा, आरोग्य शिक्षण, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती तसेच अवयवदानाविषयी यशोगाथा आणि अनुभव कथन यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

                                                               00000000

शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी प्रणालीवर सुरु

 


गोंदिया, दि.5 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता सुरु करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीच्या लाभार्थी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्निकृत बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने, अचूक माहिती अर्जामध्ये भरावी. महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारे ऑनलाईन राबविण्यात येणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे आहेत.

मॅट्रिकोत्तर (Post-Matric) शिष्यवृत्ती योजना : विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना २. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना. राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (विजाभज/विमाप्र). व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहातील निवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता प्रदान करणे (विजाभज/विमाप्र). शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विजाभज विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता. इमाव प्रवर्गातील मुलींकरिता शिष्यवृत्ती (व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या मुलीकरिता 100%). इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क. इमाव प्रवर्गातील मुलींकरिता शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क. विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता फ्रिशीप. विजाभज विमाप्र विद्यार्थ्यांकरिता शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क. विमाप्र विद्यार्थ्यांकरिता शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क.

मॅट्रिकपूर्व (Pre-Matric) शिष्यवृत्ती योजना : इयत्ता 5 वी व 7 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. इयत्ता 8 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. इयत्ता 5 वी व 7 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुलींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. इयत्ता 8 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. सैनिक शाळेत प्रशिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजना. माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील 5 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गात विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान करणे. PM-YASASVI मैट्रिकपूर्व शिष्यवृत्ती.

विद्यार्थ्यांनी करावयाची कार्ये :

महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे : सर्व विद्यार्थ्यांसाठी महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युझर आयडी/पासवर्डची आता गरज नाही.

आधार आधारित नोंदणी : विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक वापरून नवीन महाआयडी बनवावा. आधार पोर्टलवर आपली सर्व माहिती (पत्ता, मोबाईल, ई-मेल आणि बँक खाते) अचूक व अद्ययावत ठेवावी.

दस्तऐवज संकलन : आवश्यक सर्व कागदपत्रे (जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रके इत्यादी) स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करावीत.

नवीन व नूतनीकरण अर्ज : नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अशा दोन्ही अर्जासाठी नवीन महाआयडी/आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन नंतर "माझा अर्ज नूतनीकरण करावा' ही विशिष्ट टॅब निवडावी.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्जदारांकडून संबंधित महाविद्यालय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शिक्षण शुल्क घेत नसल्याने केंद्र हिस्सा विद्यार्थ्याच्या खात्यावर प्राप्त होताच संबंधित महाविद्यालयास शिक्षण शुल्काची रक्कम अदा करावी.

महाविद्यालयाने करावयाची कार्ये :

केवळ एकच लॉगिन (प्राचार्य लॉगिन) : महाविद्यालयासाठी आता केवळ एकच लॉगिन उपलब्ध असेल जे थेट महाविद्यालयाच्या प्राचार्याचे असेल (लिपीक लॉगिन पूर्णपणे बंद). ज्या महाविद्यालयांना अद्यापही लॉगिन पासवर्ड बाबत काही अडचणी असतील तर त्यांनी त्यांच्या संबंधित शैक्षणिक विभागास संपर्क साधावा.

प्रोफाईल व शुल्क निश्चिती : महाविद्यालयाने मागील युझर आयडी व नवीन डीफॉल्ट पासवर्डने लॉगिन करून आपली प्रोफाईल तपासून अभ्यासक्रमनिहाय निश्चित करण्यात आलेले शुल्क (Fee Structure) तत्काळ अद्ययावत करावे.

प्राचार्याची जबाबदारी : पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित (Pending) ठेवू नयेत, अर्ज विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठ्यण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्याची असेल.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेबाबत : मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांकरिता पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित गट शिक्षण अधिकारी (BEO) यांच्याशी समन्वय करून ऑनलाईन भरण्याकरिता संबंधितांना सहाय्य करावे.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करावा :

महाडीबीटी पोर्टलकरिता https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस उपरोक्त पोर्टलवरील लिंकवर किंवा टॅबवर "नागरिकांसाठी लॉगिन" किंवा "महाआयडीशिवाय प्रवेश करा" या पर्यायाचा वापर करून आधार बेस लॉगिन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडावा. त्यानंतर आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी अद्ययावत केल्यानंतर लॉगिन होईल. लॉगिन झाल्यानंतर पात्र योजनांचा तपशील अद्ययावत केल्यानंतर आपणास लागू होणाऱ्या विभागनिहाय योजनांची यादी उपलब्ध होईल. आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्या योजनेच्या नावासमोर 'पहा" क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर आपण निवड केलेल्या योजनांच्या समोर Apply टॅबवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी (उदा. वैयक्तिक माहिती चालू व मागील शैक्षणिक तपशील, योजने संबंधित आवश्यक कागदपत्रे) याप्रमाणे तपशील अद्ययावत करून अर्ज ऑनलाईन समाविष्ट सबमिट करावा व प्रिंट किंवा पीडीएफ मध्ये जतन करून ठेवावा. आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्य, कौटुंबिक उत्पन्न इत्यादी पोर्टलमध्ये काळजीपूर्वक भरावी.

महाविद्यालयांसाठी सूचना :

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. इमाव, विजाभज, विमाप्र कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम घेवू नये. आपल्या महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमांची नावे, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश शुल्क रचना इत्यादी माहिती पोर्टलवर मॅच करण्यासाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणा (उदा. संचालनालयास/विद्यापीठास/परिषदेस/FRA) यांच्याकडून मॅच करून घेण्याची कार्यवाही करावी.

 अधिक माहितीकरिता ०२२-४९१५०८००/ १८००१०२५३९९ या नंबरवर अथवा ई-मेल आयडी helpdesk@mahadbt.gov.in यावर संपर्क साधावा. तक्रार निवारणासाठी तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरिता आपल्या लॉगिन मधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी कळविले आहे.

                                                         00000000

Tuesday, 4 August 2026

विशेष वृत्त... गोंदिया जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेला वेग; ई-केवायसी प्रक्रियेत प्रगती

 


 

गोंदिया, दि.4:  महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सकारात्मक प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांच्या समन्वयातून कर्जमाफी प्रक्रियेला चांगली गती मिळत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ३०,२९५ कर्जखाती यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी २१,६१६ शेतकरी पात्र ठरले असून, त्यातील १६,०४७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित ५५६९ प्रकरणांवर वेगाने कार्यवाही सुरू असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासन व बँकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळवून देण्यास मदत होत असून, उर्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोहीम अधिक वेगाने राबविण्यात येत आहे.

दरम्यान, कर्जमाफीचा लाभ थेट खात्यात जमा होण्यासाठी प्रलंबित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण (E-KYC) पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0000000

7 ते 21 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू

 

    

        गोंदिया, दि.4 : जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो आत्मदहन व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिन साजरा करण्यात येणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 7 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.                        

                                                              0000000

Monday, 3 August 2026

तिबेटीयन सेटलमेंट अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांना भेट; नॉर्ग्येलिंग कॅम्पला भेट देण्याचे निमंत्रण

 


गोंदिया, दि.3 : गोंदिया जिल्ह्यातील गोठणगावजवळ वसलेल्या नॉर्ग्येलिंग तिबेटीयन सेटलमेंटचे सेटलमेंट ऑफिसर तेनझिन त्सांगपा यांनी आज दुपारी सुमारे 2.30 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मंदार पत्की (भा.प्र.से.) यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान सेटलमेंट ऑफिसर यांनी नॉर्ग्येलिंग तिबेटीयन सेटलमेंटची सविस्तर माहिती देत, ही वसाहत सन 1972 मध्ये स्थापन झाल्याचे सांगितले. तसेच, भेटीस वेळ दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानून तिबेटीयन सेटलमेंटच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सेटलमेंट ऑफिसर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तिबेटीयन कॅम्पला भेट देण्याचे निमंत्रण दिले. त्यावर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी लवकरच कॅम्पला भेट देण्याचे आश्वासन दिले.

भेटीच्या शेवटी कृतज्ञतेच्या भावनेतून सेटलमेंट ऑफिसर तेनझिन त्सांगपा यांनी तिबेटचे आध्यात्मिक नेते परमपूज्य दलाई लामा लिखित "Voice for the Voiceless" हे पुस्तक तसेच शुभचिन्ह असलेला पांढरा स्कार्फ जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिला.

                                                        0000000