जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 11 December 2016

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण करणार - पालकमंत्री बडोले


          
खमारी येथे रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन
       रस्ते हे विकासाच्या वाहिन्या आहेत. ग्रामीण दळणवळणात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रामीण भागातील रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून बारमाही वाहतूकीच्या सुविधेसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्हयातील सर्वच ग्रामीण रस्त्यांची कामे टप्याटप्याने पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            11 डिसेंबर रोजी गोंदिया तालुक्यातील खमारी येथील बाजार चौकात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खमारी ते चुलोद, आसोली, मुंडीपार रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,  जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे, शेखर पटले, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, पंचायत समिती सदस्य सारंग भेलावे, ममता वाढवे, इंद्रायणी धावडे, खमारी सरपंच विमल तावडे, चुलोद सरपंच रेखा ठाकुर, छत्रपाल तुरकर, भोलाराम मेश्राम, भाऊराव उके यांची उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खमारी ते चुलोद, आसोली मुंडीपार हा रस्ता 10.69 कि.मी.चा असून यावर 4 कोटी 88 लक्ष रुपये खर्च येणार आहे. हे काम लवकर पूर्ण होणार असल्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना येण्या-जाण्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
            पालकमंत्री म्हणाले, या योजनेतून गोंदिया तालुक्यासाठी 39 कि.मी.चे रस्ते मंजूर केले आहे. मागील व यावर्षीचे या योजनेतील कामाचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात रस्त्यांच्या कामाचे नियोजन विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात येतील. जिल्हयात यावर्षी धानाचे चांगले पीक झाले असून शेतकऱ्यांना धान विक्रीची गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी 20 दिवस आधीच धान खरेदी केंद्र सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हयात 100 किमीचे आधुनिक पध्दतीचे रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे सांगून , श्री बडोले पुढे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही रस्त्यांची कामे घेण्यात येतील. यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेवून नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
            आमदार अग्रवाल म्हणाले, या योजनेतून पालकमंत्र्यांनी तालुक्यातील 39 किमीच्या कामांना मंजुरी दिली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे बोनस दिला आहे. त्याचप्रमाणे धानाला भाव देण्याचे कामही सरकारने करावे. पिंडकेपार प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, खमारी हे तालुक्यातील मोठे गाव असल्यामुळे  या गावाच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष दयावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण जनतेला जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पालकमंत्री हे जिल्हयाचेच असल्यामुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
            हेमंत पटले म्हणाले, राज्य शासन गावाच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबध्द आहे. येत्या 5 वर्षात जिल्हयातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येतील. या योजनेच्या कामामुळे संबंधित गावातील नागरिकांना बाहेरगावी येण्या-जाण्याची चांगली सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, सरपंच श्रीमत तवाडे यांचीही समायोचित  भाषणे  झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता जी.जी.नंदनवार यांनी केले. उपस्थितांचे आभार परमानंद ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला खमारी, चुलोद, आसोली व मुंडीपार येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                

No comments:

Post a Comment