जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 27 December 2019

गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा संपन्न



उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसंस्थांचा सत्कार
                               • बचतगटांना कर्ज मंजूरीपत्रांचे वितरण

     महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती गोंदिया, नियोजन विभाग महाराष्ट्र शासन, तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, गोरेगाव यांच्या संयुक्त वतीने आज 27 डिसेंबर रोजी गुरुकृपा लॉन, गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. उदघाटक म्हणून गोरेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती आरती चव्हाण उपस्थित होत्या.
         नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा गोरेगावचे व्यवस्थापक श्री.कांबळे, आय.सी.आय.सी.आय. बँकेचे सुभाष राऊत व पंकज बिरीया, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वय रजनी रामटेके यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
        आरती चव्हाण म्हणाल्या, महिलांचा कुठेतरी आर्थिक विकास व्हायला पाहिजे, यासाठी बचतगटाच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय चांगले काम करीत आहे. माविमद्वारे महिला बचतगटांना लघु उद्योग म्हणून एक चांगले प्लेटफॉर्म मिळाले आहे असे त्यांनी सांगितले.
         सुनिल सोसे म्हणाले, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. महिलांना मुद्रा योजनेची माहिती व्हावी तसेच मुद्रा याजनेचा लाभ कशाप्रकारे मिळू शकतो याबाबत माहिती देवून प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे शिशु गट- 50 हजार रुपये, किशोर गट- 5 लाख रुपये व तरुण गट- 10 लाख रुपये कर्ज बँकेद्वारे मंजूर करण्यात येते. महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. बँकेद्वारे घेतलेल्या कर्जाची महिला प्रामाणिकपणे परतफेड करतात. महिला बचतगटांना बँकेचे कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले.
         नीरज जागरे म्हणाले, नाबार्डद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजना योजना आहेत, त्या राज्य शासन राबविते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बचतगटातील महिलांनी आर्थिक विकास करुन घ्यावा असे त्यांनी सांगितले.
        रजनी रामटेके म्हणाल्या, आज महिलांवरचे अन्याय व अत्याचार कमी झालेले नाही तर ते वाढतच चालले आहे, यावर विचार करणे गरजेचे असून यासाठी सुरक्षेची अत्यंत गरज आहे. महिलांना कायद्याची जाणिव असायला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे आहेत, त्या कायद्याविषयी त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.
        डॉ.सविता बेदरकर म्हणाल्या, स्त्रीया हया समाजाचा दागिना आहेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार दयावे. प्रत्येकाने समाजशील व्हावे. तळागाळातील लोकांना मदत करावी. महिलांनी अन्यायाविरुध्द लढा दयावा असे त्यांनी सांगितले. यावेळी आय.सी.आय.सी.आय. बँकेचे सुभाष राऊत व तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा नलिनी डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        यावेळी निर्मल ग्रामसंस्था महाजनटोला व अलंकीत ग्रामसंस्था घोटी या उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसंस्थांचा आणि उत्तम सर्वात जास्त कर्ज उचल करणाऱ्या संजीवनी आदिवासी बचतगट गोवारीटोला व श्रीगणेश महिला बचतगट गोरेगाव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         विदर्भ कोकण ग्रामीण बँक गोरेगाव द्वारे मनिषा बिसेन (सेंट्रींगकाम), चंद्रकांता पटले (शिवणकाम) व रुखमा हरिणखेडे (शिवणकाम) यांना प्रत्येकी 50 हजार रुपये आणि आय.सी.आय.सी.आय. बँक द्वारे जनलक्ष्मी महिला बचतगट महाजनटोला- 1,36000/-, जागृती महिला बचतगट हलबीटोला- 1,26000/-, एकता महिला बचतगट चंद्रपूरटोली- 2,16000/- व त्रिवेणी महिला बचतगट चंद्रपूरटोली यांना 1,75000 हजार रुपयाचे मुद्रा लोन कर्ज मंजूरी पत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
       यावेळी ‘‘तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र गोरेगाव’’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये रेडिमेड कापड, फुलवाती, इमिटेशन ज्वेलरी, सेंद्रीय शेतीपासून तांदळाचे उत्पादन, खानावळ, हळद उत्पादन इत्यादी स्टॉल्सला भेटी देवून मान्यवरांनी विचारपूस केली.
         प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी केले. संचालन योगीता राऊत यांनी, तर उपस्थितांचे आभार पदमा सरोजकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम सोनवाने तसेच तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा नलिनी डोंगरे व सर्व सहयोगीनी यांनी सहकार्य केले.

Sunday 8 December 2019

सर्वांना न्याय मिळवून देण्यासोबतच राज्याला दिशा देण्याचे काम करणार - विधानसभा अध्यक्ष पटोले


                                     गोंदिया येथे नागरी सत्कार समारंभ





             भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी विधानसभा अध्यक्ष या पदाचा उपयोग करुन घेण्यात येईल. राज्यातील सर्वांना न्याय मिळवून देण्यासोबतच राज्याला दिशा देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
            गोंदिया येथील सुभाष हायस्कूलच्या मैदानावर 8 डिसेंबर रोजी भंडारा आणि गोंदिया जिल्हा नागरी सत्कार समितीच्या वतीने विधानसभा अध्यक्षपदी आमदार नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल तसेच दोन्ही जिल्ह्यातील नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात सत्काराला उत्तर देताना श्री नाना पटोले बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. प्रमुख अतिथी म्हणून रिपाई(गवई गट)चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई हे होते. सत्कारमूर्ती म्हणून आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, राजू कारेमोरे, नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर माजी खासदार मधूकर कुकडे, माजी मंत्री भरत बहेकार, नाना पंचबुध्दे, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी जि.प.अध्यक्ष टोलसिंग पवार, के.आर. शेंडे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सूनील फुंडे, गोंदिया जिल्हा शिवसेनाप्रमुख मुकेश शिवहरे, गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंचम बिसेन, गोंदिया काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, गोंदिया न.पा.उपाध्यक्ष शिव शर्मा, धनंजय दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
               श्री पटोले पुढे म्हणाले, माझ्या जन्मगावी हा सत्कार होत असल्याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. जिल्हयातील प्रत्येक गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी त्या गावाचा विकास आराखडा तयार करावा व तो आपल्याला सादर केल्यास आपण निश्चितच या गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहोत.  दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे आपल्यावर ऋण आहेत त्याची परतफेड त्यांचा विकास करुन आपल्याला करावयाची आहे. दोन्ही जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगार, शेतमजूर अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्यांची निश्चितपणे आपण सोडवणूक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे पाणी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 9 तालुक्यात पोहोचणार असल्याचे सांगून श्री पटोले म्हणाले, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात सिचंनाची व्यवस्था मोठया प्रमाणात निर्माण होवून जिल्हयाच्या विकासाला गती मिळणार आहे.  बेरोजगारीवर देखील सिंचन सुविधेमुळे मात करता येईल. दोन्ही जिल्ह्यात बारमाही सिंचनाच्या व्यवस्थेवर आपला भर राहणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदीचे पैसे दोन दिवसात देण्याची व्यवस्था करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दोन्ही जिल्हयात आणखी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल.
धानाची भरपाई आठ दिवसात झाली पाहिजे अशी सुविधा निर्माण करण्यात येईल असे सांगून श्री पटोले पुढे म्हणाले,  दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. राज्य सरकारच्या निधीचा योग्य वापर विकास कामासाठी झाला पाहिजे याकडे आपले विशेष लक्ष राहणार आहे. सर्वांनी मिळून दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्यास हातभार लावला पाहिजे तरच जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. मागास जिल्हे म्हणून दोन्ही जिल्ह्याची ओळख आहे ही आपण मिटवून टाकू. गोंदिया जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांना वनजमिनीचे पट्टे देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
            अध्यक्ष म्हणून बोलतांना खासदार प्रफुल पटेल म्हणाले, आजच्या या नागरिक सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष आज एकत्र या मंचावर दिसत आहे. दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी हे सर्व एकत्र आले आहेत. विकासासाठी एकत्र येऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री पटले पुढे म्हणाले,  नाना पटोले हे संघर्षमय व्यक्तिमत्व आहे. आमचे कर्तव्य आहे की ज्या जनतेमुळे हे पद आम्हाला मिळाले आहे त्यांच्यासाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वच नेते विकासासाठी एकत्र येतांना दिसतात, आपल्याकडे मात्र असे होतांना दिसत नाही, ते झाले पाहिजे तरच आपल्या दोन्ही जिल्हयाचे चित्र बदलण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
               राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर अध्यक्ष म्हणून आली असल्याचे सांगून श्री पटेल पुढे म्हणाले, धापेवाडासारखे आणखी काही बंधारे जिल्ह्यात बांधण्यात येतील. त्या बंधाऱ्यातील पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता धानासोबतच अन्य पिकाकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा वापर अन्य पिकांसाठी केला तर जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. जिल्हयातील शेतकऱ्यांना  आज दिशा देण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचा हातभार लागला तर जिल्ह्याच्या विकासाचे चित्र बदललेले दिसेल. आणि हे दोन्ही जिल्हे विकासाच्या बाबतीत अग्रेसर झालेली दिसतील, असे त्यांनी सांगितले.
                आमदार अग्रवाल म्हणाले, आज आनंदाचा क्षण आहे. सर्वांनी मिळून जिल्हयाच्या विकासात हातभार लावला तर दोन्ही जिल्हे विकासात अग्रेसर असतील. प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वामुळे दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणर आहे. जिल्ह्यातील शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. प्र फुल पटेल व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे निश्चितच आपले योगदान देतील. सर्वांच्या प्रेमामुळे मला विधानसभेत जाण्याची संधी इथल्या मतदारांनी दिली आहे. त्यांचे ऋण या पाच वर्षात विकास कामाच्या माध्यमातून फेडण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
             आमदार भोंडेकर म्हणाले, दोन्ही त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खा. प्रफुल पटेल व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे अधिक गती मिळणार आहे. जिल्हयातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आता आम्हाला थेट नानाभाऊंकडे जाता येईल. विधानसभेत दोन्ही जिल्हयाचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जिल्हयाच्या विकासाला निश्चित गती देवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
           आमदार चंद्रीकापूरे म्हणाले, अर्जुनी मोरगाव तालुक्याला सिंचनातून समृध्द करण्यात इटियाडोह प्रकल्पाचा महत्वाचा वाटा आहे. इटियाडोहचे कालवे 70 किलोमीटरपर्यंत आहे हे कालवे सिमेंटचे झाले तर या प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होणार नाही. या पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी होण्यास मदत होईल. जिल्ह्याला नाना पटोले अध्यक्षपदावरून न्याय देतील. चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे नानाभाऊंनी काम करावे. विकास कामांचा मोठा अनुभव खा. प्रफुल पटेल यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे निश्चितच आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. दोन्ही जिल्हयातील प्रश्न सोडविले पाहिजे. विकासाची गंगोत्री जिल्ह्यातील धापेवाडा टप्पा दोनच्या पाण्याच्या माध्यमातून येण्यास मदत होणार असल्यामुळे हे काम लवकर व्हावे. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
         आमदार रहांगडाले म्हणाले, सर्वपक्षीय सत्कार आज होत आहे, यातून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी आज संकटात आहे. त्याला आधार देण्याचे काम विधानसभेत आमच्या जिल्ह्यातील समस्या मांडून त्या सोडविण्यावर आम्हाला निश्चितच वेळ मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
          आमदार कारेमोरे म्हणाले, दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वामुळे गती मिळणार आहे. शेती व शेतीवर आधारित उद्योगाला या नेतृत्वामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. धान उत्पादक  शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासोबतच अनेक समस्यांची सोडवणूक करण्यास त्यांची मदत होईल. समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला आता थेट विधानसभा अध्यक्षांकडे जाता येईल. दोन्ही जिल्ह्यातील समस्या त्यांच्या लक्षात आणून देऊन त्या सोडविण्यास पुढाकार घेण्यास आम्ही त्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले.
             आमदार कोरोटे म्हणाले, देवरी हा आदिवासी तालुका असून हा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे. या तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प असून हा तालुका सिंचनापासून वंचित आहे. आमगाव, सालेकसा व मध्यप्रदेशमध्ये या तालुक्यात असलेल्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. परंतु या तालुक्याला सिंचनापासून वंचित राहावे लागते. देवरी मतदारसंघात  शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था झाल्यास इथला शेतकरी समृध्द होईल असे त्यांनी सांगितले. या तालुक्यात सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यासाठी या प्रकल्पांचा तालुक्यातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याकडे आपण लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
              खा. प्रफुल पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  तसेच नवनिर्वाचित आमदारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन व जि.. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले. उपस्थितांचे आभार विनोद जैन यांनी मानले. प्रारंभी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.