जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 11 May 2020

दूध उत्पादकांनी खरेदी केंद्रावर उत्तम दर्जाचे दूध आणावे - ना.सुनील केदार

गोंदिया येथे दूध खरेदी केंद्राचे उद्घाटन


           मागील चार महिन्यापासून जिल्ह्यातील शासकीय दध खरेदी केंद्र बंद असल्यामुळे त्याचा परिणाम शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर झाला होता. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता आजपासून दुध खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर उत्तम दर्जाचे दूध विक्रीसाठी आणावे. असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. 
        आज 11 मे रोजी गोंदियाजवळील कुडवा येथील शासकीय दूध योजना केंद्रावर दूध खरेदी केंद्राचे श्री केदार यांनी फीत कापून उद्घाटन केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रादेशिक  दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हेमंत गडवे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डी.आर.लाखे, जिल्‍हा पशुसंवर्धन उपआयुक्‍त डॉ.संजय गायगवळी, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.राजेश वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
         श्री. केदार म्हणाले, शासकीय दूध खरेदी केंद्रावर भेसळयुक्त दूध स्वीकारले जाणार नाही. दुधात भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. ज्या दूध संकलन केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहे, त्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासकीय दूध खरेदी केंद्रावर सोलर पॅनल लावून विजेचा खर्च कमी करावा. येथील शासकीय दूध खरेदी केंद्राची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासाठी सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षत असून हे शासकीय दूध खरेदी केंद्र सुरू झाल्याने याचा लाभ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी मंत्री केदार यांनी शासकीय दूध खरेदी केंद्राची पाहणी केली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी व नागरीक उपस्थित होते.
00000



Friday, 8 May 2020

अखेर ती वाघीण जेरबंद गोरेवाडयाकडे रवानगी

पाच जणांचे घेतले प्राण




      जिल्ह्यातील गोरेगाव आणि तिरोडा वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीने मागील महिन्यात  एक पुरूष आणि एका महिलेवर हल्ला करून महिन्यात प्राण घेतले. गोंदिया वन विभाग आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग, गोंदिया यांनी सुसज्ज अशा १६ चमू या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गठीत केल्या होत्या. अखेर या वाघिणीला सात मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता बागडबंद गावानजीकच्या गुमडोह तलाव परिसरात जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे या वाघिणीच्या दहशतीत जगणाऱ्या बफर क्षेत्रातील गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या वाघिणीला जेरबंद करून तिची रवानगी नागपूर जवळील गोरेवाडा प्राण संग्रहालयाकडे करण्यात आली आहे.
          एन-१ या नावाच्या या वाघिणीला पकडण्यासाठी ब्रम्हपुरीपासूनच प्रयत्न सुरू होते. ही वाघिण जवळपास तीन वर्षांची असून ती ब्रह्मपुरी वन विभागातून नवेगाव अभयारण्यात,तेथून नागझिरा अभयारण्याकडे आली. तिथून पुढे नागझिऱ्याच्या बफर क्षेत्रात  वावरू लागली. 
         ब्रह्मपुरी वन विभागात असतांना या वाघिणीने तीन लोकांचे प्राण घेतले. त्यामुळे तेथूनच तिला पकडण्याचे प्रयत्न सुरु झाले. तिथे न सापडता पुढे ती गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत आली. नागझिऱ्याच्या बफर क्षेत्रातील धानुटोला येथील एका पुरुषावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर 20 दिवसांनी नागझिरा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मंगेझरी गावानजीकच्या बफर क्षेत्रात एका महिलेला ठार केले. त्यामुळे या वाघिणीला आता कुठल्याही परिस्थितीत जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वन्यजीव रक्षक  वनसंरक्षक (वन्यजीव) तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण संस्था, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तांत्रिक समितीचा सल्ला घेऊन दिले.
         या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी तसेच सुसज्ज रेस्क्यू टीम, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियाचे पशुवैद्यकीय अधिकारी व रेस्क्यू टीम आणि गोंदिया वनविभागाची रेस्क्यू टीम यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती.अखेर या सर्वांनी या वाघिणीला पकडण्याची मोहीम फत्ते केली.
        वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोड, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकिशोर खोडस्कर, एकोडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक गजरे यांनी सहभाग घेतला. एन-१ या वाघिणीला  जेरबंद करण्याच्या कार्यवाहीमध्ये नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक श्री. रामानुजम, गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. एस. युवराज, वन्यजीव विभागाच्या साकोली येथील उपसंचालक श्रीमती पूनम पोटे, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक आर.आर.सदगीर, गोंदिया जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया वन विभागातील आणि  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील शीघ्र कृती दल आणि वन्यजीव विभागाच्या विशेष कृती दलाने तसेच गोंदिया वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याच्या प्रयत्नातून हे यश मिळाले आहे.

Thursday, 30 April 2020

महाराष्ट्र राज्याचा 60 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन


        महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन आज 1 मे  रोजी गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी यावेळी राष्ट्रध्वजारोहण केले. जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
        ध्वजारोहण प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, कोषागार अधिकारी नंदकिशोर भंडारे, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ह्या शुभेच्छा संदेश पाठवून दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या शुभेच्छा संदेशाचे वाचन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी आपले योगदान दिले पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यावेळी म्हणाल्या.
        संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे मोठ्या संख्येने लोक बाधित होत आहे. काहींचा मृत्यू देखील झाला आहे. बाधित होण्याचे आणि मृत्यूचे सत्र सुरूच आहे. कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्यामुळे उपाययोजनेचा एक भाग म्हणून यावर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. केवळ जिल्हा मुख्यालयीच महाराष्ट्र दिनाच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचे त्यामध्ये नमूद केले होते. त्यानुसार जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रध्वजारोह समारंभ अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
00000


महाराष्ट्र दिनाच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा- पालकमंत्री अनिल देशमुख

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी

आपल्यासह संपूर्ण जग भयंकर अशा कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला करीत आहे. राज्य स्थापनेचा हा 60 वा वर्धापन दिन कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा कायमचा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनाला साथ द्यावी. असे आवाहन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा  60 वा वर्धापन दिन 1 मे 2020 रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पालकमंत्री देशमुख आपल्या शुभेच्छा संदेशातून म्हणतात की, ज्या थोर विभूतींनी महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात आपल्या प्राणांचे योगदान दिले आहे त्यांना अभिवादन करून त्यांचे योगदान स्मरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज्य स्थापनेचा 60 वर्धापन दिन साजरा करीत असताना शासन आणि प्रशासन कोरोना विषाणूला पराभूत करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे.कोरोनाचा  प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे. या लढ्याला लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे.घरातून बाहेर न पडता कोरोना संसर्ग साखळी तोडून ही लढाई आपल्याला जिंकायची असल्याचे ते म्हणाले.
 लढाईतील कोरोना हा अदृश्य शत्रू जरी असला तरी लढाईचे तंत्र आत्मसात करून सर्वांनी एकजुटीने लढा देऊन या विषाणूवर मात करणे शक्‍य असल्याचे सांगून  श्री. देशमुख म्हणाले की, प्रत्येकाने नियमित हात स्वच्छ धुवावेत,तोंडावर आणि नाकावर मास्क लावावा. मास्क नसल्यास स्वच्छ रूमाल बांधावा.प्रत्येकाने शारीरिक अंतर ठेवावे. ताप,सर्दी, खोकला असल्यास जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन उपचार करावे. जिल्ह्यात 20 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग, पोलीस विभाग यासह अन्य यंत्रणांचे कौतुक केले. कोरोनाबाधित व्यक्तीही बरी होऊ शकते हे आपल्या जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णाने सिद्ध करून दाखविले आहे.26 मार्चला कोरोनाबाधित आढळलेला हा युवक उपचारातून 10 एप्रिलला त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बरा होऊन घरी गेला आहे. संकट जरी मोठे असले तरी मनात भीती न बाळगता त्यावर मात करता येणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
1मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त गोंदिया येथील ध्वजारोहण समारंभात सहभागी होण्याची मनापासून आपली इच्छा असल्याचे सांगून पालकमंत्री देशमुख म्हणाले की, मी मुंबई येथे असल्यामुळे शक्य होणार नाही.राज्यात असलेल्या संचारबंदी दरम्यान राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्याचा गृहमंत्री म्हणून लक्ष ठेवून आहे.जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनही जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेकडे माझे लक्ष असून मी सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.जिल्ह्यातील गरीब व्यक्ती या काळात अन्नधान्यापासून वंचित राहू नये असे निर्देशही संबंधित विभागाला दिले आहे.जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस विभागासह अन्य यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे


Sunday, 26 April 2020

खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार नाही याचे नियोजन करा - पालकमंत्री अनिल देशमुख

                            खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभा



      आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कृषी विभागाने नियोजन करून शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करावी. असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. 
     शनिवारी 25 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे व सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि.प.कृषी समिती सभापती शैलजा सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      पालकमंत्री देशमुख म्हणाले, कृषी विभागाने समन्वय साधून रासायनिक खते, बि-बियाणे, शेतीशी संबंधित अवजारे, फवारणी यंत्रे व कीटकनाशके आदी बाबींची शेतकऱ्यांना उपलब्धता करून देतांना पिक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा सहज आणि सुलभ पद्धतीने कसा काढता येईल यादृष्टीने नियोजन करावे. पारंपारिक पिकांसोबतच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. 
     भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत बागायती पिकांमध्ये उत्सुक असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी करून घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर भर द्यावा असे सांगून श्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन प्रलंबित असतील त्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज कनेक्शन दयावे. सामान्य शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज वाटप करावे. अशा शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. खरीप हंगाम सन 2020-21 करिता जे नियोजन केले आहे त्याची कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
      आमदार चंद्रिकापुरे म्हणाले, रात्रीला आठ तास वीज पुरवठा होतो. त्यामुळे शेतक-यांना पीक घेण्यास अडचण निर्माण होत आहे. ज्या प्रमाणात धानाची खरेदी केंद्रावरून उचल व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
    आमदार अग्रवाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील जिल्ह्यातील काही पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्या सर्व शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट करण्यात यावे असे त्यांनी सुचविले.
    कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होऊ शकते त्यामुळे जिल्ह्यात जास्तीत जास्त कोल्हापुरी बंधारे बांधण्यात यावे. अशी सूचना आमदार कोरोटे यांनी केली.
     जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री घोरपडे यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीची माहिती देतांना सांगितले की, जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार 864 हेक्टर क्षेत्रावर पिके घेण्याचे नियोजन आहे. भात पीक 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्रावर घेण्याचे प्रस्तावित आहे. महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून भाताचे 68 हजार 988 क्विंटल बियान्यांची मागणी करण्यात आली आहे. युरिया, डीएपी, संयुक्त खते यासह अन्य रासायनिक खते यांची 83 हजार 57 मेट्रिक टन इतकी मागणी केली आहे. सन 2020-21 या वर्षात 270 कोटी रुपये खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांकडून प्रस्तावित आहे. सोबतच त्यांनी प्रस्तावित  नियोजनामधील महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली.
       या सभेला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, कृषी विकास अधिकारी मनोहर मुंडे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एस.पी वाघमारे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सोनुले, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक उदय खर्डेनविस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश टेटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी भाऊसाहेब खर्चे, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री.सांभरे, यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
00000

Saturday, 25 April 2020

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे - पालकमंत्री अनिल देशमुख

कोरोना प्रतिबंध उपाययोजना आढावा सभा




राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. कोणीही समाजात कोरोनाबाबत अफवा पसरवित असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून चांगले काम करावे, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
       आज २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना आयोजित सभेत श्री. देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार प्रफुल पटेल, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, नोहरराव चंद्रिकापुरे व सहसराम कोरटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पालकमंत्री देशमुख म्हणाले, शहरातील भाजी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी भाजीबाजार मर्यादित वेळेसाठी सुरू ठेवावेत. भाजीबाजारात नागरिकांनी सामाजिक अंतर राखावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामाची मोठ्या प्रमाणात मागणी असून मजुरांमध्ये सामाजिक अंतर ठेवून ही कामे सुरू करावीत. एपीएल आणि बीपीएलच्या लाभार्थ्यांना पूर्ण धान्य वाटप करावे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशा गरजू व्यक्तींना देखील धान्य वाटप करावे. धान्य वाटप करतांना आधार लिंकचा प्रश्न उद्भवणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.
         आजपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असल्याचे सांगून श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील मौलवींची प्रशासनाने बैठक घेऊन मुस्लिम समाजबांधवांना आपल्या घरातच राहून, सामाजिक अंतर ठेवून धार्मिक कार्यक्रम छोट्या स्वरूपात करावे. त्यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल, असे आवाहन मौलवींच्या माध्यमातून समाजबांधवांना करावे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा त्वरित सुरू करावी. त्यामुळे स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवावे लागणार नाही. वेळेची बचत होऊन रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील. सारी’  रोगाच्या प्रादुर्भावाची देखील आरोग्य यंत्रणेने दक्षता घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग बांधवांना आवश्यक ती मदत करून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
       खासदार पटेल म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत. कंटेंमेंट झोनमध्ये येत असलेल्या गोंदियाच्या गणेश नगर येथील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. गोरेगाव नगरपरिषदेतील साफसफाईची कामे त्वरित करावी. गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांना मागील चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे. गोंदियासाठी जास्तीत जास्त पीपीई कीटची मागणी आरोग्य यंत्रणेने वरिष्ठांकडे करावी, असेही त्यांनी यावेळी सुचविले.                                                       
         जिल्ह्यात रोहयोच्या कामांची जिल्ह्यातील मजुरांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असून ही कामे सामाजिक अंतर ठेवून सुरू करावीत, अशी मागणी आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे व सहसराम कोरोटे यांनी एकत्रितपणे केली. आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदियातील गणेश नगरच्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी त्वरित प्रशासनाने निर्णय घ्यावा. जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास परवानगी देण्यात यावी. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना यामधून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव त्वरित करावेत, अशी मागणीही यावेळी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केली. आमदार कोरोटे यांनी रोहयोमधून भातखाचरांची कामे करण्यात यावी, अशी सूचना केली.
         जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे म्हणाल्या, कन्टेमेंट झोनमध्ये येत असलेल्या गोंदियातील गणेश नगरच्या नागरिकांची गैरसोय लवकरच दूर करण्यात येईल. अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या गणेश नगरच्या नागरिकांना     ये-जा करण्यास सूट देण्यात येईल. जिल्ह्यात १० कोविड केअर सेंटर आणि ०२ कोविड हॉस्पिटल आहेत. जिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर असून १२ व्हेंटिलेटरची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील सतरा शासकीय निवारागृहात ७७८ स्थलांतरित कामगार आश्रयाला आहेत. इतर राज्यातील २२० कामगारांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २6९ कोटी रुपये बोनस मिळणार असून त्यापैकी ११३ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. २४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७४ कोटी रुपये बोनस म्हणून वाटप केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
         डॉ.राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात ग्रामपंचायत अंतर्गत रोहयोची विविध प्रकारची कामे सुरु असून या कामांवर एक हजार मजूर सामाजिक अंतर ठेवून काम करीत आहे. मजुरांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
         पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त असून ५४ अधिकारी आणि १८०० पोलीस विविध ठिकाणी तैनात आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांच्या आणि अन्य जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. २०६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना हेल्पलाइन व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
00000


Friday, 24 April 2020

कोरोना मुकाबल्यासाठी सर्व ग्रामपंचायत सज्ज



     कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जग भयभीत झाले आहे. कोरोना हे आजच्या घडीला जगावर आलेले मोठे संकट आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन एकजुटीने प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन हे आरोग्य यंत्रणा, पोलीस विभागासह अन्य यंत्रणांना सोबत घेऊन दिवस-रात्र काम करीत आहे.
        जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जिल्हा परिषद काळजी घेत असून कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच 545 ग्रामपंचायती सज्ज आहेत. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये हॅन्डवॉश स्टेशन सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी हात कशाप्रकारे धुतले पाहिजे याची तांत्रिक माहिती देणारे बॅनर या सर्व ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आले आहे. सचित्र बॅनरवरून हात कशाप्रकारे धुवावे याची माहिती ग्रामस्थांना मिळत आहे. कोरोना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे याबाबत जागृती करणारे बॅनर्स जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवरील माहिती वाचून नागरिक दक्ष होत आहे, सोबत इतरांना सुद्धा कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत माहिती देत आहेत.
        जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जंतूनाशकाची फवारणी करण्यात आल्यामुळे कोरोनासह अन्य आजारांना प्रतिबंध घालण्यात मदत झाली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीच्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. त्यामुळे रोगराईस प्रतिबंध करण्यास हातभार लागला आहे. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पुढाकार घेतल्यामुळे  ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. 
       कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात बाहेर राज्यात, जिल्ह्यात रोजगारासाठी  गेलेले गावातील व्यक्ती परत गावात आल्यास त्या व्यक्तीची तसेच विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती  गावातील नागरिकांनी सरपंच, तहसीलदार यांना देऊन त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्याने आवश्यकता असल्यास त्यांचे घरीच अलगीकरण देखील करण्यात आले. त्यांच्यावर ग्रामस्थांचे लक्ष होते. यावरून कोरोना विषाणूबाबत ग्रामस्थ किती जागृत आहेत हे यापूर्वीच दिसून आले आहे. गावातील काही गरीब व गरजू व्यक्ती आहेत ज्यांना योजनांचा लाभ मिळू शकत नाही अशांच्या मदतीसाठी  ग्रामपंचायत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देखील केली आहे. काही ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना मास्कचे वाटप केले आहे. कोरोनविरुद्धची ही लढाई जिंकण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती तयारीनिशी सज्ज झाल्या आहेत. ग्रामस्थांची सजगता, ग्रामपंचायतींनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, शासन आणि प्रशासनाचे लाभलेले पाठबळ यातून कोरोनाविरुद्धची लढाई ग्रामपंचायती निश्चितच जिंकतील.
00000