जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 24 July 2026

डायटचे प्राचार्य व शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांचा शोध

 




गोंदिया, दि.24 : शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य यांचे 29 मे 2026 चे पत्रान्वये शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 15 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये 3 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण राबविण्याचे ठरविले असून त्याबाबतची SOP ची प्रत व माहिती संकलनाचे formats प्राप्त झालेले आहे. हे महत्वपूर्ण सामाजिक काम शासनाच्या संबंधित सर्व विभागाचा सहभागाने करण्याबाबत निर्देश आहेत. सर्व संबंधित विभागातील सर्व ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरावरील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात मदत करण्याबाबत आदेशित करण्याबाबत संदर्भिय पत्रान्वये निर्देश आहेत. या महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे सर्वेक्षण राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

तालुक्यातील सर्व विभागाच्या ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरावरील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात सर्वतोपरी मदत करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. तसेच ज्या काही योजना व इतरही काही सुविधा विभागांकडून सदर बालकांना उपलब्ध करून देणे शक्य होईल त्या उपलब्ध करुन द्याव्यात, जेणेकरुन सदर सर्वेक्षणाचे काम फलदायी होईल. विशेषतः शहरी भागात भिक मागणारे, भटके कुटुंबातील बालके आढळतात, अशा बालकांचे सर्वेक्षणाकरीता नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देऊन अशा बालकांचा शोध घेण्याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश आहेत.

सर्वेक्षण दि.24 जुलै 2026 रोजी शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांचा शोध घेण्याकरीता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) पवन खंदारे, जिल्हा समन्वयक बालरक्षक कुलदीपिका बोरकर, विषय साधन व्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी अण्णाभाऊ साठे नगर (कुडवा) व गोंडीटोला कटंगी, ता. गोदिया येथे प्रत्यक्षात जाऊन भेट दिली.    

अण्णाभाऊ साठे नगर (कुड्या) व गोंडीटोला कटंगी या वस्तीतील कुटुंब प्रमुख, महिला, किशोरवयीन मुली, मुले, वरिष्ठ नागरीक व 3 ते 18 वयोगटातील बालके या सर्वांसोबत डायटचे प्राचार्य तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जे मुले वस्तीत आढळली त्यांना शाळेत नियमित जाण्याबाबत विनंती करण्यात आली. काही मुला-मुलींना सायकलची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. करीता सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, ज्यांच्या चांगल्या सायकल घरी आहेत, ज्या वापरात नाही त्यांनी सदर मुलांसाठी द्याव्या असे आवाहन डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे व शिक्षणाधिकारी (प्राथ.) पवन खंदारे यानी केले आहे.

शासनाच्या ज्या सुविधांचा लाभ देणे शक्य होईल त्या सुविधा योजना सदर बालकांपर्यंत पोहचविण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी वस्ती प्रमुखांना सांगितले. सविता बेदरकर यांनी संपूर्ण वस्तीतील पालकांशी संवाद घडवून आणला, तेथील समस्यांबाबत माहिती दिली. तेथील स्थानिक अंगणवाडीमध्ये सुध्दा भेट देण्यात आली.

अण्णाभाऊ साठे नगर (कुडवा) व गोंडीटोला कटंगी या दोन्ही वस्तीतील प्रमुखांना विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आलेली आहे, जेणेकरुन आवश्यक त्या सुविधा बालकांपर्यंत पुरविणे शक्य होईल. सदर वस्तीमध्ये प्रत्यक्ष भेटी दरम्यान जवळपास 20 ते 25 विद्यार्थी अनियमित असल्याचे निदर्शनास आले. सदर सर्व विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठविण्याबाबत पालकाचे समुपदेशन करण्यात आले.

                                                   00000000

कर्जमुक्ती योजनेचा लाभ लवकरच; बँकांनी डाटा अपलोड करून ‘झिरो प्रलंबितता’ साध्य करावी : जिल्हाधिकारी मंदार पत्की

 


गोंदिया, दि.24 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार असून, त्यासाठी सर्व संबंधित बँकांनी शेतकऱ्यांचा प्रलंबित डाटा तातडीने पोर्टलवर अपलोड करून ‘झिरो प्रलंबितता’ साध्य करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले. कामात कुठलाही कामचुकारपणा झाल्यास कारवाईचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, राज्यात असणाऱ्या महत्त्वाच्या बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या सर्व पतसंस्था व बँकांनी अद्यापपर्यंत अपलोड न केलेला शेतकऱ्यांचा डाटा तात्काळ अपलोड करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार 994 पात्र प्रकरणे (Eligible Cases) असून, त्यापैकी 29 हजार 838 प्रकरणांची माहिती बँकांच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणेही तत्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना योजनेंतर्गत लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, आत्माचे प्रकल्प संचालक अजित आडसुळे, जिल्हा उपनिबंधक योगेश भाकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे कौशल तिराळे तसेच सर्व राष्ट्रीयकृत व राज्यातील बँकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                     0000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : अंमलबजावणीला वेग

 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : अंमलबजावणीला वेग

          गोंदिया, दि.24 : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्हास्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये योजनेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था योगेश भाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, आत्माचे प्रकल्प संचालक अजित आडसुळे, अग्रणी बँकेचे एलडीएम तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्तीय बँकेमार्फत जिल्ह्यातील एकूण २१,०२० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २०,९१५ खात्यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बैठकीत योजनेअंतर्गत अपात्र ठरणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला. त्यानुसार नगरपालिका व नगरपंचायतीतील सदस्य व कर्मचाऱ्यांची तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तसेच आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांची यादी जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया गतीमान करण्यात येणार आहे.

अॅग्रीस्टॅक (Agristack) अंतर्गत नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मेळावे आयोजित करण्यात येणार असून यासाठी कृषी, महसूल व सहकार विभागाच्या समन्वयातून व्यापक प्रसिद्धी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी ‘आपले सरकार’ केंद्र व CSC केंद्रामार्फत विशेष प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

योजनेअंतर्गत तक्रार निवारण यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असून शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज तपशील किंवा आधार माहितीसंदर्भात तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले की, “शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यासच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, बँक खाते लिंकिंग आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी.”

00000000

3000 वृक्षारोपण मोहिमेला गती : श्रीराम समिती सदस्यांचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सन्मान

 





3000 वृक्षारोपण मोहिमेला गती : श्रीराम समिती सदस्यांचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सन्मान

गोंदिया, दि. 24 : नवीन प्रशासकीय इमारत परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्रीराम वृक्षारोपण आयोजन समितीच्या सदस्यांचा उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

नवीन प्रशासकीय इमारतीतील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी तहसीलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक कैलाश गजभिये यांच्यासह समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर अग्रवाल, महामंत्री सुजित अग्रवाल, सचिव अपूर्व अग्रवाल उपस्थित होते.

श्रीराम वृक्षारोपण आयोजन समितीने हाती घेतलेली 3000 वृक्ष लागवडीची मोहिम ही पर्यावरण रक्षणासाठी एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून, त्याची सुरुवात नवीन प्रशासकीय इमारत परिसरातून करण्यात आली आहे.

उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

कौशल्य विकासाला गती; महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने स्किल सेंटर उभारणीचा निर्णय

 



गोंदिया, दि.24 : जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने स्किल सेंटर उभारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे आणि संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना व्यवस्थापक लेवीस डॉन यांनी माहिती देत सांगितले की, येत्या काळात हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून येथे ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक प्रशिक्षण दिले जाईल. या माध्यमातून जिल्ह्यात कुशल प्रशिक्षणार्थी तयार होऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र उमेदवारांना महिंद्रा कंपनीत नोकरीची संधीही दिली जाणार आहे.

महिंद्रा कंपनीसोबत होणाऱ्या कराराअंतर्गत दरवर्षी 120 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार असून हा करार तीन वर्षांसाठी असणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थींना आवश्यक सोयी-सुविधा शासकीय तंत्रनिकेतन येथे उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

तसेच, बैठकीत इन्क्युबेशन व बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरच्या कार्यप्रणाली, उद्दिष्टे, उपलब्ध सुविधा व भावी उपक्रमांबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार असून, जिल्ह्यातील 59 महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 90 मिनिटांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय, आत्मसमर्पित नक्षलवादी तसेच नक्षलपीडित व्यक्तींना नव साक्षर योजना अंतर्गत साक्षर करून कौशल्य विकासाद्वारे त्यांचे पुनर्वसन करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीत जिल्ह्याच्या कौशल्य विकास आराखड्यावर चर्चा करून सन 2026-27 साठी किमान कौशल्य विकास कार्यक्रमास मंजुरी देण्यात आली.

या सर्व उपक्रमांमुळे गोंदिया जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन कौशल्य विकासाच्या क्षेत्रात जिल्हा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

                                                       0000000

‘थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन 2026’ निमित्त राज्यस्तरीय स्पर्धा

 


गोंदिया, 24: राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि इतिहासाची जाणीव नव्या पिढीत रुजविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या वतीने राज्यस्तरीय 'थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन 2026'  राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे

या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांपासून युवक, शिक्षक, साहित्यप्रेमी, कलाकार आणि इतिहास अभ्यासकांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्पर्धांमध्ये निबंध, वक्तृत्व, रील (Reel) निर्मिती, काव्यलेखन आणि नाट्यसंहिता लेखन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांचे विषय थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्य, पराक्रम, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा याभोवती केंद्रित असणार आहेत.

स्पर्धेसाठी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशिका व साहित्य सादर करता येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर ‘पराक्रम दिन’ साजरा केला जाणार असून, 27 ऑगस्ट 2026 (रक्षाबंधन) रोजी राज्यस्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

अमृतच्या गोंदिया जिल्हा कार्यालयामार्फत सर्व विद्यार्थी, युवक-युवती, शिक्षक आणि इतिहासप्रेमींना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून नव्या पिढीमध्ये प्रेरणादायी इतिहासाची जाणीव आणि राष्ट्रप्रेम जागविणारी एक महत्त्वाची चळवळ ठरणार आहे.

0000000

"माय भारत” नोंदणी अभियानाला गती द्या : जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे निर्देश

 


            गोंदिया, दि.24 : मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील युवकांच्या सहभागाला चालना देण्यासाठी जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेत पार पडली.

मेरा युवा भारत गोंदिया यांच्या जिल्हा सल्लागार समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी व संबंधित सदस्य उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सौरभ निषाद, उपसंचालक, मेरा युवा भारत गोंदिया यांनी माय भारतच्या वार्षिक कार्ययोजनेची सविस्तर माहिती सादर केली. त्यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध युवक-केंद्रित उपक्रमांची माहिती देत, या माध्यमातून युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी माय भारत पोर्टलवर सुरू असलेल्या नोंदणी अभियानाचा विशेष आढावा घेण्यात आला. 15 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अभियानात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामस्तरावर विशेष प्रयत्न करून युवकांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले.

युवकांना संधी, मार्गदर्शन आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माय भारत उपक्रम महत्त्वाचा ठरत असून, जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000000