भिमघाट
येथे अशोक स्तंभाचे लोकार्पण
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी
केलेले धर्मांतर हे सम्राट अशोकानंतरचे सर्वात मोठे धर्मांतर होते. सम्राट अशोकाच्या
कालखंडानंतर बुध्द धम्म जगभर पोहोचला. बुध्दाचे तत्वज्ञान हे विज्ञानावर
त्याचबरोबर स्वातंत्र, समता आणि बंधुता यावर सुध्दा आधारित आहे. सम्राट अशोकाने
जगभर विविध ठिकाणी उभारलेल्या अशोक स्तंभाच्या माध्यमातून बुध्द धम्म जगभर
पोहोचला. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
केले.
गोंदिया येथील पांगोली नदी काठावरील
भिमघाट येथे 28 मे रोजी आठव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण व पुरस्कार वितरण ना.आठवले
यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून भंते महाथेरो डॉ.राहूल
बोधी, डॉ.अशोक शिलवंत, डॉ.प्रशांत पगारे, माजी आमदार अनिल गोंडाणे, बुध्दीस्ट
सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, भुपेश थुलकर, नगराध्यक्ष
अशोक इंगळे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सदस्य सुलक्षणा शिलवंत, जि.प.सदस्य
विश्वजीत डोंगरे, गोंदिया न.प.सभापती दिलीप गोपलानी, विनोद किराड, राजा बंसोड व रमेश
टेंभरे यांची उपस्थिती होती.
श्री.आठवले पुढे म्हणाले, सम्राट अशोकांनी
अनेक स्तुप निर्माण केले. त्यापैकी सांचीचा स्तुप हा एक असून तो जगप्रसिध्द आहे.
डॉ.आंबेडकरांनी समतेची भूमिका मांडली. माणसाला माणसाशी जोडणारी भूमिका मांडली.
डॉ.आंबेडकरांनी माणसाला माणूस बनविणारा धम्म, मनातील अहंकार संपुष्टात आणणारा
धम्म, बुध्दीवादी धम्म, विज्ञानवादी धम्म अशाप्रकारच्या धम्माचा स्विकार डॉ.बाबासाहेब
आंबेडकरांनी केला. डॉ.आंबेडकरांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांच्या विचारांची
चळवळ चालविण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत.
अशोक शिलवंत यांनी 14 पैकी आठवा अशोक
स्तंभ गोंदिया येथे उभारल्याचे सांगून श्री.आठवले त्यांचे कौतुक करतांना म्हणाले,
या ठिकाणी उभे केले आहे अशोकाने स्तंभ आठ
म्हणून मी थोपाटतो तुमची पाठ.
तुम्ही उभे करा स्तंभ चौदा,
पण करु नका कोणाबरोबर सौदा.
आज मी पाहिला आहे गोंदियाचा भिमघाट,
म्हणून मी लावणार आहे एक दिवस भिमाच्या
दुष्मनाची वाट
तोडून जातीयतेचे बंधन, मी करतो या अशोक
स्तंभाला वंदन
माझ्या हृदयात नेहमीच आहे भिमाच्या
आणि बुध्दाच्या विचाराचे स्पंदन
म्हणून मी एक दिवस करणार आहे
विषमतेचे रणकंदन.
वरील ओळीने उपस्थितांच्या प्रचंड टाळ्या
घेतल्या. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती निमित्त केंद्र व राज्य शासनाच्या
निधीतून ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेले होते व त्यांनी तिथे सभा घेतल्या अशा
ठिकाणी हे स्तंभ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री
राजकुमार बडोले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 23 एप्रिल 1954 मध्ये या
स्थळाला भेट दिली होती. परंतु अनेक वर्ष या पवित्र स्थळाचा विकास झाला नाही.
राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून या भिमघाट स्मारकाच्या विकासासाठी 1 कोटी
रुपये मंजूर केले आहे. अशोक शिलवंत हे देशात प्रमुख 14 ठिकाणी अशोक स्तंभ उभारत
आहे. त्यांना इथे अशोक स्तंभ उभारण्याची विनंती केली असता, ती त्यांनी मान्य
केल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील महत्वाच्या अशाप्रकारच्या
ठिकाणाचा विकास करण्यासाठी निधी दिला असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले,
त्याचबरोबर 36-36 योजनेतून प्रस्ताव आल्यास त्याला देखील निधी देण्यात येईल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या महत्वपूर्ण 28 स्थळांचा विकास
करण्यात येत आहे. लंडन येथे डॉ.आंबेडकरांनी वास्तव्य केलेले घर खरेदी करण्यात आले
आहे. इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारुन 350 फुटाचा डॉ.आंबेडकरांचा पुतळा
उभारण्यात येईल. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या
जयंतीचे औचित्य साधून त्यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
करण्यात येत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, बौध्द विवाह कायदा, आंतरजातीय
विवाह कायदा व केंद्रात बौध्दांना आरक्षण देण्याचा कायदा अस्तित्वात यावा यासाठी
आपले प्रयत्न सुरु आहे. यासंबंधाने बैठकाही घेण्यात आल्या आहे. अनुसूचित जातीचा
विकास झाला पाहिजे यासाठी शासनाच्या विविध योजना नियोजनबध्द पध्दतीने राबविण्यात
येत आहे. ज्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे त्यामध्ये सुधारणा निश्चित
करण्यात येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांच्या विचाराला वाहून
घेण्याचे काम केले. हे अशोक स्तंभ त्यांच्या विचाराच्या प्रसाराचे प्रतिक असल्याचे
त्यांनी सांगितले.
भंते डॉ.राहूल बोधी म्हणाले, तळागाळात
जोर-जबरदस्तीने ठेवलेल्या माझ्या समाजाचा कसा उध्दार होईल याचे स्वप्न
डॉ.आंबेडकरांनी बघितले होते. या समाजाला जर संधी मिळाली तर आपल्या कर्तव्याने हा
समाज प्रगती करु शकतो. प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी मिळाली पाहिजे, यासाठी
त्यांन संपूर्ण जीवनभर प्रयत्न केले.
डॉ.आंबेडकर ज्यावेळी आंदोलन करीत होते
त्यावेळी या समाजात एकही आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकारी नव्हता असे सांगून डॉ.बोधी
म्हणाले, डॉ.आंबेडकरांनी निर्माण केलेल्या मार्गाने जर आमची माणसे चालली तर ते
कलेक्टर, कमिश्नर बनतील, मंत्री खासदार पण होतील. मोठ्या पदाच्या जागा ते मिळवू
शकतील. एवढा त्याग करण्याची शक्ती या समाजात आहे, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी
ओळखले होते. जगातील 134 देश बौध्दमय आहेत. या देशातील नागरिक बुध्दाच्या तत्वज्ञानाचे
पालन करतात. डॉ.आंबेडकरांमुळे आपल्याला जगातील महान बुध्द धम्म लाभला आहे. हे अशोक
स्तंभ इतिहास निर्माण करुन जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेवून आठव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण केले. यावेळी
मान्यवरांच्या हस्ते अशोक रत्न पुरस्काराने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले, अशोक विभूषण पुरस्काराने सुर्तीसेन वैद्य, अनिल सुखदेवे, अजित
मेश्राम, अशोक भूषण पुरस्काराने भागवत गायकवाड, अशोक बेलेकर, अशोक मित्र
पुरस्काराने विश्वजीत डोंगरे, संतोष बिसेन, सुरेंद्र खोब्रागडे, संघमित्र
पुरस्काराने नागाबाई पोपलवार, समता गणवीर, अशोक काव्य भूषण पुरस्काराने डॉ.नुरजहा
पठाण, महेंद्र पुरस्काराने यादव मेश्राम व मिलिंद बांबोळे यांना सन्मानीत करण्यात
आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक शिलवंत
यांनी केले. संचालन धनंजय वैद्य यांनी, तर उपस्थितांचे आभार श्याम चौरे यांनी
मानले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment