14 एप्रिल ते 5 मे दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील
येरंडी ता.अर्जुनी/मोर, घोगरा ता.तिरोडा आणि कुंभारटोली ता.आमगाव या तीन गावांची
निवड केंद्र सरकारने केली आहे. या गावात केंद्र सरकारच्या सात योजनांची प्रभावी
अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक
श्रीमती फरीदा नाईक व संरक्षण विभागाचे अवर सचिव जितेंद्र कुमार जिल्ह्यात दाखल
झाले आहेत. 17 एप्रिल रोजी श्रीमती नाईक व जितेंद्र कुमार यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी काळे
यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या अभियानाबाबत त्यांच्याशी चर्चा
केली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी उपस्थित होते. या
तीन गावांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना
(सौभाग्य योजना), उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती
विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि मिशन इंद्रधनुष्य या केंद्र सरकारच्या
सात योजनांची प्रभावी अंमलबजावणी या अभियानादरम्यान करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment