जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 30 November 2017

व्यक्तीमत्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथात - प्रा.नरेंद्र आरेकर

                              गोंदिया ग्रंथोत्सव-2017 परिसंवाद
     प्रत्येकाने आध्यात्मीक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. ग्रंथ हेच गुरु आहेत. मानवी जीवनाचे व्यक्तीमत्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथात आहे, असे प्रतिपादन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी केले.
    जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने बजाज सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवा निमित्ताने आयोजित ‘ग्रंथाने काय दिले’ या परिसंवादात श्री.आरेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे होते. प्रमुख अतिथी म्हणून कवी व साहित्यीक माणिक गेडाम, प्रा.डॉ.वर्षा गंगणे, प्रा.डॉ.सविता बेदरकर उपस्थित होत्या.
      श्री.आरेकर पुढे म्हणाले, पुस्तके माणसाला घडवितात. ग्रंथ ज्या स्वरुपाचे असतात त्याचप्रमाणे आपण घडत असतो. ग्रंथ माणसाला बहुश्रूत करतात. आपल्याला बोलण्याची शक्ती ग्रंथाने दिली आहे. चांगला वाचक असल्याशिवाय चांगला नेता होत नाही. ग्रंथांनी संतांचे अभंग दिले. ग्रंथ हे जगाकडे बघण्याची दृष्टी देतात. ग्रंथ हे आपल्याला प्रेरणा देतात. अन्यायाविरुध्द वाचा फोडण्याचे काम पुस्तके करतात. प्रत्येकाला आपल्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे. अवांतर पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. वाचन अविरत सुरु ठेवावे. मानवी जीवनाला समृध्द करण्याचे काम ग्रंथ करीत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.गेडाम म्हणाले, ग्रंथांनी समाजाची वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले आहे. निसर्ग हा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी मृत्यूंजय कादंबरी एकदातरी वाचावी, त्यातून प्रेरणा मिळेल. क्रमीक पुस्तकांसोबतच इतर साहित्याचे सुध्दा वाचन केले पाहिजे. अवांतर वाचन केल्याने ज्ञान समृध्द होते. वाचन हे भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. आत्मचरित्र लिहिण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
     प्रा.डॉ.गंगणे म्हणाल्या, सध्या वाचन संस्कृती लोप पावत आहे. आज पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आज वाचक हरवल्याचे दिसून येत आहे. ग्रंथांचे जतन केले पाहिजे. ग्रंथांमध्ये व्यक्तीमत्व निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. आई-वडिलांनी मुलांमध्ये पुस्तके वाचनाची आवड निर्माण करावी. पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडते, त्यामुळे प्रत्येकाने पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे. अनुकरणाची परंपरा जपल्या गेली तर वाचन संस्कृती जपली जाईल. ग्रंथांमध्ये मानवाचे भवितव्य निर्माण करण्याची शक्ती आहे. एखादया कार्यक्रमात आपल्याला भेट वस्तू दयायची असेल तर आपण पुस्तक भेट म्हणून दयावी असेही त्यांनी सांगितले.
      प्रा.बेदरकर म्हणाल्या, विचारांना प्रेरणा देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके आपले जीवन घडवितात. देशाला जर महासत्ता बनवायचे असेल तर देवालयात जाण्यापेक्षा ग्रंथालयात जाण्याची आज खरी गरज आहे. ग्रंथांनी आपल्याला खुपकाही शिकवले आहे. सावित्रीबाई फुले यांची प्रेरणेमुळेच यापुढेही काम करीत राहीन. ग्रंथांनी मला समृध्द केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.कटरे म्हणाले, मराठी ही आमची मायबोली आहे. झाडीबोली ही आपली मराठीची अमृत भाषा आहे. ग्रंथ हे माणसाला घडवितात. ग्रंथ वाचनाचा चांगला परिणाम होतो. ग्रंथ हे नेहमीच मदत करायला तयार असतात. वाचक घडवावा लागतो. विचारप्रवाह हे कधीही संपत नाही. जो संपतो तो वाद आणि जो प्रवाहीत राहतो तो विचारप्रवाह असतो. जीवनात प्रत्येकाला वाचणाची आवड असली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

      यावेळी मान्यवरांना भारतीय संविधान ग्रंथ म्हणून भेट देण्यात आले. शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नागपूर, नाथे पब्लीकेशन नागपूर, हिमालय पब्लीकेशन, अभिमन्यू बुक स्टॉल साकोली व जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल या ग्रंथोत्सव कार्यक्रमात लावण्यात आला होता. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शेषराव भिरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी मानले.

No comments:

Post a Comment