जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday, 15 August 2026

चिचगड येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; 14 वर्षांपासून प्रलंबित सामूहिक वनहक्क फेरफार प्रकरणे निकाली

 




गोंदिया, दि. 15 ऑगस्ट : अपर तहसील कार्यालय, चिचगड येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.

14 वर्षांपासून प्रलंबित वनहक्क प्रकरणांना मिळाला न्याय

या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सामूहिक वनहक्क फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

संबंधित ग्रामपंचायतींना सामूहिक वनहक्काचे पट्टे यापूर्वीच प्राप्त झाले होते. मात्र फेरफार प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सातबारा उतारे उपलब्ध झाले नव्हते. तहसील कार्यालयाच्या विशेष प्रयत्नांतून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि संबंधित ग्रामपंचायतींना सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.

यामुळे वनहक्कधारक ग्रामपंचायतींच्या हक्कांची महसुली नोंद अधिकृतरीत्या पूर्ण झाली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

श्रीराम विद्यालय, चिचगड येथील सुमारे 700 विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 150 विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले. देशभक्तीपर घोषणा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध राष्ट्रप्रेमपर उपक्रमांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कार्यक्रमादरम्यान महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक मूल्यांचे जतन आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी सक्रिय सहकार्य करण्याचा संकल्प केला.

प्रशासनाने संविधानातील मूल्ये प्रत्यक्षात उतरवावीत - जिल्हाधिकारी मंदार पत्की : जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते ध्वजारोण

 








 

      गोंदिया, दि.15 : प्रशासनाने संविधानातील मूल्ये प्रत्यक्षात उतरवावीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करतेवेळी केले.  

         प्रारंभी वंदे मातरम् या एैतिहासिक गाण्याने ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.

           यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी श्री. पत्की म्हणाले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे गुण जशी लिहिली गेलेली आहेत, हे गुण प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी आपल्या प्रशासकीय यंत्रणेवर आहे. प्रशासनात काम करतांना आपल्याकडून कोणत्याही कामामध्ये कोणाशी मनभेद, मतभेद किंवा आकांक्षा ठेवून कोणाकडून काम होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

         कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, सर्वश्री उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, विजय अवधाने, दर्शन निकाळजे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.रुपेशकुमार राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रविंद्र मारबते, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते

नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण

          भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

          वंदे मातरम् गीतानंतर पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीताने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देवून भेटी घेतल्या. यावेळी तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, जिल्हा उपनिबंधक योगेशकुमार बाकरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे, उपसंपादक कैलाश गजभिये यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000

गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनवूया : पालकमंत्री इंद्रनील नाईक

 







गोंदिया, दि. 15 ऑगस्ट 2026 : गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी झेनीत दोन्तुला, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व विद्यार्थी उपस्थित होते.

विकासासाठी ₹438.25 कोटींची तरतूद

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत ₹438 कोटी 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील सुमारे 30 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 12,679 शेतकऱ्यांच्या खात्यात ₹75.74 कोटी जमा करण्यात आले आहेत.

खरीप हंगामात भात लागवडीसाठी 74,613 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच धान खरेदी केंद्रांमार्फत 1.98 लाख शेतकऱ्यांकडून 75.57 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून ₹1,569.12 कोटींचे चुकारे वितरित करण्यात आले आहेत.

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

क्षयरोग निर्मूलनात गोंदिया जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.37 लाख आयुष्मान कार्ड आणि 9.90 लाख आभा कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

पर्यटन व जैवविविधतेला चालना

हाजराफॉलच्या विकासावर विशेष भर देण्यात येत असून, जूनअखेरपर्यंत 8,500 हून अधिक पर्यटकांनी हाजराफॉलला भेट दिली. सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाल्याने गोंदियाच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

रोजगार निर्मितीला प्राधान्य

व्ही.बी. जी-राम-जी अभियानांतर्गत ग्रामीण भागात 17.88 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती झाली आहे. पात्र कुटुंबांना 125 दिवसांपर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जलसंधारण सप्ताहाचा संदेश

15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

🌱 “चला माती वाचवू... पाणी जपू... जलसमृद्ध महाराष्ट्र घडवू!”

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या भावनेतून गोंदिया जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्याचा संकल्प करण्यात आला.

Friday, 14 August 2026

खांबी ते बोंडगाव रस्त्यावर असलेला पूल जड वाहतुकीसाठी बंद : पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु

 

गोंदिया, दि.14 : सन 2026 पावसाळा पूर्वीचे नियतकालीन निरीक्षण दरम्यान बोंडगाव बाराभाटी रस्त्यावर असलेल्या लहान पुलाच्या स्लॅबचे खालील स्टील पूर्णत: दिसत असल्याने व ते गंजलेल्या अवस्थेत असल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2, गोंदिया व तहसिलदार अर्जुनी मोरगाव यांनी कळविले आहे.

सदर पुलावरुन जड वाहने गेल्यास पूल क्षतीग्रस्त होवून अपघात व जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी मोटार अधिनियम 1988 चे कलम 115 चे तरतुदीनुसार त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत बाराभाटी-पिंपळगाव-खांबी-निमगाव-बोंडगाव या पर्यायी मार्गे वळविणे. बोंडगाव-निमगाव-खांबी-पिंपळगाव-बाराभाटी या पर्यायी मार्गे वळविणेकरीता खालील अटी व शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक तिथे हाईटवार लावण्याची व्यवस्था करावी. वाहतुक वळविण्याची व पर्यायी वाहतुक मार्ग उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतुक शाखा यांची राहील. वाहतुक मार्गावर आवश्यक तेथे गतिरोधक संबंधित विभागाने लावावे. वाहतुक वळविल्याबाबत दिशा निर्देशन करणारे फलक व स्वयंसेवकाची व्यवस्था संबंधित विभागाने करावी. जड-अवजड वाहतुक वळविल्याबाबत दिशा निर्देशन करणारे फलकाची व्यवस्था संबंधित विभागाने करावी. सदर वाहतुक मार्गावर कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत कोणताही प्रश्न उदभवणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घेण्यात यावी. सदर रस्ता बंद केल्यावर नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घेण्यात यावी. अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील. अटी व शर्तीचे पालन न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.

0000000

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू

 


        गोंदिया, दि.14 : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे.

           शासनाच्या http://hmasnew.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवर १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा. ऑनलाइन अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित शासकीय वसतिगृहात सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

         अधिक माहितीसाठी इमाव, विमाप्र व विजाभज मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, गोंदिया येथील गृहपाल अश्विनी दिघोरे (मो. ९७६५०८४०९०), मंगलेश गिरी (मो. ८७८८२३५७६७) तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गोंदिया यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालकांनी केले आहे.

                                                                   0000000

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन संवाद

 


       गोंदिया, दि.14 : गावपातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभरातील विविध आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद साधणार आहेत.

          १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या जनसंवादातून गावागावातील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना आणि अपेक्षा थेट आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचणार असून, त्याचवेळी राज्यातील विविध नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे.

          निरोगी महाराष्ट्रासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भागीदारी अधिक मजबूत करणे’ या दिशेने होणारा हा जनसंवाद आरोग्य क्षेत्रातील लोकसहभागाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

          सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती (VHNSC), जन आरोग्य समिती (JAS), रुग्ण कल्याण समिती (RKS) आणि एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती या समित्या शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. या समित्यांमध्ये ग्रामपंचायत प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, युवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध घटकांचा सहभाग असतो.

          आरोग्य सेवांची गुणवत्ता, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेतील सहभाग आणि स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक अडचणी याबाबत या जनसंवादातून थेट चर्चा होणार आहे. निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मार्गदर्शन करणार आहेत.

गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत व्यापक सहभाग

        या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावर व्यापक पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर JAS आणि VHNSC समितीतील अशासकीय सदस्यांना एकत्रित उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच संबंधित मान्यवरांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          गावपातळीवर VHNSC सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित उपस्थित राहून ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

         निवडक सदस्यांसोबत थेट द्विमार्गी संवादासाठी स्वतंत्र ECHO लिंक उपलब्ध करून देण्यात येणार असून, इतर समिती सदस्यांसाठी YouTube व ब्रॉडकास्ट लिंकद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध राहणार आहे.

१२४ आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटन

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध भागांत नव्याने उभारण्यात आलेल्या तसेच कार्यान्वित झालेल्या आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे. उपलब्ध नियोजनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, BPHU, PHU, UHWC यांसह विविध आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे.

             यामध्ये ग्रामीण भागासोबतच महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचाही समावेश असून, नागरिकांना त्यांच्या घराजवळ गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यामुळे अधिक बळ मिळणार आहे.

लोकसहभागातून सक्षम होणार आरोग्य व्यवस्था

           आरोग्य व्यवस्था ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी न राहता त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने आरोग्य समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा समिती सदस्यांशी होणारा हा थेट संवाद आरोग्य व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

           गावातील आरोग्यविषयक प्रश्न थेट शासनापर्यंत पोहोचविणे, स्थानिक पातळीवरील चांगले उपक्रम जाणून घेणे, आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतील अडचणी समजून घेणे आणि नागरिकांच्या सहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना गती देणे, हा या जनसंवादाचा प्रमुख उद्देश आहे.

०००००००

निवृत्तीवेतन धारकांसाठी गोंदियात समाधान शिबीर संपन्न

 


           गोंदिया, दि.14 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासंबंधित येणाऱ्या समस्यांचे निराकारण करण्याकरिता तसेच राज्य शासनाच्या नवीन उपक्रमाबाबत व शासनाचे अद्यावत निर्णय गोंदिया जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृतीवेतनधारकांना माहिती देण्याकरिता जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया तर्फे दि.11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

          या कार्यक्रमास कोषागार कार्यालय गोंदिया तर्फे अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा), कोषागार कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखेचे सर्व कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) समीर देशमुख यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी समाधान शिबिराच्या आयोजनाचे  उद्दिष्ट, सेवानिवृत्ती प्रकरणी जिल्हा कोषागार कार्यालयाची भूमिका तसेच त्यांचे कर्तव्य याबाबत माहिती दिली.

         या समाधान शिबिरात लाईफ सर्टिफिकेट (LIFE CERTIFICATE), डिजिटल सर्टिफिकेट (DIGITAL LIFE CERTIFICATE), बँकेच परस्पर बदल, मृत प्रमाणपत्र सादर करणे, निवृत्तीवेतन वाहिनी, महाउपलब्धी ॲप, निवृत्तीवेतन सुधारित करणे व एनपीएस/डीसीएजी (NPS/DCAG) च्या प्रलंबित प्रकरणांबाबत विस्तृतपणे माहिती देण्यात आली.

       यावेळी खाजगी अनुदानित शाळा अधिकारी/कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री पारधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रविण ठोंबरे, कनिष्ठ लेखापाल (निवृत्तीवेतन शाखा) जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.

                                                            0000000