जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 24 July 2016

प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न - पालकमंत्री राजकुमार बडोले


     शासन आपल्या दारी या संकल्पनेतून महाराजस्व अभियानाअंतर्गत ऑगस्ट महिन्यात महासमाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध 50 पेक्षा जास्त योजनांचा लाभ 40 हजार लाभार्थ्यांना देण्याचे निश्चित केले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
          आज 24 जुलै रोजी सडक/अर्जुनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नविन इमारतीत महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित पूर्व तयारी समाधान शिबिराचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी बी.आर.लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          शासनाच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, यासाठी सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व गोरेगाव तहसिल कार्यालय येथे स्वतंत्र समाधान नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांनी पूर्व समाधान शिबिरानंतर परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह समाधान कक्षात सादर करावे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देणे शक्य होईल. दिव्यांग व्यक्तींना सुध्दा त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक योजनेचा फायदा प्रत्येक कुटुंबाला मिळाला पाहिजे यासाठी लाभार्थ्यांनी या शिबिरातील स्टॉलवरुन विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          डॉ.सूर्यवंशी म्हणाले, पूर्व तयारी समाधान शिबिरात उपस्थित लाभार्थ्यांची संख्या बघून खऱ्या अर्थाने समाधान होत आहे. येथे असलेल्या विविध स्टॉलवरुन योजनांचे अर्ज लाभार्थ्यांनी परिपूर्ण भरुन समाधान नियंत्रण कक्षात सादर करावे. हक्काने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जावून लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ मिळण्याची मागणी करावी. परिपूर्ण भरलेल्या अर्जामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
          डॉ.पुलकुंडवार म्हणाले, आजच्या पूर्व तयारी समाधान शिबिराला मिळालेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद उदंड आहे. पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे. परंतू योजना हया खऱ्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. त्यांनीच या योजनांचा खऱ्या अर्थाने लाभ घेतला पाहिजे. लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान उंचवावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
          यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सडक/अर्जुनी तालुक्यातील प्रविण मत्स्यपालन सहकारी संस्था मालीगुंजा या संस्थेचे सदस्य जनीराम मेश्राम यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदार पत्नी धर्मशिला मेश्राम यांना केंद्र पुरस्कृत अपघात गटविमा योजनेचा 1 लक्ष रुपयाचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाला सडक/अर्जुनी तालुक्यातील विविध गावातील जवळपास 13 हजार लाभार्थी उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांनी विविध विभागाच्या स्टॉलला भेट देवून त्यांच्याशी संबंधित असलेल्या योजनांची माहिती जाणून घेतली. योजनांचा लाभ घेण्यासाठी काही लाभार्थ्यांनी तेथेच अर्ज भरले. आता 6 ऑगस्ट पर्यंत तालुक्यातील सर्व लाभार्थी विविध योजनांचा लाभ मिळण्याबाबतचे अर्ज तालुका समाधान नियंत्रण कक्षात पुरक कागदपत्रासह सादर करणार आहे.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व बार्टीच्या समता दुतांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाला जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. संचालन श्री.मेश्राम यांनी, तर उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी बी.आर.लोकरे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment