जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 8 December 2017

व्याघ्र प्रकल्पालगतची गावे जन-वनमधून विकासाच्या वाटेवर



      नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे जिल्ह्याचे वैभव असून निसर्गाने या जिल्ह्याला दिलेली ही एक देणगीच आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 656.36 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेल्या पाच संरक्षीत क्षेत्राचा समावेश  12 डिसेंबर 2013 मध्ये करुन याला नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नविन नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य या संरक्षीत क्षेत्राचा समावेश आहे. या व्याघ्र प्रकल्पाला लागून 1241.27 चौ.कि.मी. बफर झोन क्षेत्र आहे.
      व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास करुन मानव व वन्यजीवांचे सहजीवन प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वन्यजीव विभाग गोंदियाच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येत आहे. बफर क्षेत्रातील गावातील ग्रामस्थ हे जळावू लाकुड, पाळीव जनावरांचा चारा, घरगुती व शेतीच्या कामाकरीता लागणारे लहान लाकुड आणि रोजगार आदी दैनंदिन गरजांसाठी वनांवर अवलंबून आहेत. या अवलंबित्वामुळे वनांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. बफर क्षेत्रातील गावे जंगलव्याप्त असल्याने तेथे     मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहे. या गावातील जन, जल, जंगल आणि जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून गावकऱ्यांचे वनांवरील अवलंबित्व कमी करणे, उत्पादकता वाढविणे, शेतीला पुरक जोडधंदे निर्माण करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे यामधून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी संरक्षीत क्षेत्रालगतच्या गावात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उद्यान/अभयारण्यातील व त्याचे सीमेपासून 2 कि.मी.च्या आत येणाऱ्या गावांव्यतिरिक्त भारतीय वन्यजीव संस्थान यांनी निश्चित केलेल्या वन्यप्राणी भ्रमणमार्गामधील गावे, अभयारण्ये/राष्ट्रीय उद्यानामधून पुनर्वसन झालेली गावे तसेच ग्रामवनांचा समावेश करण्यात आला आहे.
        या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या नागझिरा अभयारण्य, पिटेझरी व उमरझरी नविन नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान (पार्क), डोंगरगाव-नवेगाव वन्यजीव अभयारण्य, बोंडे-नवेगाव वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य या वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. मागील दोन वर्षात एकूण 84 ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांची स्थापना या वनपरिक्षेत्राअंतर्गत करण्यात आली आहे. या वर्षात आणखी 13 गावात हया समित्या स्थापन करण्यात येत आहे. या समित्यामार्फत 6864 कुटूंबांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले तर 4756 कुटूंबांना सिलेंडरचा पुरवठा देखील केला आहे. वनावरील रोजगारानिमित्त असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी 246 कुटूंबांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. वन्यप्राणी शेतातील विहीरीत पडून त्यांचा मृत्यू होवू नये यासाठी 369 विहिरींना संरक्षीत कठडे बसविण्यात आले आहे. 228 कुटूंबांना सोलर कंदीलचा पुरवठा, वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी 359 शेतकऱ्यांच्या शेताला सौर कुंपन, 1152 कुटूंबाकडे शौचालये, 28 तलाव खोलीकरणाची कामे, गॅस कनेक्शन दिलेल्या कुटूंबापैकी 2837 कुटूंबांना किचन ओटे व 3189 घरी स्वयंपाकासाठी निर्धुर चुली दिल्या आहेत.
     गावकऱ्यांचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच शेतीपुरक जोडधंदे निर्माण करणे यासह पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देण्यावर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतून भर देण्यात आला आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समित्यामधील 79 युवकांना मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलॅन्ड कंपनीत वाहन चालक प्रशिक्षण केंद्रात, कोल्हापूर येथील वेल्डींग    इलेक्ट्रीक प्रशिक्षण आणि 4 मुलींना अमरावती येथे हेल्थ केअरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बफर क्षेत्रातील गावातील 454 युवकांना निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार शिबिरामधून प्रशिक्षीत करण्यात आले आहे. 90 महिलांना लाखेपासून बांगड्या तयार करण्याचे प्रशिक्षण देवून स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षीत करण्यात आले आहे.
        परसोडी येथे शिक्षीत युवकांना नोकरीच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी ग्रंथालय सुरु केले आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समिती आतेगाव मार्फत 6500 क्विंटल सेंद्रीय तांदुळाचे उत्पादन करुन विक्री करण्यात आली आहे. या समित्यांमार्फत 12 अभ्यास दौरे काढण्यात आले. 2 कोटी आणि 4 कोटी वृक्ष लागवडीत देखील या समित्यांनी सहभाग घेवून वृक्षांची लागवड केली. सन 2017-18 या वर्षात वनालगतच्या 93 गावातील 100 टक्के कुटूंबांना गॅस कनेक्शन देण्यासाठी वनसंरक्षक तथा संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालयाला 1 कोटी 93 लक्ष 68 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.
       नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विशेष प्रशिक्षीत 168 वनरक्षक आणि वननिरिक्षक यांचा समावेश असलेले विशेष व्याघ्र संरक्षण दल कार्यरत आहे. व्याघ्र प्रकल्पातील तणससदृश्य वनस्पती निर्मुलनाची कामे करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांना पाण्यांचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी पाणवठ्यांची दुरुस्ती करण्यासोबतच बोअरवेलला सोलर पंप बसविण्याची कामे करण्यात येत आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे.

     डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रालगतच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या गावाच्या विकासाला गती मिळाली आहे. या योजनेमुळे मानव व वन्यजीवन प्रस्थापित होण्यासोबतच वनावरील अवलंबीत्व कमी होण्यास मदत झाली आहे. स्थानिकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देण्यास ही योजना उपयुक्त ठरत आहे.

No comments:

Post a Comment