जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 24 February 2017

नवेगावबांधला गत वैभव प्राप्त करुन देणार - पालकमंत्री बडोले

                                                                  बोटींगचा शुभारंभ
                       
                                       
                                                                                निसर्गाने नवेगावबांधला भरभरुन दिले आहे. परंतू आजपर्यंत तलाव परिसरात असलेल्या नैसर्गीक साधन संपत्तीचा योग्य वापर झालेला नाही. इथे जास्तीत जास्त पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नवेगावबांध तलाव परिसराला गत वैभव प्राप्त करुन देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
      24 फेब्रुवारी रोजी नवेगावबांध जलाशय परिसरात वन विभागाच्या नवेगावबांध संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या बोटींगचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, माजी आमदार तथा नवेगावबांध संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयाराम कापगते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी व्ही.जी.उदापुरे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे, माजी सरपंच रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, अण्णा-पाटील डोंगरवार, रामदास बोरकर, विजय डोये, घनश्याम चांदेवार यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री पुढे म्हणाले, नवेगावबांधला येणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर आहे. परंतू येथे सुविधा नसल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. आता बोटींगचा सुविधा सुरु झाली आहे. भविष्यात इथे बिचेस, रोप वे, वॉटर पार्क तयार करुन याचे सौंदर्य जपतांना येत्या दोन वर्षात नवेगावबांधचा कायापालट करण्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टीने इथे रिसॉर्टची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. बोटींग करतांना कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटकांचा ओढा वाढल्यानंतर बोटींगची संख्याही वाढविण्यात येईल. असेही ते यावेळी म्हणाले.
      डॉ.रामगावकर म्हणाले, नवेगावबांध जलाशयात बोटींगचा शुभारंभ हा इथल्या पर्यटनाची सुरुवात आहे. भविष्यात इथे अनेक योजना राबवायच्या आहेत. पर्यटकांना चांगल्या सुविधा करुन देण्यासाठी वन विभाग पुढाकार घेईल. पर्यटन वाढल्यास बेरोजगारांच्या हाताला काम सुध्दा उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची आवड या भेटीतून निर्माण होईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
     माजी आमदार कापगते म्हणाले, नवेगावबांध येथे राष्ट्रीय पक्षी अभयारण्य आहे. हा परिसर विविधतेने नटलेला आहे. त्याचा विकास झाला पाहिजे. अभयारण्यात चांगल्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. पर्यटकाला या परिसरात आल्यानंतर संपूर्ण दिवसभर फिरण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आता इथे बोटींगची सुविधा उपलब्ध झाली आहे. भविष्यातही आणखी सुविधा इथे निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      बोटींगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या 2 रोवींग बोट, दोन व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या 2 पॅडल बोट आणि 2 कॅग बोट बोटींगच्या सुविधेसाठी उपलब्ध झाल्या आहे. 20 बेरोजगार युवकांनी याचे प्रशिक्षण घेतले असून 3 जणांनी लाईफ गार्डचे प्रशिक्षण घेतले आहे. बोटींगची फी 20 मिनिटांसाठी 30 रुपये आकारण्यात येणार आहे.
      कार्यक्रमाला नवेगावबांध संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.खान यांनी केले. उपस्थितांचे आभार वन विभागाचे श्री.शेंडे यांनी मानले.

1 comment:

  1. उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली.

    ReplyDelete