जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 15 September 2026

सिलिंग कायद्यान्वये वाटप केलेल्या भोगवटदार वर्ग-2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतरणाची संधी

 

गोंदिया, दि.15 : महसूल विभागामार्फत महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अर्थात सिलिंग कायद्यान्वये वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग-2 म्हणून वाटप करण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या दिनांक 4 मे 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार, अशा जमिनींचे विहित अधिमूल्य आकारून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वाटपानंतर ज्या जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत किंवा ज्या जमिनीच्या वापरामध्ये बदल करण्यात आलेला नाही, अशा जमिनींचे भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्यासाठी नगर परिषद व त्यांच्या सीमावर्ती क्षेत्रातील जमिनींसाठी वार्षिक दर विवरणपत्रानुसार (रेडी रेकनर) परिगणना केलेल्या जमिनीच्या मूल्याच्या 30 टक्के, तर नगर परिषद व त्यांच्या सीमावर्ती क्षेत्राबाहेरील जमिनींसाठी 25 टक्के अधिमूल्य आकारण्यात येईल.
तसेच, जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने वाटपानंतर हस्तांतरित करण्यात आलेल्या किंवा वापरात बदल करण्यात आलेल्या भोगवटदार वर्ग-2 जमिनींचेही विहित अधिमूल्य आकारून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरण करता येणार आहे. नगर परिषद व त्यांच्या सीमावर्ती क्षेत्रातील अशा जमिनींच्या शेती प्रयोजनासाठी वापराच्या बाबतीत 30 टक्के, तर औद्योगिक व इतर बिगरशेती प्रयोजनासाठी वापरलेल्या जमिनींसाठी 25 टक्के अधिमूल्य आकारण्यात येईल.
नगर परिषद व त्यांच्या सीमावर्ती क्षेत्राबाहेरील जमिनींच्या शेती प्रयोजनासाठी वापराच्या बाबतीत 25 टक्के, तर औद्योगिक व इतर बिगरशेती प्रयोजनासाठी वापरलेल्या जमिनींसाठी 20 टक्के अधिमूल्य आकारण्यात येईल.
या तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग-2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतरण करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपजिल्हाधिकारी (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे अर्ज सादर करावे. इच्छुक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मानसी पाटील यांनी केले आहे.
00000000

राष्ट्रीय लोकअदालतीत 17,585 प्रकरणांचा यशस्वी निपटारा

 

गोंदिया, दि.15 : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने व सामंजस्याने तातडीने निकाली काढण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार 12 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांच्या माध्यमातून तालुका न्यायालयांमध्येही लोकअदालत घेण्यात आली.

लोकअदालतीचे उद्घाटन एम.टी. असीम, जिल्हा न्यायाधीश-2,गोंदिया यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर त्यांनी लोकअदालतीचे फायदे व महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. एन.के. वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया तसेच एस. आर. बोरकर, अध्यक्ष, गोंदिया जिल्हा बार असोसिएशन यांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन केले.

17 हजारांहून अधिक प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली 5,563 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1,124 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून त्यामधून 5 कोटी 78 लाख 59 हजार 482 रुपये वसूल करण्यात आले. तसेच 71,568 पूर्वन्यायप्रविष्ट प्रकरणांपैकी 16,461 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यातून 2 कोटी 79 लाख 22 हजार 335 रुपये वसूल झाले. अशाप्रकारे 17,585 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमध्ये एकूण 8 कोटी 57 लाख 81 हजार 817 रुपयांची वसुली झाली.

विशेष ड्राईव्हमध्ये 167 फौजदारी प्रकरणे निकाली

विशेष ड्राईव्हअंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये एकूण 228 फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 167 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे संबंधित पक्षकारांना दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेतून होणारा मानसिक व आर्थिक त्रास कमी झाला. प्रकरणे तडजोडीने निकाली निघाल्याने अनेक पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.

लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे महावितरण, विद्युत, पाणी, दूरध्वनी तसेच बँक वसुलीशी संबंधित पूर्वन्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये पक्षकारांनी तडजोडीनुसार संबंधित विभागाकडे थकबाकीची रक्कम जमा केल्यानंतर त्यांची प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढण्यात आली. त्यामुळे संबंधित विभाग तसेच थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचण्यास मदत झाली.

दोन मोटार अपघात दाव्यांत 49 लाख 25 हजारांची नुकसानभरपाई

जिल्हा न्यायालय-1, गोंदिया येथे प्रलंबित असलेले दोन मोटार अपघात दावे राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने निकाली काढण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एम.डब्ल्यू. चांदवाणी यांच्या हस्ते तसेच आर.जी. वाघमारे, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांच्या उपस्थितीत अर्जदारांना नुकसानभरपाईच्या स्वरूपात 25 लाख रुपये व 24 लाख 25 हजार रुपये, असे एकूण 49 लाख 25 हजार रुपयांचे दोन धनादेश देण्यात आले. यावेळी एम.टी. असीम, जिल्हा न्यायाधीश-2, पॅनल क्रमांक 1 चे प्रमुख ए.सी. खुराणा, जिल्हा न्यायाधीश-4 तसेच एन.के. वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया उपस्थित होते.

दिव्यांग वरिष्ठ नागरिकाचे प्रकरण जागेवरच निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीदरम्यान एका वरिष्ठ नागरिकाचे मोटार अपघात प्राधिकरणातील प्रलंबित प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. संबंधित वरिष्ठ नागरिक वयस्कर व दिव्यांग असल्यामुळे त्यांना न्यायालयीन कक्षात येणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन पॅनल क्रमांक 1 चे अध्यक्ष ए.सी. खुराणा, जिल्हा न्यायाधीश-4 आणि सदस्य अॅड. चंदन वानखेडे यांनी न्यायालयाच्या आवारातील त्यांच्या वाहनाजवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संबंधित प्रकरण तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्यात आले. लोकअदालतीच्या माध्यमातून न्याय सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचविण्याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले.

समझोत्यातून वैवाहिक प्रकरणाचा सुखद शेवट

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया येथे दाखल करण्यात आलेल्या एका वैवाहिक पूर्वन्यायप्रविष्ट प्रकरणातही लोकअदालतीच्या माध्यमातून समझोता घडवून आणण्यात यश आले. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांच्या संमतीने प्रकरण निकाली काढण्यात आले आणि अर्जदार आपल्या मुलीसह सासरी नांदण्यासाठी गेली. त्यामुळे लोकअदालतीने केवळ कायदेशीर वादच मिटविले नाहीत, तर कौटुंबिक सलोखा प्रस्थापित करण्यासही हातभार लावला.

या राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने प्रकरणे तडजोडीने निकाली निघाल्याने नागरिकांचा वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचला असून, सुलभ व जलद न्याय देण्याच्या उद्देशाला जिल्ह्यात प्रभावी प्रतिसाद मिळाला आहे. सदर लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनाकरीता न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

00000000

Monday, 14 September 2026

आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू : गोंदिया जिल्ह्यातील 461 सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविले; अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 सप्टेंबर

 

गोंदिया, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विविध शासन निर्णयांनुसार गुणांकनावर आधारित निवड निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत तसेच नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्रां’करिता पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 व दिनांक 27 मार्च 2025, शासन शुध्दीपत्रक दिनांक 2 जून 2025 तसेच शासन निर्णय दिनांक 9 जुलै 2026 अन्वये गुणांकनावर आधारित एकूण 100 गुणांचे निवड निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात 455, तर नगर परिषद/नगरपंचायत क्षेत्रात 6, अशा एकूण 461 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
*ऑनलाइन अर्जाचे वेळापत्रक*
ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. प्राप्त ऑनलाइन अर्जांची माहिती 1 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्राप्त अर्जांवर आक्षेप असल्यास ते 5 ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू शाखेत लेखी स्वरूपात नोंदविता येतील. मुलाखतीस पात्र अर्जदारांची अंतिम यादी 12 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास 13 ते 16 ऑक्टोबर 2026 या कालावधीत मुलाखती घेण्यात येतील. निवड झालेल्या उमेदवारांची यादी 21 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
*अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना*
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा अर्जदार संबंधित भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रत्येक अर्जदारास केवळ एका आपले सरकार सेवा केंद्रासाठीच अर्ज करता येणार आहे.
शासनाच्या 9 जुलै 2026 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये स्वतंत्र बटण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
*अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करावे*
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. पात्र अर्जदारांनी गोंदिया जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ https://gondia.gov.in किंवा आपले सरकार सेवा केंद्र अर्ज संकेतस्थळ https://asskgondia.gov.in येथे भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावे.
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, शुल्क, वेळापत्रक, अटी व शर्ती, अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, निवड प्रक्रियेसाठी गुणांची विभागणी, रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांची क्षेत्रनिहाय यादी तसेच 9 जुलै 2026 रोजीचे शुध्दीपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळाव्यतिरिक्त ई-मेल, पोस्ट किंवा हार्ड कॉपीद्वारे (ऑफलाइन) प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही अथवा असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतु समितीचे सदस्य सचिव भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविले आहे.
0000000

गणेशोत्सवाची गोंदियातील परंपरा आता जगाच्या व्यासपीठावर

 


गोंदिया, दि.14 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या गणेशोत्सवाला आता राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, कलात्मक आणि लोकपरंपरागत वैभव जगासमोर प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर माहिती व जनसंवाद मोहीम राबविण्यात येणार आहे.

गणेशोत्सव म्हणजे केवळ सार्वजनिक मंडळांच्या भव्य सजावटी किंवा देखाव्यांचा उत्सव नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाशी आणि लोकसंस्कृतीशी घट्ट जोडलेली समृद्ध परंपरा आहे. घराघरातील गणपतीपासून ते अनेक पिढ्यांपासून जपल्या जाणाऱ्या कौटुंबिक परंपरा, स्थानिक गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक उपक्रमांपासून ते मूर्तिकला, हस्तकला, संगीत, नृत्य, लोककला आणि खाद्यपरंपरांपर्यंतचा हा सांस्कृतिक वारसा जगासमोर नेण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे.

गोंदियाच्या गणेशोत्सवातील ‘आपली’ ओळख जगासमोर आणण्याचे आवाहन

गोंदिया जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवांचा शोध घेऊन त्यांचे दस्तावेजीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच छोट्या मंडळांचे, घरगुती गणपतींचे तसेच अनेक वर्षांपासून परंपरेने साजरे होणाऱ्या गणेशोत्सवांचे संकलन केले जाणार आहे.

या अंतर्गत गणेशोत्सवाशी संबंधित ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि कलात्मक वैशिष्ट्यांची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ, मुलाखती तसेच नागरिकांच्या आठवणी आणि अनुभव संकलित केले जाणार आहेत. स्थानिक कलाकार, मूर्तिकार, कारागीर, हस्तकलावंत आणि लोककलाकार यांच्या योगदानालाही या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी मिळणार आहे.

एका क्लिकवर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

गणेशोत्सवाशी संबंधित संकलित माहिती ‘bappa.org’ या अधिकृत डिजिटल मंचाशी जोडण्यात येणार आहे. या माध्यमातून गोंदियासह राज्यातील विविध जिल्ह्यांच्या गणेशोत्सव परंपरांचा एक व्यापक आणि कायमस्वरूपी डिजिटल सांस्कृतिक दस्तावेज तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

आजच्या डिजिटल युगात स्थानिक परंपरेचे दस्तावेजीकरण ही केवळ प्रसिद्धीची बाब नसून पुढील पिढ्यांसाठी सांस्कृतिक वारसा जतन करण्याची संधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, गणेश मंडळे, कलाकार, कारागीर, सांस्कृतिक संस्था आणि गणेशभक्तांनी आपल्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ आणि आठवणी या मोहिमेशी जोडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोंदियाची संस्कृती, महाराष्ट्राचा अभिमान आणि जगासाठी सांस्कृतिक ठेवा

गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची एकात्मता, सामाजिक सहभाग, लोककला, उद्यमशीलता आणि सांस्कृतिक विविधता जगासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. युनेस्कोसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकने व गौरव प्राप्त करण्याच्या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेने जिल्ह्याच्या पातळीवरून होणारे हे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव, प्रत्येक कलाकाराची कला, प्रत्येक कुटुंबाची परंपरा आणि प्रत्येक नागरिकाच्या आठवणीतला ‘बाप्पा’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या अनोख्या परंपरांना जगाच्या व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक स्थापना झालेल्या गणेशोत्सवांना जिल्हा माहिती कार्यालयाकडून आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या गणेशोत्सवाची वैशिष्टपूर्ण माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक- DioGondia, इंस्टाग्राम- diogondia, ट्विटर- @InfoGondia, युट्यूब- DIO GONDIA, ब्लॉग- DIO Gondia या सामाजिक माध्यमांवर टॅग करावे व diogondianews@gmail.com यावर सुध्दा गणेशोत्सवाच्या बातम्या पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज : ध्वनी प्रदुषण झाल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश

 


गोंदिया, दि. 14 : जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. सार्वजनिक गणपती मंडळे, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषण नियंत्रणाकरीता पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

वर्ष २०२६ मध्ये ७०० सार्वजनिक गणपती मंडळे, ४४५ ‘एक गाव एक गणपती’ आणि ५ हजार ९५० खाजगी गणपतींची स्थापना होण्याची संभाव्यता आहे. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध माहितीनुसार, यंदा सार्वजनिक गणपती मंडळांच्या संख्येत चारने, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमातील गणपतींच्या संख्येत पाचने, तर खाजगी गणपतींच्या संख्येत २० ने वाढ होण्याचा अंदाज आहे.
गणेशोत्सव काळात पर्यावरण संरक्षण कायदा सन 1986 व ध्वनी प्रदुषण अधिनियम 2000 च्या तरतुदीनुसार औद्योगिक परिक्षेत्रात 75 डेसिबल, रहिवासी वस्तींमध्ये 65 डेसिबल आणि सार्वजनिक रुग्णालयाच्या परिसरात 55 डेसिबल पेक्षा अधिक ध्वनी नसावा. या नियमांचे पालन न केल्यास पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
यासोबतच ज्या-ज्या भागात आवाजाविषयी दिलेल्या नियमाप्रमाणे डि.जे.चा आवाज असणे अत्यावश्यक आहे. परंतु या पलीकडे आवाजात वाढ झाल्यास तात्काळ संबंधित मंडळ व डि.जे. चालक-मालक यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. डि.जे.च्या कर्कश आवाजाणे लोकांच्या जीवनशैलीवर परिणाम होणार नाही तसेच गणेश उत्सव रॅली दरम्यान लेझर लाईट, मिड मिक्सर व मिक्सर लाईटचा वापर होणार नाही याबाबतही कडक निर्देश देण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवाच्या कालावधीत विविध ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुका आयोजित करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक शांतता यांना प्राधान्य देत पोलीस व प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
सार्वजनिक गणपती मंडळांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करावे. मंडळांनी ध्वनिक्षेपकाचा वापर, मिरवणुका, वाहतूक, मंडप व्यवस्था, विद्युत सुरक्षेसह इतर आवश्यक बाबींची काळजी घ्यावी. तसेच ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देत उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अफवा, आक्षेपार्ह संदेश अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतीही अनुचित घटना किंवा संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित पोलीस यंत्रणेला माहिती द्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणास अनुकूल गणेशमूर्तींचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जनस्थळांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून शांतता, सुरक्षितता व सामाजिक सलोखा कायम राखत उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन पोलीस व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000000

Thursday, 10 September 2026

गणेश विसर्जन दरम्यान महत्वाच्या ठिकाणी बॅरिकेट्स व विद्युतची व्यवस्था करावी


गोंदिया, दि.10 : जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. स्थापित सार्वजनिक तसेच खाजगी गणेश मुर्ती विसर्जन पाचवा दिवस 18 सप्टेंबर, सातवा दिवस 20 सप्टेंबर, आठवा दिवस 21 सप्टेंबर, नववा दिवस 22 सप्टेंबर, दहावा दिवस 23 सप्टेंबर तसेच अनंत चतुर्थी दिवस 25 सप्टेंबर या दिवशी मोठ्या संख्येने गणेश मुर्तीचे विसर्जन होणार आहे.

गोंदिया शहरातील छोटा गोंदिया तलाव, भिमघाट पांगोली नदी, पिंडकेपार नाला, सरकारी तलाव (रेल्वे), मुर्री तलाव. गोंदिया ग्रामीण खमारी तलाव, टेमणी घाट (पांगोली नदी). रामनगर भागातील बांधतलाव सुर्याटोला, हिवरा गाव तलाव, टेमनी नदी घाट. रावणवाडी क्षेत्रातील कोरणी रजेगाव नदी घाट. आमगाव भागातील संत तुकडोजी तलाव, गायत्री मंदिर तलाव, बाघ नदी घाट. गोरेगाव क्षेत्रातील पवन तलाव, पांगोली नदी घाट. सालेकसा भागातील रोंढा नाला, साखरीटोला गाव नाला. देवरी क्षेत्रातील धुकेश्वरी मंदिर तलाव-गाव तलाव. डुग्गीपार भागातील चुलबंद नदी घाट-गाव तलाव. अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील महागाव तलाव, अर्जुनी मोरगाव-गाव तलाव. नवेगावबांध क्षेत्रातील नवेगावबांध तलाव. तिरोडा भागातील शिंगाडा तलाव, काशीघाट (गराडाटोला), खामतलाव, गिरजाबाई शाळेजवळील तलाव. गंगाझरी क्षेत्रातील कवलेवाडा, पांगळी, मुंडीपार, एकोडी तलाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची तसेच लहान मुलांची गर्दी होण्याची शक्यता असून विसर्जन सायंकाळी व रात्रीचे वेळी होत असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी विद्युत प्रकाशाची व बॅरिकेट्सची व्यवस्था करण्यात यावी. तसेच बोधचिन्ह, सूचना फलक सुध्दा लावण्यात यावे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही व क्रेनची व्यवस्था करण्यात यावी. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविले आहे.

0000000

गोंदिया जिल्ह्याला अधिक 461 ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मिळणार

 


गोंदिया, दि.10 : गोंदिया जिल्ह्याला अधिक 461 ‘आपले सरकार सेवा केंद्र' येत्या काळात मिळणार. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविलेल्या पत्रकानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या १९ जानेवारी २०१८, २७ मार्च २०२५, २ जून २०२६ आणि ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयांच्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहेत.

जिल्ह्यात दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या सेवा केंद्रांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या केंद्रांचे वाटप झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यासोबतच, नवीन ४६१ सेवा केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले असून, शासनाच्या नियमानुसार पुढील निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

0000000