जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday, 25 January 2020

विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री अनिल देशमुख

                                      जिल्हा नियोजन समितीची सभा

181 कोटी 69 लाखाच्या सन 2020-21 च्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
                                  


        जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीतून यंत्रणांनी विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
           24 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, विजय रहांगडाले, सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री पुढे म्हणाले, ज्या शाळांच्या आवारात विजेच्या डीपी, रोहीत्रे आणि वरून इलेक्ट्रिक तागेलेले आहेत ते तातडीने काढण्याची कार्यवाही वीज वितरण कंपनीने हाती घ्यावी. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये. ही कार्यवाही करण्यासाठी ज्या दहा कोटी रुपये निधीची मागणी केली आहे, तो निधी मिळविण्यासाठी सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा. ज्या कृषी पंपांना मागणी करूनही वीज पुरवठा करण्यात आलेला नाही त्यासाठी देखील पाठपुरावा करून प्रलंबित वीज जोडणीचा प्रश्न सोडवावा. जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीशी संबंधित असलेल्या विविध समस्यांवर लवकरच नागपूर येथे ऊर्जा मंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
         मुख्यमंत्री पांदन रस्ते योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, जिल्हा नियोजन समितीला यावर्षी या योजनेसाठी निधी उपलब्ध झाला नाही.न्य योजनांमधून  योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यास या योजनेची कामे करता येतील. या योजनेसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी रोहयो मंत्र्यांकडे मुंबईला बैठक घेण्यात येईल. निमाला डावलून रोहयो आणि वन विभागात कामे झाली असल्यास संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
        तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी ज्या स्थळांचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार नाही तोपर्यंत पुढील कारवाई करता येणार नसल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, जनसुविधा निधीची मागणी करताना संबंधित गावांमध्ये कोणकोणती कामे करण्यात आली, कोणकोणत्या कामासाठी निधीची आवश्यकता आहे त्याबाबतची मागणी करावी. प्राधान्याने जनसुविधा निधीपासून वंचित असलेल्या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दयावा. हा निधी देतांना जिल्ह्यातील आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांना विश्वासात घ्यावे. मुंबई मॅरेथॉनमध्ये जिल्ह्याती जास्तीत जास्त धावपटू भविष्यात सहभागी होतील याचे नियोजन पोलिस विभागाने करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असेही देशमुख यांनी सांगितले.                                                                                                                                                  खासदार मेंढे म्हणाले, ज्या ग्रामपंचायतींना जनसुविधा निधी आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आला नाही, त्या ग्रामपंचायतींना तो निधी उपलब्ध करून द्यावा असे सांगितले.
      आमदार डॉ.फुके म्हणाले, वनविभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे ते म्हणाले.
      आमदार अग्रवाल म्हणाले, अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आलेल्या नाही, तातडीने त्या वीज जोडण्या दयाव्यात. सन 20-21 च्या आराखड्यात नियतव्यय वाढवून मिळावा, त्यामुळे अनेक विकास कामे करता येतील. ज्या ग्रामपंचायतीला जनसुविधा निधी मिळाला नाही त्यांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला पाठवावे असे म्हणाले.
      आमदार रहांगडाले म्हणाले, वैनगंगा नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे नदी काठावरील अनेक गावांचे नुकसान होते, या गावासाठी पूरनियंत्रणकरिता दरवर्षी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी असे ते म्हणाले.
       आमदार चंद्रिकापुरे म्हणाले, विकास कामे करतांना संपूर्ण जिल्हा डोळ्यापुढे ठेवून कामे करण्यात यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. सर्वांना सारखा न्याय मिळेल या भावनेतून काम केले पाहिजे.
       आमदार कोराेटे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती हया विकासापासून वंचित आहे. अशा ग्रामपंचायतीच्या विकासासाठी जनसुविधा निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
               यावेळी समितीने जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 च्या 181 कोटी 69 लक्ष 51 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता प्रदान केली. यामध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण 126 कोटी 20 लक्ष 67 हजार रुपये, अनूसूचित जाती उपयोजना 10 कोटी 88 लाख 20 हजार रुपये,  आदिवासी उपयोजना 39 कोटी 71 लाख 99 हजार रुपये आणि आदिवासी क्षेत्र बाहय योजना व माडाच्या 4 कोटी 88 लाख 65 हजार रुपयाच्या निधीचा समावेश आहे.
        जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 या वर्षात डिसेंबर 2019 अखेर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 46 कोटी 92 लाख 45 हजार रुपये (61.83 %), अनुसूचित जाती उपयोजना 11 कोटी 53 लाख 61 हजार रुपये (90.77 %). आदिवासी उपयोजना 15 कोटी 64 लाख 39 हजार रुपये (75.84 %) आणि आदिवासी क्षेत्र बाहय योजना व माडा 4 कोटी 89 लाख 34 हजार रुपये (84.62 %) इतका खर्च झाला आहे.
         जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत पुनर्विनियोजनाचे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 13 कोटी 60 लाख 38 हजार रुपये, अनुसूचित जाती उपयोजना 1 कोटी 33 लाख रुपये, आदिवासी उपयोजना 20 कोटी 28 लाख 60 हजार रुपये आणि आदिवासी क्षेत्र बाहय योजना व माडाच्या 12 कोटी 92 लाख 54 हजार रुपयांच्या पुनर्विनियोजनाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
         सन 2019-20 या वर्षात शेतकरी बचतगटांकरीता कृषी अवजारे बँक 2 कोटी 46 लाख 50 हजार रुपये. प्राथमिक शाळांमध्ये अध्ययनस्तर निश्चिती व गुणवत्ता विकास करण्याकरीता रुपये 76 कोटी 26 लक्ष. महसूल विभागाला डिजिटल इंडिया लँड रेकाडर्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत तलाठी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप प्रिंटरचा पुरवठा करण्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांमध्ये जलशुध्दीकरण यंत्र बविण्यासाठी 77 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्हयात नियोजन भवन बांधकामासाठी 5 कोटी रुपयाची तरतुद सन 2020-21 च्या आराखडयात प्रस्तावित करण्यात आली आहे.
         भेला सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, समितीचे सदस्य हाजी अल्ताफ हमीद अली, विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवणे, लता दोनोडे, पी.जी.कटरे, रमेश चुऱ्हे, विनीत सहारे, दुर्गा तिराले, प्रीती रामटेके, नोज डोंगरे, माधुरी पातोडे, सरिता कापगते, कैलास पटले, मंदा कुमरे, कमलेश्‍वरी लिल्हारे, स्वेता मानकर, हेमलता तेह, आशिष बारेवार, ललिता चौरागडे, विमल नागपुरे, दीपकसिंह पवार, राजेश भक्तवर्ती यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती, योजनेच्या बाबतचे सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांनी केले. उपस्थितांचे आभार एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी मानले.                                          

Tuesday, 7 January 2020

आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय कामकाज होणार सुलभ - जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे


आय-पास संगणक प्रणालीवर कार्यशाळा
      जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज ‘पेपरलेस’ होण्याच्या दृष्टीने ‘आय-पास’ ही वेब बेस्ड संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यात ही प्रणाली राबविण्याकरीता मान्यता देण्यात आली असून या आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय कामकाज करणे सुलभ होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.
        7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आय-पास या संगणकीय प्रणालीवर कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी डॉ.बलकवडे बोलत होत्या. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी़ एस.ई.ए.हाश्मी, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीमती बुलकुंडे, ईएसडीस कंपनीचे किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
        डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, आपणास आय-पास प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही प्रणाली येत्या 1 एप्रिल 2020 पासून सुरु करण्यात येत असल्यामुळे सर्वांनी या आय-पास प्रणालीमध्ये लक्ष देवून कामे करावीत. कोणाला काही शंका असल्यास संबंधितांकडून त्याचे निरसन करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले.
        डॉ.दयानिधी म्हणाले, आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय काम करणे सोईचे होणार आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
        श्री.सुटे म्हणाले, आय-पास प्रणाली योग्यप्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. या प्रणालीमुळे पारदर्शक प्रशासन, गतिमान प्रशासन, परिणामकारक सनियंत्रण, लोकाभिमुख प्रशासन व पेपरलेस कामकाज होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
        श्री.पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना, खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, पर्यटन विकास कार्यक्रम, अल्पसंख्याक विकास कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम इत्यादी योजनांना प्रशासकीय मंजूरी, निधी वितरण व युटीलायझेशन सर्टिफिकेट याबाबत सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली.
        प्रास्ताविक व संचालन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदिप भिमटे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांनी मानले. कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Monday, 6 January 2020

केंद्र शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यत पोहोचवा - खा.अशोक नेते

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा

           केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.
        6 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.नेते बोलत होते. खा.सुनिल मेंढे, आ. विनोद अग्रवाल, आ.मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        खा.नेते पुढे म्हणाले, केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही असे दिसून येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगून श्री.नेते म्हणाले, यासाठी कृषि विभागाने गावपातळीवर या योजनेची माहिती शेतकऱ्यांना दयावी. शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा. नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना वेळीच मदत करावी. गरीब व गरजू व्यक्तींना यादृष्टीने लाभ देण्यासाठी प्रशासनाने लक्ष दयावे, असे त्यांनी सांगितले.
        प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना ही बेरोजगार व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून श्री.नेते म्हणाले, बँकांनी या योजनेअंतर्गत तीन गटातून कर्ज देतांना बेरोजगारांची दिशाभूल करु नये. जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी प्रबंधक यांनी मुद्रा बँक योजनेत व्यक्तीश: लक्ष घालून बँकांना निर्देश दयावे असे सांगितले.  
        जिल्ह्यातील वन जमिनीवरील अतिक्रमण नियमीत झाले पाहिजे असे सांगून श्री.नेते म्हणाले, नवनवीन कृषि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषि विभागाने प्रोत्साहित करावे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होवून पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
        खा.मेंढे म्हणाले, बिरसी विमानतळाजवळ आबादी प्लॉटवर 15 लोकांनी घरे बांधलेली आहेत. विमानतळ विभागाकडून सदर घरे खाली करण्याकरीता संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. त्याठिकाणी बऱ्याच वर्षापासून 106 लोक थांबलेली आहेत. त्या लोकांना योग्य तो न्याय देवून प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.
       शेतकऱ्यांना गोठा बांधकामाची गरज आहे. त्यासाठी कोणतेही काम ठरलेल्या वेळेतच झाले पाहिजे. व्यक्तीगत लाभाचे प्रलंबीत कामे लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या घरांचे, गोठ्याचे नुकसान झाले असल्यास त्यांना योग्य लाभ देण्यात यावा. नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्युत कनेक्शन कापू नये. मुद्रा योजनेचा लाभ बेरोजगार व गरजू व्यक्तींनाच दिला पाहिजे यासाठी लक्ष घालण्यात येत असून बेरोजगारांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
       आ. अग्रवाल म्हणाले, मुद्रा लोनबाबत बँकांची फारच उदासिनता दिसून येत आहे. यावर जिल्हास्तरीय मुद्रा समितीने योग्य तो निर्णय घेवून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले. आ. चंद्रिकापुरे म्हणाले, गोंगले ते कोसमतोंडी रेल्वे रस्त्याचे काम प्रलंबीत असल्यामुळे ते काम पूर्ण करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
        सभेला उपस्थित काही गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींनी समस्या मांडल्या. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, जि.प.सदस्य रचना गहाणे, नगरसेविका भावना कदम यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक श्री. हाश्मी यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैशाली खोब्रागडे यांनी केले.
00000


Friday, 3 January 2020

सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरुक रहावे - जगदिश पांडे

सायबर सेफ उमेनअंतर्गत कार्यशाळा


        दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत चालली आहे. महिला व बालकांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे असून तसेच सायबर सुरक्षिततेबाबत देखील प्रत्येकाने जागरुक रहावे. असे आवाहन गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांनी केले.
        आज 3 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात गोंदिया पोलीस दलाच्यावतीने ‘सायबर सेफ वुमेन’ मोहिमेअंतर्गत महिला व बालकांवरील अत्याचार व सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती कार्यशाळेत मुख्य अतिथी म्हणून श्री. पांडे बोलत होते.
        यावेळी पोलीस निरीक्षक राहूल शिरे, ॲड. हेमलता पतेह, नगरसेविका संगीता घोष, पुजा तिवारी, प्रमिला सिंद्रामे, भावना कदम, पत्रकार अपुर्व मेठी, गजेंद्र फुंडे व श्री असाटी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        प्रारंभी सायबर साक्षरता ही काळाची गरज आहे याबाबत व्हिडिओ क्लीप दाखविण्यात आली.
        श्री. शिरे यांनी महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी सर्रास इंटरनेटचा वापर होत असल्यामुळे त्यावर आपण काय उपाय केले पाहिजे याबाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे विस्तृत माहिती दिली.
        ॲड. हेमलता पतेह म्हणाल्या, इंटरनेट किंवा मोबाईल हाताळतांनी सावध राहण्याची गरज आहे. मुलांना लहान वयातच चांगले संस्कार दिले पाहिजे. गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी महिला व बालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
        श्रीमती घोष म्हणाल्या, सायबर गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस विभागातील सायबर सेलची मदत घेण्यात यावी. मोबाईलचा वापर करतांना सावधगिरी बाळगायला पाहिजे, यासाठी आई-वडिलांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.
        श्री. फुंडे म्हणाले, सामाजिक गुन्हेगारीला दूर करण्यासाठी सायबर सेलची आवश्यता आहे. नारी अबला नाही, नारी आज सबला आहे, त्यासाठी व्यवहार सांभाळून करावे. समाजशील चांगली कामे करुन समाजाला उन्नतीकडे न्यावे असे त्यांनी सांगितले.
       प्रभाकर पालांदूरकर यांनी सोशल मीडियाचा वापर करतांना आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत विस्तृत माहिती दिली. चाईल्ड लाईफ संस्थेचे अशोक बेडेकर यांनी 1098 यावर फोन केल्यास नक्कीच आपल्याला मदत मिळेल असे सांगितले.
        संचालन संजय मारवाडे यांनी केले, उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक राहूल शिरे यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थीनी, शिक्षिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधी, पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या महिला सभासद तसेच मुलांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गोंदिया पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Friday, 27 December 2019

गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा संपन्न



उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसंस्थांचा सत्कार
                               • बचतगटांना कर्ज मंजूरीपत्रांचे वितरण

     महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती गोंदिया, नियोजन विभाग महाराष्ट्र शासन, तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, गोरेगाव यांच्या संयुक्त वतीने आज 27 डिसेंबर रोजी गुरुकृपा लॉन, गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. उदघाटक म्हणून गोरेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती आरती चव्हाण उपस्थित होत्या.
         नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा गोरेगावचे व्यवस्थापक श्री.कांबळे, आय.सी.आय.सी.आय. बँकेचे सुभाष राऊत व पंकज बिरीया, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वय रजनी रामटेके यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
        आरती चव्हाण म्हणाल्या, महिलांचा कुठेतरी आर्थिक विकास व्हायला पाहिजे, यासाठी बचतगटाच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय चांगले काम करीत आहे. माविमद्वारे महिला बचतगटांना लघु उद्योग म्हणून एक चांगले प्लेटफॉर्म मिळाले आहे असे त्यांनी सांगितले.
         सुनिल सोसे म्हणाले, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. महिलांना मुद्रा योजनेची माहिती व्हावी तसेच मुद्रा याजनेचा लाभ कशाप्रकारे मिळू शकतो याबाबत माहिती देवून प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे शिशु गट- 50 हजार रुपये, किशोर गट- 5 लाख रुपये व तरुण गट- 10 लाख रुपये कर्ज बँकेद्वारे मंजूर करण्यात येते. महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. बँकेद्वारे घेतलेल्या कर्जाची महिला प्रामाणिकपणे परतफेड करतात. महिला बचतगटांना बँकेचे कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले.
         नीरज जागरे म्हणाले, नाबार्डद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजना योजना आहेत, त्या राज्य शासन राबविते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बचतगटातील महिलांनी आर्थिक विकास करुन घ्यावा असे त्यांनी सांगितले.
        रजनी रामटेके म्हणाल्या, आज महिलांवरचे अन्याय व अत्याचार कमी झालेले नाही तर ते वाढतच चालले आहे, यावर विचार करणे गरजेचे असून यासाठी सुरक्षेची अत्यंत गरज आहे. महिलांना कायद्याची जाणिव असायला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे आहेत, त्या कायद्याविषयी त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.
        डॉ.सविता बेदरकर म्हणाल्या, स्त्रीया हया समाजाचा दागिना आहेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार दयावे. प्रत्येकाने समाजशील व्हावे. तळागाळातील लोकांना मदत करावी. महिलांनी अन्यायाविरुध्द लढा दयावा असे त्यांनी सांगितले. यावेळी आय.सी.आय.सी.आय. बँकेचे सुभाष राऊत व तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा नलिनी डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        यावेळी निर्मल ग्रामसंस्था महाजनटोला व अलंकीत ग्रामसंस्था घोटी या उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसंस्थांचा आणि उत्तम सर्वात जास्त कर्ज उचल करणाऱ्या संजीवनी आदिवासी बचतगट गोवारीटोला व श्रीगणेश महिला बचतगट गोरेगाव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         विदर्भ कोकण ग्रामीण बँक गोरेगाव द्वारे मनिषा बिसेन (सेंट्रींगकाम), चंद्रकांता पटले (शिवणकाम) व रुखमा हरिणखेडे (शिवणकाम) यांना प्रत्येकी 50 हजार रुपये आणि आय.सी.आय.सी.आय. बँक द्वारे जनलक्ष्मी महिला बचतगट महाजनटोला- 1,36000/-, जागृती महिला बचतगट हलबीटोला- 1,26000/-, एकता महिला बचतगट चंद्रपूरटोली- 2,16000/- व त्रिवेणी महिला बचतगट चंद्रपूरटोली यांना 1,75000 हजार रुपयाचे मुद्रा लोन कर्ज मंजूरी पत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
       यावेळी ‘‘तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र गोरेगाव’’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये रेडिमेड कापड, फुलवाती, इमिटेशन ज्वेलरी, सेंद्रीय शेतीपासून तांदळाचे उत्पादन, खानावळ, हळद उत्पादन इत्यादी स्टॉल्सला भेटी देवून मान्यवरांनी विचारपूस केली.
         प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी केले. संचालन योगीता राऊत यांनी, तर उपस्थितांचे आभार पदमा सरोजकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम सोनवाने तसेच तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा नलिनी डोंगरे व सर्व सहयोगीनी यांनी सहकार्य केले.

Sunday, 8 December 2019

सर्वांना न्याय मिळवून देण्यासोबतच राज्याला दिशा देण्याचे काम करणार - विधानसभा अध्यक्ष पटोले


                                     गोंदिया येथे नागरी सत्कार समारंभ





             भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी विधानसभा अध्यक्ष या पदाचा उपयोग करुन घेण्यात येईल. राज्यातील सर्वांना न्याय मिळवून देण्यासोबतच राज्याला दिशा देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
            गोंदिया येथील सुभाष हायस्कूलच्या मैदानावर 8 डिसेंबर रोजी भंडारा आणि गोंदिया जिल्हा नागरी सत्कार समितीच्या वतीने विधानसभा अध्यक्षपदी आमदार नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल तसेच दोन्ही जिल्ह्यातील नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात सत्काराला उत्तर देताना श्री नाना पटोले बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. प्रमुख अतिथी म्हणून रिपाई(गवई गट)चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई हे होते. सत्कारमूर्ती म्हणून आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, राजू कारेमोरे, नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर माजी खासदार मधूकर कुकडे, माजी मंत्री भरत बहेकार, नाना पंचबुध्दे, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी जि.प.अध्यक्ष टोलसिंग पवार, के.आर. शेंडे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सूनील फुंडे, गोंदिया जिल्हा शिवसेनाप्रमुख मुकेश शिवहरे, गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंचम बिसेन, गोंदिया काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, गोंदिया न.पा.उपाध्यक्ष शिव शर्मा, धनंजय दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
               श्री पटोले पुढे म्हणाले, माझ्या जन्मगावी हा सत्कार होत असल्याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. जिल्हयातील प्रत्येक गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी त्या गावाचा विकास आराखडा तयार करावा व तो आपल्याला सादर केल्यास आपण निश्चितच या गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहोत.  दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे आपल्यावर ऋण आहेत त्याची परतफेड त्यांचा विकास करुन आपल्याला करावयाची आहे. दोन्ही जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगार, शेतमजूर अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्यांची निश्चितपणे आपण सोडवणूक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे पाणी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 9 तालुक्यात पोहोचणार असल्याचे सांगून श्री पटोले म्हणाले, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात सिचंनाची व्यवस्था मोठया प्रमाणात निर्माण होवून जिल्हयाच्या विकासाला गती मिळणार आहे.  बेरोजगारीवर देखील सिंचन सुविधेमुळे मात करता येईल. दोन्ही जिल्ह्यात बारमाही सिंचनाच्या व्यवस्थेवर आपला भर राहणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदीचे पैसे दोन दिवसात देण्याची व्यवस्था करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दोन्ही जिल्हयात आणखी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल.
धानाची भरपाई आठ दिवसात झाली पाहिजे अशी सुविधा निर्माण करण्यात येईल असे सांगून श्री पटोले पुढे म्हणाले,  दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. राज्य सरकारच्या निधीचा योग्य वापर विकास कामासाठी झाला पाहिजे याकडे आपले विशेष लक्ष राहणार आहे. सर्वांनी मिळून दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्यास हातभार लावला पाहिजे तरच जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. मागास जिल्हे म्हणून दोन्ही जिल्ह्याची ओळख आहे ही आपण मिटवून टाकू. गोंदिया जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांना वनजमिनीचे पट्टे देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
            अध्यक्ष म्हणून बोलतांना खासदार प्रफुल पटेल म्हणाले, आजच्या या नागरिक सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष आज एकत्र या मंचावर दिसत आहे. दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी हे सर्व एकत्र आले आहेत. विकासासाठी एकत्र येऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री पटले पुढे म्हणाले,  नाना पटोले हे संघर्षमय व्यक्तिमत्व आहे. आमचे कर्तव्य आहे की ज्या जनतेमुळे हे पद आम्हाला मिळाले आहे त्यांच्यासाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वच नेते विकासासाठी एकत्र येतांना दिसतात, आपल्याकडे मात्र असे होतांना दिसत नाही, ते झाले पाहिजे तरच आपल्या दोन्ही जिल्हयाचे चित्र बदलण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
               राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर अध्यक्ष म्हणून आली असल्याचे सांगून श्री पटेल पुढे म्हणाले, धापेवाडासारखे आणखी काही बंधारे जिल्ह्यात बांधण्यात येतील. त्या बंधाऱ्यातील पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता धानासोबतच अन्य पिकाकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा वापर अन्य पिकांसाठी केला तर जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. जिल्हयातील शेतकऱ्यांना  आज दिशा देण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचा हातभार लागला तर जिल्ह्याच्या विकासाचे चित्र बदललेले दिसेल. आणि हे दोन्ही जिल्हे विकासाच्या बाबतीत अग्रेसर झालेली दिसतील, असे त्यांनी सांगितले.
                आमदार अग्रवाल म्हणाले, आज आनंदाचा क्षण आहे. सर्वांनी मिळून जिल्हयाच्या विकासात हातभार लावला तर दोन्ही जिल्हे विकासात अग्रेसर असतील. प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वामुळे दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणर आहे. जिल्ह्यातील शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. प्र फुल पटेल व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे निश्चितच आपले योगदान देतील. सर्वांच्या प्रेमामुळे मला विधानसभेत जाण्याची संधी इथल्या मतदारांनी दिली आहे. त्यांचे ऋण या पाच वर्षात विकास कामाच्या माध्यमातून फेडण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
             आमदार भोंडेकर म्हणाले, दोन्ही त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खा. प्रफुल पटेल व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे अधिक गती मिळणार आहे. जिल्हयातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आता आम्हाला थेट नानाभाऊंकडे जाता येईल. विधानसभेत दोन्ही जिल्हयाचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जिल्हयाच्या विकासाला निश्चित गती देवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
           आमदार चंद्रीकापूरे म्हणाले, अर्जुनी मोरगाव तालुक्याला सिंचनातून समृध्द करण्यात इटियाडोह प्रकल्पाचा महत्वाचा वाटा आहे. इटियाडोहचे कालवे 70 किलोमीटरपर्यंत आहे हे कालवे सिमेंटचे झाले तर या प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होणार नाही. या पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी होण्यास मदत होईल. जिल्ह्याला नाना पटोले अध्यक्षपदावरून न्याय देतील. चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे नानाभाऊंनी काम करावे. विकास कामांचा मोठा अनुभव खा. प्रफुल पटेल यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे निश्चितच आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. दोन्ही जिल्हयातील प्रश्न सोडविले पाहिजे. विकासाची गंगोत्री जिल्ह्यातील धापेवाडा टप्पा दोनच्या पाण्याच्या माध्यमातून येण्यास मदत होणार असल्यामुळे हे काम लवकर व्हावे. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
         आमदार रहांगडाले म्हणाले, सर्वपक्षीय सत्कार आज होत आहे, यातून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी आज संकटात आहे. त्याला आधार देण्याचे काम विधानसभेत आमच्या जिल्ह्यातील समस्या मांडून त्या सोडविण्यावर आम्हाला निश्चितच वेळ मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
          आमदार कारेमोरे म्हणाले, दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वामुळे गती मिळणार आहे. शेती व शेतीवर आधारित उद्योगाला या नेतृत्वामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. धान उत्पादक  शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासोबतच अनेक समस्यांची सोडवणूक करण्यास त्यांची मदत होईल. समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला आता थेट विधानसभा अध्यक्षांकडे जाता येईल. दोन्ही जिल्ह्यातील समस्या त्यांच्या लक्षात आणून देऊन त्या सोडविण्यास पुढाकार घेण्यास आम्ही त्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले.
             आमदार कोरोटे म्हणाले, देवरी हा आदिवासी तालुका असून हा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे. या तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प असून हा तालुका सिंचनापासून वंचित आहे. आमगाव, सालेकसा व मध्यप्रदेशमध्ये या तालुक्यात असलेल्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. परंतु या तालुक्याला सिंचनापासून वंचित राहावे लागते. देवरी मतदारसंघात  शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था झाल्यास इथला शेतकरी समृध्द होईल असे त्यांनी सांगितले. या तालुक्यात सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यासाठी या प्रकल्पांचा तालुक्यातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याकडे आपण लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
              खा. प्रफुल पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  तसेच नवनिर्वाचित आमदारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन व जि.. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले. उपस्थितांचे आभार विनोद जैन यांनी मानले. प्रारंभी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.