आदिवासी
मुला-मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण
राज्यातील 61 टक्के आदिवासी समाज हा आजही दारिद्रयरेषेखाली
जीवन जगत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे. शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे
विविध क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आदिवासी बांधव कमी आहेत. शासन आदिवासी
बांधवांच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक योजना असून विद्यार्थ्यांनी प्रगती साधण्यासाठी मोठी
स्वप्ने बघावी व त्यासाठी कठोर परिश्रम करावे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार
बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी येथे 17 नोव्हेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी
कार्यालयाच्या वतीने बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे
लोकार्पण व विविध योजनांच्या साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे,
पं.स.सभापती कविता रंगारी, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.माजी
समाजकल्याण सभापती श्रावण राणा, माजी पं.स.सभापती संतोष मडावी, लक्ष्मीकांत
धानगाये, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त दिपक हेडावू, उपविभागीय अभियंता
प्रकाश लांजेवार, शाखा अभियंता श्री.ताकसांडे, श्री.वासनिक, जिल्हा व्यवसाय व
प्रशिक्षण अधिकारी श्री.घुले, प्राचार्य जाधव यांची उपस्थिती होती.
श्री.बडोले
म्हणाले, आदिवासी मुले ही शरीराने काटक असतात. खेळाच्या मैदानात ते आपली कर्तबगारी
सिध्द करतात. त्यांना जर ॲथलेटिक्ससारख्या क्रीडा प्रकारात चांगले मार्गदर्शन
मिळाले तर ते मोठी झेप घेवू शकतात. घरची परिस्थिती चांगली नाही त्यामुळे शिक्षण
घेता येत नाही ही मानसिकता दूर झाली पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे
प्रमाण वाढले पाहिजे तरच प्रगती होईल, सोबतच बेरोजगारी कमी होण्यास सुध्दा मदत
होईल. विदेशात सुध्दा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा आदिवासी विकास
विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अनेक आदिवासी बांधवांच्या पिढ्या
दारिद्रयरेषेखाली जगल्या, पण येणाऱ्या पिढ्यांनी चांगले शिक्षण घेवून आपली प्रगती
करावी असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार
पुराम म्हणाले, वसतिगृहाच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात
नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक मोठ्या व्यक्ती वसतिगृहात शिक्षण घेवून मोठ्या
पदावर गेले आहेत. वसतिगृहात राहतांना विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी आपल्या
शिक्षणाकडे लक्ष दयावे. चांगले शिक्षण घेवून शिक्षणाच्या माध्यमातून वसतिगृहाचा
नावलौकीक करावा. विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या चरित्रांचे वाचन करुन त्यांचा
आदर्श पुढे ठेवून शिक्षण घ्यावे असेही ते म्हणाले.
श्रीमती
गहाणे म्हणाल्या रस्ते, इमारती हा विकास नसून आदिवासींची मुले-मुली शिक्षीत झाली
तरच विकास झाला असे म्हणता येईल. सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना
पोहोचल्या तर त्यांच्या विकासाला गती मिळेल. आदिवासी विद्यार्थ्यांना स्वावलंबी
करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
प्रारंभी
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नव्यानेच बांधण्यात आलेल्या आदिवासी
मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. नाविण्यपूर्ण
योजनेतून क्रीडा विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश व कीट देण्यात
आली. तसेच आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या साहित्याचे वाटप मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला आदिवासी वसतिगृहातील मुले-मुली त्यांचे पालक व विविध आदिवासी
योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार जव्हार
गाढवे यांनी मानले.

No comments:
Post a Comment