गोंदिया, दि. 16 : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि लोकाभिमुख सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने दि.17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पात्र नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात. जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले.
शासनाच्या विविध विभागांमार्फत नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, अनेकदा योजनांची माहिती, पात्रता निकष किंवा अर्ज प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे काही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी संबंधित विभागांना दिल्या.
अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रशासनाने पोहोचून त्यांना उपलब्ध शासकीय योजनांची माहिती द्यावी. पात्र लाभार्थ्यांची ओळख करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. ‘शासकीय योजनांचा दीप लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलीत झाला पाहिजे’, या उद्देशाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
अभियानांतर्गत विविध विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना देणे, पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
शासकीय यंत्रणेने केवळ योजना जाहीर करण्यापुरते मर्यादित न राहता ‘पात्र लाभार्थी शोधा आणि त्याला योजनेचा लाभ मिळवून द्या’ या दृष्टिकोनातून काम करावे. प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती आणि सेवा पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी सांगितले.
नागरिकांनी आपल्या गावातील संबंधित शासकीय कार्यालये, सेवा केंद्रे तसेच अभियानांतर्गत आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध योजनांची माहिती घ्यावी आणि पात्रतेनुसार योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000000
No comments:
Post a Comment