येरंडी येथे ग्राम स्वराज अभियान
केंद्र
सरकारच्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान
जिल्ह्यातील तीन गावात ग्राम स्वराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या योजनांचा
लाभ घेवून समृध्द व्हावे. असे प्रतिपादन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा
दयानिधी यांनी केले.
ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत निवड करण्यात
आलेल्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील येरंडी/देवल येथे 19 एप्रिल रोजी केंद्र
सरकारचे या अभियानाचे नोडल अधिकारी श्रीमती नाईक व श्री. राजेंदर कुमार यांनी भेट
दिली. यानिमित्ताने ग्रामस्थांशी संवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ.दयानिधी
बोलत होते. यावेळी केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानाच्या नोडल अधिकारी फरीदा
नाईक, श्री. राजेंदर कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.सदस्य गिरीष
पालीवाल, पं.स.उपसभापती करुणा नांदगाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री राजेश
बागडे, राजेश राठोड, भिमराव पारखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,
उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, सरपंच रेखा खोब्रागडे, तहसिलदार श्री.भंडारी, गटविकास
अधिकारी नारायण जमईवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.दयानिधी म्हणाले, यापुर्वी केंद्र
सरकारच्या या योजनांचा गावातील ज्या कुटूंबांना लाभ मिळालेला नाही त्यांनी या
अभियाना दरम्यान लाभ घ्यावा. सर्वांचे सहकार्य व सर्वांचा सहभाग या अभियानात
आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती
विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या तीन योजनांचा गावातील प्रत्येक
व्यक्तीने लाभ घ्यावा. यासाठी प्रत्येकाने बँक खाते काढावे. मिशन इंद्रधनुष्य
अंतर्गत गावातील कुठलाही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे त्यांनी
सांगितले.
श्रीमती
नाईक म्हणाल्या, जिल्ह्यातील यंत्रणा या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.
केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत असलेल्या सात योजनांचा लाभ गावातील
प्रत्येक कुटूंबांनी घेतला पाहिजे, यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यास तसेच
मार्गदर्शन करण्यास आपण आल्याचे त्यांनी सांगितले.
विमा
योजनेचा लाभ येरंडी ग्रामस्थ कमी प्रमाणावर घेत असल्याचे दिसून आले आहे असे सांगून
श्रीमती नाईक म्हणाल्या, ग्रामस्थांनी स्वत:चे आरोग्य व सुरक्षेचा विचार करुन या
विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी बँकेचे अधिकारी-कर्मचारी आपल्या गावात आले आहे.
गावातील प्रत्येक घरी एलईडी बल्ब असले पाहिजे, त्यामुळे वीज बिलात बचत होते. ज्यांच्याकडे
शौचालय नाही त्यांनी योजनेच्या लाभातून शौचालय बांधून घ्यावे. शौचालयाचा वापर
देखील कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने करावा असेही त्या म्हणाल्या.
श्री.जितेंदर
कुमार म्हणाले, केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत ज्या सात योजनांचा
लाभ ग्रामस्थांना मिळणार आहे त्यामाध्यमातून ग्रामस्थ समृध्द होण्यास मदत होणार
आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीने या योजनांचा लाभ घ्यावा. कुणीही उघड्यावर शौचास
बसणार नाही याची प्रत्येकाने शपथ घ्यावी आणि स्वच्छतेला महत्व दयावे असे त्यांनी
यावेळी सांगितले.
प्रारंभी केंद्र सरकारचे नोडल अधिकारी
श्रीमती नाईक व श्री.राजेंदर कुमार यांनी हेमराज रामटेके या लाभार्थ्याच्या घरी
जावून आवास योजनेच्या घरकुलाचे भूमीपूजन केले तर धीरज पंचभाई या लाभार्थ्याच्या
घरी शौचालय बांधकामाचे भूमीपूजन केले.
यावेळी वीज वितरण कंपनीने सौभाग्य
योजनेअंतर्गत 19 कुटूंबांना वीज जोडणी तर उजाला योजनेअंतर्गत ग्रामस्थांनी 28
एलईडी बल्ब खरेदी केल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री.लिमजे यांनी
दिली. येरंडी गावात 56 कुटूंबांकडे बँक खाते नसून त्यांचे बॅंक खाते या
अभियानादरम्यान काढणार असल्याची माहिती देना बँकेचे अधिकारी श्री.मिश्रा यांनी
दिली. गावातील 246 कुटूंबांकडे गॅस कनेक्शन असून 93 कुटूंबांना गॅस कनेक्शनचे वाटप
या अभियानादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार श्री.भंडारी यांनी
दिली. गावातील एक बालक बाहेरगावी असल्यामुळे लसीकरणापासून वंचित आहे, त्याचेही
लवकरच लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे मिशन इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत कोणताही बालक
लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे तालुका आरोग्य
अधिकारी डॉ.विजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी नोडल अधिकारी श्रीमती नाईक व
श्री.राजेंदर कुमार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून
घेतल्या व केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला येरंडी
येथील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ, तालुक्यातील विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी,
सर्व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी नारायण जमईवार
यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी तर उपस्थितांचे आभार विस्तार
अधिकारी आर.डी.वलथरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment