जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 27 July 2016

समाधान शिबिरामुळे शासन, यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत - डॉ.विजय सूर्यवंशी


: विविध योजनांचा लाभ हा गरजू लाभार्थ्याला मिळाला तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. समाधान शिबीरातून लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळाल्यास त्याला योजनांचा लाभ घेणे सोयीचे होते. अशा प्रकारच्या समाधान शिबीरामुळे शासन, विविध यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत होत आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
          आज 27 जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात महाराजस्व अभियानांतर्गत महासमाधान शिबीराच्या पूर्व तयारी निमित्ताने आयोजित दिव्यांग स्वावलंबन अभियान समाधान शिबीराचे उदघाटक म्हणून डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी माजी आमदार दयाराम कापगते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव डोंगरवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प.सदस्य मंदा कुमरे, तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर यांची प्रमुख अतिथी म्हणून तर मंचावर तहसिलदार सिध्दार्थ भंडारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी समाधान शिबिरात नागरिकांचे समाधान ज्या प्रमाणे करीत आहे त्या प्रमाणे कार्यालयात कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांचे समाधान करावे. समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. अनेक नागरिक विविध योजनांची माहिती जाणून घेतांना व लाभ मिळण्यासाठी अर्ज भरतांना दिसत आहे. पालकमंत्री बडोले साहेबांच्या प्रयत्नांमुळे हे शिबीर होत आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          माजी आमदार कापगते म्हणाले, शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. परंतू समाधान शिबिराच्या आयोजनामुळे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळत आहे व लाभ घेणे सोयीचे होत आहे.
          श्रीमती गहाणे म्हणाल्या, समाधान शिबीर हे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास व लाभ घेण्यास उपयुक्त ठरत आहे. समाधान शिबीरामुळे कमी कालावधीत योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. शिबीरामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाही असे सांगितले.
          शिबीराला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावपातळीवरील विविध यंत्रणांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध यंत्रणांच्या स्टॉलमधून लाभार्थ्यांना व नागरिकांना योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी अर्जाचे वाटप करण्यात आले.

          यावेळी लाभार्थ्यांना व मृतकांच्या वारसांना योजनेचे धनादेश वाटप केले. जवळपास 17 हजार नागरिक व लाभार्थ्यांनी या शिबीरात आपली नोंदणी केली. दिव्यांग स्वावलंबन अभियानाची तसेच समाधान शिबीराविषयीची माहिती गजानन वाघ यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार तथा उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी केले. संचालन प्रा.डॉ.दिलीप नाकाडे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment