जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 6 September 2017

महास्कीम संकेतस्थळावरुन योजनांची माहिती जाणून घ्या - प्रशांत सांगडे

                           बामणीत गणेशोत्सवानिमित्त संवाद पर्व
     शासन जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध योजना राबवित असते. लाभार्थ्यांना अनेक योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महास्कीम या संकेतस्थळावरुन योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी केले.
     सालेकसा तालुक्यातील बामणी येथे नुकतेच माँ शितला बाल गणेश उत्सव समिती श्री साई ग्रामसंस्था आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन तहसिलदार श्री.सांगडे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, तालुका कृषि अधिकारी श्री.तोडसाम, तालुका आरोग्य अधिकारी नरेश येरणे, माविमचे तालुका प्रकल्प समन्वयक अनिल गायकवाड, पोलीस पाटील सोमेश्वरी कटरे, सेवकराम कटरे, अमृतलाल लिल्हारे, शालुराम दमाहे, भटुलाल कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.सांगडे बोलतांना पुढे म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधीतून विविध मोठ्या आजारावरील उपचारासाठी मदत मिळते. जिल्ह्यात शुन्य माता व बालमृत्यू अभियान जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून नवजात बाळ व मातेचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेणे या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. पुरातन वृक्षांचे जतन करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 वृक्षांपर्यंत दहा हजार रुपयांचे वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, दिनदयाल उपाध्याय योजना, तलाव तेथे मासोळी अभियान, ग्राम समृध्दी योजना, रोजगार हमी योजना आदी योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
     श्री.तोडसाम म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने शेती करावी. शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करावा. आता केवळ धान पिकावर अवलंबून न राहता भाजीपाला, फळे व फुलांची शेती करावी. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर न करता सेंद्रीय शेतीचा मार्ग शेतकऱ्यांनी अवलंबीला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
       महिला आर्थिक विकास महामंडळ हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम करीत असल्याचे सांगून श्री.सोसे म्हणाले, कुटूंबाची आर्थिकस्थिती बळकट करण्यास महिलांचा मोठा हातभार लागत आहे. गावात असलेल्या महिलांच्या ग्रामसंस्थेकडे 75 हजार रुपये जोखीम निधी देण्यात येतो. बचतगटातील महिलांनी दशसूत्रीचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले.
     डॉ.येरणे म्हणाले, गरोदर महिलांसाठी जननी शिशु सुरक्षा योजना व जननी सुरक्षा योजना आहे. 102 क्रमांकावर संपर्क साधल्यास ॲम्बुलन्स गरोदर महिलेला बाळंतपणासाठी रुग्णालयात आणणे व बाळंतपणानंतर महिलेला व बाळाला घरी नि:शुल्क सोडून देण्याचे काम करते. मुलींच्या रक्तवाढीसाठी शाळेतून औषधी देण्यात येतात. महाअवयवदानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. आपल्या शरीरातील अवयव यामुळे दान करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

     जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी प्रास्ताविकातून गणेशोत्वानिमित्ताने संवाद पर्व आयोजनामागची भूमिका विशद केली व शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री साई ग्रामसंस्थेच्या सरला कटरे, शामकला लिल्हारे, कविता कटरे, शकुंतला उपराडे, अनिता दसरीया, अंगणवाडी सेविका उर्मिला माहुले, माविमचे समुदाय साधनव्यक्ती पुस्तकला मंडलवार, ग्रामसंस्थेच्या लेखापाल कल्पना वालदे, प्रभाग समन्वयक लक्ष्मी नागदेवे, सहयोगीनी सुशीला बघेले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बामणी येथील ग्रामस्थ तसेच बचतगटातील महिला व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मी नागदेवे व उपस्थितांचे आभार सुशीला बघेले यांनी मानले.

No comments:

Post a Comment