महासमाधान शिबीर
सडक/अर्जुनीत 18,384 लाभार्थ्यांना लाभ
सडक/अर्जुनीत 18,384 लाभार्थ्यांना लाभ
शासनाच्या विविध योजनांची
माहिती व त्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होत
आहे. या शिबिरातून शासन आपल्या दारी आले आहे. गरजु व पात्र लाभार्थी हा योजनांच्या
लाभापासून वंचित राहू नये यासाठी महासमाधान शिबिरे ही लोकचळवळ झाली पाहिजे. असे
प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात
आज 22 फेब्रुवारी रोजी महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित महावितरण महासमाधान आणि
दिव्यांग स्वावलंबन अभियानाच्या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत
होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र
रामगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, पं.स.सभापती कविता रंगारी, गोंदिया
नगराध्यक्ष अशोक इंगळे, सडक/अर्जुनी नगराध्यक्ष रिता लांजेवार, पं.स.उपसभापती
विलास शिवणकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे,
गिरीधारी हत्तीमारे, श्रीमती मडावी, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, उपविभागीय
पोलीस अधिकारी मंदार जवळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत
धानगाये, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.अविनाश काशीवार, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी राजेश बागडे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार
केशव वाभळे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री
बडोले पुढे म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून 51 योजनांचा लाभ गावपातळीवरच्या
लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. या शिबिरामुळे गावातील कोणत्या कुटुंबांना किती
योजनांचा लाभ दिला तसेच किती योजनांच्या लाभाची आवश्यकता आहे याची परिपूर्ण माहिती
उपलब्ध झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ
करण्याची आवश्यकता आहे. यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या
पुढाकारामुळे शिबिराच्या माध्यमातून 18,384 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
गावातील कुटुंबांना जास्तीत जास्त गॅस कनेक्शनचे वितरण वन विभागाने करावे अशी
अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्याचा समाजकल्याण मंत्री म्हणून अनेक
योजना कार्यान्वीत केल्याचे सांगून लंडन येथील डॉ.आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले
घर खरेदी केले. इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरच सुरु करण्यात
येणार आहे. 125 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील डव्वा, कालीमाटी येथील बौध्दविहार
आणि गोंदिया येथील भिमघाटाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुढील
तीन महिन्यात ओबीसी मंत्रालयाचे कामकाज सुरु होईल. नवेगावबांध येथे 8 कोटी रुपये
खर्चून रिसॉर्टचे बांधकाम सुरु आहे. प्रतापगड विकासाला गती मिळाली आहे. मामा
तलावांची दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती, मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा
योजना गावांसाठी कार्यान्वीत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती गहाणे म्हणाल्या, शासन विविध
घटकांसाठी योजना राबविते. या भागातील नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात योजनांचा
लाभ मिळाला नाही. या अभियानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात
येत आहे.पूर्वी एका कागदपत्राच्या पूर्ततेसाठी अनेकदा विविध कार्यालयात
लाभार्थ्याला चकरा माराव्या लागत होत्या. मात्र या शिबिरामुळे लाभार्थ्याला
जागेवरच लाभ देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात बहुतांशी नागरिकांना योजनांचा लाभ
देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
डॉ.रामगावकर म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून
विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध
योजनांची माहिती देखील मिळत आहे. जिल्ह्यात 50 टक्के पेक्षा जास्त वने असल्यामुळे
अनेकांना त्याचा लाभ होत आहे. गेल्या दोन वर्षात 18 हजार कुटुंबांना गॅस कनेक्शनचे
वाटप करण्यात आले आहे. अनेक योजना आता ऑनलाईन झाल्या आहेत. गावाशेजारी असलेल्या
वनाची जबाबदारी ग्रामस्थांवर सोपविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
श्री.मोहिते म्हणाले, वेगवेगळी प्रमाणपत्र व
साहित्य वितरण करण्यासाठीच शिबिराचे आयोजन करण्यात येत नसून तर जनसामान्यांचे
प्रश्न लोकप्रतिनिधीसमोर मांडण्याची ही संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. शासनाच्या
लोकाभिमुख योजना प्रत्यक्ष लाभ देवून पूर्ण करण्यात येत आहे. प्रत्येक गाव व
नागरिकाला आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी शासन कार्यरत आहे. लोकांचे समाधान या
शिबिरातून करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती रंगारी म्हणाल्या, ज्यांना या
शिबिरात योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांनी निराश होऊ नये. कागदपत्रांची पूर्तता
करुन भविष्यात योजनांचा लाभ घ्यावा. शेतकरी, गरीब लाभार्थ्यांना शासनाच्या विविध
योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी पालकमंत्री सातत्याने प्रयत्नशील असल्याचे
त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्र्यांनी प्रांगणात
लावलेल्या स्टॉलचे उदघाटन केले व विविध स्टॉलची पाहणी केली. यावेळी पुरवठा,
आदिवासी विकास, आरोग्य, एकात्मिक बालविकास, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता, जिल्हा उद्योग केंद्र , महावितरण, पोलीस, राज्य महामार्ग परिवहन
महामंडळ, लोकराज्य स्टॉल, सामाजिक न्याय, महात्मा फुले महामंडळ, मुद्रा बँक, जनधन,
जीवन ज्योती, पशुसंवर्धन, महिला आर्थिक विकास महामंडळ, मत्स्य व्यवसाय, राजश्री
शाहू महाराज कृषि विद्यालय, वन आदि विभागाची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले
होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग
स्वावलंबन अभियानाअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप, राज्य अपंग वित्त व विकास
महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना थेट कर्ज योजनेचे 20 हजार रुपयाचे धनादेश, वैयक्तीक
थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजूरीपत्र देण्यात आले. महात्मा फुले
महामंडळाअंतर्गत लाभार्थ्याला 10 हजार रुपये धनादेश, इतर मागासवर्ग
महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये धनादेश. वसंतराव नाईक
महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना 25 हजार रुपये धनादेश. संजय गांधी निराधार योजना
श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नविन
शिधापत्रिका, दुय्यम प्रत, जात प्रमाणपत्र, वर्ग-2 चे वर्ग-1 प्रकरण, वाटणीपत्र,
वनहक्क पट्टे वाटप, भूमी अभिलेख मोजणी क प्रत वाटप, जमीन सुपिकता प्रमाणपत्र,
ट्रॅक्टर अनुदान, नॅपसॅक हायटेक स्प्रेपंप, म्हैस खरेदी धनादेश वाटप, शेळी संच
धनादेश वाटप, रमाई आवास योजनेअंतर्गत सौर कंदील व ब्लँकेट वाटप, प्रधानमंत्री आवास
योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पिव्हीसी पाईप वाटप, मुद्रा बँक लोन,
पीओएस मशीन वाटप, सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत पासबुक वाटप, वनविभागामार्फत
एलपीजी गॅसचे वितरण, महावितरणकडून घरगुती वीज कनेक्शन, कृषिपंप कनेक्शन, सौर ऊर्जा
कृषिपंप आदी योजनेच्या 18 हजार 384 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
यावेळी महासमाधान शिबिराच्या यशस्वी
आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचाही
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवोदय विद्यालय नवेगावबांध व
आश्रमशाळेच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर करुन उपस्थितांकडून प्रशंसा मिळविली.
कार्यक्रमाला सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक गावातील नागरिक, लाभार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी
केले. संचालन अनिल मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार प्रभार गटविकास अधिकारी
झामसिंग टेंभरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment