जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 28 August 2026

‘राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस’ निमित्ताने कायदेविषयक जनजागृती

 



गोंदिया, दि.28 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गोंदिया यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय गोदिया मार्फत ग्रामपंचायत कवलेवाडा ता.गोरेगाव येथे 21 ऑगस्ट 2026 रोजी ‘राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस’ निमित्ताने कायदेविषयक जनजागृती कार्यकम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके, सहाय्यक लोकअभिरक्षक अॅड. अतुल येडे, रिटेनर/पॅनल लॉयर अॅड. रोशनी पटले, पोलिस पाटील डोंगरुटोला किशोरकुमार भगत, पोलिस पाटील कवलेवाडा राहुल बोरकर, ग्रामपंचायत कवलेवाडा सरपंच सकुंतला कटरे, उपसरपंच टोमेंद्र तांडेकर, ग्रामविकास अधिकारी एस.एस. पाझारे, पी.एल.व्ही. आनंदकुमार पटले, माजी पं.स. सदस्य कुतनबाई पारधी व कवलेवाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अॅड. अतुल येडे यांनी 21 ऑगस्ट राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, NALSAची राष्ट्रीय विधी सेवा हेल्पलाइन आणि नालसा पोर्टल, नालसा जागृती योजना 2025, नालसा योजना 2025 अंतर्गत शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसन उपाययोजना, समाजात महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता या विषयावर माहिती दिली.
अॅड. रोशनी पटले यांनी पर्यायी विवाद निवारण (ADR) आणि त्यांचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये, पीडीत व्यक्तींसाठी नुकसानभरपाई योजना, वन्यजीव-मानव संघर्ष प्रकरणांमधील पीडीतांना न्याय मिळवून देण्याबाबतची NALSA योजना 2025 या विषयावर मार्गदर्शन केले.
ॲड. एन.के. वाळके यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिकांचे कर्तव्य व हक्क या विषयी माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिकांच्या 'समस्या, त्यांचे अधिकार, कायदेशीर सरंक्षण, मोफत कायदेविषयक सेवा तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा आदर करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे असे सांगण्यात आले. सदर कार्यकमाच्या माध्यमातुन जेष्ठ नागरिकांना कायदेशीर मदत व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोरकुमार भगत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राहुल बोरकर यांनी मानले. कार्यक्रमास कवलेवाडा गावातील रहिवासी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया कर्मचारी व पी.एल व्ही असे जवळपास 100 नागरिक उपस्थित होते.
0000000

राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याची संधी : प्राप्त अर्जांची 31 ऑगस्टला सोडत; शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे


गोंदिया, दि.28 : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व प्रगत कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादनाच्या अत्याधुनिक पद्धती, कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, बाजारपेठ व्यवस्था तसेच कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, यासाठी कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे - राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे.
सन 2026-27 या वर्षासाठी या योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार छाननी करण्यात येत असून, पात्र अर्जदारांची निवड करण्यासाठी सोडत (लॉटरी) प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
सदर सोडत प्रक्रिया दि.31 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. सोडतीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित नियम, अटी व मार्गदर्शक सूचनांनुसार देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यामुळे या योजनेसाठी अर्ज केलेल्या संबंधित शेतकऱ्यांनी दि.31 ऑगस्ट रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे प्रत्यक्षरित्या उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.
00000000

विशेष लेख... रानभाजी महोत्सव : आरोग्य, परंपरा आणि ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा

 





रानभाज्यांच्या जतनातून निरोगी जीवनशैली आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश


पावसाळा सुरू झाला की जंगल, शेतशिवार आणि डोंगरकपारींमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची रेलचेल दिसून येते. एकेकाळी ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या रानभाज्या आज आधुनिक जीवनशैलीत मागे पडत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत रानभाजी महोत्सवासारखे उपक्रम केवळ पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणारे नसून, आरोग्यदायी आहाराची जाणीव करून देणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये रानभाजी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात महिला बचत गट, उमेद अभियानातील स्वयं-सहाय्यता गट आणि महिला शेतकऱ्यांनी आयोजीत उपक्रमात सहभागी झाल्यात. गोंदिया तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवात पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली. ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाची, स्थानिक उत्पादनांच्या बाजारपेठेची आणि रानभाज्यांच्या वाढत्या मागणीची साक्ष देणारी ठरली.
रानभाज्या म्हणजे निसर्गाची आरोग्यसंपदा रानभाज्या कोणत्याही रासायनिक खतांशिवाय आणि कीटकनाशकांशिवाय नैसर्गिकरीत्या वाढतात. त्यामुळे त्या सुरक्षित, पौष्टिक आणि आरोग्यदायी मानल्या जातात. काटवल, सुरण, तरोटा, खापरखुटी, अंबाडी, शेवगा, घोळभाजी, कोचईची पाने, केना, पातूर भाजी, मशरूम यांसारख्या रानभाज्यांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, तंतुमय घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, पचनक्रिया सुधारणे आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी या भाज्या उपयुक्त ठरतात.
परंपरा जपण्याची आणि नव्या पिढीला जोडण्याची गरज
आजच्या फास्टफूड संस्कृतीत अनेक मुलांना रानभाज्यांची नावेही माहिती नाहीत. पूर्वी आपल्या पूर्वजांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या या भाज्या हळूहळू विस्मृतीत जात आहेत. त्यामुळे रानभाजी महोत्सव नव्या पिढीला आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देतो. या महोत्सवातून रानभाज्यांचे पौष्टिक मूल्य, त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ आणि त्यांचे औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचतात.
महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे साधन
रानभाजी महोत्सव हा केवळ प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून ग्रामीण महिलांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग ठरत आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचे मूल्यवर्धन करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केल्यास महिलांना रोजगाराच्या नव्या संधी यानिमित्त उपलब्ध होऊ शकतात. योग्य प्रक्रिया, पॅकेजिंग आणि बाजारपेठ उपलब्ध झाल्यास रानभाज्यांवर आधारित लघुउद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतात.
रानभाजी महोत्सव का आवश्यक आहे?
रानभाजी महोत्सवामुळे लोकांमध्ये आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता निर्माण होते, पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन होते, स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित होते आणि ग्रामीण महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होतात. तसेच रानभाज्यांचे संवर्धन, त्यावरील संशोधन आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळते. अशा उपक्रमांमुळे "आरोग्यदायी आहार, समृद्ध शेतकरी आणि सक्षम महिला" हा उद्देश प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होते.
रानभाज्या या केवळ पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या नाहीत, तर त्या आपल्या आरोग्याचा, संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अमूल्य ठेवा आहेत. त्यामुळे अशा महोत्सवांचे आयोजन वर्षानुवर्षे अधिक व्यापक स्वरूपात होणे ही काळाची गरज आहे. यामुळे निरोगी समाज, स्वावलंबी महिला आणि समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था घडविण्याच्या दिशेने निश्चितच मोठे पाऊल उचलले जाईल.

- अंजु कांबळे निमसरकर
जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया

जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदाचा खुमेंद्र बोपचे यांनी स्वीकारला पदभार

 





गोंदिया, दि.28 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गोंदियाचा प्रभारी पदभार खुमेंद्र बोपचे यांनी गुरुवारी स्वीकारला.

            मीनाक्षी कांबळे यांची बदली नागपूर कार्यालयात झाली असून श्री. बोपचे यांनी गोंदिया जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. श्री. बोपचे सध्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी भंडारा या पदावर कार्यरत आहेत.

            पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालय चळवळ, वाचकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा तसेच ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने कामकाजाला प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त केला. 

00000000


Thursday, 27 August 2026

विशेषवृत्त... विद्यार्थी खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता मात्र नववीनंतर गती थांबते

 

शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही क्रीडा प्रकारात प्रचंड क्षमता आणि आकर्षण दिसून येत असले आणि खेळाची आवड असली तरी नववी नंतर त्यामध्ये खंड पडत असल्याचे जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असल्याचे समजते.

जिल्ह्यामध्ये शासकीय व नगरपालिकेचे असे एकूण दहा क्रीडा मैदान आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थी खेळाडू सह सर्वच वयोगटातील नागरिक विविध खेळ खेळताना अथवा व्यायाम करताना दिसून येतात.
आठ तालुक्यातील आठ ठिकाणी शासकीय क्रीडा संकुल आणि गोंदिया शहरात 1 असे नऊ तसेच नगरपालिकेमार्फत एक असे दहा क्रीडा संकुल आहेत.
भारतीय लोकप्रिय क्रीडा प्रकार क्रिकेट हा सर्वत्र खेळला जात असला तरी, त्याच बरोबर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती हे क्रीडांगणात खेळले जाणारे खेळही दिसून येतात. मात्र, क्रिकेट हा खेळ मैदानात खेळला जात असल्यामुळे आणि त्याला आतापर्यंतची लाभलेली लोकप्रियता अधिक असल्यामुळे तसेच जास्त प्रेक्षक पहात असल्यामुळे तो भारतातला नंबर एकचा खेळ मानला जातो.
कबड्डी, खो-खो, कुस्ती यासारखे भारतीय खेळही लोकप्रिय आहेत, प्रत्येक विद्यार्थी दशेतला खेळाडू हे खेळ खेळतोच हे मात्र निश्चित. गोंदिया जिल्ह्यातही खेळांमध्ये खेळणारे खेळाडू आहेतच आणि त्यांनी जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, राज्यस्तरीय आणि काहींनी तर राष्ट्रीय पातळीवरही नावलौकिक मिळवलेले आहे.
ज्याला इनडोअर खेळ म्हणतात ते टेबल टेनिस, बॅडमिंटन या खेळातही आत्ता खेळाडू मोठ्या प्रमाणात येत आहेत. मागील दहा वर्षापासून खाजगी बॅडमिंटन अकादमी चालवणारे कोच अँथनी यांचे म्हणणे आहे आज बॅडमिंटन या खेळाला खूप मागणी आहे. जागतिक स्तरावर हा खेळ तिसऱ्या क्रमांकावर आहे तर भारतातही राष्ट्रीय पातळीवर चौथ्या, पाचव्या क्रमांकावर हा खेळ खेळला जातो. कोच अँथनी यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या हाताखालून जाणारे खेळाडू हे अति उत्कृष्ट खेळत असताना त्यांची दहावीची अथवा बारावीची परीक्षा येते आणि ट्युशन अथवा अभ्यासामुळे ते खेळांपासून दूर होतात हे फार दुखत आहे.
राष्ट्रीय पातळीवरील काही खेळाडूंनी बॅडमिंटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पटलावर नावलौकिक केले आहे. गोंदिया सारख्या शहरातही क्षमता असलेले खेडाळू आहेत, मात्र काही प्रमाणात सातत्य नसणे, दहावीच्या - बारावीच्या अभ्यासामुळे त्यांचे खेळ सुटणे हे एक मोठे कारण आहे. जर या खेळाडूंनी सातत्य ठेवले तर हे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावू शकतात एवढी क्षमता इथल्या खेळाडूंमध्ये आणि या खेळांमध्ये आहे असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारची खेलो इंडिया या योजनेअंतर्गत सातवी - आठवी च्या विद्यार्थ्यांना खेळांमध्ये अधिक आवड निर्माण व्हावी. पुढे राष्ट्रीय पातळीवर या खेडाळूंना मंच मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. भविष्यात ऑलम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई गेम सारख्या खेळांमध्ये अधिक पदके भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. खेलो इंडिया अंतर्गत जिल्ह्यात एक प्रशिक्षक नेमलेला आहे.
यासह मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत राज्यस्तरावरील सहभागी खेळाडूंना प्रशिक्षकासह त्यांच्या आहाराची व्यवस्थाही करण्यात येते. मिशन लक्षवेध अंतर्गतही एक प्रशिक्षक जिल्ह्यात आहे. राज्य शासनाकडून एकूण 49 खेळ प्रकारांना अनुदान दिले जाते.
जिल्ह्यात ॲथिलिटिक या क्रीडा प्रकारात सर्वाधिक खेळाडू आहेत. ज्यांनी जिल्हास्तर, विभाग स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय पातळीवरही नाव कमावलेले आहे. राजेश राऊत या खेळाडूला आट्यापाट्या या खेळ प्रकारात राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कारही मिळालेला आहे.
योग्य प्रशिक्षण, आहार, व्यायाम आणि पालकांचा खंबीर पाठिंबा खेडाळूला मिळाला तर खेडाळूंचे आयुष्य उज्ज्वल आहे, असे प्रशिक्षक अँथनी सांगतात.

-जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

🏅 राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष... गोंदियातील सुसज्ज क्रीडा संकुलांचा लाभ घ्या; ग्रामीण खेळाडूंना मिळतेय आधुनिक व्यासपीठ

  


गोंदिया | २७ ऑगस्ट : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता आणि क्रीडा कौशल्याला योग्य दिशा मिळावी, त्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि जिल्ह्यात क्रीडा संस्कृती अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यात जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. आज ही क्रीडा संकुले शेकडो खेळाडूंसाठी सराव व प्रशिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये, क्रीडा मंडळे आणि युवा खेळाडूंनी या उपलब्ध क्रीडा सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

🏟️ मरारटोलीतील जिल्हा क्रीडा संकुल ठरतेय खेळाडूंचे हक्काचे व्यासपीठ

मरारटोली, गोंदिया येथे सुमारे ६ हेक्टर क्षेत्रावर जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलात इंडोअर हॉल, जलतरण तलाव, पॅव्हेलियन इमारत, मुलांचे वसतिगृह, ४०० मीटर धावनपथ यासह क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस, हँडबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो आणि कबड्डी आदी खेळांसाठी सुविधा उपलब्ध आहेत.

याशिवाय संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रणाली आणि विद्युतीकरणाच्या सुविधाही उपलब्ध आहेत. दररोज सुमारे ५०० ते ६०० खेळाडू या संकुलाचा लाभ घेत आहेत.

🏃 तालुका क्रीडा संकुलांतून ग्रामीण खेळाडूंना संधी

तिरोडा, सालेकसा, गोंदिया (कामठा), देवरी, गोरेगाव, आमगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथे तालुका क्रीडा संकुले कार्यान्वित झाली आहेत.

या संकुलांमध्ये २०० मीटर धावनपथ, मल्टिपर्पज इनडोअर बॅडमिंटन हॉल, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल व व्हॉलीबॉलची मैदाने उपलब्ध आहेत. कार्यालयीन इमारती, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि संरक्षण भिंतीची पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून खेळाडू नियमितपणे सराव करत आहेत.

🔧 दुसऱ्या टप्प्यात सुविधांचे आधुनिकीकरण

क्रीडा संकुलांमध्ये दुसऱ्या टप्प्यात विविध विकासकामे सुरू आहेत. यात धावनपथाचे अपग्रेडेशन, सिंथेटिक व्हॉलीबॉल कोर्ट, जिम हॉल, बॅडमिंटन हॉल व प्रसाधनगृहांचे आधुनिकीकरण, चेनलिंक फेन्सिंग, सोलर सिस्टीम, विद्युतीकरण, हायमास्ट दिवे, अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यांचा समावेश आहे.

ही कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

🏹 तिरोड्यात आर्चरी-कराटे, सालेकसात कबड्डी-खो-खोचे प्रशिक्षण

तिरोडा येथे आर्चरी व कराटे, तर सालेकसा येथे कबड्डी व खो-खो या खेळांचे नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना त्यांच्या गावाजवळच दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

अर्जुनी मोरगाव येथील तालुका क्रीडा संकुलात मल्टिपर्पज गेम हॉल, २०० मीटर धावनपथ, संरक्षण भिंत तसेच कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल कोर्टची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, संबंधित जागेबाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने पुढील विकासकामे सध्या स्थगित आहेत.

⏰ सकाळ-संध्याकाळ नियमित प्रशिक्षण

जिल्ह्यातील क्रीडा संकुलांमध्ये सकाळी ६.३० ते ८ आणि सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत प्रशिक्षित क्रीडा मार्गदर्शकांमार्फत व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कराटे आणि आर्चरीचे नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात शेकडो मुले-मुली उत्साहाने सहभागी होत आहेत.

🥇 राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये गोंदियाची चमक

गोंदिया जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असून आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत आहेत. उपलब्ध क्रीडा सुविधा आणि नियमित प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नागरिकांनी क्रीडा संकुलांना भेट देऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, तसेच "क्रीडा हीच जीवनशैली" हा संदेश समाजात रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.


🌟 क्रीडा संकुले : ग्रामीण प्रतिभेला नवी दिशा!

गोंदियातील क्रीडा संकुले ही केवळ खेळाची मैदाने नसून ग्रामीण भागातील युवा प्रतिभेला घडविणारी आधुनिक प्रशिक्षण केंद्रे आहेत. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर केल्यास गोंदियातील खेळाडू भविष्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करू शकतात.

खेळा • घडवा • जिंका!
"क्रीडा हीच जीवनशैली" 🏆

#Hashtags

#राष्ट्रीयक्रीडादिन #गोंदिया #क्रीडासंकुल #क्रीडामहोत्सव #ग्रामीणखेळाडू #क्रीडासंस्कृती #SportsDay #Gondia #Sports #खेळाडी #क्रीडाहीचजीवनशैली

पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचा लाभ घेऊन पिकांचे संरक्षण करावे

 


गोंदिया, दि.27 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव वेळेत ओळखून योग्य उपाययोजना करता याव्यात, यासाठी क्रॉपसॅप (CROPSAP)- पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत विविध पिकांमध्ये आढळणाऱ्या किडी व रोगांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणामधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पिकांवरील किडी व रोगांचा प्रादुर्भाव, त्याची तीव्रता आणि परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना योग्य वेळी पीक संरक्षणाचा सल्ला देण्यात येतो. शेतकऱ्यांसाठी क्रॉपसॅप प्रकल्पाचा उपयोग पिकांवरील किडी व रोगांची प्राथमिक अवस्थेत ओळख होण्यास मदत होते. किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करता येतात. कृषी विभागाकडून पिकाच्या परिस्थितीनुसार शास्त्रीय व तांत्रिक मार्गदर्शन मिळते. अनावश्यक कीटकनाशकांच्या फवारण्या टाळून आवश्यकतेनुसारच पीक संरक्षण उपाययोजना करता येतात. योग्य कीटकनाशक, योग्य मात्रा व योग्य वेळी फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन मिळते. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या (IPM) उपाययोजनांना प्रोत्साहन मिळते.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नियमित पाहणी करावी. पिकावर किडी किंवा रोगाची लक्षणे आढळल्यास सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप अंतर्गत देण्यात येणाऱ्या कीड-रोग व पीक संरक्षण विषयक सल्ल्याची माहिती नियमितपणे घ्यावी व त्यानुसारच उपाययोजना कराव्यात. पिकांची नियमित पाहणी करावी व कीड व रोगाची लक्षणे ओळखून कृषी विभागाचा सल्ला घ्यावा तसेच योग्य वेळी योग्य उपाययोजना करावे. सर्व शेतकरी बांधवांनी पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचा लाभ घेऊन पिकांचे प्रभावी पीक संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

                                                                               00000000