प्रधानमंत्री पीक विमा योजनेची
अंतिम मुदत 31 जुलै
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागी
होण्याचे आवाहन
गोंदिया, दि. 28 : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची
अंमलबजावणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत प्रभावीपणे सुरू असून
खरीप हंगामातील भात पिकासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ही योजना ठरत आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत तब्बल 44,582 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
यावर्षी खरीप भात पिकासाठी
शेतकऱ्यांना केवळ रु. 60 प्रति हेक्टर इतका अत्यल्प विमा हप्ता भरावा लागणार असून,
त्याबदल्यात रु. 60,000 पर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे नैसर्गिक
आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार
आहे.
दरम्यान, 31 जुलै 2026 ही या
योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने पुढाकार
घेणे आवश्यक आहे. यंदाच्या हंगामात एल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या
अनियमिततेचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी विमा
संरक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी श्री. निलेश कानवडे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करताना
सांगितले की, “शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या
बँक शाखेत किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन विहित मुदतीत विमा हप्ता भरून
या योजनेचा लाभ घ्यावा.”
शेतकऱ्यांनी वेळ न दवडता या
योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असेही प्रशासनाकडून आवाहन
करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment