जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 4 September 2026

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

 






मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा योगदानाचे स्मरण; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार

गोंदिया, दि.4 : भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया व एकविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 ऑगस्टदरम्यान विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम 29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उत्साहात पार पडला. जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर हॉकीचे जादूगार व महान क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय हॉकीला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून देण्यात मेजर ध्यानचंद यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या क्रीडा कारकिर्दीची व ऑलिम्पिकमधील उल्लेखनीय कामगिरीची माहिती उपस्थित खेळाडूंना यावेळी देण्यात आली.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी पूजा श्रीवास, क्रीडा अधिकारी राहुल देशमुख, विविध एकविध क्रीडा संघटनांचे प्रशिक्षक व पदाधिकारी तसेच विविध खेळांचे प्रशिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षकांनी खेळाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासह व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व विशद केले. तसेच खेळाडूंनी योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित सराव याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास खेलो इंडिया, मिशन लक्ष्यवेध तसेच नेटबॉलचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार, क्रीडा प्रतिज्ञा, पारंपरिक खेळ, सायकल रॅली आदी विविध उपक्रम घेण्यात आले.
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविणाऱ्या युकांत उके, दक्ष ठाकरे, खुशी हलमारे, रोहित शरणागत आणि एविना चौरागडे या खेळाडूंना शिष्यवृत्तीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुराज गायकवाड यांनी केले, तर अंकुश गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

‘प्रशस्त 2.0’ प्रणालीचे मार्गदर्शक व्हिडिओ आता मराठीत उपलब्ध


दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्राथमिक तपासणीसाठी शिक्षकांचे सक्षमीकरण
गोंदिया, दि.4 : दिव्यांग विद्यार्थ्यांची लवकर ओळख पटवून त्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य मिळावे, यासाठी भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने विकसित केलेली ‘प्रशस्त 2.0’ प्रणाली शिक्षकांसाठी उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाच्या 21 प्रकारांची प्राथमिक तपासणी करण्यास मदत होते.
यापूर्वी या प्रणालीचे मार्गदर्शक व्हिडिओ हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध होते. आता मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओ महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे प्रणालीचा वापर अधिक सुलभ व प्रभावी होणार आहे.
‘प्रशस्त 2.0’ प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे निरीक्षण, प्राथमिक माहिती संकलन, माहितीची पडताळणी, अहवाल निर्मिती आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा देण्याची प्रक्रिया समजून घेता येते. ही प्रणाली केवळ प्राथमिक तपासणीसाठी असून, त्याद्वारे अधिकृत दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय निदान केले जात नाही.
दिव्यांग विद्यार्थ्यांची वेळेवर ओळख. योग्य संदर्भ सेवा आणि आवश्यक शैक्षणिक सहाय्य यामुळे समावेशित शिक्षण अधिक प्रभावी करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओ हा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी ‘प्रशस्त 2.0’ प्रणालीचा वापर अधिक सुलभ, परिणामकारक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
महाराष्ट्रातील 1,08,096 शाळांमधील 7,27,181 शिक्षकांपैकी 5,22,100 शिक्षकांनी (71.79%) मार्गदर्शक व्हिडिओच्या माध्यमातून ‘प्रशस्त 2.0’ प्रणालीची माहिती घेतली आहे. उर्वरित मुख्याध्यापक व शिक्षकांनी मराठी मार्गदर्शक व्हिडिओंचा उपयोग करून प्रणालीची माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे संवेदनशीलपणे निरीक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000000

भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा

 


शिक्षण, कौशल्य विकासातून समाजाच्या प्रगतीला चालना देण्याचे आवाहन
गोंदिया, दि.4 : सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या वतीने पंचायत समिती सभागृह, गोंदिया येथे 31 ऑगस्ट रोजी भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या सविता पुराम होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रूपेशकुमार राऊत व सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रणिता कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी केले.
शिक्षणासोबत कौशल्य विकास व पुनर्कौशल्य विकासावर भर देऊन भटके-विमुक्त समाजाच्या प्रगतीला चालना देणे आवश्यक आहे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण तसेच उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सविता पुराम यांनी भटके-विमुक्त समाजाच्या स्थिर निवास, शिक्षण, आरोग्य, रोजगार व आवश्यक कागदपत्रांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी शासन व समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चित्र व भिंतीचित्रक प्रदर्शनी, व्याख्यान, वैद्यकीय तपासणी शिबीर तसेच गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रोहिणी गोपे, बैजेस्वरी मेश्राम, निलेश मेश्राम, अर्मन कोल्हे, सुमित नागपुरे, भावेश बावणे, तनुश्री मानकर, वेद दानवे तसेच एम.टेक. पदवी प्राप्त नेहा राठोड यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास भटके-विमुक्त समाजातील पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुश अतकरे, देवदास बनकर, महेश चौधरी, आत्माराम खंडाते, भोलेश्वर वाढई, आयुष पुस्तोडे, रजत कुंभरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नितीन साळुंखे यांनी मानले.
00000000

Thursday, 3 September 2026

जिल्ह्यात 6 ते 20 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

 

                                                                                                                     गोंदिया, दि.4 : जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच 10 सप्टेंबर रोजी पोळा, 11 सप्टेंबरला मारबत व 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 6 सप्टेंबर पासून ते 20 सप्टेंबर 2026 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.                        

000000000


शासकीय वसतिगृह प्रवेशाकरीता 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

गोंदिया, दि.4 : शैक्षणिक सत्र 2026-२27 करिता इतर मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रीया सुरु झालेली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज भरण्यात यावा. मेरीट लिस्ट प्रमाणे वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ मिळाला नाही, त्या विद्यार्थ्यांचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेमध्ये रुपांतरीत करण्यात येईल.
शासनाच्या https://hmasnew.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर 12 वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह प्रवेशाकरीता दि.15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृह अथवा इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात विहीत मुदतीत सादर करावी.
गोंदिया जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, दिव्यांग, अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या विद्यार्थ्यांनी वसतिगृह तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीकरीता ओबीसी मुला-मुलींचे वसतिगृह, गोंदिया येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गोंदिया या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी केले आहे.
0000000

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अन्नधान्य पोहोचले पाहिजे - राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

 








गोंदिया, दि.3 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना नियमित, पारदर्शक व वेळेत मिळणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अन्नधान्य पोहोचले पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले.

राज्य अन्य आयोग बुधवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी राज्य अन्य आयोगाचे सदस्य ईश्वर बाळबुधे, सह सचिव अशोक आत्राम, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी श्री. ढवळे यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय अन्नधान्य वितरण व्यवस्था, शिधापत्रिकाधारकांना मिळणारे धान्य, रास्त भाव दुकानदारांचे कामकाज तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारी, शालेय पोषण आहार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मातृवंदना योजना, बाल विकास केंद्र व कुपोषण आदींबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013, हा देशातील नागरिकांना कमी दरात आणि दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन शासनाच्या विविध योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे अन्नधान्य योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्नधान्य वितरणामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये, यासाठी नियमित तपासणी करावी. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रभावी देखरेख ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.     

रास्त भाव दुकानांमध्ये लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दुकानांच्या कामकाजात पारदर्शकता ठेवावी. अन्नधान्य वितरणाबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे. पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आंगणवाडी, रास्तभाव दुकाने व शालेय पोषण आहार यामध्ये संबंधित यंत्रणांकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत याबाबत दर्शनी भागात फलक लावण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अडचणी, लाभार्थ्यांच्या समस्या आणि तक्रारी याबाबत स्थानिक पातळीवर आवश्यक कार्यवाही करून शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासन, रास्त भाव दुकानदार आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोंदिया जिल्ह्यात एकूण 999 रास्तभाव दुकाने असून 3 लाख 8 हजार 215 शिधापत्रिकाधारक आहेत. अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी जिल्ह्यात 10 गोडाऊन आहेत. जिल्ह्यात आधार सीडींग 100% पूर्ण झालेली आहे, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.

यावेळी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अंत्योदय अन्न योजनेंतर्गत 12 लाभार्थ्यांना आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत 02 लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पवन खंदारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षक उपस्थित होते.

                                                      00000000


Wednesday, 2 September 2026

स्वातंत्र्य लढ्यात स्व.सुखदेव अग्रवाल यांचे महत्वपूर्ण योगदान - पालकमंत्री इंद्रनील नाईक


 




गोंदिया, दि.2 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग, संघर्ष आणि बलिदान दिले. गोंदिया येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांनीही स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून नव्या पिढीने देशसेवेची प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

स्वातंत्र्य संग्राम सेनानी (माजी आमदार) स्व. सुखदेव अग्रवाल यांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमित्त आज श्री गुरुनानक स्कुल ग्राऊंड, गोंदिया येथे आयोजित समारंभात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष सचिन शेंडे, सर्वश्री माजी आमदार गोपालदास अग्रवाल, हेमंत पटले, केशव मानकर, गिरीष व्यास, तसेच माजी नगराध्यक्ष दामोधर अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, कमलकिशोर अग्रवाल मंचावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. नाईक म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होताना स्व. सुखदेव अग्रवाल यांनी देशाच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या त्यागामुळे आणि संघर्षामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले. अशा स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या स्मृती जपणे ही समाजाची जबाबदारी आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांच्या कार्यातून देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी, जेणेकरुन नवीन पिढीला याची माहिती होईल व त्यापासून त्यांना प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

खासदार श्री. जैन म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांचे योगदान हे गोंदिया जिल्ह्याच्या आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, स्व. सुखदेव अग्रवाल यांचे जीवनकार्य भावी पिढीला देशहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जीवनकार्यातून देशभक्ती, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार प्रफुल पटेल यांचा संदेश एैकविण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गोंदिया येथील स्व. सुखदेव अग्रवाल यांचे योगदान मोलाचे आहे, असा संदेश त्यांनी दिला.

यावेळी नगराध्यक्ष सचिन शेंडे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल व गिरीष व्यास, कमलकिशोर अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी एस. एस. अग्रवाल मुन्सीपल गर्ल्स हायस्कुल, गोंदिया येथे उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांच्या स्मरनार्थ गोंदिया जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांच्या परिवारातील व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन अपुर्व अग्रवाल यांनी केले.

                                                      0000000