गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी
पिके व कापणी झालेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या
पावसामुळे पिकाचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे
प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. 3 नोव्हेंबर रोजी
पालकमंत्री डॉ. फुके यांच्या उपस्थीतीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे
नुकसानीच्या आढावा घेण्यात आला.या वेळीस डॉ. फुके बोलत होते.
कृषी विभाग व विमा कंपनीला युध्दस्तरावर संयुक्त सर्व्हे करून
बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यास पीक विम्याचा लाभ देण्याचे निर्देश देऊन
श्री.फुके म्हणाले, नुकसान झालेला एकही शेतकरी पिक
विमापासून वंचित राहता कामा नये. राज्य सरकारने नुकतेच 10 हजार कोटी रुपयांची मदत
शेतकऱ्यांसाठी जाहिर केली असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पीक
नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पिकनिहाय भरपाई शेतकऱ्यांना निश्चित मिळणार
असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार सर्वश्री विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल,
मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी रोहन
घुगे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, निवासी
उपजिल्हाधिकारी महेन्द्र पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रभारी जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी श्री.नाईनवाड यांनी यावेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांची माहिती दिली. तसेच बाधित शेतकऱ्यांकडून अर्ज घेण्याचे व पंचनामे
करण्याचे काम सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले. कोरडवाहु शेतीला प्रति हेक्टर
6800/- तर सिंचनाखालील शेतीला 13600/- प्रति हेक्टर प्रमाणे सानुग्रह अनुदान
मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीत
पालकमंत्री डॉ. फुके यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व पंचनामे केलेल्या
शेतकऱ्यांची माहिती घेतली. कृषी विभागाने व विमा कंपनीने गावोगावी जाऊन शेतीच्या
पीक नुकसानीचा सर्व्हे करून पिकाच्या नुकसानीची पाहाणी करावी.नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची सुचना पालकमंत्री डॉ.फुके यांनी
यावेळी केली. परतीच्या पावसामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत
संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देऊन हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्यांची समस्या
ऐकून घ्यावी. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोहचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी
मोबाईलवर जी.पी.एस. टॅग करुन (लाईव्ह लोकेशन) फोटो काढुन विमा कंपनीच्या वेबसाईटवर
अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले
असल्याचे पालकमंत्री डॉ.फुके यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नाइनवाड, उपविभागीय अधिकारी गंगाराम
तळपदे, रविंद्र राठोड, तहसिलदार विनोद मेश्राम, प्रविण घोरुडे, शेखर पुनसे, राजेश
भांडारकर, अप्पर तहसीलदार.ग्रामीण खडतकर ,कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबधीत
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment