गोंदिया, दि.8 : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि.४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी हा टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देत आहे.
नागपूर विभागातील संवाद दि.१६ सप्टेंबर २०२६ रोजी डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित घटकांना आपल्या सूचना, अडचणी व अनुभव थेट टास्क फोर्ससमोर मांडता येणार आहेत.
भरती परीक्षा प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांना येणाऱ्या अडचणी, परीक्षा केंद्रांशी संबंधित बाबी, परीक्षा प्रक्रिया, सुरक्षितता, पारदर्शकता तसेच उमेदवारांच्या अपेक्षा याबाबतच्या सूचना या संवादातून जाणून घेण्यात येणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यासह नागपूर विभागातील नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी प्राप्त सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.
बैठकीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
00000000
No comments:
Post a Comment