जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 12 December 2017

कर्जमाफीचा धान उत्पादकांना दिलासा

  • ग्रीन यादीत 46 हजार 283 शेतकऱ्यांचा समावेश
  • पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार
  •   राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियान राबवित आहे. नानाविध प्रयोग शेतीत करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यात येत आहे. बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून केली जाते. निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जाच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेवून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केली आहे.  
ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 46 हजार 283 शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश असून 32 हजार 261 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच 14 हजार 22 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच 3 हजार 95 शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचादेखील लाभ मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 पर्यंतच्या दीड लाख रूपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी सन 2015-16 व सन 2016-17 या कालावधीमध्ये पिककर्जाची विहीत मुदतीत कर्जफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये यापैकी कमी असलेल्या रक्कमेचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जे शेतकरी पात्र होते, पण त्यांनी अर्ज केले नाही, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. या योजनेतंर्गत आतापर्यंत राज्यात 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने 19 हजार कोटी रूपयांची रक्कम बँकाकडे वर्ग केली आहे. या योजनेतंर्गत राज्यभरात 77 लक्ष अर्ज प्राप्त झाले होते, छाननीअंती डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.
 जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी बियाणे , रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करण्यासाठी आणि पिकांची लावणी व कापणी करण्यासाठी खर्च येत असल्यामुळे शेतकरी बँकांचे कर्ज घेतात. कधी अतिवृष्टी, गारपीट, वादळ, रोगराई, तर कधी दुष्काळी स्थितीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. संसाराचा गाडा हाकताना अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकरी चिंताग्रस्त असतो. बँकांच्या कर्जाच्या परतफेडीमुळे तो हवालदील झालेला असतांना शासनाच्या या कर्जमाफी योजनेचा मोठा दिलासा त्यांना मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोबत नव्या पद्धतीने नगदी पिकाची कास धरून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याचे नियोजन देखील शेतकरी करू लागले आहेत.
    जिल्ह्यातील गोंदीया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 31 शाखा, विदर्भ-कोकण ग्रामीण विकास बँकेच्या 22 शाखा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या 78 शाखा अशा एकूण 131 बँक शाखेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे.
गोंदीया तालुक्यातील नागरा येथील शेतकरी लक्ष्मण चौधरी कर्जमाफीबाबत बोलताना म्हणाले, माझ्याकडे 6 एकर धान शेती आहे. शेतीसाठी 36 हजार रूपये कर्ज घेतले होते. पाऊस  न आल्यामुळे व पिकांवर आलेल्या रोगराईमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. मात्र शासनाने कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय घेवून आमची चिंता दूर केली आहे. आता नव्याने कर्ज घेवून व घेतलेल्या कर्जाची वेळीच परतफेड करून नगदी पिकांच्या शेतीकडे सुद्धा वळणार असल्याचे सांगितले.
नक्षलग्रस्त अतिदुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी येथील आदिवासी शेतकरी सुंदरलाल कटंगा म्हणाले, माझ्याकडे 7 एकर शेती आहे. 35 हजार रूपयांचे शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे ते 42 हजार रूपयांपर्यंत गेले. आमचा भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही.  सरकारने कर्जमाफी करून आमची चिंताच दूर केली आहे. आता नव्याने कर्ज घेवून शेती करण्याचा विचार त्याने बोलून दाखविला. 

No comments:

Post a Comment