जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 27 July 2026

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम 2026 : शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन

 


गोंदिया, दि.27 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.

त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात येत आहेत.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगाम मधील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे.

          पिकस्पर्धेतील खरीप पीके :- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल.

पात्रता निकष :- स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर भात पिकासाठी किमान २० गुंठे तसेच उर्वरित पिकांसाठी किमान ४० गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :- फार्मर आयडी. ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास). बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख; खरीप हंगाम :- मूग व उडीद पिक :- ३१ जुलै २०२६. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल :- ३१ ऑगस्ट २०२६.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क :- पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम १५०/- राहील.

बक्षिस स्वरूप :- तालुका पातळीवर पहिले पुरस्कार 5,000 रुपये, द्वितीय 3,000 आणि तृतीय 2,000 रुपये असे आहे. जिल्हा पातळीवर प्रथम पुरस्कार 10,000 रुपये,  द्वितीय पुरस्कार 7,000 आणि तृतीय पुरस्कार 5,000 आहे. राज्य पातळीवर प्रथम पुरस्कार 50,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 40,000 आणि तृतीय पुरस्कार 30,000 असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी होण्याकरिता कृषी विभागाच्या संकेतस्थळावर http://krishi.maharashtra.gov.in "पीक स्पर्धा नोंदणी" टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

                                                        0000000

विशेष वृत्त... गोंदिया जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रगती वेगाने; सोमवारपर्यंत ५,१४९ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली

 


गोंदिया, दि.27 : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात कामकाजाला गती मिळत असून विविध टप्प्यांवर लक्षणीय प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारपर्यंत ५,१४९ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे.

जिल्हा स्तरावरील डॅशबोर्डनुसार आतापर्यंत एकूण ३०,२९५ कर्जखाते अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी २१,६१६ शेतकरी पात्र ठरले असून, त्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

योजनेच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) टप्प्यात सध्या ५,१४९ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर अजूनही १६,४६७ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.

प्रशासनाने प्रलंबित ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. संबंधित बँका, सहकारी संस्था आणि महसूल यंत्रणा यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया गतीमान करण्यात येत आहे.

पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आपले आधार प्रमाणीकरण (E-KYC) पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, गोंदिया जिल्हा कर्जमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.

                                                      00000000

 

5 व 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेट मोहीम : शाळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन

 


गोंदिया, दि.27: आधार नोंदणी नियमानुसार पाच वर्षांखालील मुलांचे नोंदणीवेळी केवळ चेहऱ्याचा फोटो व लोकसंख्याशास्त्रीय माहिती घेतली जाते. बोटांचे ठसे व डोळ्याच्या बुबुळाचे (आयरीस) बायोमेट्रिक घेतले जात नाहीत. त्यामुळे पाचव्या वर्षी (MBU1) व पंधराव्या वर्षी (MBU2) बायोमेट्रिक अद्ययावत करणे अनिवार्य आहे.

मात्र, निरीक्षणात असे आढळून आले आहे की, जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ५ ते १५ वयोगटातील मुलांनी अद्याप पहिला बायोमेट्रिक अपडेट (MBU1) केलेला नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे पंधरा वर्षांनंतरचे दुसरे बायोमेट्रिक अपडेट (MBU2) प्रलंबित आहे. यामुळे JEE, NEET यासारख्या स्पर्धा परीक्षांवेळी बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचणी निर्माण होतात व अचानक मोठ्या प्रमाणावर अद्ययावत करण्यासाठी गर्दी होते.

ही परिस्थिती टाळण्यासाठी व प्रलंबित अपडेट पूर्ण करण्यासाठी शासनाने सदर अभियान मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश दिले असून, प्रत्येक तालुक्यासाठी किमान 2 वाहने (Dedicated Vehicle) व प्रत्येक वाहनामध्ये 2 MBU किटस् उपलब्ध करुन सलग मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे, जेणेकरुन जिल्ह्यातील प्रलंबित MBU प्रकरणे तातडीने निकाली काढता येतील.

यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी आपल्या अधिपत्त्याखाली सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना Udise 18+ या वेबपोर्टलवरुन डाटा पडताळून तातडीने गोंदिया जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना शिबीर घेण्याबाबत आवश्यक त्या सूचना देऊन पुढील कार्यवाही करावी.

प्रत्येक तालुक्यात किमान 2 वाहने उपलब्ध करुन त्यामार्फत MBU विशेष शिबिरे मिशन मोडमध्ये आयोजित करावीत. सर्व शाळांमध्ये प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी तयार करुन शिबिरांचे वेळापत्रक निश्चित करावे. दररोजच्या MBU प्रगतीचा आढावा घेवून प्रलंबित प्रकरणे तातडीने पूर्ण करावीत. झालेल्या कार्यवाहीचा व प्रगतीचा अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान शाखेत सादर करावा.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी (आधार प्रकल्प) भैय्यासाहेब बेहेरे यांनी सांगितले की, शिष्यवृत्ती, शालेय व महाविद्यालयीन प्रवेश, बँक व्यवहार तसेच इतर महत्त्वाच्या सेवांसाठी आधारमधील अद्ययावत माहिती आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांचे बायोमेट्रिक वेळेत अद्ययावत करणे अत्यंत गरजेचे आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखरेखीखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

00000000

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे

 


गोंदिया, दि.27 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२६ असून जास्तीत जास्त पात्र अर्जदारांनी मुदतीचे आत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक यांनी केले आहे.

साहित्य, कला व संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे तसेच शासनाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणारे ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे निकषांची पूर्तता करणारे अर्जदार या योजनेसाठी पात्र असतील. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथिल करण्यात येत आहे. (दिव्यांगाना वयोमर्यादा ४० वर्ष). ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे विधवा/परितक्त्या/दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार.  केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज दि.३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने mahakalasanman.org या पोर्टलवर सादर करावेत. योजनेसाठी नोंदणी, अर्ज भरणे तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा या पोर्टलवर उपलब्ध आहे. अपलोड करण्यात आलेले अर्ज व आवश्यक कागदपत्र, संबंधीत पंचायत समितीकडे दोन प्रतित सादर करावेत.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  

                                                      0000000

गोंदियात कर्जमुक्ती योजनेला वेग; पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण प्रमाणपत्रांचे वितरण

 




गोंदिया, दि.27 : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पात्र सभासद शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष मेळाव्यात पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला गोंदिया जिल्ह्याचे खासदार राजेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपनिबंधक सहकारी संस्था योगेश भाकरे यांनी योजनांची संपूर्ण माहिती दिली. त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी संबंधित योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मेळाव्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास गती मिळणार असून, प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

                                                                00000000

गोंदिया जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेला वेग : ५५८ याद्या जाहीर, शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे!

 



गोंदिया, दि.27 : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील कामकाजाला गती मिळाली असून पात्र शेतकऱ्यांच्या नावांच्या एकूण ५५८ (V.K. List) याद्या संबंधित बँकांकडून प्राप्त होऊन अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी मंदार पत्की तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली या याद्या २५ जुलै २०२६ रोजी बँक शाखा, सहकारी संस्था आणि गावपातळीवरील फलकांवर जाहीर करण्यात आल्या. या प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी बँक स्तरावर २९ पंचनामे, तर संस्था/गाव पातळीवर ३२९ पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरण (KYC) करणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्ह्यात ७५२ ‘आपले सेवा केंद्रे’ उपलब्ध करून देण्यात आली असून, तेथे आवश्यक मार्गदर्शक सूचना (SOP) देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

यादीत आपले नाव असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी विलंब न करता जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गोंदिया यांनी केले आहे.

ही योजना शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, प्रशासनाकडून पारदर्शक आणि वेगवान अंमलबजावणीवर भर दिला जात आहे.

00000000

Friday, 24 July 2026

डायटचे प्राचार्य व शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांचा शोध

 




गोंदिया, दि.24 : शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य यांचे 29 मे 2026 चे पत्रान्वये शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 15 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये 3 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण राबविण्याचे ठरविले असून त्याबाबतची SOP ची प्रत व माहिती संकलनाचे formats प्राप्त झालेले आहे. हे महत्वपूर्ण सामाजिक काम शासनाच्या संबंधित सर्व विभागाचा सहभागाने करण्याबाबत निर्देश आहेत. सर्व संबंधित विभागातील सर्व ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरावरील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात मदत करण्याबाबत आदेशित करण्याबाबत संदर्भिय पत्रान्वये निर्देश आहेत. या महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे सर्वेक्षण राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

तालुक्यातील सर्व विभागाच्या ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरावरील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात सर्वतोपरी मदत करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. तसेच ज्या काही योजना व इतरही काही सुविधा विभागांकडून सदर बालकांना उपलब्ध करून देणे शक्य होईल त्या उपलब्ध करुन द्याव्यात, जेणेकरुन सदर सर्वेक्षणाचे काम फलदायी होईल. विशेषतः शहरी भागात भिक मागणारे, भटके कुटुंबातील बालके आढळतात, अशा बालकांचे सर्वेक्षणाकरीता नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देऊन अशा बालकांचा शोध घेण्याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश आहेत.

सर्वेक्षण दि.24 जुलै 2026 रोजी शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांचा शोध घेण्याकरीता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) पवन खंदारे, जिल्हा समन्वयक बालरक्षक कुलदीपिका बोरकर, विषय साधन व्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी अण्णाभाऊ साठे नगर (कुडवा) व गोंडीटोला कटंगी, ता. गोदिया येथे प्रत्यक्षात जाऊन भेट दिली.    

अण्णाभाऊ साठे नगर (कुड्या) व गोंडीटोला कटंगी या वस्तीतील कुटुंब प्रमुख, महिला, किशोरवयीन मुली, मुले, वरिष्ठ नागरीक व 3 ते 18 वयोगटातील बालके या सर्वांसोबत डायटचे प्राचार्य तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जे मुले वस्तीत आढळली त्यांना शाळेत नियमित जाण्याबाबत विनंती करण्यात आली. काही मुला-मुलींना सायकलची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. करीता सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, ज्यांच्या चांगल्या सायकल घरी आहेत, ज्या वापरात नाही त्यांनी सदर मुलांसाठी द्याव्या असे आवाहन डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे व शिक्षणाधिकारी (प्राथ.) पवन खंदारे यानी केले आहे.

शासनाच्या ज्या सुविधांचा लाभ देणे शक्य होईल त्या सुविधा योजना सदर बालकांपर्यंत पोहचविण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी वस्ती प्रमुखांना सांगितले. सविता बेदरकर यांनी संपूर्ण वस्तीतील पालकांशी संवाद घडवून आणला, तेथील समस्यांबाबत माहिती दिली. तेथील स्थानिक अंगणवाडीमध्ये सुध्दा भेट देण्यात आली.

अण्णाभाऊ साठे नगर (कुडवा) व गोंडीटोला कटंगी या दोन्ही वस्तीतील प्रमुखांना विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आलेली आहे, जेणेकरुन आवश्यक त्या सुविधा बालकांपर्यंत पुरविणे शक्य होईल. सदर वस्तीमध्ये प्रत्यक्ष भेटी दरम्यान जवळपास 20 ते 25 विद्यार्थी अनियमित असल्याचे निदर्शनास आले. सदर सर्व विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठविण्याबाबत पालकाचे समुपदेशन करण्यात आले.

                                                   00000000