सावराटोली
पोलीस चौकीचा शुभारंभ
शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षापासून इथे
पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती. इथल्या परिसरातील नागरिकांच्या, उत्पादित माल
बाजारपेठेत आणणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या चौकीमुळे सुरक्षा व्यवस्था
निर्माण होवून मोठ्या प्रमाणात व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल. असे प्रतिपादन
राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
आज 17 फेब्रुवारी रोजी गोंदिया कृषि
उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सावराटोली पोलीस चौकीचा शुभारंभ आ.अग्रवाल यांच्या
हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते
बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून
पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, कृषि उत्पन्न
बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते
कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. आ.अग्रवाल यांनी फित कापून तंबूतील चौकीचा शुभारंभ
केला. शुभारंभ केल्यानंतर चौकीला भेट दिल्याची पहिली नोंद जिल्हाधिकारी काळे यांनी
केली.
आमदार अग्रवाल पुढे म्हणाले, पोलीस
चौकीच्या सुविधेमुळे धान व्यापार इथे आणता येईल. भाजी मार्केट सुध्दा इथे आले
पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, स्टेट बँकेची शाखा इथे उघडण्यात येणार
आहे. निवडणूकीच्या काळात पोलीस विभागाने चांगले काम केले आहे. जनतेच्या
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसांनी काम करावे. रामनगर, सिटी पोलीस स्टेशन, रावणवाडी
पोलीस स्टेशनच्या इमारती आणि 144 पोलीस क्वॉर्टरची कामे येत्या सहा महिन्याच्या आत
सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावराटोली पोलीस चौकी 24 तास सुरु
असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, पांढराबोडी व
काटी येथेही पोलीस चौकी सुरु करण्यात येईल. गोंदिया शहराचे सिटी सर्व्हेक्षण
झाल्यास गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल. सिटी सर्व्हेक्षणासाठी राज्य
सरकारकडून निधी मिळवून देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया
सिटी सर्वेच्या दृष्टीने नगर परिषद पुढाकार घेईल. वादाची सुरुवात ही जमिनीपासून
होते. गोंदिया शहरात जमिनीच्या किंमती सोन्यापेक्षा जास्त आहे. राज्यातील सर्व
जमीन मोजणीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या 1 मार्च रोजी शहरातील
जागेच्या मोजणीच्या दृष्टीने बैठक घेण्यात येईल. पोलिसांनी कठोर प्रतिबंधात्मक
उपाययोजना करण्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल. असेही ते यावेळी म्हणाले.
श्री.इंगळे
म्हणाले, लोकहिताच्या दृष्टीने पोलिसांनी कायदयाची अंमलबजावणी करावी. सामान्य
जनतेचे हित साध्य करण्यासाठी ही चौकी उपयुक्त ठरणार आहे. गोंदिया शहरात अपराधी
टोळ्यांनी जनतेला त्रस्त करुन सोडले आहे. शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाला सहकार्य
करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडू असेही ते यावेळी म्हणाले.
प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक
डॉ.भूजबळ म्हणाले, गोंदिया शहरात देशाचे छोटे स्वरुप दिसून येते. सर्व जाती
धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. पोलीस चौकी उभारुन पोलीस
केंद्राचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. सावराटोली परिसरात गुन्हेगारांचा वावर
असल्याचे सांगितले जाते. ही गुन्हेगारी निश्चित आपण मोडीत काढू. या परिसरात
सुरक्षीतता व शांतता नांदण्यास या चौकीची मदत होणार आहे. चौकीमुळे पोलिसींग
चांगल्याप्रकारे करण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी धनलाल
ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते सावराटोली पोलीस
चौकीचे पोलीस हवालदार विजय गुरपुडे, पोलीस नाईक ओमेश्वर मेश्राम व संदिप नाईक
यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. कार्यक्रमाला कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक,
शेतकरी, व्यापारी, नागरिक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची मोठ्या
संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले.
उपस्थितांचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले.
No comments:
Post a Comment