राज्यातील शेतकऱ्यांची
कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज
भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या 15 सप्टेबर पर्यंत कर्जमाफीबाबतची
कार्यवाही प्रशासनाने पूर्ण करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी
दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात 24 ऑगस्ट रोजी कर्जमाफी व पीक परिस्थितीच्या आढावा सभेत पालकमंत्री
बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी
अधिकारी रविंद्र ठाकरे, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
अनिल इंगळे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी.शिंदे, जिल्हा अग्रणी प्रबंधक
दिलीप सिल्हारे, सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक मिलींद आटे, जलसंपदा
विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वश्री गेडाम, ढोरे, छप्परघरे यांची प्रामुख्याने
उपस्थिती होती.
श्री.बडोले पुढे म्हणाले, ग्रामपंचायत
स्तरावर असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी.सेंटर या केंद्रावरुन
शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज व्यवस्थीत भरण्यात यावे. यासाठी कृषि, महसूल व
ग्रामपंचायत विभागाने काळजीपूर्वक काम करावे. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून
वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेले
नाही त्यांचे आधारकार्ड काढण्याची कार्यवाही करावी. 15 सप्टेबर पूर्वी संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
जिल्ह्यात धानाचे 40 टक्के नुकसान
झाल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केलेली नाही
असे शेतकरी, कमी पावसामुळे मध्यम व उच्च प्रतीच्या धानाचे नुकसान झालेले शेतकरी
यांची स्वतंत्र यादी तयार करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता येईल. ज्या
शेतकऱ्यांच्या धानपिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना दुसरे पीक म्हणून उडीद,
मुंग याची लागवड करण्यासाठी बियाणे उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक
असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेवढ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ
मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
सिंचनासाठी शेतीला 12 तास वीजपुरवठा करण्यात येईल व कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज
कनेक्शन तोडण्यात येणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य
परिस्थिती असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या कोल्हापूरी
बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यात 8 दिवसाच्या आत पाट्या लावण्यात याव्या.
जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावात पाणीसाठा व्यवस्थीत राहील याचे नियोजन करावे. तसेच
जिल्ह्यात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. त्यामुळे शेतीसाठी व पिण्याच्या
पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल. ज्या प्रकल्पांचा भूसंपादन निधी उपलब्ध झाला
आहे त्याचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना तातडीने करावे व अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प
वेळीच पूर्ण करण्याचे नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले,
कर्जमाफीच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राने 10 अर्ज प्रती दिवस ऑनलाईन
करावे असे त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. महसूल, कृषि व ग्रामपंचायत
विभागाच्या योग्य समन्वयातून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची
प्रक्रिया 10 सप्टेबर पूर्वीच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.इंगळे
यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस व धानाची रोवणी याबाबतची माहिती दिली.
जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री.सिल्हारे यांनी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून
बेरोजगार तरुण-तरुणींना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत व बेरोजगारांच्या तक्रारी
येणार नाहीत यादृष्टीने बँकांनी या योजनेसाठी काम करावे अशा सूचना बँकांना
दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य
व्यवस्थापक श्री.वासनिक, सहायक निबंधक श्री.गोस्वामी यांचीही उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment