जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 16 July 2026

विशेष वृत्त... कृषी यांत्रिकीकरणाला गती; 2025-26 मध्ये लाभार्थ्यांची झपाट्याने वाढ

 


         गोंदिया, दि. 16 : जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात येत असून, चालू 2025-26 वर्षात या उपक्रमाला विशेष गती मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, यावर्षी लाभार्थ्यांची संख्या आणि खर्च दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.

            कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या तीन प्रमुख योजनांद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे.

           2022-23 मध्ये एकूण 1512 लाभार्थ्यांना सुमारे 1215.67 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. त्यानंतर 2023-24 मध्ये 575 लाभार्थी आणि 575.21 लाख रुपये, तर 2024-25 मध्ये 303 लाभार्थी आणि 290.93 लाख रुपये खर्च नोंदवला गेला.

          मात्र, 2025-26 या वर्षात मोठी झेप घेत 2552 लाभार्थ्यांना सुमारे 3034.43 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या आकड्यांवरून कृषी यांत्रिकीकरणाबाबत शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी स्पष्ट दिसून येते.

          यामुळे शेतीतील मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

          कृषी यांत्रिकीकरण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असून, भविष्यातही या योजनांचा विस्तार केल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

00000000

गोंदिया जिल्ह्यात एसआयआर मोहिमेला वेग ; 96.78 टक्के फॉर्म वितरण पूर्ण

 


            गोंदिया, दि.16 : विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SIR) मोहिमेत गोंदिया जिल्ह्यात लक्षणीय प्रगती होत असून १६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार मतदार नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण सुमारे ११.२३ लाख मतदारांपैकी १०.८७ लाखांहून अधिक इन्यूमरेशन फॉर्म (Enumeration Forms (EF) वितरित करण्यात आले असून वितरणाची टक्केवारी 96.78 इतकी झाली आहे.

         जिल्ह्यातील 1285 बीएलओ (BLO) मार्फत ही मोहीम राबवली जात असून सर्व भागांमध्ये जवळपास 100 टक्के फॉर्म पोहोचविण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. आतापर्यंत सुमारे 5,46,745 फॉर्म डिजिटाईज करण्यात आले असून हे प्रमाण 48.65 टक्के आहे. तर 5,61,062 फॉर्म अद्याप डिजिटायझेशन प्रक्रियेत प्रलंबित आहेत.

         फॉर्म सादर करण्याबाबतही चांगली प्रगती दिसून येत असून 5,46,585 फॉर्म (48.64%) प्राप्त झाले आहेत. याशिवाय मतदार यादीत 3,119 (0.28%) मतदारांबाबत विसंगती आढळून आली आहे. सुमारे 15,998 फॉर्म (1.42%) अजूनही न जमा झाल्याचे दिसून येते.

         तालुकानिहाय पाहता काही विधानसभा क्षेत्रांनी आघाडी घेतली असून देवरी आणि अर्जुनी मोरगाव भागात वितरण आणि संकलनाचे प्रमाण समाधानकारक आहे. जिल्हा प्रशासनाने बीएलओ (BLO) व सहाय्यकांना काम जलद व अचूक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

         प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपला इन्यूमरेशन फॉर्म (Enumeration Form) वेळेत भरून सादर करावा, जेणेकरून मतदार यादी अचूक व अद्ययावत राहील.

0000000

एसआयआर मोहिमेला वेग देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक; 48% डिजिटायझेशन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली

 




          गोंदिया, दि.16 : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झाले असून आज जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मोहिमेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत सहकार्याचे आवाहन करण्यात आले.

         बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 48 टक्के डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. एसआयआर (SIR) प्रक्रियेची सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

        यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच ‘FAQ’ (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) संदर्भातील माहिती पुस्तिका निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सर्वांना वितरित करण्यात आली.

         जिल्हा प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे आणि नागरिकांनी आवश्यक माहिती वेळेत सादर करून मतदार यादी अद्ययावत करण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले.

                                                                     0000000

राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 


          गोंदिया, दि.16 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेवून यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी दि.13 जुलै 2026 पासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

          महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६" साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे.

         यावर्षी या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. सदर पुरस्कार योजनेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उद्योगाला चालना व गती देण्यासाठी सन २०२३ पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार" सुरु करून या माध्यमातून प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत.

         नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दि.२८ जुलै २०२६ पूर्वी जिल्हा कार्यालयात पाठवावेत.

         अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय गोंदिया, शितला माता मंदिर जवळ, कापसे बिल्डींग, सिव्हील लाईन, गोंदिया येथे प्रत्यक्ष अथवा उद्योग पर्यवेक्षक नितीन नेवारे मो. 09765622268

यावर संपर्क साधावा. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.

0000000

Wednesday, 15 July 2026

खैरबोडीत श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्याच्या शेतात मार्गदर्शन

 



          गोंदिया, दि.15 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत तिरोडा तालुक्यातील मौजा खैरबोडी येथे आज श्री पद्धतीवर आधारित भात पीक लागवडीचे प्रात्यक्षिक मोठ्या उत्साहात पार पडले.

          तिरोडा तालुक्यातील खैरबोडी येथील शेतकरी युवराज हिरामण टेंभरे यांच्या शेतावर घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकात श्री पद्धतीने भात रोपांची लागवड करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी तिरोडा पवन मेश्राम, उप कृषी अधिकारी तिरोडा बाबासाहेब शिंदे, खैरबोडीचे उपसरपंच महेश ठाकरे व सहाय्यक कृषी अधिकारी जी. एन. आबाळे उपस्थित होते.

         श्री पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा 50% कमी बियाणे, 40% कमी पाणी आणि 30% पर्यंत जास्त उत्पादन मिळते, असे मार्गदर्शन यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी केले. तसेच कमी मजुरी, कमी खत आणि कमी किड-रोगाचा प्रादुर्भाव यामुळे खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो असे सांगण्यात आले.

         कार्यक्रमात एकात्मिक किड व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गावातील अनेक शेतकरी या प्रात्यक्षिकाला उपस्थित होते आणि त्यांनी श्री पद्धतीबद्दल उत्सुकता दाखवली.

         कृषी विभागातर्फे अशाप्रकारचे प्रात्यक्षिक तालुक्यातील इतर गावांमध्येही राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी पवन मेश्राम यांनी दिली.

                                                               0000000

जी.ई.एस.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत किटकजन्य व जलजन्य आजारावर जनजागृती कार्यशाळा

 



           गोंदिया, दि.15 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात पावसाळ्यात किटकजन्य व जलजन्य आजाराबाबरात जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक जुलै महिना अनुषंगाने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व आश्रमशाळेत आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दि.14 जुलै 2026 रोजी गोरेगाव तालुक्यातील जी.ई.एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत किटकजन्य व जलजन्य आजारावर मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

किटकशास्त्रज्ञ सुभाष बिसेन यांनी गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा अंतर्गत जी.ई.एस.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना बॅनरच्या माध्यमातुन डासांचे प्रकार व त्यापासुन होणारे आजार, त्यांचे लक्षणे आणि डासांचे जीवनचक्र अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना अ‍ॅनोफिलीस मादी, एडीस आणि क्युलेक्स इत्यादी किटक ओळखण्यासंबंधी माहिती देण्यात आली. हिवताप आजाराबाबत्त डासांचे जीवनचक्र, पाण्यात डासांची होणारी वाढ, डासामध्ये प्लासमोडीयम जंतुची वाढ व हिवताप जंतु भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढळणारे बदल, किटकशास्त्रीय सर्वेक्षण, हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत विस्तृत माहिती उपस्थितांना देण्यात आली.

            सदर कार्यक्रमात गोरेगाव तालुका किटकशास्त्रज्ञ सुभाष बिसेन यांनी संसर्गजन्य रोग तसेच किटकजन्य आजार यांचा प्रसार व प्रतिबंधात्मक उपाययोजना व लोकसहकार्याची गरज यावर प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवुन त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.

            आरोग्य शिक्षण कार्यक्रम उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य वी.बी.भिवगडे, केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य निरिक्षक, आरोग्य सहाय्यक महेश वाघमारे, सामुदायिक आरोग्य अधिकारी हरिणखेडे, आरोग्य सेवक रामटेके, आरोग्य सेविका व आशा सेविका उपस्थित होते.

0000000

अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावात केली परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची पाहणी

 




गोंदिया, दि.15 : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने परिसस्पर्श कुष्ठरोग तपासणी व जनजागृती मोहीम हार्ट टु रिच, हाय रिस्क व्हिलेज सर्वेक्षण बाबत दि.13 जुलै 2026 रोजी जिल्हास्तरीय चमुने अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावात परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची पाहणी केली.

            राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.10 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यातील तीन अतिदुर्गम तालुक्यात "परीसस्पर्श कुष्ठरोग अभियान" राबविण्यात येत आहे. परीसस्पर्श कुष्ठरोग अभियातुन अतिजोखमीच्या व दुर्गम भागातील गावातील लोकांवर लक्ष ठेवुन तपासणी व जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हास्तरीय चमुत सहायक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय, जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे डॉ.मुकेश येरपुडे व अभिषेक भलाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांचा समावेश होता.

जिल्हास्तरीय चमुने तालुक्यातील सिरोली, महागाव व अर्जुनी गावातील घरोघरी प्रत्यक्ष भेटी देवुन लोकांशी संवाद साधला. कुष्ठरोग आजाराबाबत जनमानसात असलेले भ्रामक अंधश्रद्धा, गैरसमजुती बाबत माहिती घेवुन लोकांना कुष्ठरोग आजाराबाबत मार्गदर्शन केले. गावात सुरु असलेले सर्वेक्षण पथकातील कर्मचारी यांचेसोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. नंतर जिल्हास्तरीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे भेट देवुन मोहिमेची पडताळणी केली. तसेच अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जावुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे यांचेशी चर्चा करुन तालुकास्तरीय परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची माहिती घेतली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्नानुसार कुष्ठरोग मुक्त भारत अंतर्गत सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसार कमी करणे आहे. परीसस्पर्श कुष्ठरोग मोहिमेतुन संशयित कुष्ठरोग लक्षणे असलेले रुग्णांवर तपासणी करुन मोफत उपचार व समुपदेशन केले जाणार आहे. सदर मोहीम कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास कुठलेही लक्षण न लपवता खरी माहिती देवुन सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.महेंद्र धनविजय यांनी केले आहे.

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे हे परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाचा उद्देश असल्याची माहिती डॉ.महेंद्र धनविजय यांनी यावेळी दिली.

सदर भेटी दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार साखरे, तालुका आरोग्य सहायक सुरेश धुर्वे, पॅरा मेडिकल वर्कर विलास कारेवार, आरोग्य सहायक जे.एस.कत्तूरवार यांचेसह कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका उपस्थित होते.

                                                                     00000000