जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 7 April 2020

गोंदिया जिल्ह्यात 5100 मेट्रिक टन धान्याचे वाटप

                                    लॉकडाऊनच्या काळातील उपाययोजना
                                        एप्रिलपासून मोफत तांदूळ उपलब्ध


   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 7 एप्रिल 2020 या सात दिवसात गोंदिया जिल्ह्यातील 1,63,500 शिधापत्रिका धारकांना तब्बल 51000 क्विंटल धान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती गोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 7 अन्वये कारवाई करण्यात येईल असे त्यांना सूचित करण्यात आले आहे.
         जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या 2,18,544  कार्ड संख्या व त्यावरील लोकसंख्या 10,21,581 इतकी आहे. या लाभार्थ्यांना 998 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 10 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 25 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना    2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो तांदूळ दिला जातो.
          प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ या एप्रिल महिन्यापासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
*जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई*
            जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक  ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याच माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment