जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 30 November 2017

परिसंवादातील वक्त्यांचा सूर डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण

गोंदिया ग्रंथोत्सव 2017

            आजचे युग हे संगणकाचे युग आहे. आजच्या या डिजीटल युगातही ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत परिसंवादातील वक्त्यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्तवतीने वाचनालयाच्या बजाज सभागृहात 29 नोव्हेंबर रोजी गोंदिया ग्रंथोत्सव-2017 च्या निमित्ताने डिजीटल युगात ग्रंथाचे महत्व या विषयावरील परिसंवाद वक्ते आपले विचार व्यक्त करतांना बोलत होते. या परिसंवादामध्ये राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू, प्रा. कविता राजाभोज व प्रा. बबन मेश्राम यांनी सहभाग घेतला.
          डॉ. जनबंधू म्हणाले, आजचे ग्रंथालय हे आधुनिकतेकडे वळलेले असावे. डिजीटायझेशनच्या माध्यमातून ग्रंथ उपलब्ध झाले आहे. माहितीचे आदान प्रदान झाले पाहिजे. पुस्तकाच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले पाहिजे. ग्रंथांच्या व्याख्या आज बदलत आहे. त्यानुसार ग्रंथालयाने बदल स्विकारले पाहिजे. डिजीटल युगातही ग्रंथालयाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी सांगितले.
          डिजीटायझेशनचे फायदे भरपूर असल्याचे सांगून डॉ. जनबंधू म्हणाले, ग्रंथालयांनी आता विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे. संगणकाचा वापर करुन जास्तीत जास्त लोकांना संगणक साक्षर व सुसंस्कृत केले पाहिजे. असे ते म्हणाले.
           प्रा. श्रीमती राजाभोज म्हणाल्या, युगाची परिभाषा ही अष्मयुगापासून हळूहळू बदलत गेली आहे. माणसाची परिभाषा बदलत गेली. त्याचप्रकारे साहित्यही बदलत गेले. काळाप्रमाणे माणसानेही बदल स्विकारणे गरजेचे आहे. डिजीटल युगात आपण स्क्रीनवर वाचतो, पाहतो, पण लक्षात किती राहते हा महत्वाचा प्रश्न आहे. पण आपण ग्रंथाचे वाचन केले तर कायम लक्षात राहते. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांला मोबाईल घेऊन न देता वाचनासाठी पुस्तके घेवून दिली पाहिजे. वाचनाचे संस्कार आले नाही तर आपण आजच्या युगात जगू शकणार नाही. पूर्वी वाचन संस्कृती ही मार्यादित लोकांकडे होती, असे त्यांनी सांगितले.
           प्रा. मेश्राम म्हणाले की, आजची पिढी ही डिजीटल झाली आहे. ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आहेत. डिजीटलमुळे सर्व जग जवळ आले आहे. जग कितीही बदलले असले तरी ग्रंथाचे महत्व कमी झालेले नाही. आजही वाचकांचा ग्रंथावर  100 टक्के विश्वास आहे. पण ई-बुकवर विश्वास ठेवणे आजही अवघड जाते. ग्रंथालयाचे स्वरुप आज बदलले आहे. ते आज ज्ञानाचे मंदिर झाले आहे. ज्ञानरुपी या मंदिराचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रंथालयातून ज्ञानदानाचे कार्य करण्यात येत आहे. 18 वे शतक हे क्रांतीचे होते. क्रांतीकारी विचाराचा प्रभाव समाजावर झाला त्यामुळे विचारसरणी प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले.
         आज आपण 21 व्या शतकात वावरत असल्याचे सांगून प्रा. मेश्राम म्हणाले, ग्रंथ हे माहिती व ज्ञान देण्याचे काम करतात. व्यक्तीची आवड निवड निर्माण झाली पाहिजे. ग्रंथालये हे ज्ञानात भर घालण्याचे काम करतात. व्यक्तीला वाचनास प्रवृत्त करण्याचे काम ग्रंथालये करतात. मानवी समाजाचा विकास ग्रंथालयामुळे साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

           डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व या विषयांवर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी ग्रंथप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य विनायक अंजनकर यांनी मानले.

व्यक्तीमत्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथात - प्रा.नरेंद्र आरेकर

                              गोंदिया ग्रंथोत्सव-2017 परिसंवाद
     प्रत्येकाने आध्यात्मीक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. ग्रंथ हेच गुरु आहेत. मानवी जीवनाचे व्यक्तीमत्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथात आहे, असे प्रतिपादन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी केले.
    जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने बजाज सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवा निमित्ताने आयोजित ‘ग्रंथाने काय दिले’ या परिसंवादात श्री.आरेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे होते. प्रमुख अतिथी म्हणून कवी व साहित्यीक माणिक गेडाम, प्रा.डॉ.वर्षा गंगणे, प्रा.डॉ.सविता बेदरकर उपस्थित होत्या.
      श्री.आरेकर पुढे म्हणाले, पुस्तके माणसाला घडवितात. ग्रंथ ज्या स्वरुपाचे असतात त्याचप्रमाणे आपण घडत असतो. ग्रंथ माणसाला बहुश्रूत करतात. आपल्याला बोलण्याची शक्ती ग्रंथाने दिली आहे. चांगला वाचक असल्याशिवाय चांगला नेता होत नाही. ग्रंथांनी संतांचे अभंग दिले. ग्रंथ हे जगाकडे बघण्याची दृष्टी देतात. ग्रंथ हे आपल्याला प्रेरणा देतात. अन्यायाविरुध्द वाचा फोडण्याचे काम पुस्तके करतात. प्रत्येकाला आपल्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे. अवांतर पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. वाचन अविरत सुरु ठेवावे. मानवी जीवनाला समृध्द करण्याचे काम ग्रंथ करीत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.गेडाम म्हणाले, ग्रंथांनी समाजाची वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले आहे. निसर्ग हा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी मृत्यूंजय कादंबरी एकदातरी वाचावी, त्यातून प्रेरणा मिळेल. क्रमीक पुस्तकांसोबतच इतर साहित्याचे सुध्दा वाचन केले पाहिजे. अवांतर वाचन केल्याने ज्ञान समृध्द होते. वाचन हे भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. आत्मचरित्र लिहिण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
     प्रा.डॉ.गंगणे म्हणाल्या, सध्या वाचन संस्कृती लोप पावत आहे. आज पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आज वाचक हरवल्याचे दिसून येत आहे. ग्रंथांचे जतन केले पाहिजे. ग्रंथांमध्ये व्यक्तीमत्व निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. आई-वडिलांनी मुलांमध्ये पुस्तके वाचनाची आवड निर्माण करावी. पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडते, त्यामुळे प्रत्येकाने पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे. अनुकरणाची परंपरा जपल्या गेली तर वाचन संस्कृती जपली जाईल. ग्रंथांमध्ये मानवाचे भवितव्य निर्माण करण्याची शक्ती आहे. एखादया कार्यक्रमात आपल्याला भेट वस्तू दयायची असेल तर आपण पुस्तक भेट म्हणून दयावी असेही त्यांनी सांगितले.
      प्रा.बेदरकर म्हणाल्या, विचारांना प्रेरणा देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके आपले जीवन घडवितात. देशाला जर महासत्ता बनवायचे असेल तर देवालयात जाण्यापेक्षा ग्रंथालयात जाण्याची आज खरी गरज आहे. ग्रंथांनी आपल्याला खुपकाही शिकवले आहे. सावित्रीबाई फुले यांची प्रेरणेमुळेच यापुढेही काम करीत राहीन. ग्रंथांनी मला समृध्द केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.कटरे म्हणाले, मराठी ही आमची मायबोली आहे. झाडीबोली ही आपली मराठीची अमृत भाषा आहे. ग्रंथ हे माणसाला घडवितात. ग्रंथ वाचनाचा चांगला परिणाम होतो. ग्रंथ हे नेहमीच मदत करायला तयार असतात. वाचक घडवावा लागतो. विचारप्रवाह हे कधीही संपत नाही. जो संपतो तो वाद आणि जो प्रवाहीत राहतो तो विचारप्रवाह असतो. जीवनात प्रत्येकाला वाचणाची आवड असली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

      यावेळी मान्यवरांना भारतीय संविधान ग्रंथ म्हणून भेट देण्यात आले. शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नागपूर, नाथे पब्लीकेशन नागपूर, हिमालय पब्लीकेशन, अभिमन्यू बुक स्टॉल साकोली व जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल या ग्रंथोत्सव कार्यक्रमात लावण्यात आला होता. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शेषराव भिरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी मानले.

Wednesday 29 November 2017

वाचन संस्कृती वाढविण्यात वाचकांची भूमिका महत्वाची - डॉ.दिलीप पाटील-भूजबळ

                            गोंदिया ग्रंथोत्सव-2017 चे उदघाटन
                                      
    आज वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. तिचा ऱ्हास होतो की काय अशी भिती वाटत आहे. सोशल मिडियाचा वापर आज मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ग्रंथ हेच गुरु असल्यामुळे वाचनाची सवय जोपासली पाहिजे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले.
      जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने वाचनालयाच्या बजाज सभागृहात 29 नोव्हेंबर रोजी आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-2017 चे उदघाटन करतांना डॉ.भूजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोलीच्या बहिनाबाई अंजनाबाई खुणे, ज्येष्ठ कवी साहित्यिक युवराज गंगाराम, प्रा.डॉ.सविता बेदरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिव शर्मा, श्री शारदा वाचनालयाचे सचिव जगदिश मिश्रा, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह डी.डी.रहांगडाले यांची उपस्थिती होती.
       नव्या पिढीला प्रेरणा देणारे अनेक पुस्तके आज बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, या पुस्तकांचे वाचन नव्या पिढीने केले पाहिजे. मराठी साहित्य समृध्द आहे, या साहित्याचे वाचन झाले पाहिजे. समाजात असलेले वेगवेगळे विचारप्रवाह हे समाज सुधारणेसाठी एकत्र आले पाहिजे. ग्रंथाचे भांडार हे वैभव आहे. या वैभवापासून कोणीही वंचित नसावे. थोरामोठ्यांचे विचार ग्रंथातून लोकांपर्यंत गेले पाहिजे. भारतीय संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, या संविधानामुळे विविधतेने नटलेला आपला देश शक्तीशाली बनला आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.
       श्रीमती मेंढे म्हणाल्या, ग्रंथाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रंथ वाचण्यामुळे ज्ञान प्राप्ती होते. दररोज वाचनासाठी वेळ काढला पाहिजे. अनेक पुस्तके ही नव्या पिढ्यांसाठी महत्वपूर्ण आहे. वाचनाची सवय वाढली पाहिजे. वाचन हे प्रगतीचे लक्षण आहे. जिल्ह्यात असलेल्या अनेक ग्रंथालयात चांगली पुस्तके उपलब्ध आहेत, त्याचे वाचन झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
      श्रीमती कांबळे म्हणाल्या, वाचन चळवळ ही वाढली पाहिजे. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून झाला आहे. वाचनामुळे व्यक्तीचे व्यक्तीमत्व निर्माण होते. वाचन हे स्वत:पुरते मर्यादित न ठेवता ते इतरांनाही सांगितले पाहिजे. समाजात चांगले विचार रुजण्यासाठी ग्रंथांची भूमिका महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी वाचनाचा छंद जास्तीत जास्त जोपासला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
       श्री.सोसे म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचकांमध्ये पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. ग्रंथ हे आपले मित्र आहे. अनेक ग्रंथ हे आपल्या जीवनात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. जास्तीत जास्त वाचनामुळे विचारसरणी प्रगल्भ होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व अंजनाबाई खुणे यांनीही विचार व्यक्त केले.

       प्रारंभी डॉ.भूजबळ यांनी शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार विभागाच्या स्टॉलचे फित कापून उदघाटन केले. कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी केले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर उपस्थितांचे आभार शिव शर्मा यांनी मानले.

Sunday 26 November 2017

माणसाला माणूस म्हणून ओळख भारतीय संविधानामुळे - देवसुदन धारगावे

सामाजिक न्याय भवनात संविधान दिन साजरा

     स्वातंत्र्यपूर्व काळात देश विविध राज्यात व संस्थानात विखुरलेला होता. राजा बोले प्रजा चाले अशी परिस्थिती होती. जाती-जाती आणि धर्माधर्मामध्ये विभाजन झाले होते. पारंपारीक पध्दतीने जातीवर आधारीत व्यवसाय चालायचे. स्वातंत्र्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे वंचित, दुर्बल घटक आज विकासाच्या प्रवाहात येवू लागला आहे. पात्रता असलेली व्यक्ती देखील देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसू शकते ही संविधानामुळे शक्य झाले आहे. माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचे काम भारतीय संविधानामुळे झाले असल्याचे मत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले.
     भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री.धारगावे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, समाज कल्याण अधिकारी श्री.पोवार यांची उपस्थिती होती.
     श्री.धारगावे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देश एकसंघ चालावा यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर भारतीय संविधान तयार झाले. भारतीय संविधानाचे महत्व अजरामर आहे. डॉ.आंबेडकरांनी जगातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास केला. कोणावर अन्याय, अत्याचार होणार नाही त्याला न्याय मिळेल असे संविधान डॉ.आंबेडकरांनी तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.खडसे म्हणाले, भारतीय संविधान हा एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. भारतीय संविधानातील प्रत्येक कलम हे प्रत्येक भारतीयांना उज्ज्वल भविष्याकडे नेणारे दिपस्तंभ आहे. राज्यघटनेतील कलमे ही केवळ कायदयाची कलमे नाहीत तर त्यांच्यात शेकडो वर्षापासून खितपत पडलेल्या सुस्त भारतीय समाजाला खडबडून जागे करण्याची व समतेच्या उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याची ताकद आहे. बालवयात मुलांनी संविधानाचे वाचन केले तर चांगले संस्कार मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.रामटेके म्हणाले, या देशात बाबासाहेब जन्माला आले नसते आणि त्यांनी भारतीय संविधान लिहिले नसते तर देशाची स्थिती कशी असती याचा विचार न केलेला बरा. आज मागासवर्गीय समाजांनी डॉ.आंबेडकरांचे विचार आत्मसात केले पाहिजे. इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम 340 वे कलम, अनुसूचित जमातीसाठी 341 वे कलम आणि अनुसूचित जातीसाठी 342 वे कलम लिहिले. या समाजासाठी तरतूद संविधानात केली नसती तर या समाजाची आज वाईट अवस्था असती. ज्या समाजांनी डॉ.आंबेडकरांचे विचार आजही आत्मसात केले नाही तो समाज आजही मागासच असल्याचे त्यांनी सांगितले.
     डॉ.सविता बेदरकर यांनी डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल आचार्य कृपलानी डॉ.आंबेडकरांना काय म्हणाले होते आणि त्यावर डॉ.आंबेडकरांनी त्यांना काय उत्तर दिले हे यावेळी सांगितले. उपस्थितांना त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची शपथ दिली.
     प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.वानखेडे यांनी केले. संचालन प्रदीप ढवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरीक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 25 November 2017

विकास कामे व महसूल वसुली उद्दिष्ट नियोजनातून वेळेत पूर्ण करा - विभागीय आयुक्त अनूप कुमार

     विविध यंत्रणांना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येतो. महसूल विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. यंत्रणांनी व महसूल विभागाने आपली कामे नियोजनातून निर्धारित वेळेत पूर्ण करावी. असे निर्देश विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात 25 नोव्हेंबर रोजी विविध यंत्रणा व महसूल विभागाचा आढावा घेतांना श्री.अनूप कुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपायुक्त सुधाकर तेलंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी.मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     श्री.अनूप कुमार म्हणाले, यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. भविष्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन आतापासूनच करावे. भूजल संरक्षण अधिनियम कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन दयावा. रेतीघाटामुळे ज्या गावाचे रस्ते खराब झाले आहे त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खनिज विकास प्रतिष्ठानमधून निधी उपलब्ध करुन दयावा. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे. निसर्ग संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने देखील संवर्धन झाले पाहिजे असे ते म्हणाले.
      जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करावा असे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, धापेवाडा टप्पा-2, झाशीनगर उपसा सिंचन योजना, निमगाव प्रकल्प, पिंडकेपार/डांगुर्ली प्रकल्प, मानागड प्रकल्प या प्रकल्पाच्या पुर्णत्वाला देखील गती मिळाली पाहिजे. बिरसी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावे. जिल्हा परिषदेतील वर्ग-2 चे रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा व त्याबाबत पाठपुरावा करावा. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटूंबातील व्यक्ती शौचालयाचा नियमीत वापर करतील यासाठी प्रवृत्त करावे. बँकेशी समन्वय साधून सहकार विभागाने पीक कर्ज योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उपलब्ध होताच जमा करावे असे ते म्हणाले.
     धडक सिंचन विहिर कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार असल्याचे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर पिके घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे. रोहयोच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे उपलब्ध झाल्यास मजुरांच्या हाताला काम मिळेल व त्या माध्यमातून विकास कामे करतांना जिल्हा राज्यात अव्वल कसा राहील याचे नियोजन करावे. कामात दिरंगाई करणाऱ्याची गय केली जाणार नसून टिम वर्क म्हणून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी महसूल वसुलीचा आढावा घेतला.
      डिसेंबर अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगून श्री.ठाकरे म्हणाले, यावेळी रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येणार नाही. अवैध रेती उत्खनन होणार नाही याकडे लक्ष दयावे. महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी डॉ.भूजबळ यांनी नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता विशद केली. तसेच पोलीस गृह निर्माण योजनेअंतर्गत पोलिसांच्या शासकीय निवासस्थान व पोलीस स्टेशन इमारतीबाबतची माहिती दिली. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेत यशस्वी व्हा - राजकुमार बडोले



तालुकास्तरीय सुरक्षा दौड स्पर्धा
    देशात लोकशाही व्यवस्था आहे. नक्षल्यांना बंदुकीच्या बळावर काहीही करता येत नाही. संविधानाने लोकांच्या मताला महत्व दिले आहे. मतदानाच्या पेटीतूनच राजा जन्माला येतो. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील युवावर्गाने इतरत्र न भरकटता विकासाची कास धरावी. पोलीस विभागाच्या वतीने आयोजित सुरक्षा दौड स्पर्धेत सहभागी होवून यश संपादन करावे. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
     सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरवाणी येथे नुकतेच गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने बिरसा मुंडा जयंती पंधरवाड्याच्या निमित्ताने नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमधील करीयर घडविण्यासाठी तालुकास्तरीय सुरक्षा दौड कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, पं.स.सभापती कविता रंगारी, अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, शेषराव गिरेपुंजे, गोंगले सरपंच डी.यु.रहांगडाले यांची उपस्थिती होती.
     पालकमंत्री पुढे म्हणाले, लोकसहभागातून अनेक कामे यशस्वी होतात. पोलीस दलाच्या वतीने सुरक्षा दौडचे देखील लोकसहभागातून यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नक्षलग्रस्त भागातील युवावर्गात मोठ्या प्रमाणात क्रीडा गुण आहे. अशा प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धेतून त्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण दिसून येण्यास मदत होते. येथूनच त्यांना जीवनाचा यशस्वी मार्ग मिळतो. रन फॉर सेक्युरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.श्री.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौडला आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 5 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातून 600 च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. नक्षलविरोधी जनजागरण विद्यार्थ्यांमध्ये व्हावे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेतून यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना धावण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      सुरक्षा दौड निमित्ताने आयोजित कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व क्रीडा कौशल्य दिसून येत असल्याचे सांगून श्री.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौड हा समाज जागृती व प्रबोधन करणारा कार्यक्रम आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करावे. त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      सुरक्षा दौडमध्ये सडक/अर्जुनी तालुक्यातील 36 शाळा व वसतिगृहांच्या 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तालुकास्तरीय दौड स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य व प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.मेश्राम यांनी मानले.

Friday 24 November 2017

ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य - राजकुमार बडोले



जिल्हा परिषदेच्या विभागांचा आढावा


      ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा व विकास कामे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी. जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य देण्यात येणार असून लवकरच मंत्रालय स्तरावर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा 23 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉल येथे आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री.बडोले यावेळी म्हणाले, ग्रामीण भागातील ज्या भागात पाणीटंचाईची स्थिती आहे अशा गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन करावे व त्यानुसार वेळेत पाणीटंचाईवर मात करावी. जिल्ह्यातील ज्या दलित वस्त्यामध्ये पथदिवे, रस्ते, समाज मंदिरे नाही ती कामे प्राधान्याने घेतांना बृहत आराखडा तयार करावा. दलित वस्त्यांमध्ये मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी अभ्यासिका सुरु कराव्यात. बार्टीमार्फत अभ्यासिकेसाठी पुस्तके पुरविण्यात येईल असे ते म्हणाले.
      दलित वस्तींच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण योजना कुणाला सूचविता येत असेल तर त्या सांगाव्यात असे सांगून श्री.बडोले म्हणाले, ही कामे करतांना ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात येईल. कृषि विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नाविण्यपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. 2022 पर्यंत सर्वांना घरे दयावयाचे असल्यामुळे शासनाकडून घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून घेतले पाहिजे असेही ते म्हणाले.
      श्री.बडोले म्हणाले, नैसर्गीक आपत्तीत पडलेल्या घरांसाठी तातडीने मदत करावी. रमाई घरकूल योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करतांना अशाच लाभार्थ्यांची निवड प्राधान्याने करावी की ज्यांना घरेच नाही. 2019 पर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. ग्रामीण भागातील बचतगटातील विकासासाठी यंत्रणांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे. बचतगटाच्या विकासासाठी नियोजनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी विशद केले.
      जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने नियोजन करावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी. तलाव दुरुस्तीचा विशेष प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. धडक सिंचन विहिरीची कामे तातडीने पूर्ण करावी. शेळीपालनाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण बेरोजगार युवकांना दयावे. त्यांना शेळीगट वाटप करुन योग्य पध्दतीने ते शेळीपालनाचा व्यवसाय करतील.
      ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी असे सांगून श्री.बडोले म्हणाले, भरारी पथकाच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात व मुख्यालयी असतात का हे शोधावे. ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाला प्रोत्साहन दिले पाहिजे. रोहयोतून प्राधान्याने पांदन रस्त्याची कामे करावी.  त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. जिल्ह्यात कुपोषणग्रस्त बालक आढळून येणार नाही याकडे लक्ष दयावे. जिल्ह्यातील शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था चांगल्याप्रकारे असावी. नादुरुस्त शौचालय तातडीने दुरुस्त करावी. शाळांमध्ये शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा इंटरनेटने जोडल्या पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
      श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने समन्वय साधून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यासाठी योग्य समन्वय राखला पाहिजे. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावोगावी शौचालयाचा वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने ग्रामस्थ आता मोठ्या प्रमाणात शौचालयाचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती यांनी विविध समस्या मांडल्या. उपस्थित विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची व तिथल्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी दिली.
      आढावा सभेला पं.स.सभापती सर्वश्री अरविंद शिवणकर (अर्जुनी/मोर), कविता रंगारी (सडक/अर्जुनी), माधुरी रहांगडाले (गोंदिया), दिलीप चौधरी (गोरेगाव), हिरालाल फाफनवाडे (सालेकसा) यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मुंडे, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री वाळके, श्री.पारखे, श्री.राठोड, श्री.बागडे, श्री.भांडारकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विश्वकर्मा, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.चंद्रिकापुरे यांच्यासह सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘संकल्प समतेचा’ चित्ररथाचा शुभारंभ


चित्ररथाच्या माध्यमातून योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत

 
 

     मागील तीन वर्षात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विविध घटकांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आहे. तसेच अनेक महत्वपूर्ण कामे सुध्दा केले आहेत. लंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेत असतांना वास्तव्य केलेले घर देखील घरेदी केले आहे. मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या कल्याणाचा निधी इतर योजनेसाठी खर्च होणार नाही. चित्ररथाच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      जिल्हा परिषद कार्यालयात 23 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांवर आधारीत ‘संकल्प समतेचा’ या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी ते बोलत होते. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, गोंदिया पं.स.सभापती माधुरी रहांगडाले, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, अर्जुनी/मोर पं.स.सभापती अरविंद शिवणकर, गोरेगाव पं.स.सभापती दिलीप चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मुंढे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री यावेळी म्हणाले, क्रिमीलेयरची मर्यादा साडेचार लाख रुपयांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली आहे. मागासवर्गीय उद्योजकांना जास्तीत जास्त व्यवसायाला चालना देण्यासाठी वैयक्तीक 2 कोटी रुपये कर्ज उद्योगासाठी देण्यात येईल. स्वाधार योजनेच्या माध्यमातून वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदतीची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      ‘संकल्प समतेचा’ या चित्ररथावर आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, बचतगटांना मिनी ट्रॅक्टर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना, कन्यादान योजना, रमाई घरकूल योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील निवासी शाळा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसह मागील तीन वर्षात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय याची सचित्र माहिती आहे. तसेच बचतगटांना मिनी ट्रॅक्टर, कौशल्य विकास योजना, आंतरजातीय प्रोत्साहन योजना या योजनांचे ऑडिओ-व्हिडिओ जिंगल्स आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डीबीटीद्वारे शिष्यवृत्ती योजना, रमाई घरकूल योजना या योजनांची माहिती ऑडिओ जिंगल्सद्वारे चित्ररथात असून त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना व नागरिकांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे.
       चित्ररथाच्या शुभारंभ प्रसंगी जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री वाळके, श्री.पारखे, श्री.राठोड, श्री.बागडे, श्री.भांडारकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.नरड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विश्वकर्मा, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.चंद्रिकापुरे यांच्यासह सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी मानले.

Thursday 23 November 2017

कोडेबर्राला गवसला विकासाचा मार्ग



       कोडेबर्रा... नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा अभयारण्यालगत असलेले गाव. तिरोडा तालुक्यातील कोडेबर्रा या आदिवासी बहुल गावात 109 कुटूंबाची वस्ती. 413 लोकसंख्या असलेल्या या गावात गोंड समाजाची संख्या जास्त आहे. या गावात ढिवर, लोहार आणि पोवार समाजाची 20 घरे आहेत. जंगलाच्या कुशीत वसलेल्या कोडेबर्रातील सर्वच कुटूंबाकडे थोडीफार शेती देखील आहे. जवळपास गावातील सर्वच शेतकरी हे अल्पभूधारक. केवळ धान हे एकमेव पीक ते घेतात. पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करीत असल्यामुळे उत्पन्नही कमीच. शेती ही जंगलाला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसानही इथल्या शेतकऱ्यांचे व्हायचे. व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात येणाऱ्या या गावातील कुटूंब हे स्वयंपाकासाठी जळावू लाकूड, शेतीसाठी लागणारी लाकडी अवजारे, पाळीव जनावरांना चारा व रोजगार या दैनंदिन गरजासाठी वनांवर अवलंबून असायचे. व्याघ्र प्रकल्पालगत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु झाली आणि कोडेबर्राला विकासाचा मार्गच गवसला.
      या योजनेअंतर्गत कोडेबर्रात स्थापन करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला दिशा मिळाली. ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष बंडू मरसकोल्हे व सचिव तथा वनरक्षक श्री.कापसे तसेच सातपुडा फाउंडेशनचे संरक्षण अधिकारी मुकूंद धुर्वे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन वनावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी गावातील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून शेतीपुरक जोडधंदे निर्मिती करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे, मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासोबतच ग्रामस्थांच्या माध्यमातून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जाणीव करुन देण्यात आली.
         वनाचे व वन्यजीवांचे महत्व कोडेबर्राच्या ग्रामस्थांना समजले. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेतून आपल्या विकासाला गती मिळेल याची खात्री त्यांना पटली. ग्राम परिस्थितीकी विकास समिती या योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आल्यामुळे या समितीच्या माध्यमातून वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या योजना कोणकोणत्या द्याव्यात याबाबत नियोजन करण्यात आले. सर्वप्रथम निर्णय घेण्यात आला की, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनासाठी आता जंगलात न जाता प्रत्येक घरी गॅस कनेक्शन असले पाहिजे. स्वयंपाकासाठी जळावू लाकडे जंगलातून आणणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय असे गावातील कुटूंबांना वाटले. स्वयंपाकासाठी लाकडे जंगलातून आणतांना वन्यप्राण्याने हल्ला केला तर जीव गमावून बसण्याची वेळ येईल. गाव बफर क्षेत्रात येत असल्यामुळे वनातून लाकडे गोळा करण्यावर सुध्दा वन्यजीव विभागाने निर्बंध आणल्यामुळे आता प्रत्येक कुटूंबाला गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय समितीने घेतला. जनवन योजनेतून कोडेबर्रातील 109 कुटूंबापैकी 100 कुटूंबाकडे गॅस कनेक्शन देण्यात आले. उर्वरीत 9 जणांना सुध्दा लवकरच हे कनेक्शन देण्यात येणार आहे.
      उघड्यावर शौचास बसण्याच्या दुष्परिणामाची जाणीव कोडेबर्राच्या ग्रामस्थांना झाली. जन-वन योजनेतून 27 कुटूंबांना शौचालये बांधून देण्यात आली. उर्वरीत कुटूंब सुध्दा लवकरच शौचालयाचे काम पूर्ण होणार आहे. गावातील 27 कुटूंबांना शेतीपुरक व्यवसाय उपलब्ध व्हावा यासाठी सन 2014-15 या वर्षात प्रत्येकी एक दुधाळ जर्सी गाईचे वाटप करण्यात आले. दररोज 250 ते 300 लिटर दुधाचे संकलन होते. हे कुटूंब दिनशा व खाजगी दूध डेअरीला 23 रुपये प्रती लिटर याप्रमाणे दुधाची विक्री करीत आहे. त्यामुळे या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. रोजगारानिमीत्त या कुटूंबांचे वनावरील अवलंबित्व दुधाळ जनावरांमुळे कमी झाले आहे.
       गावातील 100 कुटूंबांना गॅस ओटे बांधून देण्यात आले आहे. जंगलालगतच्या कोडेबर्रात पाऊस व वादळामुळे कधी कधी वीज पुरवठा खंडीत होतो तर कधी वीज भारनियमन होते. अशावेळी घरी शिक्षण घेणाऱ्या मुलांना रात्रीच्या वेळी अभ्यास करतांना अडचण जावू नये म्हणून 100 कुटूंबांना सौर कंदील वाटप केले आहे. 15 शेतकऱ्यांच्या शेतीला सौर कुंपन मंजूर झाले आहे. त्यामुळे जंगलालगत असलेल्या शेतीतील पिकाची वन्यप्राण्यामुळे नुकसान होणार नाही. शेतातील पीक सौर कुंपनामुळे सुरक्षीत राहण्यास मदत होणार आहे. 109 कुटूंबांना स्वयंपाकासाठी निर्धुर चुलीचे वाटप करण्यात आल्यामुळे महिलांची स्वयंपाक करतांना धुरामुळे डोळ्यांना होणारा त्रास बंद झाला आहे. जंगलालगतच कोडेबर्रातील शेतकऱ्यांची शेती आहे. जंगलातून येणारे वन्यप्राणी त्यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू होवू नये यासाठी 13 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला सुरक्षीत कठडे लावण्यात आले आहे.
       गावाच्या जवळच्या असलेल्या छोट्या तलाव खोलीकरणाचे काम व माती बंधाऱ्याचे काम करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जंगलातून येणारे पावसाचे पाणी तलावात अडवून सिंचनासाठी तर या पाण्याचा वापर होईलच सोबतच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे समितीचे अध्यक्ष बंडू मरसकोल्हे यांनी सांगितले. गावातील महिलांचे 6 बचतगट असून बचतगटातील महिला हया आर्थिक अडचणीच्या वेळी बचतगटातील पैसा उपयोगात आणतात तसेच अर्थोत्पादनात पतीला देखील हया महिला सहकार्य करीत आहे. माविमच्या सहयोगीनीच्या मार्गदर्शनामुळे त्या आता आत्मनिर्भर होत आहे.
        शारदाबाई मडावी म्हणाली की, पूर्वी आम्ही स्वयंपाकासाठी लागणारे लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात जात होतो. परंतू आता जनवन योजनेतून गॅस कनेक्शन देण्यात आल्यामुळे आम्ही इंधनासाठी होणारी भटकंती तर थांबलीच सोबत धुरमुक्त स्वयंपाक आम्ही करीत आहो. स्वयंपाक पण लवकरच होतो. कुटूंबातील चारही व्यक्ती आता गॅस उपलब्ध झाल्यामुळे आनंदी आहोत.
       डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेतून गावातील कुटूंबाच्या तसेच सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. या योजनेमुळे वनावरील अवलंबीत्व कमी होवून पर्यायी रोजगार सुध्दा उपलब्ध होत आहे. या योजनेमुळे मानव-वन्यजीव यांचे सहसंबंध वाढीला लागत आहे.

Tuesday 21 November 2017

सशक्त समाज निर्मितीसाठी जादूटोणा विरोधी कायदा उपयुक्त - पालकमंत्री बडोले

   समाजातील अनिष्ट परंपरा, वाईट चालीरिती, अंधश्रध्दा, शोषण व बुवाबाजीच्या नावावर होणारी लुटमार थांबविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा शासनाने केला आहे. या कायदयाची जनजागृती करण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करीत आहे. अंधश्रध्देचे निर्मुलन करुन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अत्यंत उपुयक्त असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखा गोंदिया व जादूटोणा विरोधी कायदा प्रचार-प्रसार अंमलबजावणी समितीच्या वतीने अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांचे 19 नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील संथागार येथे आयोजित वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी प्रा.श्याम मानव, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अनिसचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.प्रकाश धोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, तहसिलदार कल्याण डहाट, निशा भूरे, संजय झुरमूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, समाजातील अंधश्रध्देचे निर्मुलन व्हावे यासाठी प्रा.श्याम मानव हे अत्यंत चांगले काम करीत आहे. पाहिजे त्या प्रमाणात या कायदयाचा प्रचार-प्रसार होत नाही. मोठ्या प्रमाणात या कायदयाचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे. भोळ्याभाबळ्या लोकांना फसविण्याचे काम बुवाबाबा मंडळी करीत आहे. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. गाव पातळीपर्यंत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
      जादूटोणा विरोधी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, देवाधर्माच्या नावाने सामान्य माणसाची होणारी लुट थांबली पाहिजे. सामाजिक न्याय विभाग हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी वचनबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
      पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, शिक्षीत सुशिक्षीत मंडळीसुध्दा आज श्रध्देमुळे अंधश्रध्देला बळी पडत आहे. सुशिक्षीत आणि सुसंस्कृत समाज अंधश्रध्देला बळी पडणे म्हणजे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक आहे. जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायदयाची माहिती पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेमुळे कायदयाच्या तरतुदीची माहिती कशाप्रकारे गुन्हे दाखल करावे याची माहिती मिळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

      व्याख्यानामुळे कायदा प्रभावीपणे राबविण्यास उर्जा मिळणार असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्ह्यात या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुध्दा मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रकाश धोटे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार अमर वऱ्हाडे यांनी मानले.

जादूटोणा विरोधी कायदयाने प्रत्येक व्यक्ती विज्ञानवादी होईल - प्रा.श्याम मानव


       स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे. जादूटोणा विरोधी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी केली तर प्रत्येक व्यक्ती हा विज्ञानवादी होईल. असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक तथा राज्य जादूटोणा विरोधी कायदयाची अंमलबजावणी करणाऱ्या समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी केले.
        गोंदिया येथील संथागार येथे 19 नोव्हेंबर रोजी वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान देतांना प्रा.मानव बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.प्रकाश धोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, निशा भूरे, संजय झुरमूरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        प्रा.मानव पुढे म्हणाले, आमचा देवाधर्माला विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली सामान्य माणसाच्या फसवणूकीला आमचा विरोध आहे. वारकरी संप्रदायाने समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले. या प्रबोधनातून त्यांनी लोकांमधील अंधश्रध्दा दूर केल्या. अस्पृश्यता माणसाबाबत पाळली जायची, जातीयतेची दरी कमी करण्याचे काम सुधारकांनी केले. सुधारकीय मनोवृत्तीतून सामान्य माणसाला जागृत केले. संत परंपरा आणि बुवाबाजी ही वेगळी आहे. लहानपणी शिकविल्या जाते की, श्रध्दा ठेवली पाहिजे. ज्याच्यावर श्रध्दा ठेवायची त्याच्याबद्दल शंका ठेवू नये. श्रध्देचे रुपांतर केव्हा अंधश्रध्देमध्ये होते हे कळत नाही. त्यामुळे श्रध्दा ही डोळस असली पाहिजे, ती आंधळी नसावी. तिची चिकित्सा करता आली पाहिजे, यासाठी जादूटोणा विरोधी कायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
         जादूटोणा विरोधी कायदयानुसार गुन्हा घडत असेल तर पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे असे सांगून प्रा.मानव म्हणाले, मंत्राने साधा पापळ मोडता येत नाही. पापळ मोडणाऱ्या बाबाला 25 लक्ष रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल. मंत्राने माणूस मेला असता तर कट्यार बाळगता आली नसती. जगात कुणालाही करणी करता येत नाही. मानसिक रुग्णाचा वापर बाबा म्हणून कुणी करीत असेल तर तो गुन्हा आहे. नवसाने मुले झाली असती तर पती करण्याची गरज नसती असे तुकारामांनी अभंगात लिहिले आहे. गाडगेबाबांनी बुध्दीप्रामाण्यवाद कसा वापरायचा हे शिकविले असल्याचे त्यांनी सांगितले.
          वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया या विषयावर प्रकाश टाकतांना प्रा.मानव म्हणाले, डेरा सच्चा सौदाचा नायक बाबा राम रहीम हा एका रात्रीतून खलनायक कसा झाला. प्रसारमाध्यमांनी गुरुमीत राम रहिमच्या अनेक गोष्टी जगापुढे आणून खळबळ माजविली. स्त्रीयांचे शोषण करणाऱ्या गुरुमीत राम रहीम, पुण्याजवळच्या नारायणगाव परिसरातील केडगावकर महाराज, काटोलचे गुलाबबाबा, स्वामी विद्यानंद, स्वामी विद्यानंदचे वर्धेतील किस्से, आसारामबापूच्या रासक्रीडांची माहिती, आसारामबापूचा मुलगा नारायणसाईनेही मुलींचा कसा उपभोग घेतला याची माहिती, कृपाळू महाराज, रामस्नेही पंथाचा सुंदरदास महाराज, बंगलोरचा स्वामी नित्यानंद, हिवरा आश्रमचे शुकदास महाराज, स्वामी दत्तानंद निश्चल स्वामी, पाटीलबाबा यांनी केलेल्या महिला व मुलींच्या शोषणाचा लेखाजोखाच प्रा.मानवांनी मांडला. शेकडो मुलीचे व स्त्रीयांचे शोषण करणाऱ्या या बाबांना नेस्तनाबूत करण्याची ताकद या कायदयात असल्याचे दाखवून दिले आहे. अनेक बुवा-बाबा आज गजाआड असल्याचे त्यांनी सांगितले. काही धर्मातील पुरोहित, मौलवी, बाबा, पादरी हे धार्मिक तरतूदीचा वापर आपल्या फायदयासाठी करुन घेवून त्यातून स्त्री शोषणाचा मार्ग शोधून काढत असल्याचे सांगितले.
         प्रा.मानव म्हणाले, या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आहेत, तर सहअध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाल्याचे त्यांनी सांगितले. या कायदयाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

         वृक्ष तेथे छाया ! बुवा तेथे बाया हे अतिशय महत्वाचे वाक्य आचार्य प्र.के.अत्रे यांनी वापरल्याचे सांगून प्रा.मानव म्हणाले, जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही तसाच कोणताही बुवा बायकांशिवाय असू शकत नाही. पुण्याजवळच्या नारायणगाव परिसरातील केडगावकर हा उच्चभ्रू बाबा उच्चभ्रू सुशिक्षीत स्त्रीयांमध्ये अतिशय प्रसिध्द होता. तो महिलांचे शोषण कशाप्रकारे करायचा त्याच्या रासलिलांचा भांडाफोड आचार्य अत्रे यांनी केल्याचे प्रा.मानव यांनी सांगितले यावेळी त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या सर्व 12 कलमांची माहिती दिली. कार्यक्रमाला विद्याथी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार अमर वऱ्हाडे यांनी मानले.

Monday 20 November 2017

युवावर्गाने देशसेवेसाठी पुढे यावे - राजकुमार बडोले

गोंगले येथे सुरक्षा दौड

        आदिवासी व ग्रामीण भागातील मुले शारिरीकदृष्ट्या अत्यंत काटक असतात. मैदानी खेळात देखील ते सरस असतात. आदिवासी मुले नक्षल प्रवाहात न जाता विकासाच्या प्रवाहात यावी यासाठी पोलीस विभाग व प्रशासन तत्पर आहे. युवावर्गाने मैदानी खेळात आपले कौशल्य दाखवून पोलीस व सैन्य भरतीत सहभागी होवून देशसेवेसाठी पुढे यावे. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंगले येथे 19 नोव्हेंबर रोजी शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमधील करिअर घडविण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने आयोजित सुरक्षा दौड कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जि.प.सदस्य शिला चव्हाण, पं.स.सदस्य प्रमिला भोयर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, सांख्यिकी अधिकारी तुलसीदास झंझाड, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, सरपंच डि.यु.रहांगडाले, माजी सरपंच श्री.रहांगडाले, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, बिरसा मुंडा यांनी आदिवासींवरील अत्याचाराविरुध्द ब्रिटिशांशी लढा दिला. आज आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. हा समाज दारिद्रयरेषेखाली मोठ्या प्रमाणात असून यांच्याकडे शेती देखील कमी आहे. पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा दौड म्हणून जिल्हास्तरीय स्पर्धेतून इथले आदिवासी व ग्रामीण भागातील युवक-युवती राज्य व राष्ट्रीय पातळीवर जाण्यास मदत होईल. राष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्यातून जिल्ह्याचे नाव निश्चित उज्वल करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
       डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्हा हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. नक्षलविरोधी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींचे क्रीडा क्षेत्रात चांगले करिअर घडावे यासाठी सुरक्षा दौड आयोजित करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय दौड स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यशस्वी ठरणाऱ्या मुला-मुलींना प्रशिक्षणासाठी नागपूर, पुणे, अमरावती येथे पाठविण्यात येईल. पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र गोंगले येथे स्थापन करण्यात येणार असून या भागातील युवक-युवतींना प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. जीवनात काहीतरी करायचे आहे या प्रेरणेतून दौडमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
      सरपंच श्री.रहांगडाले म्हणाले, या भागातील मुला-मुलींचे करिअर घडविण्याचे स्वप्न पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र सुरु झाल्यानंतर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. गावातील बेरोजगार युवक-युवती यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांची गावात प्रभावी अंमलबजावणी करुन गावाच्या विकासाला गती देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी मुला-मुलींच्या 100 मीटर, 300 मीटर, 500 मीटर धावण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार विजय बिसेन यांनी मानले.

रस्त्यातील खड्डयाच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता नाही - चंद्रकांत पाटील

अभियंत्यासोबत साधला संवाद
           जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती 15 डिसेंबरपर्यंत करण्यात यावी. खड्डयांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व वाहतूक करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील रस्त्यांच्या खड्डयांच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 19 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतांना श्री.पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार गोपालदास अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव एफ.एस.मेश्राम, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        श्री.पाटील म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धोरणातून येत्या 6 महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागातील अनुकंपाची भरती लवकरच करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. खड्डे भरण्याच्या पलिकडचे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करुन मंत्रालयात पाठवावे. विशेष कार्य अधिकारी व मंत्रालयातील संबंधित यांच्याशी समन्वय साधून ही कामे गतीने करावी असे सांगितले.
         विभागीय पातळीवर विशिष्ट रक्कमेच्या कामाचे अधिकार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले, राज्यातील स्थापत्य क्षेत्रातील अभियंत्यांचा एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक असून त्यामधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकासाला दिशा मिळण्यास मदत होईल. रस्ते कोणतेही असले तरी त्या रस्त्यावरील खड्डे भरले गेले पाहिजे. अभियंत्यांनी काम करतांना जीव ओतून काम करावे. तसेच कामे करतांना सामाजिक बांधिलकी देखील जोपासावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
          पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातून जे राष्ट्रीय महामार्ग जातात त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. काही महामार्गावर खड्डे पडले असून रस्ते खराब झाले आहे. या रस्त्यांच्या साईडिंग व्यवस्थित भरण्यात न आल्यामुळे अशा ठिकाणी अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणांची तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरुस्ती करावी असे सांगितले.
        सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 च्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी सादरीकरणातून कामाची माहिती दिली. 173 कि.मी. लांबीची 11 कामे 5054 या अंतर्गत करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षात पूर्ण करण्यात आलेल्या पुलांच्या, इमारतीच्या बांधकामाची तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
           सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार यांनी आपल्या सादरीकरणातून माहिती देतांना सांगितले की, अड्याळ-दिघोरी-बोंडगाव-नवेगावबांध ते चिचगड रस्त्याचे काम केंद्रीय मार्ग निधीतून 90 टक्के पूर्ण झाले आहे. द्विवार्षिक रस्ते दुरुस्तीची कामे व कामाच्या प्रगतीबाबत तसेच रिक्त पदांबाबतची माहिती दिली.
         यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी उपस्थित काही अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. तणावातून काम न करता कुटूंबाला सुध्दा वेळ दिला पाहिजे असे सांगितले.
          सभेला राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती साखरवाडे, उपकार्यकारी अभियंता श्री.भोपे, उपविभागीय अभियंता सर्वश्री प्रकाश लांजेवार, विजय सोनुने, रुपचंद वासनिक, दिनेश नंदनवार, श्री.गणगे, प्रविण सुमंत, श्री.साहू, श्री.माटे तसेच दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंते व सहायक अभियंते यावेळी उपस्थित होते.

Saturday 18 November 2017

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील - राजकुमार बडोले

चक्रीवादळ बाधितांना धनादेश वाटप
        यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. अलिकडेच धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे दुष्काळाची स्थिती व दुसरीकडे तुडतुड्याचे संकट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      गोरेगाव तालुक्यातील तेढा येथे 17 नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालय गोरेगावच्या वतीने चक्रीवादळामुळे बाधित आपदग्रस्तांना धनादेशाचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, जि.प.सदस्य ज्योती वालदे, जि.प.माजी समाजकल्याण समिती सभापती कुसन घासले, संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, माजी जि.प.सदस्य जितेंद्र शेंडे, तेढा सरपंच रत्नकला भेंडारकर, उपसरपंच डॉ.विवेक शेंडे यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी देता येणार नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड करावी. यासाठी 3 हजार क्विंटल हरभरा अनुदानावर जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. उपग्रहाच्या आधारे यावर्षी दुष्काळाचे मोजमाप करण्यात आल्यामुळे तीनच तालुके मध्यम दुष्काळाचे घोषित करण्यात आले आहे. सडक/अर्जुनी व अर्जुनी/मोरगाव तालुक्यासह इतर तालुकेसुध्दा दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
     ज्यांनी रोवणी केली नाही त्यांना मोबदला देण्यासाठी शासन मदत करेल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, गोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यामुळे या तालुक्याला शासनाच्या निकषानुसार दुष्काळाच्या सवलती मिळणार आहे. या भागातील रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, दळणवळणाची चांगली रस्ते त्यामुळे निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
      यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.सदस्य ज्योती वालदे व सरपंच रत्नकला भेंडारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गोरेगाव तालुक्यातील 1165 घरांचे एप्रिल व मे 2016 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून त्यासाठी 31 लक्ष 6 हजार 50 रुपये निधी उपलब्ध झाला आहे. बाधितांना धनादेशाचे वाटप उर्वरित गावात सुध्दा करण्यात येणार आहे. तेढा येथील 161 घरांचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून 168 कुटूंबांना 5 लक्ष 15 हजार रुपये धनादेशाचे वितरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाधितांना करण्यात आले.
     तेढा व बाधित गावातील रामचंद्र भेंडारकर, छबीलाल अंबादे, सुमन टेंभूर्णेकर, डिगांबर खरोले, शांताबाई आस्वले, पुरणलाल पटले, छबीलाल पटले, बाबुलाल मेश्राम, हिरामन पटले, भागीरथा पंचभाई, देवलाबाई घासले, पार्बताबाई राऊत, रामचंद्र राऊत, बिजू भंडारी, झेलनबाई कोहळे, नंदलाल गाथे, दुलीचंद राऊत, प्रेमलाल वरकडे, अशोक पटले आदी बाधितांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. तेढा ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनो ! मोठी स्वप्ने बघा - पालकमंत्री बडोले

आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण
    राज्यातील 61 टक्के आदिवासी समाज हा आजही दारिद्रयरेषेखाली जीवन जगत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे. शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे विविध क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आदिवासी बांधव कमी आहेत. शासन आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक योजना असून विद्यार्थ्यांनी प्रगती साधण्यासाठी मोठी स्वप्ने बघावी व त्यासाठी कठोर परिश्रम करावे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      सडक/अर्जुनी येथे 17 नोव्हेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कार्यालयाच्या वतीने बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व विविध योजनांच्या साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती कविता रंगारी, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.माजी समाजकल्याण सभापती श्रावण राणा, माजी पं.स.सभापती संतोष मडावी, लक्ष्मीकांत धानगाये, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त दिपक हेडावू, उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार, शाखा अभियंता श्री.ताकसांडे, श्री.वासनिक, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी श्री.घुले, प्राचार्य जाधव यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, आदिवासी मुले ही शरीराने काटक असतात. खेळाच्या मैदानात ते आपली कर्तबगारी सिध्द करतात. त्यांना जर ॲथलेटिक्ससारख्या क्रीडा प्रकारात चांगले मार्गदर्शन मिळाले तर ते मोठी झेप घेवू शकतात. घरची परिस्थिती चांगली नाही त्यामुळे शिक्षण घेता येत नाही ही मानसिकता दूर झाली पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे तरच प्रगती होईल, सोबतच बेरोजगारी कमी होण्यास सुध्दा मदत होईल. विदेशात सुध्दा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अनेक आदिवासी बांधवांच्या पिढ्या दारिद्रयरेषेखाली जगल्या, पण येणाऱ्या पिढ्यांनी चांगले शिक्षण घेवून आपली प्रगती करावी असे आवाहनही त्यांनी केले.
      आमदार पुराम म्हणाले, वसतिगृहाच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक मोठ्या व्यक्ती वसतिगृहात शिक्षण घेवून मोठ्या पदावर गेले आहेत. वसतिगृहात राहतांना विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी आपल्या शिक्षणाकडे लक्ष दयावे. चांगले शिक्षण घेवून शिक्षणाच्या माध्यमातून वसतिगृहाचा नावलौकीक करावा. विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या चरित्रांचे वाचन करुन त्यांचा आदर्श पुढे ठेवून शिक्षण घ्यावे असेही ते म्हणाले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या रस्ते, इमारती हा विकास नसून आदिवासींची मुले-मुली शिक्षीत झाली तरच विकास झाला असे म्हणता येईल. सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या तर त्यांच्या विकासाला गती मिळेल. आदिवासी विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
      प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नव्यानेच बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. नाविण्यपूर्ण योजनेतून क्रीडा विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश व कीट देण्यात आली. तसेच आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
        कार्यक्रमाला आदिवासी वसतिगृहातील मुले-मुली त्यांचे पालक व विविध आदिवासी योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार जव्हार गाढवे यांनी मानले.