डिजीधन
मेळावा
व्यवहारात पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा
घालण्यासाठी कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला आहे. तसेच पंतप्रधानांचे स्वप्न डिजीटल
इंडियाचे आहे. भीम ॲपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारावर भर देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी पाहिलेले डिजीटल इंडियाचे स्वप्न कॅशलेसच्या माध्यमातून पूर्ण करा.
असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात 13 एप्रिल रोजी बँक
ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित डिजीधन मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले
बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे,
जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे व जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार
श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, बँकांचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या
मोबाईलवर भीम ॲप हे लोड केलेले नाही. यावरुन ते कॅशलेस व्यवहार करण्यास उदासीन
असल्याचे दिसून येत आहे. बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी हे अधिकारी व कर्मचारी चांगले
वागत नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी खेद व्यक्त केला. जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेत
ग्रामीण भागात पाहिजे तसे काम झाले नाही. सामान्य गरजू व बेरोजगारांना स्वावलंबी
करण्याचे काम बँकांनी मुद्रा योजनेतून करावे. जिल्हा मागास, दुर्गम, नक्षलदृष्ट्या
संवेदनशील असून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्यामुळे जिल्ह्याच्या
विकासाला अशाप्रकारच्या योजनेतून हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी
व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 126 व्या जयंतीनिमित्त यावेळी अभिवादन करण्यात
आले. 8 ते 14 एप्रिल दरम्यान समता सप्ताह आयोजित करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री
बडोले पुढे म्हणाले, 14 एप्रिल हा दिवस ज्ञान
दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व
क्षेत्रात प्रचंड ज्ञान होते. त्यांनी दीनदलित, शोषित पिडितांचा विचार मांडला,
महात्मा फुलेंनी पददलितांच्या व महिलांच्या शिक्षणाचा तर पं.दिनदयाल उपाध्याय
यांनी अंत्योदयाचा विचार मांडला. या सर्वांनी समतेचाच विचार मांडल्याचे दिसून येते.
त्यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणे हीच त्यांना आदरांजली ठरणार
असल्याचे श्री.बडोले यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी
काळे म्हणाले, आज कॅशलेसचा मार्ग स्विकारणे आवश्यक झाले आहे. प्रिंटेड मटेरिअल
शिवाय व्यवहार झाला पाहिजे. कॅशलेस व्यवहारासाठी प्रत्येकाने भीम ॲपचा वापर केला
पाहिजे. जिल्ह्यात भीम ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे नियोजन करण्यात आले असून
त्या माध्यमातून व्यवहार होत आहे. शेतकऱ्यांना देखील कॅशलेस व्यवहारासाठी प्रवृत्त
करण्यात येत आहे. कॅशलेस व्यवहाराबाबत मात्र बँकेतील अधिकारी-कर्मचारी उदासीन
असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा अग्रणी प्रबंधक श्रीवास्तव म्हणाले, डिजीटल इंडियाच्या दिशेने आपली
वाटचाल सुरु आहे. बेरोजगार व गरजूंना मदत व स्वावलंबी करण्यासाठी मुद्रा योजनेचा
लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे
सांगितले.
डिजीधन मेळाव्याला अनेक बँकांचे अधिकारी, कर्मचारी, विविध विभागाचे
अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार
अनिलकुमार श्रीवास्तव यांनी मानले.
No comments:
Post a Comment