जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 18 July 2017

पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टी बाधित जरुघाटाची पाहणी

महेंद्र लांडगेच्या वारसाला 4 लाखाची मदत


              अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात 15 जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील अनेक कुटूंब अतिवृष्टीने बाधित झाले. याच मंडळात येत असलेल्या चिचोली येथील शेतकरी महेंद्र लांडगे हा शेतातून घरी येत असतांना वाहून गेला.
                पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या केशोरी मंडळातील चिचोली, जरुघाटा व प्रतापगड या गावातील शेतीची तसेच घरांची पाहणी करुन शाळेत व भक्तनिवास येथे आश्रयास असलेल्या कुटूंबांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, तहसिलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगड सरपंच इंदू वालदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
                चिचोली येथे पालकमंत्री बडोले यांनी मृत शेतकरी महेंद्र लांडगे यांची पत्नी वत्सला लांडगे हिचे सांत्वन करुन नैसर्गीक आपत्ती अनुदानातून 4 लाख रुपयाचा धनादेश दिला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जरुघाटा या गावाला भेट देवून पुष्पाबाई लोगडे, मुन्ना तिवसकर व राजु तिवसकर यांच्या क्षतीग्रस्त घराची पाहणी केली व गावातील चौकात उपस्थित ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. बाधित कुटूंबांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
                जरुघाटा येथे 40 घरांचे अंशत: तर एका घराचे पूर्णत: नुकसान झाले असून हे नुकसान 5 लाख 81 हजाराचे आहे. चिचोली-केशोरी रस्त्याची पाहणी करुन अतिवृष्टीमुळे हा रस्ता खराब झाल्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या प्रतापगड येथील भक्त निवासात आश्रयास असलेल्या इश्वर शेंडे, इभाकर झिलपे, मनोहर राऊत, शनिश्वर मडावी, विनायक उईके या कुटूंबियांची त्यांनी भेट घेतली.
                पालकमंत्र्यांनी यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देवून अतिवृष्टीमुळे बाधित शेती व क्षतीग्रस्त घरांचे योग्यप्रकारे सर्वेक्षण करण्यात यावे. कोणताही बाधित शेतकरी तसेच क्षतीग्रस्त घरे नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment