जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 30 December 2017

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे - अंकुश शिंदे

आपले सरकार सुविधा केंद्राचे उदघाटन


    नक्षलग्रस्त भागातील अधिकारी-कर्मचारी अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करीत आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगवर्धीत पदोन्नती योजना आहे. जनतेसाठी काम करीत असतांना पोलीस विभाग लोकाभिमुख करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. असे आवाहन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी केले.
       30 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आपले सरकार नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन श्री.शिंदे यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नागरी संरक्षण दलाचे महासमादेशक अरविंद देशमुख यांची उपस्थिती होती.
      गोंदियासारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून करण्यात येत असल्याचे सांगून श्री.शिंदे म्हणाले, अशाप्रकारची सेवा देणारा गोंदिया हा पहिलाच जिल्हा आहे. पोलीसविषयक कायदयाचा वापर चांगल्याप्रकारे झाला पाहिजे. भविष्यात तंत्रज्ञान हे सर्वव्यापी होणार असल्यामुळे पोलीस विभागातील प्रत्येकाने त्याचा प्रभावी वापर करण्यास तयार व्हावे. त्यामुळे विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले.
        जिल्हाधिकारी काळे म्हणाले, आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे  आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात आज होत आहे. गोंदिया पोलीस दलाने जिल्ह्यासाठी एखादे स्वतंत्र ॲप्स विकसीत करावे. पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.भूजबळ चांगले काम करीत असल्याचे ते म्हणाले.
        श्री.ठाकरे म्हणाले, अशाप्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस विभाग लोकाभिमुख होण्यास मदत होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता विकसीत होत आहे. जिल्ह्यातील पोलीस दलात चांगले वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
        श्री.देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील प्रशासनात अत्यंत चांगला समन्वय आहे. जिल्ह्यात रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतूकीचे नियम प्रत्येकाने पाळले पाहिजे. त्याबाबत जागरुकही असले पाहिजे. जिल्ह्यात नागरी संरक्षण क्षेत्रात चांगले काम करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
     पोलीस अधीक्षक प्रास्ताविकातून म्हणाले, या सुविधेमुळे नागरिकांना सेवा देणे सोईचे होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी यापुढे ऑनलाईन तसेच मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहे. तक्रारीची त्यांना पोच मिळून प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे याबाबत सुध्दा माहिती मिळणार आहे. किओक्स केंद्राच्या माध्यमातून पोलीसविषयक सेवा गतीमान करण्यात येईल. 
       प्रारंभी मान्यवरांचे हस्ते आपले सरकार नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी देणे, कागदपत्रांचे साक्षांकन, ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना ना-हरकत परवानगी देणे, वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, विविध प्रकारचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे, शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे, नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून तक्रारदारास एफआयआर पुरविणे आदी सेवा या आपले सरकार नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालयाचे राखीव फौजदार सुनिल बांबडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त श्री.शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षार्थी शिक्षक यावेळी उपस्थित होते. संचालन राधिका कोकाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीमती खन्ना यांनी मानले.

No comments:

Post a Comment