माविमचे जिल्हा तेजस्वीनी संमेलन
• उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार
जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे काम चांगल्याप्रकारे
सुरु आहे. याचे सर्व श्रेय बचतगटात काम करणाऱ्या महिलांना आहे. आयसीआयसीआय आणि
अलिकडेच आयडीबीआय बँकेकडून बचतगटांना मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी कर्जपुरवठा
करण्यात आला आहे. माविमने आता बचतगटांच्या माध्यमातून ग्राहकांच्या मागणीनुसार
वस्तूंचे उत्पादन करावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
13 मार्च रोजी गोंदिया येथील हॉटेल ग्रँड सीता
येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला
सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत गोंदिया जिल्हा तेजस्वीनी संमेलनाचे विशेष अतिथी
म्हणून श्री.काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माविमचे विभाग सनियंत्रण व मुल्यमापन
अधिकारी केशव पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आयसीआयसीआय
बँकेचे विक्री व्यवस्थापक संतोष पाटील, आयडीबीआय बँकेचे शाखा प्रबंधक विक्रम बोराडे,
नॅबकिन्सचे व्यवस्थापक त्र्यंबक मगर, ऑक्सीजन सर्व्हीस प्रा.लि.चे धिरज दोनोडे
यांची उपस्थिती होती.
श्री.काळे म्हणाले, जिल्ह्यातील 416 गावात माविमने
महिलांच्या बचतगटांची स्थापना केली आहे. लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून
जिल्ह्यात बचतगटांच्या महिलांचे मजबूत संघटन तयार झाले आहेत ही बाब कौतुकास्पद
आहे. बचतगटांनी मिळालेल्या कर्जातून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेण्याच्या
दृष्टीने काम करावे. अलिकडेच झालेल्या कृषि व पलास महोत्सवाचा उपयोग बचतगटांना
त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाला आहे. या
महोत्सवातून महिला बचतगटांना एक निश्चित शिकायला मिळाले ग्राहकांची कोणत्या वस्तू
व साहित्याची मागणी आहे, ही मागणी लक्षात घेता, त्याचा पुरवठा करण्याचे नियोजन
करावे असे त्यांनी सांगितले.
श्री.पवार म्हणाले, तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण
महिला सक्षमीकरण कार्यक्रमामुळे बचतगटातील महिला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षीत होवून
त्यांना व्यवहाराची दिशा मिळाली. या प्रशिक्षणामुळे महिलांनी कोणता उद्योग व्यवसाय
निवडावा हे निश्चित केले आणि त्यादृष्टीने त्यांनी पुढील वाटचाल सुरु केली आहे.
बचतगटाच्या माध्यमातून महिला आज सक्षम होत आहे. बचतगटामुळे महिला संघटीत झाल्या
असून त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती बदलल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.खडसे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांना माविमने
बचतगटाच्या स्थापनेतून विकासाची वाटचाल दाखविली आहे. अनेक बचतगटातील महिला आज
सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत असून त्यांच्यामध्ये निर्णय
घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे. महिला धोरणामुळे महिलांच्या विकासाला चालना
मिळाली आहे. राज्यात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने माझी कन्या भाग्यश्री,
मनोधैर्य योजना यासह अनेक महिलाविषयक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून महिला
विषयक कायदयांची सुध्दा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
श्री.बोराडे म्हणाले, जिल्ह्यात माविम
महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रभावीपणे काम करीत आहे. माविममुळे
महिलांना स्वावलंबनाची दिशा मिळाली आहे. अनेक महिला आज उद्योग व्यवसाय सुरु करुन कुटूंबाला
हातभार लावीत आहे. बँका सुध्दा बचतगटातील महिलांना कर्ज देण्यास पुढाकार घेत आहे.
महिला हया कर्जाची वेळीच परतफेड करीत असल्यामुळे त्यांना पुन्हा कर्ज मिळत आहे असे
त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय
अधिकारी सुनिल सोसे म्हणाले, जिल्हा मागास, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त असला तरी बचतगटांच्या
माध्यमातून महिलांनी एक नवी क्रांती केली आहे. मोठ्या प्रमाणात महिलांची आर्थिक
बचत सुरु असून बचतगटातील अडचणीत असलेल्या महिलांना बचतगटातील पैसा कामी पडत आहे.
जिल्ह्यात 5 हजारापेक्षा जास्त महिलांचे बचतगट असून 62 हजार महिला बचतगटांशी
जुळलेल्या आहेत. अनेक बचतगटातील महिला अत्यंत प्रभावीपणे काम करीत असून त्यांनी
पशुसखी, कृषीसखी, मत्स्यसखी म्हणून आपली भूमिका पार पाडीत आहे. आयसीआयसीआय बँकेने
जिल्ह्यातील बचतगटांना सुध्दा मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करुन त्यांना उद्योग
व्यवसायासाठी चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत महत्वपूर्ण
योगदान दिल्याबद्दल उत्कृर्ष (गोंदिया), स्वावलंबन (आमगाव), आधार (सडक/अर्जुनी),
सहारा (सालेकसा), तेजस्वीनी (तिरोडा), नारीचेतना (देवरी) व तेजस्वीनी (गोरेगाव) या
लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष व सचिवांना प्रत्येकी 25 हजार रुपयाचा
धनादेश, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ, तसेच लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक
मोनिता चौधरी (गोंदिया), आशा दखने (आमगाव), पालिंद्रा अंबादे (सडक/अर्जुनी), शालू
साखरे (सालेकसा), अनिल आदमने (तिरोडा), हेमलता वादले (देवरी) व योगिता राऊत
(गोरेगाव) यांना प्रत्येकी 10 हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी काळे यांच्या
हस्ते देवून सन्मानीत करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल लेखापाल, सहयोगीनी व
समुदाय साधन व्यक्ती यांना बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
संमेलनानिमीत्त संवाद सत्राचे आयोजन करण्यात
आले होते. या संवाद सत्रात लोकसंचालीत साधन केंद्र सुरु करण्यामागचा उद्देश, लोकसंचालीत
साधन केंद्राची रचना व कार्यपध्दती, लोकसंचालीत साधन केंद्र कायमस्वरुपी टिकावे
म्हणून कार्य करता येईल आणि कोणकोणत्या योजना/उपक्रम राबविता येईल तसेच लोकसंचालीत
साधन केंद्राचा महिलांना फायदा व उपयोग होतो की नाही तसेच भविष्यात लोकसंचालीत
साधन केंद्राला कसे बघता येईल या विषयाच्या अनुषंगाचे उपस्थित महिलांना श्री.पवार
व श्री.सोसे यांनी मार्गदर्शन केले.
नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरीच्या
अध्यक्ष श्रीमती सिध्दीकी, आधार लोकसंचालीत साधन केंद्र सडक/अर्जुनीच्या अध्यक्ष
श्रीमती ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. या संमेलनात लोकसंचालीत साधन केंद्राच्या
अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगीनी, समुदाय साधन व्यक्ती, पशुसखी व
मायक्रो एटीएम साथी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखाधिकारी योगेश
वैरागडे, उपजिविका सल्लागार नामदेव बांगरे, सुशील पंचभाई, प्रिया बेलेकर, प्रफुल
अवघड, एकांत वरघने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सहायक सनियंत्रण
अधिकारी प्रदिप कुकडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी
सतीश मार्कंड यांनी मानले.
No comments:
Post a Comment