पाणी टंचाई आढावा सभा
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या
पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येवू नये यासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात
यावे. आवश्यक त्या ठिकाणी विंधन विहिरीची कामे, विंधन विहिरी दुरुस्तीची कामे,
सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याची कामे आणि आवश्यक त्या विंधन विहिरीमध्ये पुरक
पाईप टाकावे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही सर्व कामे प्रत्यक्ष कृतीतून यंत्रणांनी
करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
आज 31 मे
रोजी पवार बोर्डींग गोंदिया येथे जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतांना
श्री.बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आमदार विजय रहांगडाले,
संजय पुराम, प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ.राजा दयानिधी, उपाध्यक्ष हाजी अलताफ हमीद, जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती
शैलजा सोनवाने, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, शिक्षण व आरोग्य
समिती सभापती रमेश अंबुले, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे,
अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक/अर्जुनी पं.स.सभापती गिरीधारी
हत्तीमारे, गोंदिया पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, देवरी पं.स.सभापती सुनंदा बहेकार,
गोरेगाव नगराध्यक्ष आशिष बारेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री
बडोले पुढे म्हणाले, पाणी टंचाईबाबत अनेक ग्रामपंचायतीच्या व गावाच्या अडचणी आहेत.
गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगातून निधी
देण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनी स्वत: पुढाकार घेवून पाणी टंचाईवर मात
करण्यासाठी पुढे आले पाहिजे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ज्या उपाययोजना
सूचविण्यात आल्या आहेत त्या प्रत्यक्षात अंमलात आल्या पाहिजे. एप्रिल ते जून हे
महिने पाणी टंचाईचे आहेत. पंचायत समितींनी आपल्या स्तरावर उपाययोजना करण्याबाबत जी
कामे सूचविण्यात आली आहेत त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसेल तर ही बाब गंभीर आहे
असे सांगितले.
ज्या पाणी पुरवठा
योजना वीज जोडणी अभावी बंद आहेत त्या योजनांना पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता
तातडीने वीज जोडणी करण्यात यावी असे सांगून श्री.बडोले म्हणाले, जे पाण्याचे
स्त्रोत आटले आहेत त्याची तपासणी करण्यात यावी. योग्य तेथे पाण्याचे स्त्रोत
निर्माण करावे यासाठी निधीची अडचण नाही. ज्या ठिकाणी विंधन विहिरी करण्यात आल्या
आहेत त्यावर त्वरित हँडपंप बसविण्यात यावे. या कामात दिरंगाई होवू नये.
जिल्ह्यातील सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याचा कालबध्द कार्यक्रम ग्रामपंचायतीने
राबवावा, त्यामुळे पाणी साठा उपलब्ध होण्यास मदत होईल. जेथे विहिर अधिग्रहणाची
आवश्यकता आहे तेथे विहिर अधिग्रहीत करुन संबंधित गावाला पाणी पुरवठा करण्याची
व्यवस्था करावी. ज्या नादुरुस्त विंधन विहिरी आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करावी
असे त्यांनी सांगितले.
श्री.बडोले
पुढे म्हणाले, जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या ज्या योजना बंद
आहेत त्या तातडीने सुरु करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून दुरुस्तीसाठी निधीची
मागणी करावी त्यासाठी शासन निधी देण्यास तयार आहे. हया योजना तातडीने दुरुस्ती
करुन ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दयावे असे ते यावेळी म्हणाले.
आमदार
श्री.रहांगडाले म्हणाले, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील ज्या गावामध्ये पाणी
टंचाई भासत आहे त्या गावाला तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी भेट देवून संबंधित
ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेवून पाण्याची व्यवस्था करावी.
आमदार
श्री.पुराम म्हणाले, सालेकसा, देवरी व आमगाव तालुक्यातील काही गावांना पाण्याचा
प्रश्न भेडसावतो आहे. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेवून पाण्याची
उपलब्धता करुन दयावी असे सांगितले.
यावेळी
जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे यांचेसह अन्य लोकप्रतिनिधींनी आपल्या
क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्या आढावा बैठकीत मांडल्या.
ग्रामीण
पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांनी पाणी टंचाई
निवारणार्थ करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जानेवारी ते मार्च 2019 या
कालावधीत पाणी टंचाई कृती आराखडा टप्पा-2 अंतर्गत जिल्ह्यात 123 गावांमध्ये
संभाव्य पाणी टंचाई असून यावर मात करण्यासाठी 272 उपाययोजना करण्यात येत आहे.
नव्याने 39 नविन विंधन विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. 220 विंधन विहिरीच्या
हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली आहे. टप्पा-3 अंतर्गत एप्रिल ते जून 2019 या
कालावधीत 153 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई असून यावर मात करण्यासाठी 1540 उपाययोजना
प्रस्तावित असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.
माहे
जानेवारी ते मे 2019 या कालावधीत लघु नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 22 विद्युत पंप
दुरुस्ती व आश्रम शाळेअंतर्गत 6 असे एकूण 28 विद्युत पंप दुरुस्ती करण्यात आली
आहे. तसेच प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 2 योजना दुरुस्त करण्यात आल्या
आहे तर सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजनेअंतर्गत 20 कामे पूर्ण करण्यात
आली आहे. टंचाई कालावधीत एकूण 1182 पैकी 596 विंधन विहिरींची दुरुस्ती करण्यात आली
असून 586 दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहे. स्थानिक विकास निधी अंतर्गत 127 विंधन
विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ पंचायत समितीला पाणी टंचाई
अंतर्गत देखभाल दुरुस्तीसाठी 2696 जीआय पाईपचे वाटप करण्यात आल्याचे श्री.चव्हाण
यांनी सांगितले.
सभेला निवासी
उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, रचना गहाणे,
किशोर तरोणे, शिला चव्हाण, श्रीमती तिराले, श्रीमती पाथोडे यांचेसह अन्य
जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, नगरपालिका-नगरपंचायत मुख्याधिकारी,
पाणी टंचाई निवारणार्थ संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विविध जि.प.सदस्य, पं.स.सदस्य व ग्रामपंचायत सरपंचांनी त्यांच्या
क्षेत्रातील व गावातील पाणी टंचाईच्या समस्या मांडल्या.