बालाघाट येथे आंतरराज्यीय बैठक
संपन्न
• पूरस्थितीत नदीत पाणी सोडण्याची सूचना मिळणार
• प्रत्येक गावात नोडल अधिकारी नियुक्त
करणार
वैनगंगा,
बावनथडी आणि बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पावसाळ्याच्या दिवसात
अतिवृष्टी झाल्यास अशा स्थितीत नदीत पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे बालाघाट,
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. ही पूरपरिस्थिती
नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने बालाघाटचे जिल्हाधिकारी डी.व्ही.सिंह यांच्या
अध्यक्षतेखाली आज 22 मे रोजी बालाघाट जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बालाघाट,
गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, बालाघाटच्या
जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मंजुषा राय प्रामुख्याने उपस्थित
होत्या.
तसेच या बैठकीला गोंदिया, नागपूर, भंडारा,
बालाघाट जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मध्यप्रदेशातील शिवनी
जिल्ह्यातील संजय सरोवर प्रकल्पातील पाणी अतिवृष्टीच्या काळात सोडल्यानंतर बालाघाट,
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काही गावे प्रभावित होतात. गोंदिया जिल्ह्यातील
शिरपूर प्रकल्प, पुजारीटोला व कालिसराड या प्रकल्पातील सुध्दा अतिवृष्टीच्या काळात
पाणी सोडल्यानंतर बालाघाट जिल्ह्यातील काही गावात पूरपरिस्थिती निर्माण होते.
बावनथडी नदीवर बांधण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर भंडारा
जिल्ह्यातील काही गावांमध्ये सुध्दा पूरपरिस्थिती निर्माण होते. ही बाब बैठकीतील
चर्चेत आली.
यावेळी निश्चित करण्यात आले की, शिवनी
जिल्ह्यात वैनगंगा नदीवर भिमगड प्रकल्प तसेच बालाघाट जिल्ह्यातील बावनथडी नदीवर बांधण्यात
आलेल्या राजीव सागर प्रकल्प तसेच गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीवर बांधण्यात आलेले
शिरपूर, पुजारीटोला व कालिसराड प्रकल्पातील नदीमध्ये पूरपरिस्थितीच्या काळात
एकाचवेळी पाणी सोडण्यात येणार नाही. एका प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर दुसऱ्या
प्रकल्पातून पाणी सोडले जाणार नाही. प्रकल्पातून पाणी सोडतांना योग्य समन्वयातून
पाणी सोडण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर, पुजारीटोला व कालिसराड प्रकल्पात
पावसाळ्याच्या दिवसात नियंत्रीत स्वरुपात पाणी सोडण्यात येईल. ज्यामुळे वैनगंगा
नदीत पूरस्थिती निर्माण होणार नाही व या नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसणार
नाही.
पावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थितीवर मात
करण्यासाठी आवश्यक ते साहित्य व साधने तयार असावीत. या साहित्य साधनांचा वापर
करण्याच्या दृष्टीने त्याची रंगीत तालीम सुध्दा घेण्यात यावी. त्यामुळे सुस्थितीत
असलेल्या साधनांची माहिती मिळून आवश्यक ते साहित्य खरेदी करता येईल.
पूरपरिस्थितीच्या काळात ग्रामस्थांना सावध करण्याचे स्त्रोत अद्ययावत करण्यात
येतील. प्रसारमाध्यमातून पूरपरिस्थितीबाबतची पूर्वकल्पना ग्रामस्थांना देण्यात
येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक गावाकरीता एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
करण्यात येणार असून या काळात ग्रामस्थांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासोबतच
उपाययोजना करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पूर्ण करण्याचे काम
नोडल अधिकारी करणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
प्रकल्प पूर्णपणे भरल्यानंतर किंवा
पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबतची सूचना संबंधित
जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. संबंधित जिल्ह्यांच्या
जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याशिवाय नदीमध्ये प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार नाही.
संजय सरोवरातून पाणी सोडल्यानंतर 170 कि.मी.चा प्रवास करीत हे पाणी 15 ते 20
तासामध्ये बालाघाटपर्यंत पोहोचते. त्यामुळे सर्व संबंधित जिल्ह्यात पाणी सोडण्यात
येणार असल्याची पूर्वसूचना देण्यात येणार असल्यामुळे पूरपरिस्थितीवर नियंत्रण
मिळण्यासोबतच आवश्यक त्या उपाययोजना करता येणार आहे.
संजय सरोवर व बावनथडी प्रकल्पातून पाणी
सोडण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर गोंदिया व भंडारा जिल्हा प्रशासनाला सूचना
देण्यासाठी बालाघाटचे अधीक्षक अभियंता यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात
आली आहे. या बैठकीत हेही निश्चित करण्यात आले की, बालाघाट, शिवनी, गोंदिया व
भंडारा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी एकदूसऱ्यांशी याबाबत समन्वय ठेवतील व
प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतची माहिती परस्परांना देतील. तसेच शिवनी,
बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मोबाईवर एक व्हॉट्स ॲप ग्रुप
तयार करुन पावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थितीवर तसेच प्रकल्पातून सोडण्यात
येणाऱ्या पाण्याबाबत माहितीचे आदान-प्रदान करतील.
संजय सरोवर व राजीव सागर या प्रकल्पातील
पाण्याच्या पातळीबाबतची माहिती गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना उपलब्ध
करुन देण्यात येईल. अशाचप्रकारची माहिती गोंदिया जिल्ह्यातील संबंधित विभागाचे
अधिकारी शिरपूर, पुजारीटोला व कालिसराड प्रकल्पातील पाण्याच्या पातळीची माहिती
बालाघाटच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी उपलब्ध करुन देतील. मोबाईवर एस.एम.एस. व
व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून प्रकल्पातील पाण्याची क्षमता, पाण्याची पातळी याबाबतची
माहिती बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल.
बैठकीला बाघ इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी
अभियंता एच.वाय.छप्परघरे, केंद्रीय जलसिंचन आयोगाचे नागपूर येथील अधिकारी जितेंद्र
कुमार, भंडाऱ्याचे अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, भंडारा पाटबंधारे विभागाचे
कार्यकारी अभियंता के.एस.मानवटकर, गोंदियाचे सहायक वनसंरक्षक एन.एच.शेंडे, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अभिषेख नामदास, डॉ.के.पी.त्रिपाठी, बालाघाट
जिल्ह्यातील बालाघाट, वाराशिवनी, बैहर, लांजीचे उपविभागीय अधिकारी, सिंचन विभागाचे
अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, संजय सरोवर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर.एस.शर्मा
यांची उपस्थिती होती.