जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 15 July 2026

खैरबोडीत श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्याच्या शेतात मार्गदर्शन

 



          गोंदिया, दि.15 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत तिरोडा तालुक्यातील मौजा खैरबोडी येथे आज श्री पद्धतीवर आधारित भात पीक लागवडीचे प्रात्यक्षिक मोठ्या उत्साहात पार पडले.

          तिरोडा तालुक्यातील खैरबोडी येथील शेतकरी युवराज हिरामण टेंभरे यांच्या शेतावर घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकात श्री पद्धतीने भात रोपांची लागवड करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी तिरोडा पवन मेश्राम, उप कृषी अधिकारी तिरोडा बाबासाहेब शिंदे, खैरबोडीचे उपसरपंच महेश ठाकरे व सहाय्यक कृषी अधिकारी जी. एन. आबाळे उपस्थित होते.

         श्री पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा 50% कमी बियाणे, 40% कमी पाणी आणि 30% पर्यंत जास्त उत्पादन मिळते, असे मार्गदर्शन यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी केले. तसेच कमी मजुरी, कमी खत आणि कमी किड-रोगाचा प्रादुर्भाव यामुळे खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो असे सांगण्यात आले.

         कार्यक्रमात एकात्मिक किड व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गावातील अनेक शेतकरी या प्रात्यक्षिकाला उपस्थित होते आणि त्यांनी श्री पद्धतीबद्दल उत्सुकता दाखवली.

         कृषी विभागातर्फे अशाप्रकारचे प्रात्यक्षिक तालुक्यातील इतर गावांमध्येही राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी पवन मेश्राम यांनी दिली.

                                                               0000000

जी.ई.एस.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत किटकजन्य व जलजन्य आजारावर जनजागृती कार्यशाळा

 



           गोंदिया, दि.15 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात पावसाळ्यात किटकजन्य व जलजन्य आजाराबाबरात जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक जुलै महिना अनुषंगाने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व आश्रमशाळेत आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दि.14 जुलै 2026 रोजी गोरेगाव तालुक्यातील जी.ई.एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत किटकजन्य व जलजन्य आजारावर मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

किटकशास्त्रज्ञ सुभाष बिसेन यांनी गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा अंतर्गत जी.ई.एस.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना बॅनरच्या माध्यमातुन डासांचे प्रकार व त्यापासुन होणारे आजार, त्यांचे लक्षणे आणि डासांचे जीवनचक्र अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना अ‍ॅनोफिलीस मादी, एडीस आणि क्युलेक्स इत्यादी किटक ओळखण्यासंबंधी माहिती देण्यात आली. हिवताप आजाराबाबत्त डासांचे जीवनचक्र, पाण्यात डासांची होणारी वाढ, डासामध्ये प्लासमोडीयम जंतुची वाढ व हिवताप जंतु भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढळणारे बदल, किटकशास्त्रीय सर्वेक्षण, हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत विस्तृत माहिती उपस्थितांना देण्यात आली.

            सदर कार्यक्रमात गोरेगाव तालुका किटकशास्त्रज्ञ सुभाष बिसेन यांनी संसर्गजन्य रोग तसेच किटकजन्य आजार यांचा प्रसार व प्रतिबंधात्मक उपाययोजना व लोकसहकार्याची गरज यावर प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवुन त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.

            आरोग्य शिक्षण कार्यक्रम उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य वी.बी.भिवगडे, केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य निरिक्षक, आरोग्य सहाय्यक महेश वाघमारे, सामुदायिक आरोग्य अधिकारी हरिणखेडे, आरोग्य सेवक रामटेके, आरोग्य सेविका व आशा सेविका उपस्थित होते.

0000000

अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावात केली परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची पाहणी

 




गोंदिया, दि.15 : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने परिसस्पर्श कुष्ठरोग तपासणी व जनजागृती मोहीम हार्ट टु रिच, हाय रिस्क व्हिलेज सर्वेक्षण बाबत दि.13 जुलै 2026 रोजी जिल्हास्तरीय चमुने अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावात परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची पाहणी केली.

            राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.10 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यातील तीन अतिदुर्गम तालुक्यात "परीसस्पर्श कुष्ठरोग अभियान" राबविण्यात येत आहे. परीसस्पर्श कुष्ठरोग अभियातुन अतिजोखमीच्या व दुर्गम भागातील गावातील लोकांवर लक्ष ठेवुन तपासणी व जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हास्तरीय चमुत सहायक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय, जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे डॉ.मुकेश येरपुडे व अभिषेक भलाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांचा समावेश होता.

जिल्हास्तरीय चमुने तालुक्यातील सिरोली, महागाव व अर्जुनी गावातील घरोघरी प्रत्यक्ष भेटी देवुन लोकांशी संवाद साधला. कुष्ठरोग आजाराबाबत जनमानसात असलेले भ्रामक अंधश्रद्धा, गैरसमजुती बाबत माहिती घेवुन लोकांना कुष्ठरोग आजाराबाबत मार्गदर्शन केले. गावात सुरु असलेले सर्वेक्षण पथकातील कर्मचारी यांचेसोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. नंतर जिल्हास्तरीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे भेट देवुन मोहिमेची पडताळणी केली. तसेच अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जावुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे यांचेशी चर्चा करुन तालुकास्तरीय परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची माहिती घेतली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्नानुसार कुष्ठरोग मुक्त भारत अंतर्गत सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसार कमी करणे आहे. परीसस्पर्श कुष्ठरोग मोहिमेतुन संशयित कुष्ठरोग लक्षणे असलेले रुग्णांवर तपासणी करुन मोफत उपचार व समुपदेशन केले जाणार आहे. सदर मोहीम कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास कुठलेही लक्षण न लपवता खरी माहिती देवुन सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.महेंद्र धनविजय यांनी केले आहे.

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे हे परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाचा उद्देश असल्याची माहिती डॉ.महेंद्र धनविजय यांनी यावेळी दिली.

सदर भेटी दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार साखरे, तालुका आरोग्य सहायक सुरेश धुर्वे, पॅरा मेडिकल वर्कर विलास कारेवार, आरोग्य सहायक जे.एस.कत्तूरवार यांचेसह कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका उपस्थित होते.

                                                                     00000000

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 


गोंदिया, दि.15 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने अनुसूचित जातीतील मांग/मातंग व या समाजातील बारा पोट जातीतील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. जे विद्यार्थी-विद्यार्थीनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदवीका परीक्षामध्ये कमीत कमी 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्याथी-विद्यार्थीनींनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय गोंदिया येथे शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला, गुणपत्रिका, शाळेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, दोन फोटो, बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड, मोबाईल नंबर यासह दि.27 जुलै 2026 पर्यंत संपर्क साधून अर्ज सादर करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पतंगा मैदान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाने कळविले आहे.

                                                                   0000000

विशेष वृत्त... गोंदिया जिल्ह्यात मका पिकासाठी विशेष प्रकल्प; 42 हजार शेतकरी कुटुंबांना थेट लाभ

 


         गोंदिया, दि.15 : गोंदिया जिल्ह्यात मका पिकाच्या वाढीस चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, यामुळे ४२ हजार शेतकरी कुटुंबांना थेट लाभ होणार आहे. २०२५-२८ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

         या प्रकल्पाअंतर्गत सुमारे १६,८०० हेक्टर क्षेत्रावर मका लागवड वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ४० शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) यामध्ये सहभागी होणार आहेत. एकूण प्रकल्प खर्च सुमारे ₹३४०१.३९ लाख इतका असून त्यातील ८७ टक्के हिस्सा RKVY अंतर्गत उपलब्ध होणार आहे.

        प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पीक प्रात्यक्षिके, प्रशिक्षण सत्रे आणि शेती शाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. १६,८०० हेक्टरवर प्रात्यक्षिके घेतली जाणार असून २४ प्रशिक्षण सत्रे व ३१२ शेती शाळांद्वारे शेतकऱ्यांचे कौशल्यविकास होणार आहे.

        तसेच ४० FPOsना ८० टक्के अनुदानावर यंत्रसामग्री बँक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये रोटाव्हेटर, ट्रॅक्टर, मल्टीक्रॉप थ्रेशर, हॅपी सीडर यांसारख्या यंत्रांचा समावेश आहे. यामुळे शेती खर्च कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

        या प्रकल्पात मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यावरही भर देण्यात आला असून शेतकऱ्यांना हमीभाव व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांशी ‘बायबॅक’ करार करण्यात येणार आहे. देवरी येथील उद्योगाद्वारे इथेनॉल उत्पादनासाठी मक्याची खरेदी केली जाणार आहे.

        विशेष म्हणजे, भात पिकाच्या तुलनेत मका पिकासाठी कमी पाणी लागते. त्यामुळे पाण्याची सुमारे ५० टक्क्यांहून अधिक बचत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना भातापेक्षा अधिक नफा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

        एकूणच, हा प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मोठी चालना देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

                                                                                          00000000          

Tuesday, 14 July 2026

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविणाऱ्या जिल्ह्यातील आश्रम शाळेत होणार ‘आनापान’ शिबीर

 



       गोंदिया, दि.14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविणाऱ्या जिल्ह्यातील आश्रम शाळेत ‘आनापान’ शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभाग गोंदिया आणि विपशना केंद्र ओझाटोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 जुलै 2026 रोजी लक्ष्मणराव चंद्रिकापुरे माध्यमिक आश्रम शाळा घोटी येथे ‘आनापान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

         मुलांचा बौध्दिक विकास करणे, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे, त्यांची एकाग्रता वाढविणे, त्यांच्यावर चांगले संस्कार घडविणे, सुजान नागरिक घडविणे हा यामागाचा उद्देश आहे, असे विचार इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी व्यक्त केले.

         शिबिराची सुरुवात सकाळी 9 वाजता करण्यात आली व दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना मंगल शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तीचे श्वास व मनाची अवस्था व त्यातून होणारे फायदे याबद्दल विविध सत्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राहुल चंद्रिकापुरे, संतोष कुलकर्णी, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000

जिल्ह्यात 15 ते 30 जुलै दरम्यान शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांची विशेष शोध मोहीम; एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणार

 



         गोंदिया, दि.14 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम (RTE) २००९ नुसार वय वर्षे ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षण मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.29.06.2026 चे पत्रान्वये दि.१५ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात व्यापक स्तरावर विशेष शोध मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

         महिनाभर चालणाऱ्या मोहिमेचे संपूर्ण वेळापत्रक :

         जुलैचा पहिला आठवडा : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नियोजन, क्षेत्रकामाचा आराखडा निश्चिती आणि कामगार कार्यालयाकडून बालकामगारांची यादी प्राप्त करणे.

         १५ ते ३० जुलै २०२६ (प्रत्यक्ष सर्वेक्षण) : प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरोघरी आणि कार्यक्षेत्रात जाऊन सर्वेक्षण करणे व विहित प्रपत्रांमधील माहिती संकलित करणे.

         १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत : ग्रामीण व नागरी भागातून प्राप्त माहितीचे संकलन, पडताळणी करून शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्यामार्फत ती Excel मधील प्रपत्रांसह विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करणे.

         २० ऑगस्ट २०२६ पर्यंत : विभागीय शिक्षण उपसंचालकांद्वारे अंतिम पडताळणी करून संपूर्ण अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडे सादर करणे.

        ढोल-ताशांच्या गजरात दिंडी काढून होणार बालकांचा शोध : या मोहिमे अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सर्व खेडी, वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, शेतमळे व जंगलात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांच्या घरोघरी जाऊन प्रगणक सर्वेक्षण करतील. शाळाबाह्य बालकांचा शोध घेताना केवळ पारंपरिक पद्धत न वापरता ढोल-ताशांच्या गजरात दिंडी काढून आणि मेळावे आयोजित करून स्थानिक लोकप्रतिनिधी व पालकांच्या सहभागाने बालकांना वयानुरूप वर्गामध्ये दाखल केले जाईल.

         घरोघरी सर्वेक्षणासोबतच जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, सिग्नल्स, हॉटेल्स-खानावळी, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी, शेतमळे आणि महिला व बालविकास विभागांतर्गत येणारी बालगृहे व निरीक्षणगृहे या सर्व ठिकाणी ३ से १८ वयोगटातील मुलांचा कसून शोध घेतला जाणार आहे.

         माहिती संकलनासाठी 'अ, ब, क, ड' प्रपत्रांचा वापर : सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेली माहिती अचूक राहावी यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या विहित प्रपत्रांचा वापर केला जाईल:

         प्रपत्र-अ : कुटुंबाची सर्वसाधारण माहिती नोंदवणे. प्रपत्र-ब : शाळेत कधीच दाखल न झालेली (E1) आणि १ महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित असलेली (E2) शाळाबाह्य व अनियमित बालकांची माहिती. प्रपत्र-क : गोंदिया जिल्ह्यातून कुटुंबासोबत स्थलांतरीत होऊन गेलेल्या बालकांची माहिती. प्रपत्र-ड : इतर भागांतून गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरीत होऊन आलेल्या बालकांची माहिती.

         स्थलांतरीत मुलांसाठी विशेष सोयी व 'शिक्षण हमी कार्ड' (EGC) : मजुरी किंवा रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल. स्थलांतरीत होऊन जाणाऱ्या मुलांना शिक्षण हमी कार्ड (EGC) दिले जाईल, जेणेकरून नवीन ठिकाणी त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही. स्थलांतरीत होऊन आलेल्या बालकांना नियमित शाळेत दाखल करून मोफत शिक्षणासह शालेय पोषण आहार, मोफत गणवेश, उपस्थिती भत्ता व मध्यान्ह भोजनासारख्या सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. जर स्थलांतरीत वस्ती शाळेपासून १ कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असेल, तर संबंधित कारखाने किंवा व्यावसायिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था किंवा स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाईल.

          गाव ते जिल्हा पातळीवर समित्यांचे गठन : या मोहिमेत संपूर्ण प्रशासकीय एकसूत्रता राहण्यासाठी राज्य स्तरापासून ते थेट गाव पातळीवर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सह-अध्यक्षतेखाली समिती काम करेल, तर तालुका स्तरावर तहसीलदार व गाव स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य सेवक आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश असलेली समिती प्रत्येक बालकाच्या प्रवेशावर सनियंत्रण ठेवणार आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आणि अंगणवाडी सेविका हे प्रगणक म्हणून प्रत्यक्ष काम पाहणार आहेत.

           प्रशासनाचे जाहीर आवाहन : हा केवळ शासकीय उपक्रम नसून देशाच्या भविष्याशी जोडलेला संवेदनशील विषय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था (NGOs), युवक मंडळे, शालेय व्यवस्थापन समिती (SMC) आणि ग्रामस्थानी आपल्या परिसरात कोणताही बालक शाळाबाह्य अथवा स्थलांतरीत असल्याचे आढळल्यास तात्काळ जवळच्या सरकारी शाळेत किंवा शिक्षण विभागाशी संपर्क साधावा आणि या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000000