जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 1 July 2018

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज - खा.मधुकर कुकडे

                           खामखुरा येथे 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम


          मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे. मागील बऱ्याच वर्षापासून वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मींग व वातावरणातील बदलामुळे परिस्थितीला तोंड दयावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो. या सर्व घडामोडी पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे घडून येत आहे. त्यामुळे बिघडलेल्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड आज काळाची गरज झाली आहे. असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.

        आज 1 जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील खामखुरा येथे 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मनोहर चंद्रिकापूरे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य रचना गहाणे, किशोर तरोणे, गिरीश पालीवाल, पं.स.सदस्य आशा झिलपे, नगरपंचायत सदस्य श्रीमती ब्राम्हणकर, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रविण बडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री.कुकडे पुढे म्हणाले, यंत्रणा आणि संस्थांनी जिल्ह्याला दिलेले 31 लक्ष 64 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा लोकाभिमुख झाला पाहिजे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पर्यावरण संतुलीत ठेवण्याकरीता प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करुन त्याची जोपासणा करावी, तरच ही वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
       श्री.चंद्रिकापूरे म्हणाले, आपला जिल्हा भाग्यशाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून बराच भूभाग हा वनाने आच्छादीत आहे. जीवसृष्टीचा विनाश थांबविणे हे आपले कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन करतात त्याचप्रमाणे वृक्षांचे सुध्दा संवर्धन करणे हे आपले कर्तव्य समजून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांची जोपासणा करावी असे त्यांनी सांगितले.
      श्री.ढेंगे म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे’ हे सांगून पर्यावरणाचे महत्व विषद केले आहे. त्याची प्रचिती आता दिसून येत आहे. वृक्ष लागवडीमध्ये सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. याचा फायदा भविष्यात आपल्याला निश्चितच होणार आहे असे सांगितले.
      श्री.बडगे म्हणाले, शासनाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. केवळ वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर ती वृक्ष जगविणेही महत्वाचे आहे. लावलेल्या वृक्षांचा उपयोग भविष्यात निश्चितच होणार आहे असे त्यांनी सांगितले.
       प्रास्ताविकातून माहिती देतांना श्री.युवराज म्हणाले, यावर्षी 1 ते 31 जुलै दरम्यान 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्याला 31 लाख 64 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात 35 लाख 78 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत विविध यंत्रणा, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्था सहभागी आहेत. वृक्ष लागवड कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होवून लोकचळवळ निर्माण करावी असे त्यांनी सांगितले.
       यावेळी खासदार मधुकर कुकडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी खामखुरा गावाच्या परिसरात राखीव वन कक्ष क्रमांक 259 येथे वृक्ष लागवड केली. कार्यक्रमास अर्जुनी/मोर वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले, खामखुरा गावचे सरपंच अजय अंबादे, ईटखेडाचे सरपंच अश्विन कोडापे, इसापूरचे सरपंच आनंदराव सोनवाने, झरपडाचे सरपंच श्रीमती डोंगरवार, पोलीस पाटील जयप्रकाश लाडे, माजी सरपंच मधुकर गुनेवार, तिबेटीयन सेटलमेन्टचे अध्यक्ष सो ग्यालसेन, प्राचार्य श्री.परशुरामकर तसेच खामखुरा गावाच्या परिसरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार भारतीय वनसेवेचे अधिकारी पुनम पाटे यांनी मानले.              

No comments:

Post a Comment