सामाजिक
समता सप्ताहाचे उदघाटन
समाजातील
सर्व घटकांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मंथन व्हावे हा या
सप्ताहामागचा उद्देश आहे. डॉ.आंबेडकर हे ज्ञानी व्यक्तीमत्व होते. त्यांनी असंख्य
विषयावर विस्तृत लिखान केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. डॉ.आंबेडकरांनी
समाजाच्या कल्याणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले. त्यांची प्रेरणा घेवून
प्रत्येकाने समाजाच्या कल्याणासाठी योगदान दयावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
अभिमन्यू काळे यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127
व्या जयंतीचे औचित्य साधून 8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा
करण्यात येत आहे. आज 8 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात या सप्ताहाचे
उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती
अधिकारी विवेक खडसे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता
बेदरकर, समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, प्रा.धर्मशील चव्हाण, बार्टीचे सहायक
प्रकल्प संचालक (समतादूत) रिदय गोडबोले यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
काळे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानले. महात्मा
फुलेंनी शेतकऱ्यांचे आसुड मधून शेतकऱ्यांचे दु:ख मानले. यातून त्यांनी विचाराला
कृतीची जोड दिली. समाजाच्या हिताचा विचार करुन त्यांनी पाण्याचा हौद सर्वांसाठी
खुला केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर या थोर व्यक्तींनी आपल्या विचाराला कृतीची जोड दिल्यामुळे ही माणसे महामानव
झालीत. शिक्षण घेवून डॉ.आंबेडकरांनी सर्वप्रथम समाजाच्या कल्याणाचा विचार केला. ‘प्रॉब्लेम
ऑफ रुबी’ या ग्रंथातून त्यांनी आर्थिक विचार मांडले. हे विचार अत्यंत महत्वाचे
आहे. कितीही वाईट परिस्थिती आली तरी समाजाच्या हितासाठी मागे राहणार नाही हे
डॉ.आंबेडकरांनी ठरविल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.सविता
बेदरकर म्हणाल्या, सामाजिक समतेची पायाभरणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ‘जाती
तोडो समाज जोडो’ ही संकल्पना त्यांनी मांडली. धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशात धर्म
कधकधी डोके वर काढत असल्याचे सांगून डॉ.बेदरकर म्हणाल्या, सर्व मानव हे एक झाले
पाहिजे असे डॉ.आंबेडकरांना वाटायचे. या सप्ताहामुळे समाजात समता निर्माण होण्यास
मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सन
2017-18 या वर्षात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल सुर्तीसेन
वैद्य, लिखन निर्विकार, चरणदास चंद्रिकापुरे, उमाकांत अवस्थी, होमराज ठाकरे यांचा
मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी
प्रा.धर्मशील चव्हाण यांनी दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षेबाबत उपस्थित
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समता सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्पर्धा
परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह व निवासी
शाळेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळाचे
अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले. संचालन शिक्षक प्रदीप
ढवळे यांनी तर उपस्थितांचे आभार समतादूत शारदा कळसकर यांनी मानले.
सर,कालच्या पवनी रामपुरी रोडच्या भूमिपूजन चा वृत्तांत तयार झाला काय?कृपया पाठवा
ReplyDelete