उष्माघात व अग्नीसुरक्षा बाबत कार्यशाळा
• प्रात्यक्षिकाचे सादरीकरण
उन्हाळ्याच्या
दिवसात बाहेर जातांना तीव्र तापमानामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते.
उन्हामध्ये बाहेर जातांना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेवून
उष्माघातापासून आपले संरक्षण करावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र
पातुरकर यांनी केले.
23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील
नियोजन समितीच्या सभागृहात उष्माघात व अग्नीसुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत
प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, पोलीस
उपअधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे,
तहसिलदार सर्वश्री रविंद्र चव्हाण, विठ्ठल परळीकर, सी.आर.भंडारी प्रामुख्याने
उपस्थित होते.
डॉ.पातुरकर पुढे म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस
लक्षात घेता, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे. जास्त तापमानामुळे तीव्र
उन्हाचा मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. अशावेळी उष्माघात होण्याची
शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे त्यांनी
सांगितले.
डॉ.निमगडे म्हणाले, जास्त तापमानामुळे
उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांची योग्य ती काळजी घेवून
उष्माघात होणार नाही यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.
श्रीमती खन्ना म्हणाल्या, पोलीस विभागातील
विविध पथकांच्या माध्यमातून विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेली
आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलीस विभाग सदैव सज्ज असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत अदानी प्रकल्पाचे अग्नीशमन
अधिकारी त्रिलोकसिंग पांचाळ यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनाबाबत आपत्ती व्यवस्थापनात
प्राथमिक उपाययोजना कशाप्रकारे कराव्यात तसेच उपलब्ध साधनांच्या आधारे आपत्तीत
जखमी झालेल्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी नेण्याची उपाययोजना, तसेच या काळातील
प्रथमोपचार कशा पध्दतीने करता येईल याबाबतची विस्तृत माहिती सादरीकरणातून
उपस्थितांना दिली.
डॉ.हेमंत आळीकने यांनी उष्माघातापासून
संरक्षण कसे करावे याबाबत सादरीकरणारे विस्तृत माहिती दिली. जसे- श्रमिकांनी
उन्हामध्ये जास्त श्रमाची कामे करणे टाळावे, उन्हात बाहेर निघतांना डोळ्यावर
गॉगलचा वापर करावा. उन्हाळ्यात शक्यतो सकाळी व संध्याकाळी असे दोनदा आंघोळ करावी.
जेणेकरुन तीव्र तापमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उष्माघातापासून बचाव होण्यास मदत
होईल असे त्यांनी सांगितले.
एलपीजी गॅस वितरक अरविंद नागदेवे यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचा तसेच शेगडी व
रेग्युलेटरचा महिलांनी कशाप्रकारे योग्य वापर करावा याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच
महिलांनी गॅस शेगडी व रेग्युलेटरचा उपयोग काळजीपूर्वक करावे असे सांगितले. सिलेंडर
गॅसचे वजन 14.2 असते. सिलेंडर कधीही एक्सपायर होत नाही. गॅस शेगडी ही
आय.एस.आय.मार्कची असणे आवश्यक आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा विमा असतो. दुर्घटना
झाल्यावर कंपनीमार्फत विमा देण्याची तरतूद आहे. गॅस सिलेंडर दुर्घटनेमुळे एखादयाचा
मृत्यू झाल्यास योग्य ती पडताळणी करुन लाभार्थ्याला विमा कंपनीतर्फे 6 लाख रुपये
विमा देण्यात येतो. गॅस शेगडीचा पाईप पाच वर्षात एक्सपायर होत असतो. गॅस शेगडीचा
वापर करतांना रेग्यलेटरला नेहमी बंद करुन ठेवावे. जेव्हा काम असेल तेव्हाच
रेग्युलेटर सुरु करावे अन्यथा बंद करुन ठेवावे असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेला पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, राष्ट्रीय
सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.बबन मेश्राम, पत्रकार एच.एच.पारधी व अपुर्व मेठी
तसेच महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस विभाग व जिल्ह्यातील
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी
बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
राजन चौबे यांनी केले. उपस्थितांचे आभार लेखाधिकारी लखीराम बाविस्कर यांनी मानले.
आपत्ती
व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके
इमारतीला आग लागल्यास कशाप्रकारे आगीवर
नियंत्रण मिळवावे याची प्रात्यक्षिके उपस्थितांसमोर अग्नीशमन यंत्राद्वारे अदानी
प्रकल्पाचे अग्नीशमन अधिकारी श्री.त्रिलोकसिंग पांचाळ व विवेक शांडिल्य यांनी करुन
दाखविले. गजबजलेल्या ठिकाणी आग लागल्यास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दुचाकी
अग्नीशमन वाहनाद्वारे आगीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येईल याची प्रात्यक्षिके
नगरपालिका विभागाचे सहायक अग्नीशमन अधिकारी छबीलाल पटले व जितेंद्र गौर यांच्या
सहकाऱ्यांनी करुन दाखविले. तसेच उपस्थितांकडून अशाप्रकारचे प्रात्यक्षिके सुध्दा करवून
घेतली. प्रात्यक्षिकाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, तहसिलदार सर्वश्री सी.आर.भंडारी, विठ्ठल परळीकर,
रविंद्र चव्हाण, नायब तहसिलदार सोमनाथ माळी, जिल्हा माहिती कार्यालयाचे
के.के.गजभिये, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.